आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताने २०२० मध्ये एक नवा नकाशा जगासमोर आणला होता, यामुळे आपला शेजारी देश नेपाळ चांगलाच भडकला.
या नकाशात कालापाणी नावाच्या वादग्रस्त भूभागाला भारताने उत्तराखंड राज्याचा भाग दाखवला.
या प्रसंगी नेपाळने त्वरित पत्रक काढले आणि हे अत्यंत चुकीचे आणि अस्वीकारार्ह असल्याचं मत नोंदवलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे तत्कालीन प्रवक्ते रविष कुमार यांनी मात्र भारताकडून जारी करण्यात आलेला नकाशा हा शंभर टक्के बरोबर असल्याचे मत नोंदवले. त्यांनी सांगितले की सध्याची सीमारेखा ही नियमानुसारच आखण्यात आली आहे. यात कुठल्याही प्रकारे नेपाळच्या भूभागावर दावा करण्यात आलेला नाही.
कालापाणी हा ३५ वर्ग किलोमीटरचा भूभाग असून, या भूभागावर नेपाळ आणि भारत दोन्ही दावा करतात. महाकाली नदी याच कालापाणी भागातून जाते.
भारत आणि नेपाळ कालापाणीला आपला भूभाग समजतात. भारतात त्याला उत्तराखंडच्या पिटोरागड आणि नेपाळमध्ये दारचुला जिल्ह्याचा भाग समजला जातो.
कालापाणी हे एक जंक्शन असून, यात नेपाळ-भारत आणि चीनची सीमा येते. या भागात १९६२ पासून इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस कार्यरत आहेत.
या भागातून जाणारी महाकाली ही नदी या भारत नेपाळमधील वादाचे कारण आहे. १८१६ च्या सेगुलीच्या करारानुसार ब्रिटिशांनी महाकाली नदीला भारताची आणि नेपाळची पश्चिमी सीमारेषा म्हणून घोषित केले होते. महाकाली नदीच्या अनेक उपनद्या कालापाणी परिसरात एकत्र येतात.
भारताचा असा दावा आहे की महाकाली नदीचा उगम कालापाणी भागात होतो, म्हणून त्यावर भारताचा अधिकार आहे, तर नेपाळच्या मते महाकालीच्या सर्वात मोठ्या उपनदीचा आणि अनेक उपनद्यांचा उगम लिपु लेक पास येथे होतो त्यामुळे महाकाली नदीवर त्यांचा हक्क आहे.
नेपाळच्या मते महाकाली नदीचे संपूर्ण खोरे निर्विवादपणे त्यांचे आहे. लिपु गड असे महाकाली नदीच्या सर्वात मोठ्या उपनदीचे नाव आहे.
याविषयी भारताचे असे म्हणणे आहे की महाकालीचा उगम हा लिपुगड आणि कालापाणीचा जलप्रवाहांच्या एकत्रितकरणाने होतो. त्यामुळे संपूर्ण कालापाणी परिसर महाकाली नदीच्या उगमस्थानासकट भारताचा आहे.
आपल्या या भूभागावरचा दावा सिद्ध करण्यासाठी भारताने १८३० सालचे प्रशासकीय आणि कराची कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रानुसार कालापाणी हा भाग पिठोरागड (जो आज उत्तराखंडमध्ये आहे) या जिल्ह्यामध्ये येतो.
भारताने ब्रिटिशांद्वारे १८७० साली महाकालीच्या खोऱ्यात केलेल्या सर्वेक्षणाची कागदपत्रे प्रकाशित केली आहेत. १८७९ साली देखील ब्रिटिशांनी त्याला आपला भूभाग म्हणून उल्लेखले आहे. नेपाळने देखील १८५० आणि १८५६ साली असाच एक नकाशा दिला असून त्यानुसार महाकालीचा उगम कालापाणी भागात दाखवण्यात आला आहे.
एकोणिसाव्या शतकातील हा वाद बऱ्याचदा पुन्हा पुन्हा डोकं वर काढत असतो. १९९६ साली भारत आणि नेपाळमध्ये करार झाला होता. हा करार असाच घडला नव्हता, त्यासाठी नेपाळमध्ये राष्ट्रवादी चळवळ उभी राहिली. १९८१ साली त्यांनी वाद मिटवण्यासाठी जॉईंट टेक्निकल बॉण्डरी कमिटीची स्थापना केली.
सद्य:परिस्थित हा सीमेचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देश चर्चा करत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








