आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘आपण कधीच अशा पदाचा स्वीकार करू नये, ज्याला आपण पूर्ण न्याय देण्यास असमर्थ आहोत’
हे शब्द के. कामराज नावाच्या एका धोरणी राजकारण्याचे आहेत, जे स्वतःच्या सैद्धांतिक राजकारणासाठी ओळखले जातात. राजकारणात बऱ्याचदा तत्त्वं बाजूला ठेवून तडजोडीच्या भूमिका राजकीय नेते घेत असतात, पण के. कामराज त्यांच्यापैकी नव्हते. त्यांनी कधीच आयुष्यात आपल्या सिद्धांतांशी तडजोड केली नाही. भारतीय राजकारणात काही निवडक सैद्धांतिक भूमिका असलेले धोरणी राजकारणी होऊन गेले, के. कामराज त्यांच्यापैकीच एक होते.
१५ जुलै १९०३ रोजी तमिळनाडूच्या विदुरनगरमध्ये कामराज यांचा जन्म झाला. त्यांचा परिवार पारंपरिक व्यवसाय करत असे. त्यांचे पूर्ण नाव कुमारस्वामी कामराज होते. कामराज आपल्या तारुण्यात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. फक्त १५ वर्षांचे वय असताना त्यांनी जालियनवाला बाग दुर्घटनेने पेटुन उठत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला.
कामराज यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता. ते प्रखर गांधीवादी होते. १८ वर्षांचे असतानाच ते असहकार चळवळीत सहभागी झाले. १९३० साली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग नोंदवला होता. याच काळात ते तुरुंगात देखील गेले. आपल्या संपूर्ण आयुष्यात ते सहा वेळा तुरुंगात गेले होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील ३००० दिवसांचा दीर्घकाळ तुरुंगात घालवला होता.
तुरुंगात असतानाच ते महानगरपालिकेच्या चेयरमनपदी निवडून आले होते. त्यांना पदाचा मोह नव्हता, त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
१३ एप्रिल १९५४ रोजी कामराज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आपल्या शासनकाळात त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवले. त्यांनी तमिळनाडूच्या प्रत्येक गावात प्राथमिक शाळा उघडल्या आणि सोबतच ग्राम पंचायतीच्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा उघडण्याची योजना देखील हाती घेतली होती. अधिकाधिक प्रमाणात लोक शिक्षण प्राप्त करू शकतील या उद्देशाने ११वी पर्यंत मोफत शिक्षणाची योजना त्यांनी सुरु केली. त्यांच्या या यशस्वी योजनांच्या फलस्वरूप, त्यांना सलग तीनवेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली.
१९६२ मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर एका वर्षात त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देऊन पक्षाच्या अंतर्गत कार्यात सामान्य कार्यकर्ता म्हणून योगदान देण्यास सुरुवात केली.
ते पंतप्रधान नेहरूंचे निकटवर्तीय होते. त्यांनी नेहरूंना त्यांच्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन सामान्य लोकांमध्ये कार्य करण्याची सूचना केली, जेणेकरून ते मंत्री सामान्य जनतेच्या दुःखांंना समजून घेऊ शकतील. नेहरूंना देखील कामराज यांची संकल्पना फार आवडली आणि त्यांनी आपल्या ६ मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांना जनसेवेसाठी रवाना केले.
जनतेत राहिल्यामुळे मंत्र्यांना जनतेच्या समस्या समजल्याच पण जनतेच्या मनात काँग्रेस हा जनसामान्य लोकांचा पक्ष आहे, अशी प्रतिमा निर्माण झाली. कामराज यांच्या या योजनेचा काँग्रेसला फायदा झाल्यामुळे त्याला ‘कामराज प्लॅन’ असे नाव देण्यात आले. आज देखील जनतेसोबत हितसंबंध प्रस्थापित करण्यासाठी राजकारणी आणि राजकीय पक्ष या प्लॅनचा वापर करतात.
स्वातंत्र्यानंतर तब्बल १६ वर्षे नेहरू पंतप्रधान होते. त्यांना जनतेचे भरभरून प्रेम मिळाले. १९६४ साली त्यांचा अचानक मृत्यू झाला. यानंतर काँग्रेसचा कारभार कोण बघणार यावर वादंग निर्माण झाला. कोणीच पुढे येत नव्हतं, कुठलंच समाधान प्राप्त होत नव्हतं, पक्षांतर्गत मतभेद वाढून दरी वाढतच चालली होती. मोरारजी देसाई आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पदाचे सर्वांत मोठे दावेदार होते. हे नेते वरिष्ठ असल्याने इंदिरा गांधींच्या हाती कमान सोपविणे योग्य नव्हते.
मोरारजी देसाई आणि लालबहादूर शास्त्री यांच्यातील पंतप्रधान पदासाठीची स्पर्धा तीव्र होती. लालबहादूर शास्त्री हे नेहरूंचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्या नावाला अधिक पसंती असली तरी मोरारजी देसाई मागे हटायला तयार नव्हते. काही दिवसांत कामराज यांच्या नेतृत्वात सिंडिकेट काँग्रेस या नावाने काँग्रेस नेत्यांचा एक गट अस्तित्वात आला. या गटाने आपली संपूर्ण शक्ती लाल बहादूर शास्त्री यांच्या पाठी उभी केली आणि मोरारजी देसाई यांचं नाव मागे पडलं. लालबहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले.
परंतु १९६६ साली लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिक व रहस्यमयीरित्या सोविएत रशियात निधन झाले. आता पुन्हा रिकाम्या झालेल्या पंतप्रधान पदावर मोरारजी विराजमान होण्यास उत्सुक होते. पंतप्रधान पदासाठी सर्वानुमते मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कामराज हे इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी इंदिरा गांधींसाठी मोर्चेबांधणी केली. इंदिरा गांधींना संसदीय मंडळात ३५५ मतं मिळाली आणि त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.
कामराज यांना कधीच पंतप्रधान होण्याची इच्छा नव्हती. जेव्हा त्यांचे नाव पुढे येत तेव्हा ते स्वतः माघार घेत. ते असं का करत? अशी विचारणा केल्यावर ज्या माणसाला हिंदी-इंग्रजी येत नाही, त्याने त्या पदावर विराजमान होणे योग्य नाही, असा निर्वाळा दिला.
१९६७ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आणि खुद्द कामराज यांचा पराभव झाला, यामुळे पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. निंजलिंगप्पा यांची त्यांच्या नंतर पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महत्वपूर्ण बाब ही आहे की संघटनेच्या अंतर्गत असलेले अनेक महत्वपूर्ण निर्णय हे कामराज यांनाच विचारून घेतले जात होते. पुढे काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर ते तमिळनाडूला परतले. त्यांनी केंद्रीय राजकारणाचा त्याग केला.
२ ऑक्टोबर १९७५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांना भारतरत्नने पुरस्कृत करून सन्मानित करण्यात आले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








