आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“सर्जिकल स्ट्राईक” या संकल्पनेला भारतात बदलणाऱ्या राजकारणामुळे खूप लोकप्रियता मिळाली. अगदी या आधुनिक संकल्पनेचं अस्तित्व मध्ययुगीन गनिमी काव्यातंही शोधण्यात आलं. “तान्हाजी – फर्स्ट सर्जिकल स्ट्राईक ऑफ इंडिया” अशी आर्थिक फायदा घेणारे चित्रपट येणं साहजिकच आहे.
जसे हॉलीवूडमध्ये अमेरिकी सैन्यावर एकानंतर एक ढिगाने चित्रपट आले तसेच गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडेसुद्धा आपल्या शूरवीरांवर चित्रपट काढण्याचा ट्रेंड आला. परमाणू, फँटम आणि उरी हे त्यातलेच.
आता नवीन चित्रपट म्हणजे तरुणांमध्ये नवीन ट्रेंड हे तर होणारच. ऋषी कपूर यांच्या काळात क्लीन शेव प्रसिद्ध होती तर “Beardo” लुक तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. जिममध्ये जाऊन बनवलेलं पिळदार शरीर, दाढी आणि इन्स्टाग्रामसाठी करण्यात येणारं फोटोसेशन हेच सगळीकडे सध्या बघायला मिळतंय.
या ट्रेंडमध्ये चपखल बसला तो विकी कौशल.
आर्मीमध्ये दाढी ठेवायला परवानगी नसते पण हा ट्रेंड पकडायला निर्मत्यांनी तो लूक दिलाय हे स्पष्ट आहे. तुमच्या बहिणीच्या नवऱ्याची हत्या झाली म्हणून तुम्हाला एखाद्या मिशनवर पाठवत नसतात पण लोकांना भावनिक करून चित्रपटात गुंतवून ठेवण्यासाठी याचा उपयोग करण्यात आला.
“उरी” चित्रपट येण्याआधी तुम्हाला विकी कौशल माहीत होता का? फार कमी लोकांना माहिती असेल. या चित्रपटामुळे विकीच्या करिअरला वेग मिळाला आणि विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचलं.
आज विकीचा वाढदिवस. एक असिस्टंट डायरेक्टर ते प्रसिद्ध अभिनेता या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेऊ.
तब्बल २५ वर्षानंतर जेव्हा जगातल्या सर्वात जुन्या कान्स चित्रपट महोत्सवात मसान या भारतीय चित्रपटाने पुरस्कार, प्रसिद्धी मिळवली. तेव्हा या चित्रपटाशी निगडित असलेलं एकही नाव प्रसिद्ध नव्हतं, पण आज आहेत.
त्या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती रिचा चड्डा आणि विकी कौशल यांनी. त्यांच्याबरोबर सुधीर मिश्रा यांनाही या चित्रपटात महत्वाची भूमिका होती.
तर हे सगळं कसं घडलं?
विकी कौशल प्रसिद्ध स्टंट डिरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा. शिक्षण संपत असताना त्याचा चित्रपटांतला रस वाढला. पण हा रस त्या क्षेत्रातल्या ग्लॅमरमुळे नाही वाढला. विकी एका मुलाखतीत सांगतो,
मला अजूनही आठवतं की आम्हाला घरात लागणाऱ्या अनेक गोष्टी घ्यायला वाट बघावी लागायची. वडील त्या गोष्टींसाठी जास्त मेहनत करायचे. त्यांनी नेहमी सांगितलं होतं की या क्षेत्रात काम करणं दिसतं तेवढं सोपं नाही.
त्याकाळी स्टंट डिरेक्टरला फार चांगला मोबदला मिळत नसायचा. आजही या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कोणीही ओळखत नाही. त्यामुळं विकीकडे या क्षेत्रात न येण्यासाठी भरपूर कारणं होती. पण अभिनयाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी एक दिवस त्याने आपल्या वडिलांना तसे बोलून दाखवलं.
श्याम कौशल तेव्हा अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटावर काम करत होते. विकीला सिनेमातल्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी अनुरागकडे आपल्या मुलाला काम देण्याची विनंती केली.
हा चित्रपट अत्यंत कमी पैशात बनवला गेला त्यामुळे आर्थिक फायदा तसा काहीच नव्हता. पण शिकायला मिळेल म्हणून विकीने यात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. यातून त्याला सिनेमा नक्की कसा असतो याची जाणीव झाली.
याच सिनेमात अनुरागने इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रींना वगळून रिचा चड्डाला महत्वाची भूमिका दिली होती. एक सॉफ्टवेअर इंजिनियर नोकरी सोडून अनुरागकडे आला होता, त्यालाही अनुराग ने असिस्टंट डिरेक्टर म्हणून घेतलं होतं. त्याचं नाव नीरज घैवान. मसान चित्रपटाचा दिग्दर्शक. या चित्रपटाचे गाणे लिहिले होते वरुण ग्रोव्हर याने. या सगळ्या कौशल्यपूर्ण कलाकारांची इथे अनुरागमुळे भेट झाली.
हा प्रोजेक्ट पूर्ण केल्यावर नीरजने एवढ्या कमी अनुभव असतानादेखील स्वतः चित्रपट दिग्दर्शित करायचं ठरवलं. वरूण ग्रोव्हरने कथा लिहिली. तर विकी आणि रिचाने मुख्य भूमिका साकारल्या.
या सगळ्या फार अनुभव नसणाऱ्या कलाकारांनी मिळून इतिहास रचणारा मसान चित्रपट बनवला.
बनारसमध्ये राहणाऱ्या या दोन प्रेम युगुलांची कथा तिथल्या समाजकारणात कशी रंग बदलते, हे सांगणारा हा सिनेमा बऱ्याच अंगाने महत्वाचा ठरला. यातून अभिनयातला आणि तंत्रज्ञानातला एक मापदंड उभा राहिला. याच्याशी निगडित सगळीच नावं आता चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवू लागली. त्यातही जास्त ठळकपणे विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक झालं.
विकीचा अभिनय अनुरागला इतका आवडला की त्याने रमण राघव 2.0 या सिनेमांत त्याला मुख्य भूमिकेसाठी निवडलं. अमली पदार्थांचं व्यसन असलेल्या गोंधळलेल्या पोलीस अधिकाऱ्याची ही भूमिका खूपच डार्क आणि असामान्य मानवी भावना दर्शवणारी होती.
या भूमिकेसाठी विकीने स्वतःला किती तरी दिवस एकाच खोलीत बंद करून ठेवलं होतं, आणि त्या भावविश्वात स्वतःला न्यायला त्याला कठोर मेहनत करावी लागली.
सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा मसानप्रमाणे या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी दुर्लक्ष केलं. परंतु समीक्षक आणि सिनेमासृष्टीतल्या इतर लोकांना मात्र विकीमध्ये असणारे अभिनयाचे कसब आता जास्त स्पष्ट दिसू लागले.
छोट्या छोट्या भूमिकांसाठी एकतरी असा कौशल्यपूर्ण अभिनेता असावाच लागतो, याच आधारावर विकीला अनेक भूमिकांच्या ऑफर आल्या. पण त्याने यात हरवून न जाता त्याने योग्य सिनेमाची वाट बघितली.
राजू हिराणी यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाचा संजू हा चित्रपट शेवटच्या टप्प्यात आला होता, रणबीर कपूर याच्यासोबत सेकंड लीड म्हणून जेव्हा विकीला ती भूमिका मिळाली तेव्हा त्याला प्रचंड आनंद झाला. त्याने त्या भूमिकेला अतिशय योग्य न्याय दिला.
यानंतर विकीला उत्तमोत्तम भूमिका मिळत गेल्या. लव्ह पर स्क्वेअर फूट, लस्ट स्टोरीज आणि राझी या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठीही त्याची स्तुती झाली. पण एक चांगला अभिनेता ते सुपरस्टार हा पल्ला त्याने गाठला तो केवळ “उरी” या चित्रपटामुळे.
आज विकी त्या प्रस्थापित अभिनेत्यांच्या रांगेत जाऊन बसलाय. त्याचे ब्रँड्स आहेत, खूप फॅन्स आहेत. पण तो त्यात अडकून पडलेला नाही. अजून चांगल्या भूमिकांचा तो शोध घेतोय.
जो संघर्ष आणि मेहनत करून त्याने ही अभिनयाची कला जोपासली आहे आणि अनुराग, नीरजसारख्या लोकांनी त्याला इथवर यायला जी मदत केली आहे या सगळ्यांसाठी अजूनही तो तसाच नम्र, सामान्य, मध्यमवर्गीय विकी आहे.
झाकीर खानची एक मुलाखत खूप प्रसिद्ध झाली होती. त्यात तो प्रसिद्धी विषयी सांगतो,
“तुम्ही तुम्हाला आवडतं ते करण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यात निपुण होता, ती कला जोपासून तुम्हाला खूप छान वाटतं, तेव्हा तुम्ही तिथेच यशस्वी झालेले असता. पण तुम्ही यशस्वी आहात हे जगाला समजायला लागणारी प्रसिद्धी तुम्हाला मिळेलच असं नसतं. पण ही कधीच तुमची समस्या नसते, तुम्ही तसेच खुश असता”
विकीला जर उरीमुळं प्रसिद्धी मिळाली नसती तर कदाचित इतका प्रतिभावंत अभिनेता आपल्यापर्यंत पोहोचायला अजून काही वर्ष गेले असते.
अशा या असामान्य अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.