आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“या इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?”
असे आपल्या अग्रलेखांतून खडसावून विचारणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात झाला. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या टिळकांना लहानपणापासूनच इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी काही सहकाऱ्यांच्या सोबत न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
त्यानंतर सभोवताली घडणाऱ्या घटनांचा वृत्तांत समाजात पोहोचवण्यासाठी तसेच समाजप्रबोधन करण्यासाठी त्यांनी मराठीतून केसरी तर इंग्रजीतून मराठा अशी दोन वृत्तपत्रं प्रकाशित करायला सुरुवात केली.
केसरीमध्ये ते स्वतः अग्रलेख लिहीत असत. त्यांनी तब्बल ५१३ अग्रलेख लिहिले. त्यांचा जाज्ज्वल्य देशभक्तीने भारावलेला अग्रलेख म्हणजे केसरीचा आत्मा होता.
३० एप्रिल १९०८ रोजी मुजफ्फरपुरात कलकत्त्याचे मुख्य दंडाधिकारी डग्लस किंगस्फोर्ड यांच्या बग्गीवर दोन तरुण क्रांतिकारकांनी बॉ*म्बह*ल्ला केला. पण दुर्दैवाने ती चुकीची बग्गी निघाली आणि त्या स्फो*टात दोन महिलांचा मृत्यू झाला. हा ह*ल्ला करणाऱ्या क्रांतिकारकांचे नाव होते- प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस.
इंग्रज अधिकाऱ्यांनी पकडायच्या आधीच चाकी यांनी आत्मह*त्या केली तर खुदिराम बोस पोलिसांच्या तावडीत सापडले. सरकारने त्यांच्या वयाचीही तमा न बाळगता फाशीची शिक्षा सुनावली. या फाशीने संपूर्ण देशात एकच खळबळ उडवून दिली. सगळीकडे याचा निषेध करण्यात आला.
लोकमान्य टिळक या प्रकाराने प्रचंड चिडले. केसरीमधून त्यांनी ब्रिटिश सरकारला धारेवर धरले. क्रांतिकारकांच्या कृत्याचे त्यांनी समर्थन केले. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असे म्हणत “पूर्ण स्वराज्य”ची घोषणा केली.
याचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. इंग्रज बऱ्याच दिवसांपासून टिळकांच्या विरोधात ठोस काहीतरी हाती लागावं याचीच वाट बघत होते. इंग्रज सरकारने ताबडतोब टिळकांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
टिळक सुरुवातीला स्वतःच खटला लढवत होते पण नंतर त्यांचे मुद्दे कमजोर पडू लागले. याचकारणाने मोहम्मद अली जिन्हा यांनी टिळकांची केस लढवण्याची तयारी दर्शवली. त्यावेळी जिन्हा हे खरंतर टिळकांचे वैरी आहेत असेच चित्र होते. पण आपापसातील मतभेद बाजूला ठेवून जिनांनी पूर्ण ताकदीने टिळकांची केस लढवली. खूप प्रयत्न करूनही ते टिळकांना वाचवू शकले नाही आणि कोर्टाने त्यांना सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली .
दुसरा कोणी असता तर थोडा नरमला असता. पण ते टिळकांच्या रक्तातच नव्हते. त्यांच्यावर तब्बल तीन वेळा देशद्रोहाचा खटला चालला. यापैकी पहिल्या दोन वेळेस त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली होती.
शिक्षा भोगून ते १९१४ साली बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा आपले लिखाण आणि भाषण सुरू केले. भाषणांचा विषय एकच “पूर्ण स्वराज्य”. पुन्हा एकदा १९१६ साली त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला.
मागच्या दोन्हीवेळी जिनांनीच टिळकांचा खटला लढवला, याहीवेळी तेच वकील म्हणून उभे होते. पण जास्ती काळजीपूर्वक त्यांनी मुद्दे मांडले.
टिळक राजकिय मुद्द्यांवर खटला लढवला जावा यावर अडून बसले होते पण जिनांनी त्यांना कायदेशीररित्या मुद्देसूद मांडणी करून खटला लढवण्यासाठी मनवले. याचवेळी टिळकांनी त्यांची पूर्ण स्वराज्यची मागणी नेमकी काय होती हे स्पष्ट केले.
जिनांची युक्ती कामात आली आणि टिळक तिसऱ्यांदा कारागृहात जाण्यापासून वाचले. त्यांना वीस हजाराच्या जामिनावर सोडण्यात आले. या सगळ्यामध्ये जिनांचा खूप मोठा हात होता.
लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्यामधले मतभेद, काम करण्याची पद्धती सगळ्याच बाबतीत उघड वाद होते. पण असे असतानादेखील जेव्हा जेव्हा ब्रिटिश सरकारच्या विरोधात जाण्याचा विषय असेल तेव्हा दोघांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम केले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








