आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या घरात महिन्याकाठी लागणारं किराणा सामान, भाजीपाला किंवा खाण्या-पिण्याच्या किती गोष्टी लागतात हे घरात असणाऱ्या लोकांच्या संख्येवर अवलंबून आहे. याशिवाय ते शाकाहारी आहेत की मांसाहारी ही गोष्टसुद्धा घराच्या एकूण बजेटवर परिणाम करणारी ठरते. आपल्या लहानशा घराची ही अवस्था आहे तर संपूर्ण जगाचा जरा विचार करून बघा. आपल्याला माहिती आहे की, पृथ्वीची लोकसंख्या सातत्यानं वाढत आहे.
सध्या जगाची लोकसंख्या सात अब्जपेक्षा जास्त आहे. २०५० पर्यंत यामध्ये वाढ होऊन एकूण लोकसंख्या नऊ अब्जांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितकी संसाधनांची आवश्यकतासुद्धा जास्त असेल यात शंकाच नाही. भविष्यात आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त अन्न, पाणी आणि जमीनीची आवश्यक असेल.
सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास, सात अब्ज लोकांपैकी अंदाजे ८०.५ करोड लोक तीव्र भुकेने ग्रस्त आहेत. शिवाय, आपली नैसर्गिक संसाधनांची संख्यासुद्धा घटत चालली आहे. अगदी वर्षावनांपासून ते महासागरांपर्यंतच्या सर्व नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी वेगानं नाहीसे होत आहेत. अशा परिस्थितीत जर येत्या ३५ वर्षांत आपली लोकसंख्या दोन अब्जांनी वाढली, तर उपलब्ध संसाधनांमध्ये आपण प्रत्येकाला पुरेसा आहार देऊ शकतो का? यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे.
गेल्या एक ते तीन दोन वर्षांचा आढावा घेतल्यास जागतिक स्तरावर लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल होत असल्याचं बोललं जात आहे. अनेकजण मांसाहारी खाद्यपदार्थ सोडून शाकाहारी पदार्थांकडे वळत असल्याचं चित्र आहे. परंतु, जर प्रत्येकजणानं फक्त शाकाहार सुरू केला तर भविष्यात काय स्थिती तयार होईल याचादेखील विचार करणं गरजेचं आहे.
अमेरिकेतील कोलंबिया इंटरनॅशनल सेंटर फॉर ट्रॉपिकल ॲग्रीकल्चरमधील तज्ज्ञ अँड्र्यू जार्विस यांच्या मते, या गोष्टीचा विचार करणं म्हणजे खरंच दोन जगांची कहाणी सांगितल्यासारखं आहे. मांसाहार पूर्णपणे बंद केला तर विकसित देशांवर कदाचित जास्त परिणाम होणार नाही परंतु, विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच नकारात्मक परिणाम होतील.
सध्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास, लोकसंख्येचा एक मोठा भाग मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी खाण्यास प्राधान्य देतो. हे सर्व घटक प्राणीजन्य उत्पादनं आहेत. ते मिळवण्यासाठी जमीन, पाणी आणि उर्जेची गरज भासते.
सध्या जगभरात एकूण १० ते ११ अब्ज लोकांची भूक भागवतील इतक्या प्रमाणात कॅलरीज (खाद्य) तयार होतायत. मात्र, यातील बहुतेक कॅलरीज या भुकेल्या लोकांना नाही तर पशुधनाला दिल्या जातात. याशिवाय पशुधनासाठी निवारे, त्यांना वाढवण्यासाठीचा खर्च आणि त्यांनी तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अतिरिक्त जमीन, पाणी आणि ऊर्जा संसाधनं खर्ची होतात. इतकंच काय शेवटी या प्राण्यांपासून मांस मिळवण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. परिणामी शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांसाहारी लोकांच्या अन्नाच्या गरजेवर १६० पट जास्त जमीन, पाणी आणि इंधन वापरलं जातं, असं एका रिसर्चमधून निदर्शनास आलं आहे.
सध्याची नैसर्गिक संसाधनांची स्थिती, भूकेल्या लोकांची संख्या पाहता आपण कमीत-कमी खर्चामध्ये लोकांची भूक भागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं तज्ज्ञांना वाटतं. अमेरिकेमध्ये शाकाहारी उत्पादन घेण्यासाठी आणि मासांहारी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक संसाधनांच्या प्रमाणाचा अभ्यास करण्यात आला. एकट्या अमेरिकेतून समोर आलेले निष्कर्षसुद्धा कमालीचे आश्चर्यकारक आहेत.
अमेरिकेमध्ये ५६ दशलक्ष एकर जमीन पशुशेतीसाठी वापरली जाते तर केवळ चार दशलक्ष एकर जमीन साध्या अन्नधान्य उत्पादनासाठी वापरली जाते. ७० टक्के धान्य लोकांना न देता पाळलेल्या प्राण्यांना दिलं जातं.
मांसाहार करणाऱ्या व्यक्तीचा आहार तयार करण्यासाठी दररोज ४ हजार २०० गॅलन पाणी लागतं. तर, शाकाहारासाठी दररोज फक्त 300 गॅलन पाणी वापरलं जातं. याव्यतिरिक्त, आपल्या घरगुती वापराच्या गोड्या पाण्यापैकी ७० टक्के पाणी थेट पशुशेतीसाठी वापरलं जातं. सर्व संसाधनांचा हिशोब केल्यास, एक एकर जमीनीतील चाऱ्याचा वापर करून २५ पाऊंड मांस तयार होऊ शकतं. पण, त्याच एक एकर जमिनीतून ५० हजार पाऊंड टोमॅटो किंवा ५३ हजार पाऊंड बटाटे मिळू शकतात या वस्तुस्थितीचा कधी गांभीर्यानं विचार होत नाही. ही आकडेवारी फक्त अमेरिकेतील अभ्यासाची आहे. संपूर्ण जगाचा अभ्यास केला तर आणखी गंभीर वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.
वरील डेटाच्या आधारे, पृथ्वीवरील वाढत्या लोकसंख्येला आपण मांसाहार पुरवत राहणं धोक्याचं आहे असं दिसतं. तज्ज्ञांच्या मते आपण अधिक प्रमाणात शाकाहार घेतल्यास कार्बन फूटप्रिंट मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. मौल्यवान पाण्याचा साठा वाचवला जाऊ शकतो आणि शेतीतून मिळणारं उत्पादन पशुधनापेक्षा लोकांना पुरवलं जाईल याची खात्री होऊ शकते.
प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशीच स्थिती शाकाहारी आणि मांसाहारी घटकांच्या वापराबाबतदेखील आहे. मांसाहाराकडं व्यावसायिकदृष्ट्या पाहणाऱ्या लोकांना पूर्णपणे शाकाहार स्वीकारण्याचा मुद्दा पटलेला नाही. जगभरात अनेक लोक मांस उत्पादन आणि विक्री व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळं जर संपूर्ण जगानं मांसाहार सोडून शाकाहाराकडं वळण्याचा निर्णय घेतला तर या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. त्यांच्यासाठी रोजगाराच्या पर्यायी संधी शोधाव्या लागतील. मग त्या शेतीमध्ये असो, वनीकरणात असो किंवा सध्या पशुधन खाद्य म्हणून वापरल्या जाणार्या पिकांच्या उपउत्पादनांमधून बायोएनर्जी तयार करण्याच्या असो.
केंब्रिज विद्यापीठात अन्नाची मागणी आणि जैवविविधतेतील समतोलावर संशोधन करणारे बेन फलन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवर दरवर्षी कोट्यवधी कोंबड्यांचं उत्पादन घेतलं जातं आणि नंतर त्या मांसासाठी मारल्या जातात. या प्रक्रियेत अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. लोकांनी मांस खाणं बंद केलं तर ही उलाढाल ठप्प होईल.
पण, दीर्घकालीन भविष्याचा विचार केल्यास, मांसाहार हळूहळू कमी करण्यातच जास्त फायदा आहे, असं निदर्शनास येतं. त्यामुळं लोकांनीदेखील आता आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणं गरजेचं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










