The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिंहासनावर हक्क सांगणाऱ्या प्रत्येकाला यमसदनी धाडून शहाजहान हिंदुस्थानाचा बादशाह बनला

by द पोस्टमन टीम
18 September 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


शहाजहान हा दिल्लीच्या मोगल राजघराण्यातील पाचवा बादशाह, जहांगीराचा मुलगा. त्यानेच दिल्लीचा लाल किल्ला बांधला. वास्तविक शहाजहान हा सगळ्यात थोरला मुलगा नव्हता, तसेच तो जहांगीराच्या पट्टराणीचा मुलगासुद्धा नव्हता. पण तरीदेखील शेवटी मोगल सत्ता त्याच्या ताब्यात आली. हे कसे घडले याचा प्रवास मोठा रंजक आहे.

शहाजहान त्याच्या वडिलांपासून म्हणजेच तत्कालीन मोगल सम्राट जहांगीर याच्यापासून दूर राहूनच लहानाचा मोठा झाला. त्याला कारणीभूत होता राजज्योतिष्याचा सल्ला. या सल्ल्यानुसार त्याला त्याच्या आजोळी ठेवण्यात आले. तिथे त्याची आजी रुकैया सुलताना बेगम हिने त्याचा सांभाळ केला. जरी तो राजवाड्यापासून आणि राजकारणापासून दूर राहून लहानाचा मोठा झाला, तरी त्याला राज्यकारभारासाठी आवश्यक असलेले सर्व शिक्षण मिळाले. युद्धशास्त्र, कायदा, प्रशासन, लिबरल आर्ट्स यांसारख्या विषयात त्याने ज्ञान मिळवले.

दरम्यानच्या काळात जहांगीराचा मोठा मुलगा राजकुमार खुसरो याच्याकडे दरबारातल्या सर्व महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यावरून एक न एक दिवस त्याच्याच ताब्यात सत्ता येणार हे निश्चित होते. पण मध्येच माशी शिंकली. या उतावळ्या राजकुमाराने सन १६०६ साली करू नये ती चूक केली. त्याने आपले वडील म्हणजेच राजा जहांगीर हयात असतानाच सिंहासनावर आपला दावा सांगितला.

त्यावेळी तो लाहोरमध्ये होता. जहांगीरने त्याचे बंड मोडून काढले आणि त्याला तुरुंगात टाकले. खुसरोचे सर्व समर्थक फासावर चढवले गेले. स्वतः खुसरोचेही डोळे फोडण्यात आले, आणि नंतर त्यालाही फासावर लटकवण्यात आले. इतकेच नाही तर त्याच्या मुलांनाही तुरुंगात डांबले गेले.

आतापर्यंत दूर असलेला शहाजहान या घटनेनंतर जहांगीराच्या अधिकच जवळ आला. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेत राजधानीमध्ये आपला प्रभाव वाढवला. महत्त्वाच्या राजकीय आणि लष्करी जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेत त्याने या संधीचे सोने करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.



वास्तविक जहांगीराचा दुसरा मुलगा परवेज मिर्झा हा शहाजहानपेक्षा वयाने मोठा होता. पण तो राज्यकारभार संभाळण्याइतका कर्तबगार नव्हता. त्यामुळे राजघराण्यावर आणि सत्तेवर हक्क सांगण्यास शहाजहानच पात्र होता. असं असलं तरी त्याच्यासाठी सत्ता मिळवणे इतके सोपे नव्हते.

जहांगीर व्यसनाधीन झाल्यानंतर त्याची विसावी पत्नी असलेली नूरजहां ही राणी खऱ्या अर्थाने सत्तेचे केंद्र बनली. तिने अत्यंत चातुर्याने राजकीय खेळी खेळायला सुरुवात केली. आपल्या मर्जीतील माणसांना सत्ता मिळावी म्हणून तिने आपल्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीचा विवाह जहांगीरचा मुलगा ‘शहरयार’ याच्याशी केला आणि आपली भाची मुमताज हिचे लग्न शहाजहानशी केले. मुमताज ही नूरजहांचा भाऊ असलेल्या असफखानची मुलगी होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अशाप्रकारे नूरजहांने राजगादीवरील आपली पकड मजबूत केली. पण यामागे तिचा डाव होता तो आपला स्वतःचा जावई शहरयार याला सिंहासनावर बसवण्याचा. तशी संधी तिला मिळालीही. त्याचदरम्यान पर्शियन राजांनी कंदाहारचा ताबा घेतला. नूरजहांने पर्शियन लोकांशी लढण्यासाठी शहाजहानला कंदाहारला पाठवायचा सल्ला जहांगीरला दिला.

पण शहाजहानची यासाठी तयारी नव्हती. त्याला सतत वाटायचे, त्याच्या अनुपस्थितीत नूरजहां जहांगीरावर विषप्रयोग करून त्याला ठार मारेल आणि शहरयारला सिंहासनावर बसवेल. पण राजाज्ञेचा अवमान केल्यामुळे शहाजहानलाच अटक करण्यात आली. त्याच्या लक्षात आले, हा डाव आपल्यावरच उलटू शकेल. त्यामुळे यापुढे काय होऊ शकते याचे चित्र रंगवून शहाजहानने माफी मागितली. जहांगीरानेही त्याला क्षमा केली. परंतु त्या क्षणी शहाजहान आणि नूरजहां यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले, ते कायमचेच.

इ. स. १६२७ साली राजा जहांगीरचा लाहोरजवळ मृत्यू झाला. त्यावेळी शहाजहान दख्खनमध्ये एका लढाईत व्यस्त होता. जहांगीराचा मृत्यू होताच लाहोरचा राज्यपाल असलेल्या शहरयारने स्वतःला सम्राट म्हणून घोषित केले. सत्तेचा खेळ सुरू झाला. अनेकजण आपापली बाही सरसावून पुढे आले. यातच एक होते ते म्हणजे शहाजहानचा सासरा असफखान. त्याने चतुराईने हालचाली करत आपल्या जावयाचे राजसिंहासनावरील स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न केले.

सगळ्यात आधी त्याने नूरजहांच्या ताब्यातून शहाजहानच्या मुलांची सुटका केली आणि नूरजहांला अटक केली. नंतर त्याने राजकुमार दावर बक्ष याची तुरुंगातून सुटका केली आणि त्याला सम्राट म्हणून घोषित केले. दावर बक्ष हा राजकुमार खुसरोचा मुलगा. या खुसरोलाच जहांगीराने बंड केल्याबद्दल फाशीवर लटकवले होते.

दावर बक्षला शाही हत्तीवरून शहरयारशी लढण्यासाठी सैन्यासह पाठवण्यात आले. वास्तविक दावर बक्षमध्ये कोणतेही गुण नव्हते. तो स्वतःच या अभूतपूर्व अनुभवाने चकित झाला होता. त्याचा केवळ एक प्यादं म्हणून वापर करण्यात आला होता आणि तेही त्याच्या लक्षात आले नव्हते. या युद्धात शहरयारच्या सैन्याचा पराभव झाला. दरम्यानच्या काळात शहाजहानही दख्खनच्या लढाईवरून परत आला.

परत येताच त्याने स्वतःला सम्राट म्हणून घोषित केले. त्यानंतर त्याने आपल्या सर्व संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना फाशीवर लटकवले. यामध्ये शहरयार, त्याचे अनेक भाऊ, आणि पुतण्यांचा समावेश होता. कर्तबगारी नसलेल्या दावर बक्षचीही तीच गत झाली. त्यालाही फाशीवर लटकवण्यात आले. अखेरीस सर्व लोकांना यमसदनी धाडून शहाजहान मोगल सम्राट बनला. असफखानला मात्र त्याच्या कामगिरीबद्दल योग्य ते इनाम मिळाले. शहाजहानने त्याची वझीर-ए-आझम अर्थात पंतप्रधान म्हणून नेमणूक केली.

शहाजहानने किरकोळ बदल करून अकबराची प्रशासनव्यवस्था पुढे नेली. मात्र त्याने काही महत्त्वाचे आणि काही अन्याय्य असे बदलही केले. त्याने रयतवारी पद्धतीऐवजी जमीनदारी पद्धत अमलात आणली. त्याच्या कारकीर्दीत इस्लामचा प्रभाव वाढला. अकबराच्या काळात दंडवत किंवा नमस्कारासाठी असलेली सिजदा ही पद्धती जाऊन त्याऐवजी तहार-तस्लिमची पद्धत त्याच्या काळात रूढ झाली. तो स्वतः सुन्नी पंथाचा पुरस्कर्ता होता. त्याने मंदिरांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवले आणि प्रजेवर तीर्थयात्राकर लादला. त्याच्या काळात ‘अल्लाह’बद्दल अपशब्द काढणे हा दखलपात्र गुन्हा होता.

शहाजहानने सुलेखनकला, संगीत, चित्रकला आणि वास्तुकला यांना उत्तेजन दिले. त्यामुळे अनेक भव्य व उत्तम शैली असलेल्या वास्तू उभारण्यात आल्या. संगमरवरी पाषाणात बांधलेला ताजमहाल, आग्र्यातील दिवाण-इ-आम, दिवाण-इ-खास, मोती मशीद, दिल्लीचा लाल किल्ला, दिल्ली व आग्रा येथील जामा मशिदी, कश्मीरमधील शालिमार व निशात बाग ही सर्व या वास्तुशैलीची उदाहरणे आहेत.

त्याच्या दरबारात जगन्नाथपंडित, सहाकविराय, लालखान (तानसेनचा जावई), सुखसैन, सुरसैन हे संस्कृत पंडित व कलावंत होते. मुल्ला अब्दुल हकिम, सीयालकूटी, मुल्ला महमूद जौनपूरी हे अरबी साहित्यिकही त्याच्या सेवेत होते. कोहिनूर हिरा बसविलेले मयूरसिंहासन अर्थात तख्त-ए-ताऊस त्यानेच बनवून घेतले. एकूण शहाजहानची कारकीर्द ऐश्वर्यसंपन्न, वैभवशाली होती. आजही इतिहासात त्याचा कालखंड मोगल सत्तेचे सुवर्णयुग मानला जातो.

या मोगल सम्राटांना ‘आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं’ असे वाटत असेल हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं विधान खरंच आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

रविचंद्रन अश्विन म्हणजे भारताला सापडलेला ‘परफेक्ट ऑलराउंडर’ आहे..!

Next Post

जस्ट डायलची ‘सक्सेस स्टोरी’ एखाद्या पिक्चरपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग आहे..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जस्ट डायलची 'सक्सेस स्टोरी' एखाद्या पिक्चरपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग आहे..!

लाखो लोकांना भिकेला लावणारा 'डॉट कॉम बबल' काय होता माहिती आहे का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.