आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
महाराष्ट्राचा मध्ययुगाचा इतिहास पाहिला तर तो आपल्याला रक्तरंजित दिसतो परंतु याच काळामध्ये भारतीय आणि मुसलमान ‘संगीत पद्धती’ यांचा मेळ होत होता असे दिसते. यासाठी आपल्याला थोडा पूर्व इतिहास पाहणे देखील फार महत्वाचे ठरते. जेव्हा मुहम्मद बिन कासीम याने इ.स. ७१२ साली सिंध प्रांतावर आक्र*मण केले तेव्हा त्या यु*द्धात फार मोठी क*त्तल घडवली गेली तसेच खूप मोठा वि*ध्वंस देखील केला गेला. मुहम्मद कासीम याने नेमलेले अरब सैनिक तेथेच स्थायिक झाले आणि त्यांनी भारतीय स्त्रियांशी लग्ने केली आणि तिथे मुसलमानी वसाहती बनण्यास सुरुवात झाली.
मन्सुरा, कुजदार, कदावेल, वैजा, मह्फुजा आणि मुलतान येथील वसाहती विद्येची आणि संस्कृतीची केंद्रे बनली.
याच काळामध्ये या सर्व अरबांना हिंदू गायक, हिंदू शिल्पकार, तत्त्वज्ञ आणि विद्वान यांनी खूप प्रभावित केले. ब्राम्हण पंडित आणि बौद्ध भिक्षूंंकडून त्यांनी तत्वज्ञान, ज्योतिष, गणित, आयुर्वेद, रसायन अशा विविध विद्या शिकून घेतल्या. बगदाद येथील राज्यकर्त्यांनी तर भारतातील विद्यांचे अध्ययन करण्यासाठी ‘अरबी लोकांना’ खूप मोठे प्रोत्साहन दिले.
इ.स. ७५३ ते ७७४ काळात भारतीय विद्यांचे अध्ययन करण्यासाठी ‘ब्रम्ह सिद्धांत’ आणि ‘खंड खाद्यक’ असे महत्त्वाचे ग्रंथ भारतामधून अरबांनी बगदाद येथे नेले. ‘बरमक’ शाखेच्या मुसलमानांनी बऱ्याच अरबांना भारतामध्ये पाठवले आणि भारतीय विद्वानांना बगदादमधे बोलावून तत्त्वज्ञान, ज्योतिष, गणित, आयुर्वेद, रसायन या विषयांच्यावरील ग्रंथांचे अरबी भाषेत अनुवाद करून घेतले.
अब्बासिया घराण्याचे वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर भारताचा आणि अरबांचा सांस्कृतिक संबंध संपलेला आपल्याला दिसतो परंतु याच काळामध्ये मुसलमानांंचे हल्ले भारतावर सुरु झालेले दिसतात.
गजनीचा जो बादशहा होता ‘सुबुक्तगीन’ याने भारतावर इ.स. ९८६-९८७ साली आक्र*मण केले आणि दुसरे आक्र*मण हे इ.स. ९९७ साली केले. हे आक्र*मण करून ‘सुबुक्तगीन’ याने भारताचा काही प्रदेश जिंकून घेतला. इ.स. ९९७ मध्येच तो मेला. ‘सुबुक्तगीन’ याचा मुलगा ‘महमूद गजनवी’ याने भारतावर इ.स. १००० ते १०२६ यादरम्यान सतरा वेळा आक्र*मणे केली आणि प्रचंड लुट घेऊन तो परत गेला. भारतावर राज्य करण्याच्या हेतूने आक्र*मण करणारा पहिला मुसलमान आक्रमक हा ‘मुहंंमद घौरी’ हा होता. ‘मुहंंमद घौरी’ याने ‘पृथ्वीराज चौहान’ यांचा पराभव करून भारतामध्ये मुस्लीम राजसत्तेचा पाया घातला.
‘पृथ्वीराज चौहान’ यांचा पराभव होण्याच्या जवळपास ६ वर्षे आधी ‘शेख मुईनुद्दिन चिश्ती’ हा सुफी संत ‘मुहंंमद घौरी’च्या सैन्यासोबत येऊन अजमेर येथे स्थायिक झाला. ‘शेख मुईनुद्दिन चिश्ती’चा १२३६ साली मृत्यू झाला. ‘बहाउद्दीन जकरिया’ हा प्रसिद्ध विद्वान आणि संगीतज्ञ असलेला सुफी हा ५३ वर्षांचा होता.
याचाच अर्थ ‘मुहंंमद घौरी’ याच्या काळात ‘बहाउद्दीन जकरिया’ हा संगीतज्ञ हा तरुण होता आणि ‘शम्सूद्दीन इल्तुतमिष’ याच्या काळात तो प्रौढ झाला होता. ‘शेख मुईनुद्दिन चिश्ती’ आणि त्यांच्या अनुयायांनी भारतीय भाषा आणि लोकरीतींचा स्वीकार केला.
‘निजामुद्दीन चिश्ती’च्या काळात ‘चिश्ती’ परंपरेने वसंतोत्सव साजरा करायला सुरुवात केली आणि रंग देखील खेळू लागले. मुसलमानांच्या घरात हिंदू स्त्रियांचा प्रवेश झाल्यामुळे संमिश्र रक्ताच्या मुसलमान मुलांमध्ये बरेचसे हिंदू संस्कार आणि रिती रुजलेल्या होत्या. हिंदू गायिका आणि नर्तकी दासी बनवल्यामुळे भारतीय संगीत हे मुसलमानांंच्या घरामध्ये शिरले.
वास्तविक पाहता इस्लाममध्ये संगीत, शेरोशायरी किंवा नाट्यासारख्या कला हराम मानल्या जातात. बादशहा बनल्यानंतर औरंगजेबानेही या कलांवर सक्त बंदी आणली होती. याविरोधात दिल्लीतील संगीतकारांनी वाद्यांचा जनाजा काढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण औरंगजेबाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सर्वांना औरंगजेबाचे क्रौर्य समजले.
मौलवी लोकं हे संगीताला त्याज्ज मानत असत तर सुफी लोकं भक्तीपर संगीत फार महत्त्वाचे समजत असत. सुफिंच्या सुहरवर्दी परंपरेचा संस्थापक ‘शेख बहाउद्दीन जकरिया’ संगीताचा खूप मोठा पंडित होता. याच काळात हळूहळू संगीत हे मुस्लीम राजांच्या मनोरंजनाचे एक साधन झाले. ‘कैकुबाद’ याच्या दरबारात असे काही गायक होते की जे फारसी गीतांसोबत हिंदी गाणी देखील गात असत. ‘अल्लाउद्दिन खिलजी’ आणि ‘तुघलक’ या बादशहांच्या काळामध्ये बरेचसे कव्वाल हे फारसी गजलांंप्रमाणे हिंदी गाणे गात असत.
खिलजीच्या काळामध्येच ‘अमीर खुस्रो’ याने भारतीय रागांचे वर्गीकरण हे अभारतीय दृष्टीकोनातून केलेले होते. जलालउद्दीन खिलजी, अल्लाउद्दिन खिलजी, मुहम्मद तुघलक या बादशाहांच्या दरबारात संगीतावर खूप चर्चा चालत असे. ‘निजामुद्दीन चिश्ती’ याच्या शिष्यपरंपरेतील लोकं हे सुफी प्रचारासाठी देशभर विखुरली.
बहमनी साम्राज्याच्या स्थापनेसोबत या सुफी परंपरेचे पाय देखील दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात रुतले. याच ‘चिश्ती’ परंपरेच्या संपर्कामुळे पहिला महंमदशहा बहमनी आणि फिरोजशहा बहमनी सुलतान हे संगीताचे मोठे आश्रयदाते झाले. तसेच बहमनी साम्राज्याची शकले उडाल्यानंतर ज्या पाच शाह्या तयार झाल्या त्यापैकी ‘महमंद कुली कुतुबशहा’ आणि ‘इब्राहीम आदिलशहा’ हे फार मोठे संगीताचे पंडित होऊन गेले.
याच काळामध्ये काही मुसलमानांनी भारतीय संगीतशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न केला. ‘इब्राहीम शार्कीने’ कडा येथे मलिक सुलतान नावाचा सुभेदार नेमला होता त्याचा मुलगा बहादूर मलिक याने संगीत शास्त्रावरील ग्रंथ जमा केले आणि संपूर्ण देशातील पंडित बोलावून त्या सगळ्या पंडितांंकडून त्या जमवलेल्या संगीत ग्रंथाच्या आधाराने ‘संगीत शिरोमणी’ या नावाचा ग्रंथ बनवून घेतला. हा ‘बहादूर मलिक’ केवळ एक सरदार होता तो बादशहा नसल्यामुळे त्याने केलेल्या प्रयत्नांंचा विशेष उपयोग झाला नाही.
मुहम्मद तुघलक याच्या काळामध्ये त्याने दिल्लीवरून आपली राजधानी ‘देवगिरी’ येथे हलविली होती. याच देवगिरीचे नाव त्याने ‘दौलताबाद’ असे केले. तुघलकासोबत बरेच लोक हे दिल्लीवरून ‘देवगिरी’ येथे आले होते. त्यामध्ये ‘बुऱ्हानुद्दिन गरीब’ याच्यासारखे सुफी आणि बरेच कव्वाल होते. या सगळ्यांमुळे दक्षिण भारतात गजल आणि कव्वाल्या वाजू लागल्या.
या सर्व घडामोडी होत असताना विजयनगर साम्राज्य स्थापन होण्याच्या आधी विजयनगरमध्ये सुफी आणि कव्वाली गायक यांनी वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. त्याचे एक मुख्य कारण म्हणजे जो भाग मुसलमानी आक्र*मक जिंकत असत त्या प्रदेशात ते ताबडतोब मशिदी, शाळा आणि सुफी मठ उभारत असत.
हिंदू लोक सहिष्णू असल्याने कोणीही त्याला सहजासहजी विरोध दर्शवत नसे. विजयनगरचे साम्राज्य आणि बहमनी साम्राज्य हे एकमेकांचे शत्रू जरी असले तरी देखील दोन्ही राज्यांच्या प्रजेमध्ये व्यवस्थित दळणवळण चालू होते. याबाबत दोन्ही राज्यांचे काही प्रतिबंध नव्हते.
महमंंदशहा बहमनी पहिला याने इ.स. १३३६ साली विजयनगरच्या संस्थापक ‘बुक्क’ याचा पराभव केला आणि त्याच्याकडून आपल्या कव्वालांंना पारितोषिक देण्यासाठी धन वसूल केले. हे जवळपास ३०० कव्वाल होते आणि ते अमीर खुस्रो याच्या कव्वाल्या गात असत.
इ.स. १३९८ मध्ये विजयनगर येथील सम्राट ‘दुसरा हरिहर’ राज्यकर्ता असताना ‘फिरोजशहा बहामनी’ याचा ‘काजी सिराज’ हा आपल्या साथीदारांसह नर्तकीच्या वेशात विजयनगरच्या शिबिरात शिरला आणि त्याने युवराजाचे मनोरंजन करून त्याचा खू*न केला. या घटनेकडे नीट पाहिले असता विजयनगरमध्ये मुसलमानांंचे गाणे आणि नाचणे हे लोकप्रिय झाले होते.
‘फिरोजशहा बहमनी’ याने इ.स. १४०६ मध्ये ‘पहिल्या देवरायाचा’ पराभव केला आणि त्याच्या कन्येशी विवाह केला. या प्रसंगानंतर बहामनी आणि विजयनगर साम्राज्य यांच्यामध्ये कलेची देवाण घेवाण झालेली दिसते. ‘दुसरा अल्लाउद्दिन बहमनी’ सुलतानाने विजयनगरचा राज्यकर्ता ‘दुसरा देवराय’ याचा पराभव केल्यानंतर ‘दुसऱ्या देवरायाने’ सुलतानाला भेट म्हणून संगीत नृत्यात निपुण असलेल्या दोनशे दासी पाठवल्या होत्या.
बहमनी साम्राज्याचा पहिला सुलतान ‘अल्लाउद्दिन हसन बहादूरशहा’ हा संगीतप्रेमी होता. तो ‘शेख निजामुद्दीन’ याचा शिष्य होता आणि ‘अमीर खुस्रो’ याचा मित्र होता. हाच याचा संगीतप्रेमाचा फार मोठा पुरावा ठरतो. याच्या पदरी ‘शिराज-निवासी हकीम नसीरुद्दीन’, समरकंद येथील सदरुश्शरीफ, मौलाना आसामी आणि रजिउद्दीन, आणि जगाजोत यांच्यासारखे मोठे संगीत पंडित हे याच्या दरबारात होते.
बहमनी सुलतान ‘पहिला महंमदशहा’ याच्या दरबारात ‘अमीर खुस्रोचे’ गजल गाणारे ३०० गायक होते. ही स्थिती दक्षिणेतील संगीतावर मुस्लीम प्रभावाची सूचक आहे. यांच्या बिदागीसाठी विजयनगरकडून याने धन वसूल केले होते. याच काळामध्ये विजयनगरच्या संगीत पद्धतीमध्ये राग वर्गीकरण याच्यावर ‘मुक्काम’ पद्धतीचा परिणाम झाला. ‘मुजाहिदशहा बहामनी’ आणि ‘दुसरा महंंमदशहा’ हे देखील संगीताचे खूप मोठे चाहते होते.
‘फिरोजशहा बहमनी’चे संगीतावर खूप प्रेम होते. फिरोजशहा हा संगीताचा वेडा होता. याच ‘फिरोजशहा बहमनी’च्या काळात इ.स. १४०६ मधे ‘पहिल्या देवरायाचा’ पराभव त्याने केला आणि त्याच्या कन्येशी विवाह केला. या संबंधामुळे विजयनगर येथील संगीतावर खुस्रो परंपरेचा रंग अधिक गडद झालेला आपल्याला दिसतो. याच फिरोजशहाच्या काळामध्ये ‘बंदानवाज गेसूदराज’ हा दिल्लीवरून गुलबर्गा येथे आला आणि त्याच्यासोबत बरेच त्याचे अनुयायी आले.
सुलतान ‘अहमदशहा बहमनी’ हा ‘बंदानवाज गेसूदराज’ याचा परमभक्त होता. त्याला संगीताची प्रचंड आवड होती. ‘दुसरा अल्लाउद्दिन बहमनी’ जसा क्रू*र होता तसा संगीताचाही वेडा होता. एवढाच याचा उल्लेख सापडतो. नंतरच्या बहमनी सुलतानांंना संगीताविषयी प्रेम जास्त दिसत नाही.
बिलकीसजमानी, हातम, बहमनी हिंदू, हिंदी छोरी, पद्मिनी, सुंदर, सज्जन, रंगीली, नुरकी मुरत, कसबिन, नाजनीन, चंचलनयन, माहअबरु, काबारुख, सरो खूषकद, फितना दखन, तिलंगन, दखनकी पुतली ही अशी नावे तो सांगतो. त्याच्या या प्रेमिकांच्यापैकी काही संगीतात निपुण होत्या तर काही नृत्य आणि शिल्पकलेमध्ये.
जसे सगळे कुतुबशाही सुलतान हे संगीत प्रेमी होते तसेच सगळे आदिलशाही सुलतान देखील संगीतप्रेमी होते. परंतु ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ हा संगीत क्षेत्रात अत्यंत प्रसिद्ध सुलतान आहे. याची कारकीर्द ही इ.स. १५८० ते १६२७. ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ हा पैगंबरवासी ‘बंदानवाज गेसूदराज’ याचा भक्त होता.
‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ हा ‘बंदानवाज गेसूदराज’ याच्या समाधीवर कायम स्तुतीपर कविता लिहित असे. याच ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ याने आपल्या गीतांच्या ग्रंथाचे मंगलआचरण हे ‘सरस्वतीच्या स्तुतीने’ केलेले आहे. ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ याने जो ‘किताब-इ-नवरस’ हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात त्याने ‘राग-रागीण्यांचे’ चित्रे काढली आहेत. दुसरा इब्राहिम आदिलशहा हा स्वतःला गणपती आणि सरस्वतीचा पुत्र मानत असे, इतकंच नाही तर त्याने स्वतःला जगद्गुरू ही बिरुदावली लावून घेतली होती.
तसेच चित्रांनी युक्त ‘रागमाला’ याचा प्रवर्तक ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ हाच आहे. ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ याच्या दरबारात सुमारे चार हजार संगीतज्ञ होते.
महान गायक ‘तानसेन’ याचा शिष्य ‘बख्तरखान’ हा ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ याचा संगीत गुरु होता. याच ‘बख्तरखानाशी’ त्याने आपल्या पुतणीचा विवाह देखील करून दिला होता. ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ याने आपल्या वीणेला ‘मोतीखाण’ असे नाव दिले होते. या ‘मोतीखाण’ वीणेची विजापूरमधून हत्तीवरून मिरवणूक निघत असे.
‘रागविबोधकार’ सोमनाथ हा ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ याच्या समकालीन होता. ‘दुसरा इब्राहीम आदिलशहा’ याने आपल्या ‘किताब-इ-नवरस’ या ग्रंथात भोपाली, रामकी, भैरव, हाजीज, मारू, आसावरी देसी, पुरबी, बरारी, तोडी, मलार, गौरी, कल्याण, धनश्री, कानरा, केदार, आणि नौरोज हे राग वापरले आहेत आणि त्या रागांना त्याने ‘मकाम’ म्हटले आहे.
२) खिलजी कालीन भारत:- अतहर अब्बास रिझवी, इतिहास विभाग, मुस्लीम युनिव्हर्सिटी, अलिगड, २००८.
३) तुघलक कालीन भारत भाग १ आणि २ :- अतहर अब्बास रिझवी, इतिहास विभाग, मुस्लीम युनिव्हर्सिटी, अलिगड, २०१६.
४) गुलशने इब्राहिमी:- फेरिश्ता, अनुवाद भ.ग.कुंटे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, १९८२.
५) बहामनी राज्याचा इतिहास:- अनुवाद भ.ग.कुंटे, मॅॅजेस्टिक प्रकाशन, १९६६.
५) इब्न बतुता कि भारत यात्रा:- मदनगोपाल, १९८८.
६) विजापूरची आदिलशाही म्हणजे बुसातीन-उस-सलातीन:- अनुवाद नरसिंह विठ्ठल पारसनीस, संपादक वा.सी.बेंद्रे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाची ग्रंथमाला क्रमांक १७, १९६८.
७) सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुतुबशाही:- वा.सी.बेंद्रे, १९३४.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.