आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
एक मुलगा आणि एक मुलगी एका पार्कमध्ये भेटतात. पार्कमधल्या बाकावर बसून गप्पा मारत असतात, तसे तर ते रोजच भेटतात पण आजचा दिवस काही खास आहे. आजचा दिवस सगळ्याच प्रेमी युगुलांसाठी खास असतो. कारण आजचा दिवस म्हणजे वॅलेंटाईन्स डे! प्रेमाचा दिवस. तुमचे तुमच्या ‘त्या’ व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करून ते प्रेम साजरे करण्याचा दिवस. पण या सुंदर दिवसालाही खराब करणारे लोक आहेतच. त्यांच्यामुळेच अनेक संघटना वॅलेंटाईन्स डेच्या विरोधात असतात. प्रेमी युगुल, जे हा दिवस साजरा करताना मर्यादा विसरतात, त्यांच्यावर कार्यवाही करतात.
वॅलेंटाईन्स डे वगैरे पाश्चात्य लोकांचे चोचले आहेत असं म्हणून अनेक ठिकाणी याला विरोध होताना दिसतो. परंतु भारतातही अनेक ठिकाणी लग्न न झालेल्या मुलामुलींनी एकत्र येण्याची परंपरा दिसून येते. यामध्ये घोटुल अशी एक प्रसिद्ध परंपरा आहे. छत्तीसगडच्या आदिवासी भागात माडिया जातीत हा सण साजरा केला जातो. याद्वारे मुले-मुली एकत्र राहतात आणि मग त्यांना त्यांचा आवडता जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते.
छत्तीसगडच्या आदिवासी समाजातही घोटुलला मान्यता मिळाली आहे. मात्र, अलीकडच्या काळात ही परंपराही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही परंपरा बस्तर जिल्ह्यात दिसून येत असली तरी देशाच्या ईशान्येकडील राज्ये, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतामध्ये अशाच काही परंपरा आहेत. घोंटुल देशातील अनेक आदिवासी समुदायांमध्येही लोकप्रिय आहे.
यामध्ये गावातील लहान मुलं आणि तरुण एकत्र राहतात. घोटुल हा एक प्रकारचा बॅचलर वसतिगृह आहे. जिथे सर्व आदिवासी मुलं-मुली रात्री राहतात. गावातील सर्व कुमार मुले-मुली सायंकाळी गावातील घोटुल घरामध्ये जातात. वेगवेगळ्या भागातील घोटुलच्या परंपरांमध्ये फरक आहे. काही तरुण मुलंमुली घोटुलमधेच झोपतात, तर काही ठिकाणी ते दिवसभर तिथे राहून रात्री आपापल्या घरी झोपायला जातात. अनेक तरुण-तरुणी या घोटुलमध्येच आपला जीवनसाथी निवडताना दिसतात.
घोटुलसोबत दोन गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, चेलिक आणि मोटियारी. गावाच्या सीमेवर घोटुलसाठी मातीची झोपडी बांधलेली असते. या झोपडीला घोटुल म्हणतात. घोटुलला सुंदर बनवण्यासाठी त्याच्या भिंती रंगवून त्यावर रंगरंगोटी करण्यात येते. कधी कधी घोटुलमध्ये भिंतींऐवजी उघडा मंडप असतो. आदिवासी युवक-युवती एक गट तयार करून येथे जमतात. इथे नाच, गाणं, संभाषण, हशा, असा सगळा कार्यक्रम असतो. घोंटुलमध्ये मुलांना चेलिक आणि मुलींना मोटियारी असे म्हणतात. मुलींच्या प्रमुखाला ‘बेलोसा’ आणि मुलांच्या प्रमुखाला ‘सरदार’ म्हणतात. घोटुलमध्ये प्रौढांची भूमिका फक्त सल्लागाराची असते.
बस्तरमध्ये बाहेरच्या जगाने एंट्री घेतल्यामुळे आता ही परंपरा संपण्याच्या मार्गावर आहे. किंवा तिचं स्वरूप तरी बदलू लागलं आहे. बस्तरच्या अंतर्गत भागात आजही घोटुल सुरू असले तरी बदललेल्या पद्धतींसह. आता इथे संख्या थोडी कमी होऊ लागली आहे. तसे पाहायला गेलं तर, घोटुल हे आदिवासी गावांचे सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.
घोटुलमध्ये मुले आणि मुली एकमेकांसोबत वेळ घालवतात, यानिमित्ताने त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. ते येथे लग्नाचे नाते सुरू करतात. पण, बाहेरच्या लोकांनी येथे येऊन फोटो काढणे, व्हिडिओ फिल्म बनवणे यामुळे ही परंपरा संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे.
दररोज संध्याकाळी ढोल वाजवणे हे मोटियारी आणि चेलिकांच्या घोटुलमध्ये जाऊन मौजमजा करण्याची वेळ आल्याचे लक्षण आहे. रात्री उशिरापर्यंत तिथे नाच-गाणी, मिरवणूक, मस्ती, अंताक्षरी असे खेळ चालतात. तंबाखू आणि ताडी सर्वांसाठी ठेवण्यात आली असते. मनोरंजन आणि इतर शिक्षणाव्यतिरिक्त, घोटुलचे उद्दिष्ट तरुणांना व्यापक गोंड समाजाचा एक भाग बनवण्याचे आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या परंपरा आणि जबाबदाऱ्या वेळेत ओळखता येतील.
ही प्रथा लिंगो पेन म्हणजेच लिंगो देव यांनी सुरू केली होती. लिंगो देव ही गोंड जमातीची देवता मानली जाते. पहांडी कुपर लिंगोने कोया पुणेमच्या माध्यमातून संपूर्ण गोंड समाजाला एका धाग्यात बांधण्याचे काम केले.
शतकानुशतके गोंड जातीत कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाला स्थान नसल्याचे लिंगो देव यांनी पाहिले तेव्हा त्यांनी एक अनोखी प्रथा सुरू केली. त्यांनी वस्तीबाहेर काही बांबूच्या झोपड्या बांधल्या. तिथे मुलांना शिकवायला सुरुवात केली.
एक मुलगा घोटुलला येताच. त्याला असे वाटते की तो शारीरिकदृष्ट्या प्रौढ झाला आहे, त्याला बांबूचा कंगवा बनवावा लागतो. हा कंगवा बनवण्यात तो आपली सर्व शक्ती आणि कला पणाला लावतो, कारण हा कंगवाच ठरवत असतो की त्याला कोणती मुलगी पसंत करेल.
घोटुलमधील मुलीला मुलगा आवडला की ती त्याचा कंगवा चोरते. तिला तो मुलगा आवडल्याचे हे लक्षण आहे. जेव्हा ती केसात हा कंगवा घेऊन बाहेर पडते, तेव्हा सगळ्यांना कळते की ती कोणावर तरी प्रेम करू लागली आहे. मग मुला-मुलींची जोडी तयार होते. त्यानंतर दोघेही लग्न करतात.
परंतु आता वाढत्या पाश्चात्तीकरणामुळे आणि बदलत्या गोष्टींमुळे या परंपरेच्या गाभ्याला धक्का बसला आहे. हळूहळू ही प्रथा लोप पावत चालली असल्याचे दिसून येते आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.