आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्रत्येक धर्मातील चालीरीती वेगळ्या असतात. तसेच खानपान, पोशाख, यांच्या बाबतीतही धर्माधर्मांत भिन्नता आढळते. धर्म म्हटले की जसे त्याचे उपासक असतात तसेच त्या त्या धर्मात संत-महंतही असतातच. प्रत्येक धर्मातील संत ईश्वरप्राप्तीचा उद्देश समोर ठेवूनच आपापल्या धर्माचे अनुसरण करतात. ते करताना कधीकधी ते स्वतःच्या विचारांची, चिंतनाची, ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी अनुसरलेल्या पद्धतींची भर घालतात. थोड्या बारकाव्याने पाहिल्यास या सगळ्या विविधतेत काही ना काही साम्य असतेच. कारण, शेवटी उद्देश एकच आहे ना! ईश्वराची प्राप्ती.
सगळ्या धर्मांतील संतांमध्ये सामान्य असणारी एक बाब म्हणजे मुंडन. तुम्ही बौद्ध भिक्खुंचे फोटो पाहिले असतील तर बौद्ध भिक्खुंनी संपूर्ण मुंडन केलेले असते. ब्राह्मण देखील संपूर्ण मुंडन करतात पण, एक शेंडी ठेवतात. आपण पुराणकथेतील अनेक गोष्टींत आणि त्यातील चित्रात हे पाहिलेले आहे.
अशाच रीतीने मध्ययुगातील कॅथोलीक्स संताचे फोटो पाहिले तर त्यांनी फक्त गोलाकार मुंडन केल्याचे लक्षात येईल. म्हणजे त्यांनी डोक्याच्या फक्त मधल्या भागातीलच पूर्ण केस काढलेले असतात. बाकी कडेचे केस तसेच असतात. हे तसे दिसायला थोडे विचित्रच वाटते. पण, या काळातील संतामंध्ये ती प्रथाच पडलेली दिसते. हे कॅथोलिक संत फक्त वरच्या भागातील केस काढून टाकत.
सुमारे १०७३च्या आसपास असा हा विचित्र प्रकार सुरु झाला. त्यावेळी ‘पोप ग्रिगोरी सातवा’ हा चर्चचा मुख्य पोप होता. याकाळात केस, कपड्यांची स्टाईल आणि संत, धर्मगुरू, नन्स यांच्यातील परस्परसंबंध याबाबत बरेच नियम घालून देण्यात आले होते.
ग्रिगोरी सातवा याच्या काळात चर्चचे वातावरण दुषित झाले होते. धर्माच्या नावावर अनाचार बोकाळला होता. चर्चमध्येच भ्रष्टाचार वाढला होता. चर्चमधील या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ग्रिगोरी सातवा याने एक निर्णय घेतला. चर्चच्या प्रत्येक धर्मगुरूला आपण संयम कसा ठेवायचा हे शिकवले पाहिजे आणि संयम राखण्यासाठी त्यांचे आचरण सुधारले पाहिजे असे त्याला वाटले.
फक्त धर्मगुरूच नाही तर संत आणि नन्स यांनीसुद्धा ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन केले पाहिजे असे त्याचे मत होते. संत, नन आणि धर्मगुरू यांच्यातील लैंगिक संबंध अमान्य केले आणि रोजच्या जीवनात संयम राखण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले. या अनेक नियमातील एक नियम म्हणजे संतांच्या केसांची ठेवण कशी असली पाहिजे याबद्दल होता.
आपले जीवन परमेश्वराला समर्पित केले आहे, याची धर्मगुरू, संत यांना कायम आठवण राहावी म्हणून ते आपले केस दान करत. बुद्धीजममध्येही संसारिक जीवनापासून मुक्ती मिळवल्याची खूण म्हणून केशवपन किंवा मुंडन केले जात असे. पण, ग्रिगोरी यांनी कॅथोलिक संतांसाठी एक वेगळीच केशवपन पद्धती शोधून काढली.
ख्रिश्चन धर्मात सेंट पॉल यांनी बायबलचे विवेचन करणाऱ्या १३ ग्रंथांचे लेखन केले. त्यांच्या या कार्यामुळे ख्रिश्चन धर्म समस्त रोमन साम्राज्यात पसरला. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठीच सेंट पॉल यांनी आपले सगळे आयुष्य वाहून घेतले. सेंट पॉल यांना टक्कल होते. ते त्यांच्या या टकलासाठीच ओळखले जात. त्यांच्याप्रती आपली निष्ठा दाखवण्यासाठी ग्रिगोरी यांनी सर्वच प्रिस्ट म्हणजेच धर्मगुरू आणि संतांना मुंडन करण्याची सक्ती केली. त्यामुळे चर्च आणि देवामधील नाते अधिक दृढ होईल अशी त्यांची धारणा होती.
परंतु बायबलनुसार संपूर्ण टक्कल करण्यास मज्जाव आहे. अगदी डोक्याच्या शेवटपर्यंत कुणीही केस कापायचे नाहीत असे वचन बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटच्या लेव्हीक्टीस १९:२८ मध्ये लिहिले आहे.
आता पोप ग्रीगोरीची चांगलीच पंचायत झाली. देवाला नाराज न करता धर्मसुधारणेसाठी काय करता येईल यासाठी ते मार्ग शोधू लागले तेंव्हा त्यांना ही कल्पना सुचली. केशवपन म्हणून संपूर्ण डोक्यावरचे केस काढण्याऐवजी फक्त मधल्या भागातील केस काढायचे आणि कडेचे केस तसेच ठेवायचे. त्यांच्या आदेशानुसार सर्व कॅथोलिक संतांनी याचपद्धतीने केशभूषा केली. शिवाय, अनेक संतांना तर सेंट पॉल यांच्याप्रमाणे केशरचना करायचीच होती. पण, बायबलच्या जुन्या टेस्टामेंटमधील ते वचन त्यांच्या इच्छेआड येत होते.
शेवटी, सेंट पॉल यांच्याविषयी आदर दाखवण्यासाठी सर्वच संतांनी अशाप्रकारची केशरचना निवडली. मध्ययुगीन काळातील प्रत्येक संताची प्रतिमा पाहिल्यास तुम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल.
काळाच्या ओघात प्रत्येक गोष्ट बदलतेच. तसेच कॅथोलिक परंपरेतही बदल होत गेले. याच बदलाचा भाग म्हणून ही केशरचनाही मागे पडली. मध्ययुगानंतर संपूर्ण जगावर परिणामकारक ठरणाऱ्या अशा कित्येक घटना घडल्या. याचा परिणाम साहजिकच चर्चवरही झाला.
सातव्या ग्रिगोरीने मुंडन प्रथा सक्तीची केली. तसेच १९७२ मध्ये, सहाव्या पोपने केस काढण्याची सक्ती बंद केली. त्यांनी मुंडन प्रथा बंद करून टाकली. कोणत्याही संताला अशा प्रकारचे मुंडन करण्याची गरज नाही असे त्यांनी जाहीर केल्याने ९०० वर्षे चालत आलेली ही प्रथा शेवटी कालबाह्य ठरली.
कोणत्याही प्रदेशातील, समाजातील, धर्मातील एका मोठ्या कालखंडाचा विचार केल्यास अशाच काही प्रथांचा उदय आणि त्यांचा अंत दिसतो. शेवटी परिवर्तन हाच निसर्गाचा एकमेव नियम आहे. या जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नाही मग ती मानवनिर्मित असो की निसर्गनिर्मित. त्यामुळे आज ज्या प्रथांचा आपल्याला अभिमान वाटतो कालांतराने त्या प्रथा लुप्त होणार असतात.
काळाच्या ओघात निर्माण झालेल्या आणि लुप्त झालेली अशी एखादी प्रथा परंपरा जर तुम्हाला माहित असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला त्याबद्दल जरूर सांगा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.