आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपत्ती मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, तिचे परिणाम भयावहच असतात.
विशेषतः मानवनिर्मित आपत्ती जी माणसाने स्वतःच्या कर्माने स्वतःवर ओढवलेली असते आणि उत्तरोत्तर जसं तंत्रज्ञान प्रगत होत चाललंय तसं कृत्रिम आपत्तीचे परिणामही भीषण आणि हानिकारक ठरत आहेत. भूतकाळात घडलेल्या कृत्रिम आपत्तीचे परिणाम हे मानवाच्या भावी पिढ्यांना भोगावे लागतील असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?
पण असं झालंय…
दिनांक २६ एप्रिल १९८६ च्या मध्यरात्री ‘चेर्नोबील अणुविद्युत केंद्राच्या’ (Chernobyl Nuclear Power Plant) अणुभट्टी क्रमांक ४ मध्ये असं काही घडलं की ज्याने मानवनिर्मित आपत्तीचा एक नवीन चेहरा समोर आणला जो की भयावह तर आहेच पण त्याचे दुष्परिणामही मानव जातीच्या हाताळण्याच्या क्षमतेपलीकडे आहेत.
या घटनेनं झालेली जीवित आणि वित्त हानी एवढी होती की तिला दुर्घटनेला ७ व्या श्रेणीत (जास्तीत जास्त नुकसान करणारी श्रेणी) ठेवलं गेलं.
दुर्घटनेला कारणीभूत ठरलं अणूभट्टीच (Nuclear Reactor) सदोष डिजाईन, निष्काळजीपणा आणि आपत्कालीन परिस्थिती सांभाळण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवी आणि कुशल कामगारांचा अभाव.
दुर्घटनेच्या दिवशी अणुभट्टीच्या विविध आपत्कालीन चाचण्या घेतल्या जात होत्या. उदा. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास अणुभट्टीतील युरेनियम इंधनाचं होणार ‘केंद्रीकीय विभाजन’ (Nuclear Fission) नियंत्रित करणारी प्रणाली कार्यरत ठेवण्या संदर्भात.
या प्रकारच्या चाचण्या आधीही घेण्यात आल्या होत्या पण डिजाईनमध्ये असलेली ही खोट उघडकीस आली नव्हती. दुर्घटनेच्या दिवशी ‘या’ दोषाने उचल खाल्ली आणि युरेनियम इंधनाचं अनियंत्रितरित्या विभाजन होऊ लागलं. त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होऊ लागली. त्यामुळे भट्टीच तापमान धोक्याच्या पातळीपेक्षा वाढलं अणुभट्टीला थंड ठेवणारी प्रणाली (Cooling System) निकामी झाली आणि त्यांनतर झालेल्या स्फो*टांच्या मालिकांनी चेर्नोबिल हादरून गेलं.
केंद्राच्या आत भट्टीच्या परिसरात काम करणारे लोक तत्काळ गतप्राण झाले. स्फो*टामुळे अणुभट्टीत वापरलेलं किरणोत्सर्गी (Radioactive) विषारी इंधन इतस्ततः विखुरलं. स्फो*टानंतर अणुभट्टीला लागलेली आग विजवण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या अग्निशामक दलालाही धोकादायक किरणोत्सर्गाची (Radiation) कल्पना देण्यात आली नव्हती आणि अशा दुर्घटनासाठी त्यांना प्रशिक्षिणही देण्यात आलं नव्हतं. या बेजबाबदारपणामुळे बहुतांश अग्निशामक कर्मचाऱ्यांना किरणोत्सर्गाची बाधा झाली आणि त्यांचा हकनाक बळी गेला.
अणुभट्टीला लागलेली आग जवळ जवळ ८ दिवस धुमसत होती आणि तिच्या राखेच्या रुपात किरणोत्सारी संयुगं हजारो किलोमीटर्सपर्यंत पसरली.
दुर्घटनेत ४२ लोकांचा मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा आहे. परंतु हे नुकसान तर फक्त हिमनगाचं टोक होतं. कारण या अदृश्यरुपी किरणोत्सारी संकटाने येत्या काळात हजारो नागरिकांचे बळी घेतले. सरकारी आकडेवारीनुसार दुर्घटनेपासून आतापर्यंत ९००० ते १६००० लोकांचा कर्क रोग व इतर व्याधींमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे.
एका अंदाजानुसार इसवी सन २०६५ (दुर्घटनेच्या जवळपास ७० वर्षांनी) पर्यंत अजून हजारो लोकांना या किरणोत्सर्गाची किंमत मोजावी लागेल असा अंदाज आहे.
दुघटनेनंतर त्वरित 30 किमी परिघातील परिसर पुर्णतः रिकामा करण्यात आला व परिसरातील ६५००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
एका भुताच्या शहरासारखं ते शहर आजही सुमारे ३४ वर्षानंतर ओस पडलेले आहे. दुर्घटनेनंतर ५,००,००० मनुष्यबळ वापरून तब्बल २० वर्षे तेथील आ*ण्विक किरणोत्सारी कचरा उचलायचं काम सुरू होतं, ज्याच्यामध्ये अंदाजे १८ अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च झाला.
या घटनेनंतर जगामध्ये अणूऊर्जेच्या वापरासंबंधी व तिच्या सुरक्षेसंबंधी दोन मत प्रवाह तयार झाले. अणूऊर्जेचा वापर योग्य की अयोग्य हा एक वादाचा भाग आहे परंतु अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. परंतु अशा दुर्घटना घडल्याच तर त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जाऊ शकू एवढी क्षमता मानव जातीत नाही आणि त्याची किंमत पिढ्यांपिढ्या मानवाला चुकवावी लागेल हे मात्र खरं….!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.