आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“इट्स नॉट साईज ऑफ द डॉग इन फाइट, बट साईज ऑफ फाइट इन डॉग” असं एक वाक्य आहे ज्याचा समर्पक अर्थ आहे की लढाईत एखादा छोटा असला तरी त्याच्यात लढण्याची क्षमता जास्त असेल तर तो लढाई जिंकू शकतो. असाच काहीसा पराक्रम चिनी सैनिकांशी लढताना भारतीय सेनेच्या जवानांनी करुन दाखवला. संख्याबळ कमी असतानाही त्यांनी चीनच्या सैन्याला धूळ चारली. या लढाईत सहभागी झालेली तुकडी होती, ती म्हणजे ‘बिहार रेजिमेंट’.
आपल्या शौर्य आणि कुठलीही परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्यासाठी प्रसिध्द असलेली ही तुकडी भारतीय सेनेच्या अगदी सर्वोत्कृष्ट तुकड्यांपैकी एक आहे. आज आपण याच तुकडीचा इतिहास, परंपरा जाणुन घेणार आहोत.
१८व्या शतकात बिहार बटालियनपासून सुरुवात असलेल्या या तुकडीचे रुपांतर १९४१ मध्ये बिहार रेजिमेंटमध्ये झाले. सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा सेनेच्या गुप्त कारवाया असतील, सीमावाद असेल अशा प्रत्येक वेळी या तुकडीने इतिहास घडवला आहे.
आपल्या पराक्रम आणि शौर्यासाठी प्रसिध्द असलेली ही तुकडी नेहमीच आपल्या देशासाठी बलिदान देत आली आहे. आपल्या शौर्याने इतिहासात आपले नाव अजरामर करणारी ही तुकडी भारतीय सेनेच्या शिरपेचात असणारा एक मानाचा तुरा आहे.
स्वतंत्र भारतात झालेल्या जवळ-जवळ प्रत्येक यु*ध्दात बिहार रेजिमेंटने सक्रिय सहभाग घेतला आहे. फक्त सहभागच नाही तर अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. ‘वीर बिहारी’ या नावाने ओळखली जाणारी ही तुकडी संयुक्त राष्ट्रांच्या अनेक शांती प्रस्तावांचे नेतृत्व विविध देशात करुन आली आहे. सोमालिया आणि कॉन्गो या देशातही या तुकडीने संयुक्त राष्ट्राचे नेतृत्व केले आहे.
तुकडीच्या अनेक जवानांनी आपल्या पराक्रमाने भारतीय सेनेची मान उंचावली ती कारगील यु*ध्दात. जुलै १९९९ मध्ये बटालिक सेक्टरच्या पॉईंट ४२६८ आणि जुबर खिंडीत पाकिस्तानी घुसखोर आपले वर्चस्व प्रस्थापित करत असताना बिहार रेजिमेंटने त्यांचे प्रयत्न उलथुन पाडले होते. कारगील यु*ध्दात तुकडीचे काही जवान शहीद झाले. त्यातील कॅप्टन गुरजिंदर सिंग सुरी यांना महावीर चक्र आणि याच दरम्यान वीरमरण प्राप्त झालेले मेजर मरीयप्पन सरा वनन यांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पटनामध्ये गांधी मैदानाजवळ कारगील चौकात कारगील यु*ध्दात शहीद झालेल्या १८ सैनिकांचे स्मृती स्मारक आहे.
मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या भ्याड द*हश*तवादी ह*ल्ल्यात शहीद झालेले एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा ऑपरेशन टोर्नेडोमध्ये मृत्यू झाला. खरं तर ते बिहार रेजिमेंटचे अधिकारी होते, त्यांना प्रतीनियुक्तीने एनएसजीला पाठवले गेले होते.
१८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मु आणि काश्मिरमधील उरी भागात पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या ह*ल्ल्यात या रेजिमेंटच्या १५ जवानांनी आपले प्राण गमावले. एकूण १७ जवानांमधील १५ जवान हे या तुकडीचे होते.
नाव बिहार रेजिमेंट असले तरीही या तुकडीत फक्त बिहारमधील सैनिक असतात असे नाही. सुरुवात बिहारी जिल्ह्यात झाली म्हणून या तुकडीचे नाव बिहार रेजिमेंट असे पडले.
या तुकडीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून या तुकडीला मिळालेले अनेक पुरस्कार आजही या तुकडीच्या कार्यालयाची शान वाढवत आहेत. १९४१ साली सुरु झालेल्या या तुकडीकडे भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदरच ५ मिलीटरी क्रॉस आहेत, ९ मिलीटरी पदक आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या तुकडीच्या खात्यात ७ अशोक चक्र, ९ महावीर चक्र, २१ किर्ती चक्र आणि ७० शौर्य पदक आहेत.
याच तुकडीच्या नावावर १९७१ मध्ये एक विक्रमही आहे. १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश यु*ध्दात बिहार रेजिमेंटने पाकिस्तानी सेनेचा सामना केला. बंदुकीतील गोळ्या संपल्यावरही सैनिकांनी बंदुकीचा वापर करुनच विरोधी सैन्य मारुन पाडले असे म्हटले जाते. या यु*ध्दात पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली तेव्हा त्यांची संख्या ९३,००० होती. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी शरणागती समजली जाते.
‘कर्म हाच धर्म’ असं ब्रीदवाक्य असणारी ही तुकडी नेहमीच आपल्या कार्यासाठी तत्पर राहिली आहे. भारतीय भूमीचे रक्षण करणे हा एकमेव धर्म आज पर्यंत त्यांनी पाळला आहे. या तुकडीची यु*ध्दगर्जना ‘जय बजरंग बली’ आणि ‘बिरसा मुंडा की जय’ अशी आहे. या गर्जनेतूनही या तुकडीच्या बलिदान आणि त्यागाची प्रचिती आपल्याला येते. याच गर्जनेंसहीत ही तुकडी आपल्या विरोधी सैन्यावर तुटून पडते.
बिहार रेजिमेंटचे जवान अतिशय शूर आणि प्रसंगावधान राखून असतात. कितीही मोठी समस्या अचानक समोर आली तरीही आपला संयम सुटू न देण्याची त्यांची क्षमता त्यांना दुर्गम भागात आणि अवघड जागी नियुक्त करण्यास कारणीभूत आहे. भारत-चीन यांच्यामधे एलएसीला लागून असलेल्या गलवन घाटी आणि अशाच दुर्गम भागात ही तुकडी काम करत असते.
आपल्या शौर्याने आणि पराक्रमाने ही तुकडी बिहार आणि भारताची मान अशीच उंचावत राहो एवढीच इच्छा. देशासाठी दिलेल्या बलिदानासाठी देशातील प्रत्येक नागरिक बिहार रेजिमेंटच्या प्रत्येक जवानाचा आजन्म ऋणी राहील हे मात्र खरं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








