आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एका देशातून दुसऱ्या देशात केल्या जाणाऱ्या अवैध माल वाहतुकीस त*स्करी असं म्हणतात. त*स्करी बऱ्याच प्रकारची असते. कुठे सोन्या-चांदीची त*स्करी केली जाते तर कुठे अंमली पदार्थांची! मानवी त*स्करी, मानवी अवयवांची त*स्करी, प्राण्यांची त*स्करी असे अनेक प्रकार त*स्करीमध्ये येतात.
वन्यप्राण्यांची त*स्करी ही जगातली सर्वाधिक होणारी दुसऱ्या क्रमांकाची त*स्करी आहे. आत्ता वन्यजीवांच्या शिकारीला बंदी आहे पण काही वर्षांपूर्वी शिकारीला परवानगी होती. कधी हौस म्हणून तर कधी त्यांच्या अवयवांसाठी ही शिकार केली जायची. शोभेच्या वस्तूंसाठी हस्तिदंत, वाघाची कातडी, सांबरची शिंगं यांचा उपयोग केला जायचा. कालांतराने वन्यजीवांच्या शिकारीवर कायद्याने बंदी घालण्यात आली. कोणत्याही वन्यप्राण्यास मारल्यास त्या व्यक्तीसाठी कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली.
वन्यप्राण्यांची शिकार फक्त हौसमौज म्हणून केली जात नाही तर अंधश्रद्धेपोटीही अनेक वन्यजीव शिकारीला बळी पडतात. ही अंधश्रद्धा फक्त भारतातच दिसून येत नाही तर परदेशातही दिसून येते. ही अंधश्रद्धा इतकी टोकाची असते की या वन्यप्राण्यांसाठी लोक करोडो रुपये द्यायलाही तयार होतात. आपल्याकडे अनेक प्राण्यांची त*स्करी केली जाते, त्यातलेच काही प्राणी म्हणजे कासव, खवलं मांजर, मांडूळ, नाग आणि मुंगूस. वन्यप्राण्यांबरोबरच पक्ष्यांचीही तस्करी केली जाते. जगभरात घुबड आणि ससाण्याला बरीच मागणी आहे.
वन्यप्राण्यांच्या त*स्करीत खवले मांजर सर्वात वरच्या क्रमांकाला आहे. खवलं मांजर हा अत्यंत लाजाळू असा निरुपद्रवी आणि सस्तन प्राणी आहे. भारतात अत्यंत दाट जंगलांमध्ये हा वास्तव्य करतो. भारतीय खवल्या मांजराची लांबी ६० ते ७५ सेंटीमीटर्स इतकी असून शेपटीची लांबी ४५ सेंटीमीटर्स असते. त्याचं डोकं छोटं व निमुळतं असतं, डोळे आणि कानही बारीक असतात पण त्यांचे घाणेंद्रिय म्हणजेच वास घेण्याची क्षमता प्रचंड असते. तोंडात दात नसतात पण पायाला नखं मात्र धारदार असतात. त्याची ओळख असलेली खवलं ही केराटिनपासून बनलेली असतात, त्यांची रचना घराच्या कौलांसारखी असते. ते त्यांचं संरक्षणात्मक कवच असतं.
खवल्या मांजराचं डोकं, पाठ, अंगाच्या दोन्ही बाजू, पाय आणि शेपटी मोठ्या खवल्यांनी झाकलेले असतात. खवलं मांजर हा निशाचर प्राणी आहे, दिवसा ते आपल्या बिळात झोपलेले असतात. आपल्या धारदार नखांनी ते बिळं उकरतात, एकदा का बिळात घुसले की आतून बीळ बंद करून घेतात. हा प्राणी माणसांसाठी अत्यंत निरुपद्रवी आहे, त्याचं अन्न म्हणजे मुंग्या आणि वाळव्या! आपल्या चिकट जिभेने ते मुंग्या टिपून खातात. तसं बघायला गेलं तर खवलं मांजर हा अत्यंत मजबूत प्राणी आहे पण त*स्करीमुळे आणि शिकरीमुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
जगात खवल्या मांजराच्या एकूण आठ प्रजाती आढळतात. आफ्रिका खंडात चार आणि आशिया खंडात चार अशा या आठ प्रजाती आहेत. आपल्या आशिया खंडात फिलिपन खवले मांजर, सुंदा खवले मांजर, चिनी खवले मांजर आणि भारतीय खवले मांजर अशा चार प्रजाती आहेत
आपल्या भारतात मात्र खवलं मांजर हे दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे चिनी खवलं मांजर आणि दुसरं भारतीय खवलं मांजर. भारतात हिमालय आणि ईशान्य भारत सोडून सगळीकडे खवलं मांजर वास्तव्यास असतं. हल्ली आंतरराष्ट्रीय बाजारात चिनी खवल्या मांजरांची संख्या घटली आहे म्हणून त*स्करी करणारे लोक भारतीय खवल्या मांजराकडे वळत आहेत. खवल्या मांजराची राहण्याची जागा शोधून, त्यांच्या बिळांचा शोध घेऊन त्यांना उकळून मारण्यासाठी एक रॅकेट चालवल्याचंही बोललं जातंय.
खवले मांजराची शिकार बऱ्याचदा अंधश्रद्धेपोटी केली जाते पण त्याचबरोबर खवले मांजराच्या खवल्यांचा उपयोग औषधांमध्येही केला जातो. ही खवलं चीनमध्ये नेऊन त्यापासून औषध बनवलं जातं. या औषधाने दमा आणि संधीवात बरा होतो असं म्हटलं जातं. याच खवल्यांमुळे अनेक खवल्या मांजरांनी आपला जीव गमावला आहे. काही देशांमध्ये खवल्या मांजराचं मांसही खाल्लं जातं.
वर म्हटल्याप्रमाणे खवलं मांजर हा मजबूत प्राणी आहे, निसर्गतः त्याला स्वतःचं रक्षण फार चांगल्या पद्धतीने करता येतं. जेव्हा त्याला कोणत्याही प्रकारच्या धोक्याची चाहूल लागते तेव्हा ते स्वतःच्या शरीराचा चेंडूसारखा गोल आकार करून घेतं. एकदा का त्याने स्वतःला चेंडूसारखं बनवलं की त्याला पुन्हा आधीसारखं बनवणं कोणालाही शक्य होत नाही. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला तरीही त्याला फरक पडत नाही. कोणतीही मात्रा लागू पडत नसल्याने खवल्या मांजराला अत्यंत अमानुष पद्धतीने मारलं जातं. एकदा का खवल्या मांजराला पकडलं की त्याला उकळत्या पाण्यात टाकलं जातं, गरम पाण्यात पडताच खवलं मांजर आपला जीव गमावून बसतं.
खरंतर खवलं मांजर हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र आहे. खवलं मांजर नैसर्गिकरित्या पेस्ट कंट्रोल करायचं काम करत असतं. लाल मातीत असणारी वाळवी खाऊन ते एकप्रकारे शेतकऱ्यांना मदतच करत असतं.
गेल्या काही वर्षांत खवले मांजराची इतक्या मोठ्या प्रमाणावर शिकार झाली आहे की ते आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खवले मांजराची ही शिकार रोखण्यासाठी आणि त्याची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची घोषणा केली गेली. ही घोषणा २०१६ साली ‘WWF’ म्हणजेच World Wildlife Fund आणि ‘TRAFFIC’ या संस्थांनी केली.
२०१६ साली ही घोषणा करूनही २०१९ मध्ये कडक निर्बंध असताना खवल्या मांजराची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याचं लक्षात आलंय. WWF ने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार २०११ ते २०१३ या तीन वर्षांच्या कालावधीत जगभरात तब्बल २ लाख ३३ हजार ९८० खवल्या मांजरांची शिकार झाल्याचं म्हटलं आहे.
भारतात ‘वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२’ नुसार वन्यप्राण्यांना पकडणं, त्यांना डांबून ठेवणं, त्यांची शिकार किंवा विक्री करणं हा गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतचा कारावास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
कायदेशीर कारवाईची तरतूद असतानाही खवले मांजराची शिकार थांबतात दिसत नाही, त्यामुळे स्थानिक लोकांनीच त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘डुगवे’ या गावातले गावकरी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसावर नजर ठेऊन असतात. डुगवे गावाजवळच्या जंगलात खवले मांजरं राहतात, त्यामुळे त्या भागात बाहेरील व्यक्तीस फिरण्यास मनाई आहे.
जगभरात फेब्रुवारी महिन्यातला तिसरा शनिवार हा खवले मांजराचा दिवस म्हणून साजरा केला जातो, खवलं मांजराचं निसर्गातलं स्थान लक्षात घेऊन त्याचं संवर्धन करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. या पृथ्वीवरून खवलं मांजर समूळ नष्ट होण्याआधी त्याच्या संवर्धनासाठी सरकार आणि आपणही स्थानिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.