आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
टेस्ट हा क्रिकेटचा जुना फॉरमॅट आहे. कसोटी सामन्यामध्ये जी मजा आहे ती वनडे आणि टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये नाही, असं मत असलेले लाखो क्रिकेट रसिक आजही सापडतात. टेस्ट क्रिकेटला लोकप्रिय करण्याचं श्रेय खेळाडूंना जातं, विशेषत: १९७० ते २००० या तीन दशकांतील खेळाडूंना. याकाळात अनेक असे खेळाडू होऊन गेले की लोक खास त्यांच्यासाठी टेस्ट क्रिकेट पहायचे. अशाच खेळाडूंमध्ये भारताचा ‘जम्बो’ म्हणजेच अनिल कुंबळेचा समावेश होतो.
लेगस्पिनर अनिलच्या बॉलिंगमध्ये कमालीची जादू होती. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे होती. १९९८-९९च्या भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सिरीजमध्ये तर त्यानं ‘कहर’ केला. त्या सिरीजमध्ये अनिल कुंबळे नावाची दहशत पाकिस्तानी खेळाडूंनी प्रत्यक्ष अनुभवली होती.
१९९८ च्या शेवटी टेस्ट सिरीज खेळण्यासाठी पाकिस्ताननं १२ वर्षांनंतर भारतात पाऊल ठेवलं होतं. भारत-पाकिस्तानचे क्रिकेट सामने म्हणजे दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. तेव्हाही होता आणि आताही आहे. सिरीजमधील पहिला सामना चेन्नईमध्ये झाला. सिरीजच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं भारताचा १२ धावांनी दारून पराभव केला. पाकिस्ताननं पहिल्या डावात २३८ धावा केल्या.
मोईन खानचे ६० रन्स आणि अनिल कुंबळेच्या सहा विकेट्स ही या डावाची ठळक वैशिष्ट्ये ठरली. याला उत्तर म्हणून भारतानं २५४ रन्स केले. भारताच्या बाजूनं सौरव गांगुलीनं ५४ धावांची सर्वोच्च धावसंख्या केली होती तर पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकनं ५ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात पाकिस्ताननं शाहिद आफ्रिदीच्या शानदार १४१ रन्सच्या बळावर २८६ रन्स केले.
भारतानं देखील दमदार प्रत्युत्तर दिलं होतं. एक वेळ अशी होती की, भारताचे ६ आऊट २५४ रन्स झालेले होते. क्रीजवर भारताचा भरभक्कम आधार सचिन तेंडुलकर उपस्थित होता. मात्र, विजयापासून केवळ १७ रन्स दूर असताना सचिन आऊट झाला. त्यानंतर भारतीय संघाच्या टेलेंडर्सनं सपशेल हार पत्करली. पुढील चार रन्समध्ये भारताच्या चार विकेट गेल्या अन् सिरीजमधील पहिला पराभव भारताच्या पदरात पडला.
पाकिस्तान विरुद्धचा हाताशी आलेला पहिलाच सामना भारतानं अतिशय वाईट पद्धतीनं गमावल्यानं भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी उमटली होती. मीडियानं देखील भारतीय संघावर टीका केली होती. दोन्ही देशांतील दुसरा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर खेळवला जाणार होता. भारताला हा सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणं गरजेचं होतं. कारण, सामना ड्रॉ जरी झाला असता तरी ट्रॉफी पाकिस्तानला गेली असती.
भारतीय कर्णधार अझरुद्दीननं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अक्रम, वकार आणि सकलेन यांचा समावेश असलेल्या पाकिस्तानी बॉलिंग अटॅकचा सामना करणं त्याला कदाचित जास्त सोपं वाटलं असावं. सदागोपन रमेश आणि व्हीव्हीएस लक्ष्मणनं इनिंगची सुरुवात केली. चांगली सलामी देत भारताचा स्कोअरकार्ड त्यांनी ८८ पर्यंत नेला. ही जोडी मोठी सलामी देईल असं वाटत असतानाच अक्रमची एक कमालीची इन-स्विंग डिलीव्हरीनं लक्ष्मणच्या बॅट आणि पॅडमधून जागा शोधली आणि लक्ष्मण आउट झाला.
त्यानंतर कर्णधार अझरुद्दीन मैदानावर आला. रमेश आणि त्यानं मिळून ६७ धावांचं योगदान दिलं. चांगली सुरुवात होऊनही भारतीय संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला नाही. सगळा संघ २५२ धावा करून माघारी आला होता. पाकिस्तानच्या सकलेननं पाच विकेट्स घेतल्या होत्या.
पाहुण्यांच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पाकिस्तानचा स्कोअर एक असताना सईद अन्वर, व्यंकटेश प्रसादच्या स्विंगला बळी पडला. त्यानंतर आफ्रिदी आणि इजाज अहमद दोघांनी स्कोअरकार्ड ५४ पर्यंत नेला. मात्र, भारतीय बोलर्सनी अप्रतिम बोलिंग करत पाहुण्यांना स्वस्तात उरकण्यास भाग पाडलं. पाकिस्तानचा डाव १७२ धावांवर आटोपला.
फिरकीची जोडगोळी अनिल कुंबळेनं चार आणि हरभजन सिंगनं तीन विकेट घेतल्या होत्या. भारताकडं ८० रन्सची आघाडी होती. कोटलाच्या खेळपट्टीवर बॉल काहीसा खाली राहत होता आणि दोन्ही बाजूंनी स्विंग मिळत होता. आम्हाला कल्पना आली होती की पाकिस्तानला शांत ठेवायचं असेल तर स्पिनर्सला आपला जोर लावावा लागणार होता, अशी प्रतिक्रिया अनिल कुंबळेनं दिली होती.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. १५ स्कोअर असताना लक्ष्मण आउट झाला. त्यानंतर द्रविड आणि तेंडुलकर यांनी देखील विशेष काही केलं नाही. आपली दुसरीच टेस्ट खेळत असलेल्या रमेशनं मात्र, मुख्य भूमिका साकारली. त्यानं ९६ रन्स करून संघाची धावसंख्या वाढवण्याचं काम केलं. सौरव गांगुलीनं ६२ रन्स करून रमेशला मोलाची साथ दिली. गांगुलीनं कुंबळे आणि श्रीनाथला हाताशी धरून भारताचं स्कोअर कार्ड ३३८ पर्यंत नेलं.
दोन दिवसांचा खेळ बाकी असताना भारतानं पाकिस्तानला एकूण ४२० रन्सचं टारगेट दिलं. पाकिस्ताननं मोठ्या आत्मविश्वासानं आपल्या डावाची सुरुवात केली. दुपारच्या जेवणापर्यंत एकाही भारतीय बोलरला छाप पाडता आली नाही. पाकिस्तानचा स्कोअर बिनबाद १०१पर्यंत केला होता. भारतीयांच्या मनात पुन्हा कसोटी गमावण्याची भीती घर करू लागली होती.
एकूण स्थिती पाहता भारतीय संघाचे कोच अंशुमन गायकवाड यांनी अझरला एक मोलाचा सल्ला दिला. कोटलाच्या खेळपट्टीवर अनिल कुंबळे हा एकमेव व्यक्ती पाकिस्तानला अडचणीत आणू शकत होता. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये तो खचून जाणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला कोचनं दिला होता. त्यानंतर अझहरने अनिलला अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं.
दुपारच्या जेवणानंतर अझरनं कुंबळेला पॅव्हेलियन एन्डवर आणलं. आफ्रिदीनं ऑफ स्टंपच्या बाहेर एक बॉल टोलवण्याचा प्रयत्न केला मात्र, तो सरळ मोंगियाच्या हातात जाऊन पडला. त्यापाठोपाठ कुंबळेनं इजाज अहमदला देखील माघारी धाडलं. अनिल कुंबळे हॅट्ट्रिक करण्याचा मार्गावर होता मात्र, इंझमामनं पुढील काही बॉल खेळून काढले आणि हॅट्ट्रिक टाळली. फटकेबाजी करण्याच्या नादात तो देखील कुंबळेचा बळी ठरला. त्यानंतर आलेला युसूफ योहाना देखील लवकर माघारी गेला. त्याची विकेट सुद्धा अनिल कुंबळेला मिळाली होती. लंचपूर्वी बिनबाद १०१ वर असलेला पाकिस्तानी संघाची अवस्था चार बाद ११५ झाली होती.
सुरुवातीचे खेळाडू आउट झालेले असले तरी घातक असलेला सईद अन्वर अद्याप आव्हान बनून उभा होता. अन्वरनं एका बाजूनं भक्कमपणे बचाव सुरू ठेवला तर कुंबळेनं आपली बळी मिळवण्याची मोहीम. कुंबळेनं मोईन खानला स्लिप एरियामध्ये उभ्या असलेल्या गांगुलीकडे कॅच देण्यास भाग पाडलं. त्यानंतर धोकादायक सईद अन्वरला सुद्धा लक्ष्मणकरवी माघारी पाठवलं. पाकिस्तानची अवस्था सहा बाद १२८ झाली होती.
कुंबळेनं १५ रन्स देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. लंचपासून ते ‘टी’पर्यंत सतत बॉलिंग केल्यामुळं कुंबळे थकला होता. मात्र, ‘टी’नंतर त्याला पुन्हा नवीन उमेद मिळाली. सलीम मलिक आणि वसीम अकरम या शेवटच्या धोकादायक जोडीला मैदानाबाहेर काढण्यास तो सज्ज झाला. या जोडीनं ५८ धावांची भागीदारी केली होती. कुंबळेनं मलिकला एक फास्ट बॉल टाकण्याचा निर्णय घेतला. कुंबळेच्या नियोजनाप्रमाणं बॉल सरळ जाऊन मधल्या स्टंपला लागला आणि मलिक बाद झाला. त्यानंतर काही वेळातचं द्रविडनं गलीमध्ये मुश्ताक अहमदचा कॅच घेतला. तर पुढे सकलेन कुंबळेचा नववा बळी ठरला.
अनिल कुंबळे, भारताचा लेगस्पीनर एका विक्रमाच्या उंबरठ्यावर होता. त्याक्षणी प्रत्येकाला वाटत होतं की, दहावी विकेट कुंबळेलाचं मिळावी. जगवाल श्रीनाथ देखील बॉलिंग करत होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विकेट मिळू नये अशी प्रार्थना आपण केली होती असं श्रीनाथनं या टेस्टनंतर सांगितलं होतं. क्रिकेट इतिहासातील कदाचित ती पहिलीच वेळ असावी की एक बॉलर विकेट मिळू नये प्रार्थना करत होता.
आपल्या परिनं प्रयत्न करूनही आपल्या जाळ्यात अडकण्यापासून श्रीनाथ अक्रमला रोखू शकला नाही. अक्रमनं मारलेला एक बॉल क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या रमेशकडं गेला. त्यावेळी जवळपास सर्व संघ त्याला कॅच सोडून देण्यासाठी ओरडत होता, अशी एक आठवण लक्ष्मणनं टेस्टनंतर सांगितली होती. रमेशनं कॅच घेतला असता की सोडला असता हे त्यालाचं माहिती पण तो बॉल त्याच्या पर्यंत पोहचलाचं नाही! त्यानंतर कुंबळे पुन्हा बॉलिंगसाठी आला.
शेवटी एका साध्या लेग ब्रेकवर अक्रमनं पुन्हा बॉल उडवला आणि लक्ष्मणनं तो झेल अचूकपणे टिपला. अनिल कुंबळेला डावातील दहावी विकेट मिळाली. दुपारच्या जेवणानंतर कुंबळेनं २०.३ ओव्हर्स बॉलिंग करून केवळ ४७ रन्स देऊन सर्वच्या सर्व पाकिस्तानी टीम माघारी पाठवण्याची किमया केली होती. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात ऐतिहासिक स्पेल होता.
कुंबळेच्या जादुई फिरकीमुळं भारतानं पाकिस्तानवर २१२ रन्सनी दणदणीत विजय मिळवला होता. चेन्नईमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा दिल्लीमध्ये काढण्याचं काम भारतीय संघानं केलं होतं. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कुंबळेला त्याच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर उचलून पॅव्हेलियनमध्ये नेलं होतं.
त्यानंतर कुंबळेची जगभरात चर्चा झाली होती. त्यानं भारतासाठी १३२ टेस्ट मॅचेस खेळून ६१९ विकेट्स घेतलेल्या आहेत. मुथय्या मुरलीधरन (८००) आणि शेन वॉर्न (७०८) यांच्यानंतर जास्त टेस्ट विकेट घेण्यामध्ये कुंबळेचाचं क्रमांक येतो. त्यानंतर पुन्हा कुंबळेनं एका डावात १० विकेट्स मिळवल्या. मात्र, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची सर त्यांना आली नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.