आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
वाढलेले वजन कसे कमी करायचं याची चिंता अनेकांना असते. यासाठी सगळ्यात पहिला उपाय डोक्यात येतो तो डायटिंगचा. कोणी दीक्षित डायट फॉलो करतं कोणी दिवेकर, तर कित्येक लोक वजन कमी करायचं म्हणून सरळ उपवास करतात. पण माणूस फार फार तर एक आठवडा विना अन्नपाण्याचा राहू शकतो. यापेक्षा जास्त दिवस जर कुणी उपवास करायचा म्हटले तर निश्चितच तब्येत बिघडेल, अशक्तपणा वाढेल, कदाचित मृत्यूही.
स्कॉटलंडच्या एका सत्तावीस वर्षीय तरुणाने मात्र ही शक्यता पूर्णत: मोडीत काढली.
हा तरुण तब्बल ३८२ दिवस न जेवता राहिला होता. म्हणजे एक वर्षाहूनही जास्त काळ त्याने अन्नाचे सेवनच केले नव्हते. या तरुणाचे नाव होते अँगीस बॅर्बिअरी.
पण अँगीसने हा निर्णय का घेतला आणि प्रदीर्घ काल उपाशी राहिल्याने त्याच्या शरीरावर काही विपरीत परिणाम झाले की नाही? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.
बॅर्बिअरी खूप लठ्ठ माणूस होता. सत्ताविसाव्या वर्षी त्याचे वजन २०७ किलो होते. वजन कमी करण्यासाठी त्याने काय केले पाहिजे याचा सल्ला घेण्यासाठी तो स्कॉटलंडच्या रॉयल इन्फिमरी ऑफ ड्युंड येथील डॉक्टरांना भेटायला आला.
त्याचे वजन खूपच जास्त होते त्यामुळे डॉक्टरांनी त्याला काही दिवस उपवास करण्याचा सल्ला दिला. थोडे दिवस उपवास केल्याने त्याचे वजन थोडे तरी कमी होईल असा डॉक्टरांचा अंदाज होता. पण, त्याने काहीच दिवस हा प्रयोग करावा असा सल्ला त्यांनी दिला होता.
बॅर्बिअरीने एक दिवस दोन दिवस करत करत संपूर्ण आठवडाभर उपवास केला. याचा त्याला फायदा जाणवू लागला. त्याने उपवास करणे बंद करण्याऐवजी ते सुरूच ठेवले. जोपर्यंत आपले मूळ वजन (८०किलो) प्राप्त करत नाही, आपण उपवास करतच राहणार असा निर्धार बॅर्बिअरीने केला. त्याचा हा उपवासाचा निश्चय ४० दिवसांच्याही पुढे नेला तेव्हा डॉक्टरांना थोडीफार धाकधूक वाटू लागली. पण, तरीही त्याने मात्र आपला निर्धार सोडला नाही.
उपवासाच्या या सगळ्या दिवसात त्याने घरीच थांबणे पसंत केले. अधूनमधून फक्त तो डॉक्टरांकडे आरोग्य तपासणीसाठी जात असे. कधी कधी तपासणी करण्यासाठी तो रात्रभर हॉस्पीटलमध्येच थांबत असे.
पण त्याच्या तब्येतीतील सुधारणा पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत होते. आठवडे करत करत नंतर काही महिने गेले तरी त्याने जेवण घेतले नाही. आता त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागले होते. तेव्हा मात्र डॉक्टरांनी त्याला व्हिटामिन्स, पोटॅशियम आणि सोडियम सप्लीमेंट घेण्याचास सल्ला दिला.
अधूनमधून तो हे व्हिटामिन्स घेऊ लागला. सोबत कॉफी, चहा, आणि सोडा घेऊ लागला. उपवासाच्या शेवटच्या टप्प्यात तो साखर आणि दुध घेऊ लागला.
एक वर्ष आणि पंधरा दिवस त्याने हा उपवास सुरूच ठेवला. तेव्हा कुठे त्याचे वजन ८० किलोवर आले. ११ जुलै १९६६ रोजी जेव्हा त्याने आपला हा दीर्घकालीन उपवास सोडला तेव्हा त्याने नाश्त्याला फक्त एक उकडलेले अंडे आणि ब्रेड घेतले होते. इतक्या वर्षात अन्नाची चव कशी असते हेही मी विसरून गेलो होतो, अशी अँगसची पहिली प्रतिक्रिया होती. यानंतर त्याच्या जेवणात हळूहळू वाढ करण्यात आली. पाच वर्षानंतर अँगसचे वजन पुन्हा पाच किलोंनी वाढले.
सर्वात जास्त दिवस उपवास केल्याचा किंवा अन्नपाण्यावाचून राहिल्याचा विक्रम अँगस बॅर्बिअरीच्या नावावर नोंदवला गेला. परंतु डेनिस गॅलेरने त्यानंतर बॅर्बिअरीपेक्षाही अधिक दिवस उपवास केल्याची नोंद आहे. त्याला एका बलात्काराच्या आरोपात गोवण्यात आले होते, तेव्हा आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी तो उपोषणाला बसला होता. ३८५ दिवसाच्या सलग उपोषणानंतर त्याला जबरदस्तीने अन्न पाणी घालण्याचा प्रयत्न केला होता.
अतिलठ्ठपणा कमी करण्यासाठी उपाशी राहण्याचा उपाय योजला जाऊ शकतो असे संशोधनही नंतर १९६४ मध्ये प्रसिद्ध झाले.
लठ्ठपणाने ग्रस्त व्यक्ती जास्तीत जास्त ११७ दिवसांचा उपवास करू शकते असे या संशोधनातून मांडण्यात आले.
काही लोकांनी वजन कमी करण्यासाठी २०० दिवसांचा उपवास केल्याच्याही नोंदी आढळतात. वेगवेगळ्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. जेव्हा माणसाच्या शरीरात बाहेरून अन्न जात नाही तेव्हा शरीर आपल्या नियमित कामकाजासाठी शरीरात साचलेल्या फॅट्सचाच अधिक वापर करते. शरीरात जर अधिक प्रमाणात फॅट्स असतील तर जास्तीत जास्त दिवस शरीर याच साचलेल्या फॅट्सचा वापर करून तग धरू शकते. पण ज्याच्या शरीरात असे फॅट्स साचलेले नसतील त्यांनी मात्र असा अधिक दिवस उपवास करण्याचा हट्ट धरू नये.
पण तरीही अशा प्रकारे अधिक काळ उपाशी राहण्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. क्वचित प्रसंगी जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.
१९६० पर्यंत अनेकांनी अशाप्रकारे उपवासाची पद्धत अवलंबून वजन कमी केले. मात्र पुढे पुढे खुद्द डॉक्टरांनीच अशा प्रकारे उपवास करणे आरोग्याला हानिकारक ठरू शकते, असा निष्कर्ष काढून रुग्णांना वजन कमी करण्यासाठी उपवासाचा सल्ला देणे बंद केले.
काही काही रुग्णांमध्ये उपवासाने फॅट कमी झाले तरी स्नायू कमकुवत झाल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेक रुग्णांना अशा उपवास पद्धतीने आपल्या प्राणासही मुकावे लागले. तेव्हापासून डॉक्टरांनी सरसकट उपाशी राहण्याचा सल्ला देणे बंद केले. ज्या लोकांना लो-कॅलरी डाएट घ्यायला सांगितले त्यांच्यातही उपासमारी आणि भूकबळीची लक्षणे आढळून आली.
अँगस बॅर्बिअरीसारखी पुष्कळ दिवस उपाशी राहूनही तग धरू शकतील असे रुग्ण खूप कमी आढळले. अँगसचे उदाहरण तर अतिदुर्मिळच म्हणावे लागेल.
तसेही प्रत्येक धर्मात उपवासाचे महत्त्व सांगितले आहेच. हिंदू श्रावण महिन्यात श्रावणी करतात, मुस्लीम रोझे करतात, ख्रिश्चन धर्मातही गुड फ्रायडेच्या आधी दीर्घकाळ उपवास करण्याची परंपरा आहे. उपवास केल्याने शरीराला आणि मनाला प्रसन्नता मिळते असे धर्मातून सांगितले गेले आहे.
पण, म्हणून अतिरिक्त उपवास करून शरीराला विनाकारण शीण देण्यात अर्थ नाही. दीर्घकाळाचा उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आरोग्याच्या सर्व तपासण्या करून घेणे फायद्याचे ठरेल.
अँगस बॅर्बिअरीला जे जमले ते सगळ्यांनाच जमेल असे नाही. काय म्हणता?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.