आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
दरवर्षी १ जुलै रोजी आपण राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करतो. डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ दरवर्षी त्यांचा जन्मदिन डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. डॉ. बिधान हे स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीचे अनुयायी होते. त्यांनी आपल्या व्यवसायात जे यश आणि कीर्ती मिळवली ती क्वचितच इतर कुणाला मिळाली असेल.
डॉ. बिधान रुग्ण सेवेत इतके गुंग होऊन जायचे की त्यांना खाण्या-पिण्याचेही भान राहत नसे. आधुनिक भारताच्या इतिहासात अगदी गंभीर काळात त्यांनी आपल्या व्यवसायाचा अत्यंत कुशलतेने समजाच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी उपयोग केला. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि त्यांच्या निस्सीम कार्याची पोचपावती म्हणूनच आज भारतात त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.
डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै, १८८२ रोजी पटना येथे झाला. त्यांचे वडील डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. लंडनच्या सेंट बार्थोलोमीज हॉस्पिटलमध्ये त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता.
पण, या हॉस्पिटलचे डीन कोणत्याही एशियन विद्यार्थ्याला प्रवेश देण्यास इच्छुक नव्हते. शेवटी तब्बल दीड महिने सतत प्रयत्न केल्यानंतर आणि जवळपास ३० बैठका झाल्यानंतर त्यांना या हॉस्पिटलमध्ये अखेर प्रवेश देण्यात आला.
१९११मध्ये डॉ. बिधान चंद्र रॉय यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर डॉ. रॉय “रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स“चे (MRCP) सदस्य बनले. त्याचवेळी त्यांना रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (FRCS) मध्येही प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश मिळाला.
१९०५ साली बंगालची फाळणी झाली तेंव्हा ते कलकत्ता विद्यापीठात पदवीचा अभ्यास करत होते. त्यावेळी सगळे वातावरण ब्रिटिशविरोधातील आंदोलनांनी भरून गेले होते. मात्र अशा काळात देशकार्यात सहभाग घेण्याऐवजी त्यांनी अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करण्यास प्राधान्य दिले. आपण निवडलेल्या व्यवसायात जर आपण चांगले ज्ञान मिळवले आणि पात्र ठरलो तर आपण अधिक चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करू शकू हे त्यांनी तेंव्हाच ओळखले होते.
त्यांचा हा निर्णय अगदी योग्यच होता. पदव्युत्तर शिक्षण घेऊन जेंव्हा ते भारतात परत आले तेंव्हा मात्र त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. बंगालच्या राजकारणातही त्यांनी रस घेतला. महात्मा गांधींच्या वैयक्तिक आणि जवळच्या डॉक्टरांमध्ये त्यांचा समावेश होता.
१९३३ साली पुण्यात गांधींनी आत्मशुद्धी सत्याग्रह सुरु केला होता. या सत्याग्रहाच्या वेळी गांधींची तब्येत खालावली म्हणून डॉ. रॉय सत्याग्रह स्थळी गांधींवर उपचार करण्यासाठी पोहोचले. गांधींनी डॉक्टरांना प्रश्न विचारला, “मी तुझ्याकडून उपचार का करून घेऊ सांग? आपल्या देशातील चारशे दशलक्ष लोकांवर तू मोफत उपचार करू शकशील का?”
डॉ. रॉय उत्तरले, “नाही, गांधीजी मी सगळ्याच रुग्णांवरमोफत उपचार करू शकत नाही. परंतु, मी इथे अशा व्यक्तीवर उपचार करण्यासाठी आलो आहे, जी माझ्या देशातील चारशे दक्षलक्ष लोकांचे प्रतिनिधित्व करते”. यावर गांधी म्हणाले, “तुम्ही तर एखाद्या जिल्हा न्यायालयातील वकीलाप्रमाणे युक्तिवाद करत आहात”.
या प्रसंगानंतर गांधींनी आपले विचार बदलले.
पुढे, जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले तेंव्हा नेहरू देखील आरोग्याबाबत डॉ. रॉय यांचाच सल्ला घेत असत. नेहरुंना देखील वेळेवर औषधोपचार घेण्याबाबत वेळेवेळी आज्ञा देण्याची क्षमता फक्त डॉ. रॉय यांच्याकडेच होती.
भारतीयांना शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि सदृढ बनावण्यात औषधांची चांगली मदत होऊ शकते असा डॉ. रॉय यांचा विश्वास होता. भारतीय आरोग्याने सुदृढ असतील तरच ते ब्रिटिशांविरोधात लढू शकतील, असे ते म्हणत. यासाठी त्यांनी ठिकठिकाणी हॉस्पिटल्स उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी जाधवपूर टी. बी. हॉस्पिटल, चित्तरंजन सेवा सदन, कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटल, विक्टोरिया इन्स्टिट्यूशन (कॉलेज), चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल आणि महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी चित्तरंजन सेवा सदन अशा संस्था उभारल्या.
१९३१-३३ या काळात ते कलकत्ता शहराचे महापौर होते. या काळात शहरात मोफत शिक्षण, सार्वजनिक आरोग्य केंद्रांची सुविधा, रस्त्यांची सुविधा, रस्त्यांवर दिव्यांची सुविधा पाणीपुरवठा अशा विविध पायाभूत सोयीसुविधांमध्ये प्रगती केली. १९४२-४४ याकाळात त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे सांभाळली.
१९३९ साली ते मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी एक उत्तम प्रशासकाची भूमिका देखील तितक्याच तडफेने, प्रामाणिकपणे आणि दक्षतेने पार पडली.
महात्मा गांधींच्या विनंतीवरून त्यांनी १९४८ साली बंगालचे मुख्यमंत्री पद स्वीकारले. त्याकाळात बंगालमध्ये सांप्रदायिक हिंसेनी उच्छाद मांडला होता. बंगाल प्रांत अशांत बनला होता. बंगालच्या फाळणीमुळे निर्वासितांचा प्रश्न देखील तीव्र बनला होता. परंतु, डॉ. रॉय यांच्या कामाच्या पद्धतीने तीन वर्षात बंगालमध्ये शांतता प्रस्थापित झाली.
सुमारे १४ वर्षे ते राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतु, या काळातही ते रुग्णसेवेसाठी आवर्जून वेळ काढत असत.
त्यांच्या मृत्यूपश्चात ब्रिटीश मेडिकल जर्नलने लिहिलेल्या एका लेखात त्यांच्याबद्दल असे लिहिले आहे की, “भारतीय उपखंडात डॉ. रॉय हे पहिले असे वैद्यकीय सल्लागार होते जे आपल्या समकालीन डॉक्टरांना हरेक क्षेत्रात मागे टाकून ते पुढे जात राहिले.”
त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांना प्रचंड उत्साह होता. इतका की, अगदी एखाद्या शहराला किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनला डॉक्टर भेट देणार असल्याची बातमी पसरताच अक्षरश: रुग्णांची अमाप गर्दी त्याठिकाणी लोटत असे.
१ जुलै, १९६२ साली त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. परंतु, जनसेवेचा एक अत्यंत आदर्श आणि उत्तम नमुना ते जाताजाता मागे ठेवून गेले. त्यांच्या या कार्याबद्दल प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डॉक्टरी पेशा स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीला सॅल्युट केला जातो.
एक सेवाभावी डॉक्टर आणि कुशल, दक्ष प्रशासक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.