आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या प्रत्येक राज्याचा एक इतिहास आहे. त्याच्या निर्मितीपासून तेथील लोकांनी केलेल्या संघर्षापर्यंत सर्व गोष्टी इतिहासात नमूद केलेल्या आहेत. इतिहासात अनेक असे नायक आहेत ज्यांनी मोठे जनआंदोलन उभारले, त्याबरोबरच अनेक सामाजिक सुधारणादेखील केल्या.
अशाच नायकांपैकी एक होते राजस्थानचे पहिले मुख्यमंत्री हिरालाल शास्त्री.
हिरालाल शास्त्री हे नाव फार कमी लोकांना परिचयाचे असेल, परंतु भारताच्या स्वातंत्र्यता संग्रामात आणि एकूणच जडणघडणीत हिरालाल शास्त्री यांचे मोठे अमूल्य योगदान आहे. त्यांनी ब्रिटिश सत्तेचा धिक्कार करत ब्रिटिशांचे मांडलिक बनलेल्या संस्थानिकांच्या राजसत्तेला राजस्थानमध्ये मोठे आव्हान दिले होते. पुढे तेच राजस्थानचे पहिले मुख्यमंत्री बनले.
राजकारणाबरोबर सामाजकारणात त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांनी त्याकाळात स्त्री-पुरुष समानतेची हाक देत भारतातील पहिले महिलांचे निवासी विद्यापीठ स्थापन केले होते. इतकंच नाही तर संविधान सभेत महिलांना समान हक्क मिळावे ही मागणीदेखील लावून धरली होती.
शास्त्री यांचा जन्म जयपूर जवळील जोबनेर गावातील एका सधन कुटुंबात २४ नोव्हेंबर १८९९ रोजी झाला. १९२१ साली जयपूरच्या पदवी प्रशिक्षण महाविद्यालयातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत पदवी प्राप्त केली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी करायला सुरुवात केली आणि ते ब्रिटिश सरकारच्या गृह व परराष्ट्र व्यवहार विभागाच्या सचिव पदापर्यंत जाऊन पोहचले.
परंतु, शास्त्री यांना सामाजिक कार्यात मोठा रस होता. ६ वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरीतून राजीनामा दिला. त्यांनी जयपूरपासून ५२ किमी अंतरावर असलेल्या बनस्थळी नावाच्या एका खेड्याला दत्तक घेतले. तिथे अनेक सुधारणा केल्या तसेच त्या गावात जीवन कुटीर या नावाने अनेक आर्थिक आणि सामाजिक संस्थांचा विकास केला.
त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची फौजच तयार केली आणि ग्रामविकासाचा कार्यक्रम हाती घेतला. शास्त्रींच्या हाताखाली तयार झालेले अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले आणि त्यांनी सत्ताधारी लोकांना आव्हान दिले.
सामजिक कार्य करत असताना १९३७ साली ते राजकारणात उतरले. त्यांनी जयपूर राज्य प्रजा मंडळात सहभाग घेतला जी एका राष्ट्रव्यापी आंदोलनाचा भाग असलेली, एक देशभरात हाती घेण्यात आलेली चळवळ होती. या चळवळीचा प्रमुख उद्देश ब्रिटिश सरकारच्या ताटाखालचे मांजर झालेल्या संस्थनिकांचा पडाव करणे हा होता.
प्रजा मंडळ आंदोलन हे मानवी हक्कांसाठी तर होतेच पण त्यांनी शाळा उभारणे, खादी उद्योगाचा प्रचार प्रसार करणे, स्थानिक गिरणी उद्योगाला सहाय्य करणे आणि अस्पृश्यते विरोधात आंदोलन करणे यासारखी सामजिक विधायक कार्ये देखील केली.
प्रजा मंडळाचे सचिव म्हणून शास्त्री यांनी जयपूरच्या संस्थनिकांचा व ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन केले. १९३९ साली त्यांना अटक करण्यात आली. सत्याग्रह केला म्हणून ६ महिन्यांसाठी त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
प्रजा मंडळमध्ये केलेल्या अमूल्य योगदानामुळे १९४७ साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांची ऑल इंडिया स्टेट्स पीपल कॉन्फरन्स, या संस्थानात चालू असलेल्या जनआंदोलनाच्या संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. २५ एप्रिल १९४८ ला ही संघटना बरखास्त करण्यात जेव्हा अनेक संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन झाले होते.
या संघटनेने भारताच्या एकीकरणात मोठी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी भारत सरकारच्या वतीने असंख्य संस्थानिकांशी बोलणी केली.
त्यावर्षी त्यांची जयपूर संस्थांनातून संविधान सभेवर निवड करण्यात आली. त्यांचे संस्थानासोबत वाद असले तरी त्या भागाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली उपस्थिती सिद्ध केली. त्यांनी संस्थांनांच्या बाजूने प्रतिनिधींना बोलण्याचा हक्क असावा का? यावर बोलताना म्हटले होते की, आम्ही संस्थानिक आहोत. त्यांचे वारसदार आहोत संस्थानिकांचे प्रतिनिधी आहोत अथवा आम्ही निवडणूक जिंकून निवडून आलेले प्रतिनिधी आहोत, याला महत्व नसून आम्हाला आमची बाजू मांडण्याचा संपूर्ण हक्क आहे.
संस्थानातुन आले म्हणून ते मागास ठरत नाही, कुठल्याही प्रकारचा जातीय व धार्मिक भेदभाव न करता सर्वांना बोलण्याची समान संधी दिली जावी.
२७ मार्च १९४८ ते २९ मार्च १९४९ या कालावधीत त्यांनी जयपूर संस्थानाचा प्रधानमंत्री म्हणून कार्य पाहिले. पुढे गृहमंत्री सरदार पटेल यांनी त्यांच्यावर राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली. ते राजस्थानचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्यावर संस्थानांच्या भारतात विलगिकरण करण्याचे कार्य सोपविण्यात आले जेणेकरून देशाचा कारभार सुव्यस्थितपणे पार पाडला जाऊ शकेल.
त्यांनी जरी भारतीय गणराज्यात अनेक संस्थानांचे विलगिकरण केले तरी त्यांच्याबद्दल राजस्थानच्या स्थानिक नेत्यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांना मोठा विरोध केला जात होता. पुढे १९५० ला पटेल गेल्यावर त्यांची बाजू अजूनच कमकुवत झाली. परिणामत: त्यांनी १९५१च्या सुरुवातीला आपला राजीनामा दिला. पुढे ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले.
या सर्व राजकीय घटनाक्रमात १९३५ साली त्यांनी बनस्थळी या दत्तक घेतलेल्या गावी आपल्या पत्नीच्या मदतीने मुलींसाठी एक निवासी शाळा सुरू केली. ही शाळा त्यांनी त्यांच्या दिवंगत मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारली होती, जिचे वयाच्या १२ व्या वर्षीच निधन झाले होते. आज विद्यापीठात २००० मुली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.