आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सतरावे शतक भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते. या काळात भारतात मुघलांची सत्ता होती. याच काळात अनेक परकीय आक्र*मक देखील भारतात येऊन आपला साम्राज्य विस्तार करत होते. या काळात युरोपियांची भूमिका जरी साम्राज्यविस्ताराची होती तरी त्यांनी आधी व्यापाराचा मार्ग स्वीकारला होता.
त्यांनी मुघल दरबारी मुजरे करून आणि सत्ताधीश तसेच सरदारांना पैसे, भेटवस्तू देऊन आपला व्यापारी कारभार करायला सुरुवात केली होती. त्यांनी बंदरांवर ताबा मिळवला.
ब्रिटीश आणि फ्रेंच राजसत्ता प्रबळ होण्याआधी भारतात पोर्तुगीज व्यापाऱ्यांचा दबदबा होता. वास्को-द-गामाच्या आगमनानंतर भारतात पोर्तुगीज यायला सुरुवात झाली. त्यांनी भारताच्या पश्चिमी तटावर आपले प्राबल्य प्रस्थापित करून तेथे बंदरांची निर्मिती केली. त्यांनी पश्चिमी किनाऱ्यावर अनेक व्यापारी पेठांची निर्मिती केली.
जवळजवळ ७० वर्षे पोर्तुगीजांचे भारताच्या पश्चिमी तटावर प्राबल्य होते.
पण एक घटना अशी घडली ज्यामुळे पोर्तुगीजांच्या या पश्चिमी तटावरील सत्तेला मोठा धक्का बसला व त्यानंतर कधीच पोर्तुगीज पुन्हा आपले डोके वर काढू शकले नाहीत. पोर्तुगीज राजसत्ता मुघलांना हफ्ता देऊन आपला व्यापार करत असे. त्यांनी मुघलांकडून किनाऱ्यावर आपले जहाज लावण्याची आणि व्यापार करण्याची परवानगी मिळवली होती. त्यांच्या यु*द्धनौकांच्या बळावर त्यांनी समुद्रात मोठा झंझावात निर्माण केला होता. त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यापासून काही मैल अंतरापर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली.
आपल्या वसाहतींची उभारणी त्यांनी या किनारपट्टीवर करून व्यापारी पेठांची निर्मिती केली.
गुजरातच्या सुरतेचे बंदर आणि व्यापारी पेठ म्हणून विकास पोर्तुगीजांनी केला. पोर्तुगीजांनी गोव्यात आपल्या भारतातील अधिसत्तेचं केंद्र प्रस्थापित केलं होतं. सुरतमध्ये व्यापाराला सुगीचे दिवस असतांना त्यांच्याकडून एक खूप मोठी चूक झाली, ज्यामुळे त्यांच्या राजसत्तेला भारतात कायमचा पायबंद बसला आणि त्यांचा प्रभाव मर्यादित झाला. याचं कारण फक्त एक मुघल सम्राज्ञी होती जिचा अपमान पोर्तुगीजांनी केला होता. हरखाबाई असे या साम्राज्ञीचे नाव होते.
हरखाबाई, मुळच्या अंबरच्या राजपूत घराण्याच्या राजकन्या होत्या. त्यांचा विवाह अकबराशी झाला, विवाहानंतर तिचा दरबारी राजकारणात मोठा वावर असायचा. ती मुघलांच्या घराण्याची सून असून देखील तिने इस्लामचा स्वीकार केला नव्हता.
हुमायून आणि बाबराच्या काळात देखील महिलांना दरबारी राजकारणावर मत मांडण्याचा अधिकार होता पण अकबराच्या काळात मुघलांचा व्यवहार हा संपूर्णपणे वेगळा होता.
अकबराने राण्यांना बरीच मोकळीक देऊ केली होती. हरखाबाईंना अकबराने ‘मरियम-उर-झुमानी’ असे टोपणनाव दिले होते ज्याचा अर्थ जगताची माता असा होतो. अकबराच्या मृत्युनंतर जहांगीर गादीवर बसला. यामुळे हरखाबाईंच्या हातात खऱ्या अर्थाने सत्ता आली, त्यांच्या जवळ १२ हजार सैन्याची धुरा सोपविण्यात आली होती. हरखाबाई जहांगीराच्या दरबारातील चार प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी एक बनल्या होत्या. दरबारातील कामकाजात प्रवेश मिळवू शकलेल्या त्या एकमेव महिला होत्या.
एका मोठ्या सैन्याची धुरा हाती आल्यामुळे त्यांचे पती आणि मुलावर असलेले अवलंबित्व फक्त पैशासाठी होते. त्या स्वतःच एक हरम चालवायच्या जो एक छोटेखानी राजदरबारचं होता. तिने अनेकांना पैसा, दागिने इत्यादी गोष्टी दिल्या. हरखाबाईंनी मुघलांच्या व्यापारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
हरखाबाई त्या काळच्या सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जायच्या आणि त्यांचा मुघलांच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता. हरखाबाई या राजपूत घराण्यात वाढल्या होत्या आणि त्यांची राज्यकारभारावर विशेष पकड होती. त्यांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रात अनेकांचे कल्याण केले. त्या जरी मुघलांच्या घरात होत्या तरी त्यांनी राजकारभारात राजपूती बाणा जपला होता. त्यांनी अनेक व्यापारी, शेतकरी लोकांचे कल्याण केले होते.
याच काळात पोर्तुगीज पश्चिमी तटावर पिंगा घालत होते. सुरतेवर आपला प्रभाव निर्माण केला होता. पण हे सगळं मुघलांच्या मर्जीत चालू होतं याचा विसर पोर्तुगीजांना पडला.
हरखाबाई ‘रेहमी’ नावाच्या एका मोठ्या बोटीतून हज यात्रेकरूंना मक्का मदिनेला पाठवत असे. अशाच प्रकारे एका वर्षी या बोटीतून प्रवासी हजला जात होते पण पोर्तुगीजांनी या प्रवासी लोकांना आडवले. त्यांच्याकडे परवान्याची मागणी करू लागले.
रेहमी जहाजाकडे आधीच परवाना होता पण पोर्तुगीजांनी त्यांना आडवले आणि मदर मेरीची प्रतिकृती जहाजावर ठेवण्याची मागणी केली पण मुघलांनी ही मागणी फेटाळून लावली. मुघलांच्या प्रतिक्रियेने पोर्तुगीज संतप्त झाले आणि कुठलंही कारण नसताना त्यांनी ते जहाज ताब्यात घेतले आणि त्या जहाजाला घेऊन पोर्तुगीज गोव्याला गेले. मुघलांनी जहाजाची मुक्तता करावी असा संदेश हरखाबाईच्या सांगण्यावरून पाठवला खरा पण पोर्तुगीजांनी त्या जहाजाला आग लावून टाकली. रेहमी हे त्याकाळातील अरबी समुद्रातील सर्वात मोठं जहाज होतं. ज्याला पोर्तुगीजांनी जाळून टाकले होते, हरखाबाईला हा अपमान सहन झाला नाही.
त्यांनी जहांगीरकरवी सुरतेतील पोर्तुगीज वसाहतीवर आक्र*मण केले, मुघलांनी पोर्तुगीजांची घरं जाळली, त्यांच्या लोकांना कैद केले आणि चर्च जमीनदोस्त केले.
मुघलांनी पोर्तुगीजांच्या सुरतेतील व्यापारावर पूर्णतः आळा घातला. पोर्तुगीजांची ही चूक त्यांना महागात पडली. मुघलांशी वाकडं घेऊन त्यांना सुरत गमवावी लागली. पुढे इंग्रजांना सुरतेचा ताबा मिळाला. पुढे शिवाजी महाराजांनी सुरतेवर ह*ल्ला केला आणि तिथला ऐवज लुटला. पण पोर्तुगीज मात्र पुन्हा कधीच सुरतेकडे जाऊ शकले नाहीत. मराठे आणि दक्षिणेतल्या हिंदू राजांशी झालेल्या यु*द्धात त्यांची आणखी पीछेहाट झाली.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि चिमाजीआप्पा पेशवे यांनी पोर्तुगीजांना चांगलीच अद्दल घडवली होती.
पोर्तुगीजांनी आपलं गोव्यातील सत्ताकेंद्र दीर्घकाळ टिकवलं, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९६१ साली त्यांनी गोव्याचा ताबा सोडला. तब्बल ४०० वर्ष पोर्तुगीजांची गोव्यावर सत्ता होती पण त्यांनी मुघलांच्या विरोधात जाऊन भारतावर राज्य स्थापन करण्याची एक मोठी संधी गमावली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.