आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
विविध मानवी सभ्यतांमध्ये मेसोपोटेमिया सभ्यतेला फार महत्त्व आहे. मेसोपोटेमिया हा टायग्रीस आणि युफ्रेट्स या दोन नद्यांच्या मधला प्रदेश होता. पुरांमुळे सुपीक झालेल्या जमिनीवर मध्यश्म्युगीन भटके जनसमूह इथे स्थिरावले व शेती करू लागले. पुढे शेतीतील प्रगतीमुळे इथे गावं आणि वसाहतींचा उदय झाला. ही मेसोपोटेमियन सभ्यता जर जगाच्या नकाशावर शोधायची झाली तर ती ज्या भागात सापडते त्या भागाला आज मध्य-पूर्व (Middle East) म्हटले जाते. या भागावर कालांतराने ग्रीक, रोमन साम्राज्यांनी अधिकार गाजवला. परंतु ही साम्राज्य नंतर खिळखिळी झाली होती व त्यातच त्यांचा अस्त झाला. या मध्य-पूर्व (Middle East) भागात अरेबिक, हिब्रू, टर्कीश, पर्शियन या चार भाषांचा जन्म झाला. ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या तिन्ही धर्मांचे उगमस्थान ही मध्य-पूर्व (Middle East) येथे आहे.
इस्लाम धर्माची सुरुवात सातव्या शतकाच्या सुरुवातीला सौदी अरेबियामध्ये झाली. महंमद पैगंबर यांनी एक नवा धर्म, नवे राष्ट्र निर्माण केले. सर्व जग इस्लाममय करण्याच्या तीव्र आकांक्षेने इस्लामी फौजेने एका मागून एक देश जिंकले. महंमद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर १०० वर्षांच्या आत स्पेनपासून ते अफगाणिस्तानपर्यंतचा सर्व मुलूख हा इस्लामच्या अधिपत्याखाली आला होता. इस्लाम धर्माचे सर्व अनुयायी स्वतःला मुसलमान म्हणवतात, पण इस्लामचा कायदा ज्याला “फिकह” म्हणतात आणि इतिहास यानुसार मुसलमान वेगवेगळ्या पंथामध्ये विभागले गेले आहेत.
पण इस्लाममध्ये शिया आणि सुन्नी हे दोन प्रमुख पंथ आहेत व या दोन्ही पंथांचे बरेच उपपंथ देखील आहेत. शिया आणि सुन्नी हे दोन स्वतंत्र गट जरी असले तरीही अल्ला एकच आहे, महंमद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहे, कुराण हा पवित्र ग्रंथ ही अल्लाची देणगी आहे या तिन्ही तत्वांवर दोन्हीही पंथाची श्रद्धा आहे व एकमत ही आहे. पण धर्मपालनाच्या विविध पद्धती व महंमद पैगंबर यांच्या निर्वाणानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण या संदर्भात दोन्ही पंथामध्ये तीव्र मतभेद आहेत.
आता शिया आणि सुन्नी पंथामध्ये नेमका काय फरक आहे तो आधी समजावून घेऊ. महंमद पैगंबर यांनी स्वतः अनुसरलेल्या गोष्टी तसंच विचारांचं पालन करणारा पंथ अशी सुन्नी गटाची ओळख आहे. सुन्नी पंथानुसार महंमद पैगंबर यांच्या नंतर त्यांचे सासरे हजरत अबू बकर हे इस्लामचे प्रमुख झाले. सुन्नी पंथ इस्लामच्या प्रमुखाला “खलिफा” असे म्हणतो. अबू बकर यांच्यानंतर हजरत उमर हे खलिफा झाले. हजरत उमर यांच्यानंतर हजरत उस्मान हे खलिफा झाले.
हजरत उस्मान यांच्यानंतर हजरत अली हे खलिफा झाले. अशा प्रकारे महंमद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर या 4 खलिफांनी इस्लामचे नेतृत्व केले. इस्लामच्या कायद्यानुसार सुन्नी पंथाचे चार उपगट आहेत. या सर्व गटांच्या धर्मपालन आणि श्रद्धांमध्ये फार फरक नाही. हे चार उपगट आहेत “हनफी”, “मालिकी”, “शाफई”, “हंबली”. हनफी या गटाचं आणखी २ विचारधारांमध्ये विभाजन झाले आहे, या दोन विचारधारा आहेत एक “देवबंदी” आणि दुसरी “बरेलवी”. वरील चारही उपगटांचे नेतृत्व हे “इमाम” करतात.
आता सुन्नी पंथामध्ये एक विचारप्रवाह असा आहे जो कोणत्याही इमामांच्या विचारांना मानत नाही. या विचारप्रवाहाच्या अनुसार शरियतचं पालन करण्यासाठी कुराण आणि हदीस यांचा अभ्यास करणे गरजेचं आहे. हा विचारप्रवाहाचं पालन करणाऱ्या समुदायाला “सलफी” आणि “अहले हदीस” या नावाने ओळखला जातो. “सलफी” आणि “अहले हदीस” हा बाकी चारही इमामांच्या ज्ञानाचा व साहित्याचा आदर करतो. “सलफी” आणि “अहले हदीस”च्या मते इमामांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी कुराण आणि हदीसनुसार असतील त्याचं पालन करावं. मात्र विवादास्पद प्रसंगी कुराण आणि हदीसचा शब्द अंतिम आणि प्रमाण राहील असं “सलफी” आणि “अहले हदीस” मानतात.
“मोहम्मद बिन अब्दुल वहाब” यांनी या “सलफी” आणि “अहले हदीस” समुदायाच्या विचाराला पुष्टी दिली. मोहम्मद बिन अब्दुल वहाब यांच्यामुळेच पुढे “सलफी” आणि “अहले हदीस” या समुदायांना “वहाबी” हे नाव मिळाले. “वहाबी” समुदायाचं वैशिष्ट्य म्हणजे ते धार्मिकदृष्ट्या अत्यंत कट्टर असतात आणि मुलतत्ववादाला पाठिंबा देतात.
वरील परिच्छेदात आपण इस्लामच्या सुन्नी पंथाबद्दल समजून घेतलं आता शिया पंथाबद्दल जाणून घेऊ. सुन्नी पंथाच्या तुलनेत शिया पंथाचे धर्मविषयक आचारविचार वेगळे आहेत. पैगंबरांनंतर दूत पाठवण्याऐवजी इमामांची नियुक्ती केली जावी या विचाराचे ते समर्थन करतात. महंमद पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे जावई “हजरत अली” यांना शिया पंथीय इस्लामचे उत्तराधिकारी म्हणून मानतात.
शिया पंथीयांच्या म्हणण्यानुसार महमंद पैगंबरांनी हजरत अली यांनाच इस्लामचा उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं, पण हजरत अबू बकर यांनी फसवून इस्लामच्या प्रमुखपदी आपली वर्णी लावून घेतली. शिया पंथीय महमंद पैगंबरांनंतरच्या तीन खलीफांना नेता म्हणून मानत नाहीत, ते या तीन खलीफांना “गासिब” असं म्हणतात. “गासिब” हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ हडपणे असा होतो.
शिया पंथियांनुसार अल्लाने महमंद पैगंबर यांना प्रेषित म्हणून पाठवलं होतं, म्हणून याच धर्तीवर महमंद पैगंबर यांचे जावई अली यांना अल्लानेच इमाम/नबी म्हणून पाठवल होतं. शिया पंथातही अनेक उपपंथ आहेत, ते म्हणजे “इस्रा अशरी”, “जैदिया”, “इस्माइली शिया”, “दाऊदी बोहरा”, “खोजा”, “नुसैरी” असे आहेत.
बहारीन, इजिप्त, इराण, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, ओमान, कतर, सौदी अरेबिया, सीरिया, संयुक्त अरब अमिराती, येमेन या देशांना मध्य-पूर्वेतील देश असे मानले जाते. इजिप्त हा देश जरी आफ्रिकेच्या ईशान्य भागात असला, तरी मध्य-पूर्वेतील राजकारणात या देशाचा सहभाग असल्यामुळे याचा समावेश मध्य-पूर्वेत केला जातो.
मध्य-पूर्वेतील देश हे केवळ इतिहास, भाषा, धर्म, तेलाचा व्यापार याबाबतीतच नाही, तर समस्यांच्या बाबतीतही एकमेकाशी जोडले गेले आहेत. ऊर्जा क्षेत्रातील संसाधनामुळे अमेरिका व रशिया या महासत्तांसाठी मध्य-पूर्वेचा भाग हा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
“तेलासाठी सर्व काही” ही या भागातील भुराजनीती आहे. या भागावर आपलं वर्चस्व व नियंत्रण राहावं या करता पाश्चात्य देश वाटेल त्यावेळी आपल्या पसंतीच्या नेत्यांना सत्तेत आणतात व या नेत्यांनी विरोध दर्शविला की त्यांची सत्ता उलथून टाकतात.
जगात सर्वांत जास्त लष्करीकरण मध्य-पूर्वेत झालं आहे. येथील नागरिकांना वाटतं की मध्य-पूर्वेच्या सर्व समस्यांचं कारण अमेरिकेच्या वर्चस्वामुळे आहे. यामुळे मध्य-पूर्वेत पाश्चिमात्य विरोधी भावना वाढून इस्लामिक दहशतवाद व धार्मिक कट्टरता वाढली आहे. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाची दोन प्रमुख कारणे आहेत, एक तेल संपत्ती वर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आलेले परकीय देश आणि दुसरे शिया आणि सुन्नी पंथीयांत सत्तेवर पकड मिळवण्यासाठीचा संघर्ष. तर चला आता शिया आणि सुन्नी पंथीयांत सत्तेवर पकड मिळवण्यासाठीचा संघर्ष नेमका काय आहे हे समजावून घेऊ.
शिया आणि सुन्नी पंथीयांत सत्तेवर पकड मिळवण्यासाठीचा संघर्षात मध्यपूर्वेतील जवळपास सगळेच देश सामील आहेत, पण या सर्व देशात दोन देशांची भूमिका ही निर्णायक ठरते एक म्हणजे इराण तर दुसरा सौदी अरेबिया. वरील परिच्छेदात तुम्ही वाचलं असेल की महमंद पैगंबरांच्या मृत्यूनंतर शिया सुन्नी वाद सुरू झाला आणि आज हाच वाद पुन्हा पाहायला मिळतो.
इराण हा शियाबहुल देश तर सौदी अरेबिया हा सुन्नीबहुल देश. वर्षानुवर्ष हे दोन्ही देश एकमेकांचे विरोधक आहेत. प्रादेशिक प्रभुत्वासाठी इराण आणि सौदी अरेबियामध्ये संघर्ष दीर्घ काळापासून सुरू आहे, तो कसा सुरू झाला हे समजून घेऊ.
या संघर्षाची सुरुवात होते १९२० साली, इराणमध्ये त्यावेळी पहलवी राजवट सत्तेत होती. १९२९ साली इराण आणि सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच राजनैतिक संबंध स्थापित झाले. इस्लाममध्ये आपल्या आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे हे धर्म कर्तव्य आहे असे म्हटले आहे.
१९४३ साली एक इराणी हज यात्रेकरूला सौदी अरेबियाच्या सरकारने ठार मारले, यावरून या दोन्ही देशातील राजनैतिक संबंध संपुष्टात आले. याच काळात अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यात शीत युध्द चालू होतं. या शीतयु*द्धाचे पडसाद हे मध्यपूर्वेवर उमटले.
इराण आणि सौदी अरेबिया हे अमेरिकेच्या “निक्सन डॉक्टराईन” नावाच्या परराष्ट्र नीती व कुटनीतीचे दोन स्तंभ होते, याच कारणामुळे इराण आणि सौदी अरेबिया यांना “The 2 pillars of Nixon Doctrine” असं संबोधलं जायचं. अमेरिकेने या “निक्सन डॉक्टराईन” अंतर्गत इराण आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांना मध्यपूर्वेत राजकीय स्थिरता कायम ठेवण्याची व सोव्हिएत युनियनचा मध्यपूर्वेतील देशात प्रभाव कमी करण्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे कट्टर वैरी असून देखील या दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम केलं.
हे सगळं इथवर ठीक चालू होतं, पण १९६० साली, इस्लामची दोन प्रमुख धार्मिक स्थळ मक्का आणि मदिना यांच्यावर आमचं नियंत्रण आहे म्हणून आम्ही इस्लामी जगताचे नेते आहोत हे सौदी अरेबियाने जाहीर केलं.
१९७० साली सौदी अरेबियाने इराणच्या लष्कराच्या आधुनिकीकरणावर आणि मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी वर्चस्वावर आक्षेप घेतला. आता १९७९ साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि सौदी अरेबियाच्या आम्ही इस्लामी जगताचे नेते आहोत या धोरणाला थेट आव्हान मिळालं. इराणने आता त्यांच्या देशात धर्मावर आधारित शासन प्रणाली निर्माण केली होती आणि इराणला त्यांच्या या धर्मावर आधारित शासन प्रणालीचा विस्तार सर्व मध्यपूर्वेत करायचा होता.
१९८० साली इराकने इराणवर आक्र*मण केले याला जगाच्या इतिहासात इराण-इराक यु*द्ध म्हणतात. पण गंमत अशी आहे की इराक आणि इराण हे दोन्ही शियापंथी देश जरी असले तरी केवळ इराणला शह देण्यासाठी सौदी अरेबियाने या यु*द्धात इराकला समर्थन दिले. या घटनेमुळे इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातला तेढ अजून वाढला.
परत एकदा 1987 साली हज यात्रेच्यावेळी चेंगराचेंगरीत इराणच्या २७३ शिया यात्रेकरूंचा मृत्यू झाला व इराणने या घटनेसाठी सौदी अरेबियाच्या सरकारला जबाबदार धरले. १९८८ च्या दरम्यान इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातल्या राजनैतिक संबंधात सुधारणा व्हायला चालु झाली.
पण, २००० साली येमेन मधल्या काही हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या सीमेवरच्या दोन सैनिकांना ठार मारलं आणि सौदी अरेबियाच्या हद्दीत असलेल्या अल-दौद (Mount Al-Doud) या पर्वतावर ताबा मिळवला. सौदी अरेबियाने इराणवर तुम्ही हौथी बंडखोरांना पाठिंबा देता असा आरोप लावला व अल-दौद (Mount Al-Doud) या पर्वतावर ताबा मिळवण्यासाठी लष्करी कारवाई केली. इराणने या लष्करी कारवाईचा जगतिक माध्यमांसमोर समोर तीव्र निषेध व्यक्त केला.
२००३ साली अमेरिकेने इराणचा मुख्य शत्रू असलेल्या इराकवर आक्रमण केले व सुन्नी सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवली. इराकमधील सुन्नी सत्तेचा पाडाव झाल्यानंतर, इराणला इराकमध्ये शियाबहुल सरकार स्थापन करण्यासाठीचा मार्ग खुला झाला आणि तेव्हापासून इराणचा इराकवर प्रभाव वाढत गेला.
२०११ साली “अरब स्प्रिंग” नावाने ओळखले जाणारे वेगवेगळ्या देशातील यादवी यु*द्ध व लोकशाही स्थापन करण्याचे प्रयत्न मध्यपूर्वेत आणि उत्तर आफ्रिकेत झाले. या २०११ सालच्या अरब स्प्रिंगमुळे इराक, सीरिया, आणि इजिप्त इथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली. या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत इराण आणि सौदी अरेबियाने सीरिया, येमेन इथे आपला विस्तार करायला सुरुवात केली. दोन्ही देशांच्या या विस्तारवादी धोरणांमुळे या दोन्ही देशातील व मध्यपूर्वेतील तणाव फार वाढला.
सौदी अरेबियाला इराणची मक्तेदारी रोखायची आहे. २०१५ साली येमेनच्या हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाचे डेटाबेस हॅक करून सौदी अरेबियाचे गोपनीय दस्तावेज “सौदी-लिक्स” नावाच्या माध्यमातून विकिपीडियावर प्रदर्शित केले. याला प्रत्युत्तर म्हणुन सौदी अरेबियाने या येमेनच्या हौथी बंडखोरांविरोधात यु*द्ध पुकारलं होत. सौदी अरेबियाने इराण येमेनच्या हौथी बंडखोरांना शस्त्र व तंत्रज्ञान पुरवतं असा आरोप केला.
२०१६ साली सौदी अरेबियाच्या सरकारने सौदी अरेबियातील शिया पंथाचे, “शेख निमर अल-निमर” यांना ठार मारले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणमधील सौदी अरेबियाच्या राजकीय दूतावासावर ह*ल्ले झाले. या हत्येनंतर दोन्ही देशांत तणाव अजून वाढला.
२०१७ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र नीतीमध्ये सौदी अरेबियाला इराणच्या तुलनेत झुकतं माप मिळालं होतं. २०१८ साली अमेरिकेने इराणसोबत केलेली “Iran Nuclear Deal” मधून काढता पाय घेतला आणि हा इराणला फार मोठा झटका होता. २०१९ साली हौथी बंडखोरांनी येमेनमधून सौदी अरेबियाच्या तेल उत्पादन करण्याऱ्या सौदी अरामको या कंपनीवर ड्रोन ह*ल्ले केले. सौदी अरेबियाने इराणनेच या हौथी बंडखोरांना ड्रोन तंत्रज्ञान पुरवले असा आरोप केला. ३ जानेवारी २०२० रोजी इराणच्या इराण रिव्होल्यूशनरी गार्डसचे प्रमुख मेजर जनरल कासीम सुलेमानी यांची ह*त्या झाली. इराणने या ह*त्येचं खापर सौदी अरेबियावर फोडलं आहे.
या इराण सौदी अरेबियाच्या संघर्षात इतर देश नक्की कुणाच्या बाजूने आहेत हे आधी समजून घेऊ. सुन्नीचें प्राबल्य असलेल्या सौदी अरेबियाला युएइ, बहारीन, इजिप्त, आणि जॉर्डनचा पाठिंबा आहे तर इराणला इराक, सीरिया, व लेबनॉनचा पाठिंबा आहे. इराण आणि सौदी अरेबिया हे थेट यु*द्ध करत नसले तरी त्यांच्यात “प्रॉक्सी वॉ*र” प्रॉक्सी वॉ*र म्हणजेच “छुपं यु*द्ध” चालू आहे, प्रॉक्सी वॉ*रमध्ये हे दोन्ही देश दुसऱ्या देशातल्या बंडखोरीला पाठिंबा देतात.
याचं उदाहरण म्हणजे आखतातल्या महत्वाच्या जलमार्गांवर इराणने आपलं वर्चस्व स्थापन केले आहे, याच जलमार्गांवरून सौदी अरेबियाकडून तेल पुरवठा केला जातो. अमेरीका व पाश्चात्य देशाच्या तेलाच्या जहाजांचा स्वतंत्र व सुरक्षित वावर सुरू राहणं महत्वाचं आहे. त्यामुळे या दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्यास जगाला हे फायद्याचे नाही.
आपल्यामुळे होणाऱ्या संघर्षामुळे आपलं व जगाचं भरपूर नुकसान होणार आहे ही उपरती या दोन्ही देशांना झाली आहे. इराणचा मूळ प्रतिस्पर्धी अमेरिका आहे आणि सौदी अरेबियाशी इराणचा मुद्दा हा फक्त येमेनमधील यु*द्ध आहे. इराण आणि सौदी अरेबियाने वाटाघाटी करून हे तणाव सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दोन्ही देश हे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या ५ फेऱ्यांच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी सहभागी होणार आहेत. या दोन्ही देशांना लक्षात आलं आहे की जर आपण आपल्याला देशाची प्रगती साधायची असेल तर आपण आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. अमेरिकेने इराणवर इराणच्या छुप्या आण्विक अस्त्र निर्मितीमुळे २०१५ साली आर्थिक निर्बंध लावले आहेत तर सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था ही फक्त तेल उत्पादनावर अवलंबून आहे ज्यामुळे त्यांना त्यांचा अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्रगती साधता येत नाही.
जर या दोन्ही देशातील वाटाघाटी यशस्वी झाली तर इराणवरचे आर्थिक निर्बंध येणाऱ्या काळात शिथिल केले जाऊ शकतात व सौदी अरेबिया त्यांच्या “सौदी व्हिजन २०३०” या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून या प्रकल्पा अंतर्गत अर्थव्यवस्थेत विविधता आणून आपल्या पारंपरिक तेल उत्पादनावर अवलंबून असलेल्या प्रतिमेला छेद देतील. पण मध्यपूर्वेत आणि जगात जर या दोन्ही देशांना राजकीय स्थैर्य व आर्थिक प्रगती साधायची असेल तर धार्मिक कट्टरता, पंथीय भेद हे बाजूला सारून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मार्ग अनुसरला तर या दोन्ही देशात व जगात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.