आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आशियामध्ये सहाव्या आणि सातव्या शतकात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार झाला. बौद्ध धर्माचा प्रसार फक्त भारत आणि चीनपुरताच न थांबता पार जपानपर्यंतही पोहोचला. बौद्ध धर्मातील सहजता आणि मानवतेमुळे जगातील बहुतांश लोक हा धर्म स्वीकारू लागले. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर अनेकांनी ‘भिक्षु’ होऊन मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मूळ वैदिक धर्मातील धारणा, ध्यान, योग आणि समाधी या गोष्टी बौद्ध धर्माबरोबरच जैन आणि शीख धर्मातही सांगितल्या गेल्या आहेत.
बौद्ध धर्म स्वीकारून जे लोक आपल्या योगसाधनेत उत्कृष्ट प्रगती करतात त्यांना समाधी घेता येते. जपानमध्ये समाधी बरोबरच सेल्फ-ममीफिकेशनच्या प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो. परंतु एखाद्या मानवी शरीराचे ममीफिकेशन करण्यासाठी आजूबाजूचे वातावरणही अनुकूल असायला हवे. ममीफिकेशनसाठी जपानचे हवामान कोणत्याही प्रकारे अनुकूल नाही. त्याठिकाणी ना सुके गवत सहजासहजी मिळते, ना तिथे रखरखीत वाळवंट आहे. जपानमधील उन्हाळा अतिशय कडक असतो.
सेल्फ-ममीफिकेशन:
एवढी प्रतिकूलता असूनही जपानच्या शिंगोन पंथातील बौद्ध भिक्षूंच्या गटाने यामागाताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील एका पवित्र शिखरावर कठोर तपस्येद्वारे सेल्फ-ममीफिकेशनची प्रक्रिया शोधून काढली. शिंगोन पंथातील बौद्ध भिक्षूंच्या मते, सेल्फ-ममीफिकेशन हीसुद्धा समाधीप्रमाणेच मुक्ती मिळवण्याचा एक प्रशस्त मार्ग आहे.
जपानमध्ये प्रतिकूल हवामान असलं तरी अशा हवामानातही २० भिक्षूंनी सेल्फ-ममीफिकेशनची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. अतिशय गूढ असलेला शिंगोन पंथ बौद्ध, शिंटोईजम, टॉईजम आणि इतर धर्मांचे मिश्रण आहे. या पंथातील लोक शुगेंडोचे पालन करतात. शुगेंडो हे स्वयंशिस्त आणि भौतिक सुखाला नाकारून अध्यात्मिक प्रगती या तत्वांवर आधारित तत्वज्ञान आहे.
जपानमधील सेल्फ-ममीफिकेशनचा जनक – कुकाई:
जपानच्या शिंगोन पंथाचा संस्थापक, कुकाई नावाच्या भिक्षूने सेल्फ-ममीफिकेशनच्या परंपरेची सुरुवात केली. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात, कुकाईने समाधीच्या अवस्थेत प्रवेश केला. त्याने अन्न-पाण्याचा त्याग केला. कालांतराने त्याचा मृत्यू झाला. त्याने इच्छामृत्यू स्वीकारला होता. कुकाईचा मृतदेह जपानमधील वाकायामा प्रांतातील कोया डोंगरावर पुरण्यात आला. आधुनिक काळात ज्यांनी त्याची समाधी खोदून तथ्य तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. कारण कुकाई झोपलेला दिसत होता. त्याचे स्वरूप पूर्णतः बदलले होते. इतकंच नाही तर त्याचे केस निरोगी आणि मजबूत होते.
सोकुशींबोत्सु:
सेल्फ-ममीफिकेशनच्या प्रक्रियेला जपानमध्ये ‘सोकुशींबोत्सु’ म्हटले जाते. ही प्रक्रिया अतिशय अवघड असून एक प्रत्येकी एक हजार दिवसांमध्ये तीन पातळ्यांवर केली जाते. अवघड प्रक्रिया असल्याने प्रत्येक वेळी ती यशस्वी होईलच असे नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘सोकुशींबोत्सु’ किंवा ‘सेल्फ-ममीफिकेशन’वर बंदी घालण्यात आली होती. पण तरीही अनेक भिक्षु सेल्फ-ममीफिकेशनची प्रक्रिया करीतच होते.
‘सोकुशींबोत्सु’ करणारा सर्वांत वयस्कर भिक्षु म्हणजे ‘शिन्योकाई’. १७८३ साली, वयाच्या ९६व्या वर्षी, तो संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात यशस्वी ठरला त्यामुळे आजपर्यंत देखील त्याचा देह अतिशय उत्तम स्थितीत आहे. जगातील प्रत्येक ममीचे कपडे सुमारे १२ वर्षांनंतर बदलले जातात, पण शिन्योकाईचे कपडे प्रत्येक ६ वर्षांनी बदलले जातात. त्याच्या ममीवरील आधीचे कपडे लहान लहान तुकड्यांमध्ये कापले जातात आणि ‘एक हजार येन’ या किमतीने गळ्यात घालण्यासाठी विकले जातात.
सेल्फ-ममीफिकेशनची प्रक्रिया:
‘सोकुशींबोत्सु’ किंवा सेल्फ-ममीफिकेशनच्या प्रक्रियेमध्ये तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात बहुतेक प्रकारचा अन्न-त्याग करावा लागतो. ‘सोकुशींबोत्सु’ प्रक्रिया करू इच्छिणाऱ्या भिक्षूंना हजार दिवसांसाठी फक्त सुका मेवा खाण्याची परवानगी असते. कोणत्याही प्रकारच्या लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांना कठोर व्यायाम करावा लागतो.
दुसरा टप्पा यापेक्षाही अवघड आहे. यामध्ये भिक्षूंना पाण्याचाही त्याग करावा लागतो. त्यांना फक्त ‘उरुषी इसेन्स टी’ नावाचा विषारी चहा पिण्याची परवानगी असत. या चहामुळे भिक्षूंच्या शरीरातील सर्व द्रव पदार्थ तर निघून जाताच असत, त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर सूक्ष्म जंतूंनी किंवा किड्यांनी ह*ल्ला करू नये यासाठी त्यांच्या टिश्यूजमध्ये विष भरले जाते. यावेळी त्यांना सुक्या मेव्याऐवजी झाडाची साल आणि मुळे खावी लागत असत.
तिसरा आणि शेवटचा टप्पा हा त्या भिक्षूच्या मृत्यूपर्यंत असे. त्यांना पद्मासनात बसवून एका दगडाच्या समाधीत ठेवले जात असत. समाधीच्या आतील भिक्षूला प्रत्येक दिवशी आपल्या जवळ बांधलेली घंटा वाजवून बाहेरच्यांना आपण जिवंत असल्याचे सांगणे अनिवार्य होते.
त्यामुळे एकदा आतील घंटेचा आवाज बंद झाल्यानंतर ती दगडाची समाधी आणखी एक हजार दिवसांसाठी बंद केली जात. एक हजार दिवसांनंतर तपासणी करण्यासाठी पुन्हा दगडाची समाधी उघडली जात असे. जर त्या भिक्षूचे शरीर व्यवस्थित असेल तर ‘सोकुशींबोत्सु’ची प्रक्रिया यशस्वी झाल्याचे मानले जात होते. पण दुर्दैवाने क्वचितच असं होत असे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.