आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
समाज, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्थेचं नातं मानवी संस्कृती इतकचं जुनं आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था यंत्रणा अस्तित्वात असणं अतिशय गरजेचं आहे. भारतात ही यंत्रणा फार पूर्वीपासून आहे. मात्र, तरी देखील अगदी ऐतिहासिक काळापासून तर आजपर्यंत असे अनेक गुन्हे घडले आहेत की ज्यांच्यामुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. तपास यंत्रणांनी आपापल्या परिनं अशा गुन्ह्यांचा तपास देखील केला. यातील काही घटनांमध्ये गुन्हेगार पकडण्यात यश आलं तर काहींमध्ये अपयश. अशा अनेक गुन्हेगारी घटना घडून गेलेल्या आहेत, ज्यांचा आजतागायत उलगडा झालेला नाही. ‘डे ला हे’ स्कँडलचा देखील अशाच न सुटलेल्या घटनांमध्ये समावेश होतो. नेमकं हे प्रकरण काय होतं याबाबत हा विशेष लेख…
‘डे ला हे’ प्रकरण भारतातील आतापर्यंतच्या गंभीर प्रकरणांपैकी एक आहे. १९१९च्या काळात मद्रास(चेन्नई)मध्ये ही घटना घडली होती. यात शहरातील न्यूईंग्टन प्रॉपर्टीमध्ये असलेल्या एका उच्चभ्रू शाळेतील प्राचार्याचा खून करण्यात आला होता. १५ ऑक्टोबर १९१९ च्या रात्री घडलेल्या घटनेमुळं त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती.
यामध्ये संपूर्ण प्रकरणात स्वातंत्र्यपूर्व काळातील दोन मोठ्या संस्थानांचा समावेश होता. या प्रकरणामुळे यातील एका संस्थानिकाला आपल्याकडची तब्बल १२ हजार हेक्टर (जवळपास ३० हजार एकर) जमीन गमवावी लागली. मात्र, आजतागायात ही हत्या कोणी केली, कशासाठी केली यातील काहीच समोर आलं नाहीये.
स्वातंत्र्यपूर्व काळात, जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं; तेव्हा त्यांनी मद्रास प्रांतामध्ये (आजचं चेन्नई) न्यूइंग्टन हाऊस कॉलेजची स्थापना केली होती. ब्रिटिश किती शिस्तप्रिय आणि कडक असतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी उभारलेल्या या कॉलेजमध्येही अगदी कडक वातावरण होतं. या कॉलेजचे प्राचार्य म्हणून डे ला हे यांची नेमणूक करण्यात आली होती. ते अगदीच कडक स्वभावाचे होते. या कॉलेजमध्ये मुलांना शूटिंग, हॉर्स रायडिंग, टेबल मॅनर्स अशा गोष्टीही शिकवल्या जात. डे ला हे यांनी लेडी मॅककॉर्मिक यांच्यासोबत लग्न केलं होतं.
१५ ऑक्टोबर १९१९ च्या संध्याकाळी, सर्व मुलांचा निरोप घेऊन डे ला हे घरी निघून गेले. त्यानंतर काही तासांनीच, रात्रीच्या सुमारास लेडी मॅककॉर्मिक यांच्या ओरडण्याने संपूर्ण कॉलेज जागं झालं. डे ला हे यांच्या घरी पोहोचल्यानंतर लक्षात आलं, की हे यांची कोणीतरी गोळ्या घालून हत्या केली आहे. अगदी पॉईंट ब्लॅक रेंजवरुन त्यांना गोळी घालण्यात आली होती. यानंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी हॉस्टेलची तपासणी केली. हॉस्टेलमध्ये दोन मुलांकडे रायफल्स मिळाल्या. यांपैकी एक कदंबुर प्रांताचा राजकुमार होता, तर दुसरा सिंगमापट्टी प्रांताचा राजकुमार. दक्षिण भारतातील श्रीमंत आणि प्रतिष्ठित असे हे दोन प्रांत होते.
हॉस्टेलमधील इतर मुलांच्या चौकशीत असं समजलं, की कदंबुर प्रांताचा राजकुमार आणि डे ला हे यांचं मागे एकदा भांडण झालं होतं. डे ला हे यांनी भारतीयांचा उल्लेख ‘बार्बेरियन्स’, म्हणजेच जंगली असा केल्यामुळे या दोघांमध्ये वाजलं होतं. यामुळे डे ला हे यांना मारण्यासाठी कदंबुरच्या राजकुमाराने आपल्या सोबतच्या इतर विद्यार्थ्यांनाही गोळा केलं होतं. मात्र हे प्रकरण पुढे गेलं नव्हतं. यासोबतच विद्यार्थ्यांकडून असंही समजलं, की हॉस्टेलमधील काही विद्यार्थ्यांसोबत लेडी मॅककॉर्मिक यांचं अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यामुळे मुख्य साक्षीदार असलेल्या मॅककॉर्मिक यांना सरकारने तातडीने ब्रिटनला पाठवून दिलं.
आता कदंबुरच्या राजकुमारावरच मुख्य आरोप होता. एकूणच पुरावे आणि साक्षी त्याच्या विरोधात होत्या. तसेच, त्याने डे ला हे यांना मारण्याची धमकीही दिल्याचं स्पष्ट झालं होतं. या प्रकरणाचे पडसाद स्थानिक राजकारणावर पडू नयेत, यासाठी कदंबुरच्या राजाने हा खटला मद्रास ऐवजी मुंबई न्यायालयात नेण्याची विनंती केली. त्या काळी ब्रिटिश न्यायालयांमध्ये न्यायाधीश पूर्ण काळा गाऊन आणि केसांचा टोप वगैरे परिधान करुन बसत असत. मात्र, हे केवळ ब्रिटनमध्ये होत होतं, जिथे हवामान थंड आहे.
भारतासारख्या देशात, तेही मुंबईच्या उकाड्यात न्यायाधीश सहसा हा सर्व डामडौल करत नसत. मात्र, हा खटलाच एवढा हाय प्रोफाईल होता, की न्यायाधीश अगदी ब्रिटनमध्ये असल्याप्रमाणे पूर्ण वेषात हजर झाले होते.
खटला सुरू असताना, अचानकपणे सिंगमापट्टी राज्याच्या राजकुमाराने माफीचा साक्षीदार होण्याची मागणी केली. कदंबुरच्या राजकुमाराने आपल्याला बळजबरी या गुन्ह्यामध्ये सहभागी करुन घेतल्याचा जबाब त्याने दिला. कदंबुरच्या राजकुमाराने भारतीयांच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी म्हणून डे ला हे यांची हत्या केल्याचेही सिंगमापट्टीच्या राजकुमाराने सांगितलं. यामुळे या प्रकरणाला अधिकच प्रसिद्धी मिळाली. दोन्ही पक्षांनी महागातले महाग वकील आणून आपली बाजू मांडली.
हा खटला लढण्यासाठी अगदी लंडनहून वकील मागवण्यात आले होते. एवढं सगळं करुन, सगळे पुरावे विरोधात असूनही, कदंबुरचा राजकुमार या सगळ्यातून निर्दोष सुटला.
कदंबुरच्या राजकुमाराची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर हत्येचा आरोप सिंगमापट्टीच्या राजकुमारावर आला. सिंगमापट्टीच्या राजाने मग हा खटला मुंबई न्यायालयातून लंडनमधील एका गव्हर्नरच्या खासगी न्यायालयात हलवला. याठिकाणी हा खटला जिंकून, सिंगमापट्टीच्या राजाने आपल्या मुलाची निर्दोष मुक्तता करुन घेतली. पण या सगळ्यामध्ये, केवळ या खटल्याचा खर्च पेलावा, यासाठी या राजाला आपला १२ हजार हेक्टर एवढा मोठा असलेला चहाचा मळा विकावा लागला. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्परेशनने हा मळा विकत घेतला.
एवढं सगळं होऊनही डे ला हे यांची हत्या कोणी, आणि का केली होती हे स्पष्ट झालं नाहीच. कालांतराने हे प्रकरणही विस्मरणात गेलं. नंतर कधीतरी सिंगमापट्टीच्या राजघराण्याने डे ला हे यांच्या वारसांचा आपल्या राजवाड्यामध्ये पाहुणचारही केला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.