आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
रस्ते, पाणी, आरोग्य अशा मूलभूत सुविधांची देशातील अवस्था वेगळी सांगायला नको. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील हजारो खेडी अशी आहेत, ज्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचल्याही नाहीत. कित्येक गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, तर कित्येकांना लाईट काय असते हे माहिती नाही. कित्येक नागरिकांना अजूनही या सर्व सुविधांसाठी झगडावं लागतं.
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारोमुखिया गावातील लोकांचा हा वनवास मात्र गेल्यावर्षी संपला. राज्य सरकार एकदम जोमाने याठिकाणी रस्त्याचे बांधकाम करु लागले आणि याला कारण होतं – टोकियो ऑलिम्पिक्स!
भारताची बॉक्सर लव्हलीना बोर्गोहेन ही बारोमुखिया गावची रहिवासी आहे. २०२१ साली टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये लव्हलीनाने कांस्यपदक मिळवत देशाचे नाव मोठे केले होते. याच कारणामुळे प्रशासन तिच्या गावाचा रस्ता दुरुस्त करायला लागले होते.
बारोमुखिया गाव आसामच्या राजधानीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर आहे. या गावात केवळ रस्तेच नाही, तर इतर सुविधांचाही अभाव दिसून येतो. गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. तसेच गावात आरोग्य सुविधांच्या नावाखाली केवळ एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोणाला गंभीर आजार झाल्यास वा इमर्जन्सी असल्यास नजीकच्या शहरात जावं लागतं. इथं एक आणखी एक अडचण आहे, ती म्हणजे मोबाईल नेटवर्क. बहुतांश वेळा इथं मोबाईलला नेटवर्क नसतं, नेटवर्क असलं तरी इंटरनेटचा वेग कमी असतो. त्यामुळे बाहेरुन रुग्णवाहिका मागवणं अवघड होतं. नशिबाने कॉल लागलाच, तरी रुग्णवाहिका इथे येण्यास पुन्हा रस्त्याची अडचण आहेच. या सगळ्या गोष्टींमुळे तेथील सामान्य नागरिकांना त्रास होतोच आणि लव्हलीनासारख्या खेळाडूंच्या करिअरमध्येही या गोष्टी अडथळा आणतात.
अशा अडचणी समोर असतानाही लव्हलीनाचा स्पोर्टमध्ये करिअर करण्याचा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. लव्हलीना बॉक्सिंगमध्ये कशी आली याचा किस्साही मोठा रंजक आहे. लव्हलीनाला दोन बहिणीच आहेत. तीनही मुली असल्यामुळे, त्यांनी सेल्फ डिफेन्स शिकून घ्यावं असं त्यांच्या आईने सुचवलं. यानंतर लव्हलीना आणि तिच्या बहिणी थाई किक बॉक्सिंग शिकू लागल्या. पुढे एक दिवस लव्हलीनाचे वडील घरी मिठाई घेऊन आले होते. ही मिठाई एका वृत्तपत्रामध्ये बांधून आणली होती. मिठाई खाता खाता लव्हलीनाने पेपरमध्ये जगप्रसिद्ध बॉक्सर मुहम्मद अलीचा फोटो पाहिला. तो फोटो पाहून प्रेरित झालेल्या लव्हलीनाने बॉक्सिंगमध्ये आपला हात आजमवायचा निर्णय घेतला. यानंतर तिने शाळेत विविध क्रीडाप्रकारांमध्ये सहभाग नोंदवला.
अशीच एकदा लव्हलीना बॉक्सिंग प्रॅक्टिस करत असताना शाळेतील स्काऊट्सनी तिला पाहिले, आणि तिच्यातील प्रतिभा ओळखली. अर्थात बॉक्सिंगसाठी तिच्याकडे प्रतिभा होती, मात्र यात करिअर करण्यासाठी त्यासाठी तिला अनेक अडथळे पार करावे लागणार होते. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शिवाय गावात बॉक्सिंग किंवा अन्य कोणत्याही क्रीडाप्रकाराच्या सरावासाठी चांगली सुविधा उपलब्ध नव्हती. यासाठी लव्हलीनाला दूर असणाऱ्या ट्रेनिंग सेंटरवर जावे लागणार होते.
गावातील रस्त्यांची स्थिती अगदीच खराब होती. त्यामुळे लव्हलीनाला सुमारे तीन-चार तास सायकल चालवत ट्रेनिंग सेंटरला जावं लागत होतं. संध्याकाळी जेव्हा ती घरी परत येत, तेव्हा तिला बऱ्याच जखमा झालेल्या असत. काही वेळा या प्रॅक्टिसदरम्यान झालेल्या जखमा असत, तर काही वेळा रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अडखळून पडल्यामुळे. मात्र, लव्हलीनाने कोणत्याच जखमांची पर्वा न करता आपले लक्ष केवळ सरावावर ठेवले.
या सगळ्यातून पुढे येत २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षी तिने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले. पुढे २०२० मध्ये ती ऑलिम्पिकची तयारी करत असताना मध्येच कोरोना महामारी आली, आणि ऑलिम्पिक पुढं ढकलण्यात आलं. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे सराव करणंही अवघड झालं. अशावेळी तिने चक्क गॅस सिलिंडरचा वापर करुन आपला सराव कायम ठेवला.
सगळ्या परिस्थितींवर मात करत २०२१ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदकाची कमाई केली. लव्हलीनाची स्ट्रगल स्टोरी ही प्रेरणादायी असली, तरी तिच्यावर या स्ट्रगलची वेळ का आली याचा विचार करणेही गरजेचे आहे.
लव्हलीनाचे गाव एवढं आडबाजूला आहे, की २०१८ मध्ये जेव्हा तिची कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवड झाली, तेव्हा माध्यमांमध्ये याबाबत बातम्या आल्यानंतर तिला याची माहिती मिळाली होती. म्हणजेच प्रशासन तिच्या घरापर्यंत पोहोचलेही नव्हते.
पण, ऑलिम्पिकमध्ये जेव्हा तिला मेडल मिळाल्याचं घोषित झालं, त्यानंतर अवघ्या तीन तासांमध्येच तिच्या गावातील रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. म्हणजेच, जर ठरवलं तर आपण कोणत्याही गावाचा अगदी कमी वेळेत कायापालट करू शकतो. मात्र, हे करण्यासाठीची इच्छाशक्ती आपल्या प्रशासनाकडे नाही. प्रशासन याबाबतीत किती उदासीन आहे हे यापूर्वीच्या आणखी एका घटनेवरुन दिसून येतं.
यापूर्वी २०१६ मध्ये या गावातील रस्ता बनवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तेव्हा अवघा १०० मीटर रस्ता तयार करुन हे काम बंद पडले होते. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर हवीलदार पद्म बहादुर श्रेष्ठा यांचेही घर आहे. २०१९ मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अंदाधुंद गोळी*बार केला होता. त्यावेळी श्रेष्ठा यांना वीरमरण आले होते. त्यांच्या हौतात्म्यानंतरही हे गाव चर्चेत तर आलं होतं, मात्र इथली परिस्थिती जैसे थे राहिली होती.
दरम्यान, बारोमुखियामधील रस्त्याच्या बातमीबाबत सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. “आपल्या देशात मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी आधी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवावं लागतं”, “मेडल जिंका, रस्ता मिळवा हा चांगला सौदा आहे”, “देशासाठी एवढी मोठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या गावात रस्ताही नाही ही शोकांतिका आहे” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसल्या होत्या.
याबाबत तुम्हाला काय वाटतं?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










