आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
चन्द्रो तोमर या देशातील सर्वात वयोवृद्ध शार्पशूटर म्हणून ओळखल्या जात. चन्द्रो तोमर यांचं याच वर्षी एप्रिलमध्ये कोरोनामुळे निधन झालं. मात्र, त्यांच्या आयुष्याची स्टोरी आजही कित्येकांना प्रेरणा देते. एवढंच काय, तर त्यांच्या आयुष्यावर “सांड की आँख” नावाचा बॉलिवूडपटही होऊन गेला आहे. कोण होत्या चन्द्रो तोमर? एक सामान्य महिला ते शार्पशूटर हा प्रवास कसा झाला?
उत्तर प्रदेशच्या बागपथमधील जौहरी गावामध्ये चन्द्रो तोमर राहत होत्या. बहुतांश नेमबाज हे कमी वयापासूनच या खेळाचा सराव सुरू करतात, आणि कित्येक वर्षांच्या सरावानंतर त्यांना मोठ्या स्पर्धांमध्ये खेळता येण्याइतपत कौशल्य प्राप्त होतं. चन्द्रो तोमर यांची गोष्ट मात्र वेगळी आहे. त्यांनी नेमबाजीची सुरुवातच वयाच्या ६५व्या वर्षीपासून केली. खरंतर त्यांची नात शेफाली हिने नेमबाजीमध्ये भाग घेतला होता. ती सरावासाठी शूटींग रेंजवर जाताना चन्द्रो तिच्या सोबत जात. शेफाली सराव करताना अगोदर चन्द्रो या केवळ मागे बसून तिचा सराव पाहत.
मग त्यांनी हळूहळू आपल्या नातीला बंदूक लोड करुन द्यायला सुरुवात केली. असेच दोन-तीन दिवस गेले. त्यानंतर चन्द्रो यांनी विचार केला, की आता बंदूक लोड करायला तर शिकलोच आहोत; फक्त नेम धरुन गोळी (छर्रा) मारायचंच राहिलंय. त्यांच्या नातीनेही त्यांना प्रोत्साहन दिलं, आणि चन्द्रो यांनी गोळी चालवली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्यांची गोळी अगदी लक्ष्याच्या मधोमध लागली.
हे बघून तिथं सरावाला आलेल्या बाकीच्या मुलांनीही त्यांना पुन्हा गोळी चालवण्यास सांगितलं. पुन्हा चन्द्रो यांचा नेम अचूक लागला, आणि त्यांचा हुरुप वाढला. यानंतर मग सगळ्यांनीच त्यांना दररोज सरावासाठी येण्याची विनंती केली; आणि चन्द्रो यांचा नवा प्रवास सुरू झाला.
चन्द्रो यांनी सरावाला जायला सुरू तर केलं. मात्र, याला त्यांच्या घरातून मोठा विरोध झाला. त्यांचे पती आणि दीर यांनी सुरुवातीला त्यांना आजिबात पाठिंबा दिला नाही. मात्र, चन्द्रो यांच्या मुलांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. मुलांच्या सपोर्टने मग चन्द्रोंनी आपला सराव सुरू ठेवला. घरच्यांचा विरोध काही दिवसांनी मावळला, मात्र बाहेरुन टोमणे सुरुच होते. अगदी गावातले म्हातारे लोकही त्यांना येता-जाता टोमणे मारत. चन्द्रो यांनी एका मुलाखतीत सांगितलंय, “गावातील लोक काहीही बोलायचे, मात्र मी माझे कान बंद करुन घेतले होते. त्यामुळे ते काही जरी बोलले तरी मी त्याकडे लक्ष देत नव्हते.”
दुसरीकडे शूटिंग रेंजमध्ये चन्द्रो यांची कामगिरी अधिकाधिक चांगली होत चाललेली. कित्येक लोकांना महिनोमहिने सराव करुनही आपला हात स्थिर ठेवणं जमत नव्हतं. त्यात चन्द्रो यांचा हात साठीमध्येही अगदी स्थिर राहत होता, ज्यामुळं त्यांचा निशाणा अचूक बसत. यामुळेच अगदी कमी वेळातच त्या कित्येक स्पर्धांमध्येही चमकल्या.
ज्या वर्षी त्यांनी शूटींगचा सराव सुरू केला, त्या वर्षीच त्यांनी चंदीगढमधील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. पुढे राष्ट्रीय स्तरावरील ५०हून अधिक पदकं त्यांनी जिंकली. शिवाय, आंततराष्ट्रीय स्तरावरही त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. कित्येक वेळा स्पर्धेला गेल्यानंतर लोक त्यांच्या पेहरावावरुन, वयावरुन त्यांची टर उडवत. मात्र, याला त्या आपल्या खेळातूनच उत्तर देत.
बऱ्याच ठिकाणी केवळ महिला आहेत म्हणूनच त्यांना दुय्यम वागणूक मिळाली. तरीही त्या डगमगल्या नाहीत. या सर्व प्रवासात त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या जाऊ प्रकाशी तोमरही होत्या. चन्द्रो यांचा प्रवास जिथून सुरू झाला, तिथूनच प्रकाशी यांचाही प्रवास सुरू झाला होता. सुरुवातीला प्रकाशी या लपूनछपून चन्द्रो यांच्यासोबत सरावाला जात. मात्र, नंतर टप्प्याटप्प्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला.
एका स्पर्धेमध्ये तर प्रकाशी यांनी चक्क शहराच्या डीआयजीलाच हरवलं होतं. याबाबत बोलताना प्रकाशी सांगतात, की “त्या स्पर्धेमध्ये .३२ बोरची बंदूक हाताळायची होती. ती जरा जड असल्यामुळं फायर केल्यानंतर हाताला झटका बसत. मात्र, तरीही मला गोल्ड मेडल मिळालं, आणि डीआयजींना सिल्व्हर. आपण एका महिलेकडून हरल्याचं त्यांना एवढं दुःख झालं, की त्यांनी मेडलसोबत फोटोही काढायला नकार दिला.”
ट्रॅप शूटिंगच्या बंदुका या सुमारे दीड-दोन किलोच्या असतात. त्यामुळं तरुण मुलं-मुलीही सरावाशिवाय त्यांना जास्त वेळ स्थिर पकडू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीला किमान दोन ते तीन महिन्यांच्या सरावानंतरच ‘बुल्ज आय’ म्हणजेच अगदी अचूक निशाणा साधता येतो. त्यामुळं या दोन आजीबाई अगदी सहजपणे या बंदुका हाताळताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसायचा. प्रकाशी सांगतात, “आम्ही लहानपणापासूनच जात्यावर दळण करणं, घरातील इतर कामं करणं असं करत आलो आहोत. त्यामुळं या वयातही आमचे हात थरथरत नाहीत.” प्रकाशी यांनीही कित्येक स्पर्धांमध्ये मिळून २५ हून अधिक मेडल मिळवले आहेत.
या दोघींना लोक ‘शूटर दादी’ किंवा ‘रिव्हॉल्व्हर दादी’ म्हणून ओळखतात. त्यांना ‘गुगल इंडिया वुनेम विल प्रोग्राम’कडून आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून सन्मानित करण्यात आलंय.
यासोबतच त्यांना महिला व बाल विकास मंत्रालयाकडून आयकॉन लेडी पुरस्कारही देण्यात आला आहे. तसंच सत्यमेव जयते, इंडियाज गॉट टॅलेंट आणि हिस्ट्री चॅनलवरील “ओएमजी” या कार्यक्रमांमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. एवढंच नव्हे, तर प्रकाशी यांची मुलगी सीमा ही आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषकामध्ये रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. सीमा सध्या भारतीय सैन्यामध्ये आहे. तसेच, त्यांची नात रुबी सध्या पंजाब पोलीसमध्ये काम करत आहेत.
चन्द्रो यांना जे लोक सुरुवातीला टोमणे मारत होते, त्यांच्याच मुलींना आणि नातींना चन्द्रो आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये शूटींग शिकवत होत्या. चन्द्रो यांनी उचललेल्या बंदुकीमुळे आधी कोणालाच माहिती नसलेलं गाव आज जगाच्या नकाशावर आलं आहे, आणि गावाला ‘शूटर दादी’ अशी ओळख मिळाली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










