आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतातील शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड माउंटबॅटन प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने भारताच्या फाळणीमधील त्यांची भूमिका हा मोठा वादाचा विषय ठरली, आणि आता त्यांचं नाव घेतलं की लोकांना तेच आधी आठवतं. माउंटबॅटन यांचे काँग्रेससोबत आणि भारतातील इतर नेत्यांसोबतही चांगले संबंध होते. मात्र, ते देशात असताना एक अशी घटना घडली होती, जी त्या काळी बाहेर आली असती तर माऊंटबॅटन यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं असतं.
ब्रिटिश राणी एलिझाबेथचे पती प्रिंस फिलिप आणि लॉर्ड माऊंटबॅटन हे एकमेकांचे नातलग होते. वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांनी ऑझबर्नमधील रॉयल नेव्हल महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पुढे १९१६ मध्ये कॅडेट म्हणून त्यांनी नौदलात प्रवेश घेतला. आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर ते अल्पावधीतच वरच्या हुद्द्यांवर पोहोचले होते. दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीला त्यांनी केली या जहाजाचा कप्तान म्हणून काम पाहिलं. पुढे इलस्ट्रियस ही विमानवाहू नौकाही त्यांनी सांभाळली.
त्यांचं काम पाहून ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १९४१ ला तीनही सेनादलांच्या प्रमुखपदी माउंटबॅटन यांची नेमणूक केली. तिकडं दुसरं महायु*द्ध सुरू होतं, आणि भारतात राष्ट्रवादी चळवळ जोर धरत होती.
माउंटबॅटन यांची एक खासियत होती, ते म्हणजे अगदी शत्रू राष्ट्रांशीही ते चांगल्या प्रकारे जुळवून घेत होते. इंग्लंडच्या सैन्यदलांचे प्रमुख म्हणून केलेलं काम अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रॅन्कलीन रुझव्हेल्ट यांना आवडलं होतं. त्यामुळेच १९४३मध्ये त्यांनी लुई यांची आग्नेय आशियामधील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचे कमांडर म्हणून नेमणूक केली. माउंटबॅटन यांच्या तिथे जाण्यापूर्वी दोस्त राष्ट्रांच्या सैन्याची परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, त्यांनी राबवलेल्या योजना आणि त्यांच्या आत्मविश्वासामुळे सैनिकांचंही धैर्य वाढलं होतं. याठिकाणी माउंटबॅटन यांच्या योजनांचा वापर करुन सैन्याने विजय मिळवलाही असता; मात्र त्यापूर्वीच अ*णुबॉ*म्बचा वापर झाल्यामुळे यु*द्ध थांबवण्यात आलं होतं.
माउंटबॅटनच्या नेतृत्वाखालील नौदलाने जपानी नौदलाचा पराभव केला. याचवेळी माउंटबॅटनच्या नेतृत्वाखालील सैन्याने सिंगापूर ताब्यात घेतले तेव्हा माउंटबॅटनने आपल्या सैन्याला तेथील आझाद हिंद सेनेच्या स्मारकाला उद्ध्वस्त करायचे आदेश दिले आणि त्याच्या या आदेशावर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली.
यु*द्धाच्या काळातही ब्रह्मदेश, सिंगापूर आणि इतर प्रदेशांमधील लोकांशी माउंटबॅटन यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. माउंटबॅटन यांच्या या स्वभावामुळेच ब्रिटिश सरकारने त्यांना भारताच्या व्हॉईसरॉय पदाची जबाबदारी दिली.
माउंटबॅटन भारतात आले तेच १९४७ मध्ये. त्यांच्यापुढे शांततेत भारताला स्वातंत्र्य देण्याचं आव्हान होतं. मात्र, ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नितीमुळे देशातील हिंदू-मुस्लीम वाद विकोपाला गेला होता. त्यामुळं फाळणी होणं अटळ होतं. आता केवळ ही सर्व प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने पूर्ण करण्याचं त्यांचं लक्ष्य होतं. आधीच्या इतर व्हॉईसरॉयपेक्षा निर्णय घेण्याचं अधिक स्वातंत्र्य माउंटबॅटनला देण्यात आलं होतं. मात्र, तरीही ते वेळोवेळी ब्रिटिश सरकारचा सल्ला घेत.
हिंदू आणि मुस्लिम समुदाय अगदी टोकांच्या भूमिका घेत होते. त्यामुळं मग माउंटबॅटन यांनी स्वतःचीच एक योजना पुढे केली. यामध्ये फाळणीचा उल्लेख होताच, मात्र त्यासोबतच संस्थानांनी कोणाच्या बाजूने जायचं याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलं होतं. यासोबतच इतर तरतुदीही होत्याच. ब्रिटिश संसदेने याला मान्यता दिली. काँग्रेस आणि मुस्लीम लीगनेही याला मान्यता दिली, आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला.
देश स्वतंत्र झाल्यानंतरही माउंटबॅटन भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्ती होते. बरेच मोठे राजे-महाराजे त्यांना भेटण्यासाठी येत असत. कित्येक राजे त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून त्यांच्यासोबत जेवणासाठी थांबत. १९५५ मध्येही असाच एक राजा माउंटबॅटन यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी आला होता. तेव्हा माउंटबॅटन यांनी त्याला जेवणासाठी थांबवून घेतलं.
जेवण झाल्यानंतर दिवाणखाण्याकडे जात असताना हा राजा माउंटबॅटन यांच्या दिशेने झुकला. माउंटबॅटनला वाटलं की या राजाला काही खासगी बाब त्यांच्या कानात सांगायची आहे. त्यामुळे तेदेखील या राजाच्या दिशेने झुकले. मात्र, हा राजा पुढे-पुढे येतच राहिला, आणि खाली कोसळला.
हे पाहून माउंटबॅटन दचकले, आणि घाबरलेही. त्यांनी तातडीने राजाची नाडी तपासली, आणि त्यांच्या लक्षात आलं की राजाचा मृत्यू झाला आहे. ते तातडीने इंग्लंडच्या राणीला याबाबत माहिती देण्यासाठी गेले.
त्यांनी सांगितलं, की अमूक एक राजा माझ्याकडे आला होता, आणि आम्ही एकत्र जेवण वगैरे केलं. राणी म्हणाली, की त्या राजांना माझ्या सदिच्छा द्या. कसे आहेत ते? यावर लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले – ते तर गेले!
मागे एकदा एका इन्स्टाग्राम हँडलला देत असलेल्या मुलाखतीमध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांची मुलगी पामेला यांनी हा किस्सा सांगितला होता. या किस्स्यातील राजा कोण, किंवा पुढे काय झालं याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. मोठमोठे निर्णय सहजपणे घेणारे लॉर्ड माउंटबॅटनही कधी काळी अशा परिस्थितीमध्ये पडले होते जिथे त्यांना काय करावं सुचलंच नाही हे सांगताना त्यांनी या घटनेचा उल्लेख केला होता.
संपूर्ण जीवनभर मानवतावादी दृष्टीकोन ठेवलेल्या लॉर्ड माउंटबॅटन यांचा मृत्यू मात्र द*हश*तवादाने झाला हे मोठं दुर्दैव. आयुष्यभर यु*द्ध आणि तंटे पाहिलेले माउंटबॅटन हे निवृत्तीनंतर आयर्लंडमध्ये शांत जीवन जगत होते. कोणत्याही सामान्य निवृत्त ब्रिटिश व्यक्तीप्रमाणे घराजवळ मासेमारी करणे, नातवंडांसोबत वेळ घालवणे असं एकंदरीत सुखी आयुष्य सुरू होतं.
२७ ऑगस्ट १९७९ रोजी देखील अशाच प्रकारे ते आपल्या कुटुंबियांसोबत लॉब्स्टर फिशिंगसाठी गेले होते. माउंटबॅटन, त्यांची मुलगी पॅट्रिशिया, तिचा पती लॉर्ड जॉन ब्रॅडबोर्न, पॅट्रिशिया आणि जॉनची दोन जुळी मुलं, पॅट्रिशियाची सासू, आणि त्यांचा फॅमिली फ्रेंड पॉल मॅक्सवेल हे सगळे या ‘शॅडो व्ही’ नावाच्या बोटीवर होते.
दुर्दैवाने या बोटीवर आयरिश द*हश*तवाद्यांनी बॉ*म्ब लावला होता. या बॉ*म्बस्फो*टात लॉर्ड माउंटबॅटन, दोन जुळी मुलं आणि पॅट्रिशियाच्या सासूचा मृत्यू झाला. पुढे तपासात असंही समोर आलं, की आयआरए ही आयरिश द*हश*तवादी संघटना १९६०पासून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होती. अखेर, १९७९ साली त्यांना यश आलं.
संदर्भ-
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










