आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू सर्वांनाच महिती आहे. पडद्यावर मोठमोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केलेल्या तब्बूने आजतागायत लग्न केलं नाही. तब्बू आजही अविवाहित असण्याचं खरं कारण तिलाच माहिती असेल. मात्र, अनेकांना असा ठाम विश्वास आहे, की यामागे साऊथचा ‘मास’ सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी हे कारण आहे!
तब्बूचं खरं नाव, तबस्सुम फातिमा हाश्मी असं आहे. सिनेमात येण्यापूर्वी तिचा प्रवास खूप संघर्षमय राहिला. तब्बू अवघ्या तीन वर्षांची असताना तिचे वडील तिची आई आणि बहिणीला सोडून निघून गेले. यानंतर तिच्या आईनेच दोन्ही मुलींना मोठं केलं. यामुळेच तिनं आपल्या वडिलांचं नाव लावणं सोडून दिलं. तब्बूची आई शिक्षिका होती. आईप्रमाणेच तब्बूलाही शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं होतं. मात्र, तिच्या नशिबात दुसरंच काहीतरी लिहिलेलं.
तब्बूची मोठी बहीण फराह तिला एकदा बॉलिवूड पार्टीमध्ये घेऊन गेली होती. याठिकाणी तेव्हाचा सुपरस्टार देवानंदने तब्बूला पाहिलं, आणि आपल्या पुढच्या चित्रपटातील महत्त्वाची भूमिका तब्बूच करु शकते, असा त्याला ठाम विश्वास बसला. या सिनेमाचं नाव होतं, ‘हम नौजवां’. इथूनच तब्बूच्या करिअरची सुरुवात झाली.
जिथं बॉलिवूडमधील अभिनेत्री ग्लॅमरस रोलच्या मागे धावत, तिथं तब्बूच्या करिअरची सुरुवात मात्र एका रेप व्हिक्टिमच्या रोलने झाली. ही भूमिका नवख्या तब्बूने चांगलीच साकारली. यानंतर तिच्या करिअरची गाडी सुसाट धावू लागली. पुढे लीड रोल मिळू लागल्यानंतर तब्बूने अजय देवगणसोबत कित्येक सिनेमे केले. या दोघांची जोडी एवढ्या चित्रपटांमध्ये दिसली, की या दोघांचं काहीतरी सुरुच आहे अशा अफवा पसरु लागल्या. त्यांनी मात्र वेळोवेळी तसं काही नसल्याचं स्पष्ट केलं. हे दोघे आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
या अफवेनंतर तब्बूच्या आयुष्यात खरं ‘प्रेम’ आलं, ते संजय कपूरच्या रुपाने. ‘प्रेम’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दोघांनी अगदी कमी काळातच डेटिंग सुरू केलं होतं. त्यांच्याकडे पाहून सर्वांना असंच वाटत होतं, की तब्बूला आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळाला. मात्र, ‘प्रेम’ चित्रपटाचं शूटिंग आटोपल्यानंतर तब्बूला पुढचा सिनेमा लगेच मिळाला. हा होता नागार्जुनसोबतचा ‘सिसिंद्री’. इथंच तब्बू आणि नागार्जुनच्या डेटिंगला सुरुवात झाली.
सिसिंद्रीच्या शूटिंगदरम्यान हे दोघे कायम एकमेकांसोबत असत. एवढंच नाही, तर शूटिंगनंतर मोकळ्या वेळातही ते एकमेकांसोबतच फिरत असत. पुढे तर नागार्जुनने तब्बूला एक बंगलाच गिफ्ट केला होता, जो त्याच्या हैदराबादमधील घराच्या अगदीच शेजारी होता. असं म्हणतात की वीकेंड्सला हे दोघे याच बंगल्यावर भेटत. मात्र, तब्बू आपल्या लव्ह लाईफबद्दल कधीच स्पष्टपणे बोलत नसायची. त्यामुळे या सर्व प्रकाराबाबतही तिने काहीच मत व्यक्त केलं नव्हतं.
राहिला प्रश्न नागार्जुनचा, तर त्याला आधीपासूनच एक पत्नी होती. विशेष म्हणजे अमला अक्किनेनी ही नागार्जुनची दुसरी पत्नी होती. तरीही, तब्बल दहा वर्षांपर्यंत नागार्जुन तब्बूला डेट करत राहिला.
तब्बूला नागार्जुनकडून कमिटमेंट अपेक्षित होती. मात्र, आधीच दोन वेळा लग्नाच्या बंधनात अडकलेला नागार्जुन तिसऱ्या लग्नाचा विचारही करत नव्हता. अखेर दहा वर्षं वाट पाहिल्यानंतर तब्बूच्या लक्षात आलं, की कितीही काही झालं तरी नागार्जुन आपल्या पत्नीला सोडणार नाही. त्यामुळं मग शेवटी तिनेच नागार्जुनसोबत ब्रेकअप करुन दूर जाणं पसंत केलं.
असं म्हणतात, की तब्बूसाठी हा अत्यंत अवघड आणि दुःखद निर्णय होता. यानंतरच तिने इथून पुढं कुणाशीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात अशाही वावड्या उठल्या होत्या, की तब्बूने अजय देवगनमुळे लग्न केलं नाही. मात्र, या सर्व गोष्टी केवळ अफवा असल्याचं तब्बूने स्पष्ट केलं होतं. अजय आणि आपण कॉलेज जीवनापासूनच केवळ चांगले मित्र होतो, आणि अजूनही आहोत असं तब्बूने सांगितलं होतं. अजयनंतर मध्ये संजय कपूर, आणि पुढे नागार्जुनवरही तब्बूने प्रेम केलं. मात्र, नागार्जुननंतर तब्बूने जणू आपल्या हृदयाचा दरवाजाच बंद केला. त्यामुळेच तिच्या लग्न न करण्याला नागार्जुनच कारण असल्याबद्दल लोकांना विश्वास आहे.
या सगळ्या प्रकाराला कित्येक वर्षं झाली असली, तरी आजही नागार्जुन आणि तब्बू चांगले मित्र आहेत. नागार्जुन एका मुलाखतीत म्हटला होता, “तब्बू माझी खास मैत्रिण आहे. आजही तिचं नाव घेतलं, की माझा चेहरा उजळतो. अगदी २१-२२ वर्षांचा असल्यापासून मी तिला ओळखतो. म्हणजे, जवळपास अर्ध आयुष्य आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. आता आमच्याबद्दल तुम्हाला दुसरं काही वाटत असेल, तर तो तुमचा दृष्टीकोन आहे. माझ्यासाठी तर ती एक सुंदर व्यक्ती आणि सुंदर मैत्रिण आहे, आणि कायम असणार आहे.”
एवढंच नाही, तर नागार्जुनाची पत्नी अमलाही तब्बूची चांगली मैत्रिण आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमला म्हणाल्या होत्या, “मला माझे पती नागार्जुना आणि माझी मैत्रिण तब्बू यांच्यावर १०० टक्के विश्वास आहे. या विश्वासाला कशामुळेच तडा जाऊ शकत नाही. माझ्या घरात काय होतं याची काळजी बाकीच्यांनी करायची गरज नाही. आता तुम्ही विचाराल, की याबाबत मी नागार्जुनाशी बोलली आहे का; तर आधीच सांगते – कधीच नाही! माझं घर हे एखाद्या मंदिराप्रमाणे पवित्र आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील कोणतीही घाण मी या घरात येऊ देत नाही. खासकरुन असे गॉसिप. अशा प्रकारच्या चर्चा मी घरात करतही नाही आणि करुही देत नाही.”
तब्बूबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “तिला दुःख झालं असेल, हे स्वाभाविक आहे. मात्र आम्ही त्याबाबत कधीही बोलत नाही. मुंबईतील केवळ दोन लोक माझ्या संपर्कात असतात. एक म्हणजे माझा मानलेला भाऊ डॅनी डेंझोंग्पा, आणि दुसरी म्हणजे तब्बू. ती जेव्हा कधी हैदराबादला येते, तेव्हा ती आमच्यासोबतच राहते.”
नागार्जुना आणि अमलाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर तर तब्बूचं प्रेमप्रकरण हे एकतर्फीच वाटू लागतं. मात्र, एक खरं, की तब्बूच्या आयुष्यातील एकही लव्हस्टोरी सक्सेसफुल ठरली नसूनही, तिच्या करिअरवर याचा परिणाम तिने होऊ दिला नाही. ती आजही तितक्याच ताकदीने सिनेमांमध्ये काम करत आहे. शिवाय, एकटीच समर्थपणे सगळं सांभाळत आपल्याला कोणाची गरज नसल्याचंही दाखवून देत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.