आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९९७ साली एक १४ वर्षांचा मुलगा डोळ्यात हजारो स्वप्त घेऊन दिल्लीतल्या छात्रसाल स्टेडिअममध्ये दाखल झाला होता. प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक आणि स्टेडिअमचे व्यवस्थापक असलेल्या सतपाल सिंग यांच्याकडून त्यानं कुस्तीचे धडे घेण्यास सुरुवात केली. जवळपास एक दशकभर दोरखंड आणि मॅटशी झगडून त्यानं अनेक लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवले. मात्र, २००८च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्य (ब्राँझ) पदक मिळवून त्यानं इतिहास रचला. खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारा तो पहिला भारतीय झाला. (जाधव यांनी १९५२ ला हेलसिंकीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवलं होतं) चार वर्षांनंतर त्यानं पुन्हा लंडन ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करत रौप्यपदक जिंकलं.
या मुलाच्या प्रयत्नांनी भारतीय कुस्तीला जागतिक स्तरावर पुन्हा वैभव प्राप्त झालं. त्याला पाहून अनेक नव्या दमाच्या पहिलवानांनी कुस्ती सुरू केली. सुशील कुमार असं या मुलाचं नाव.
स्वप्नवत वाटणाऱ्या सुशील कुमारच्या या गोष्टीनं ४ मे २०२१च्या रात्री एका वाईट वळण घेतलं. ते ही त्याच ठिकाणी ज्या ठिकाणापासून त्याच्या स्वप्नांना सुरुवात झाली.
४ मेला रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअमच्या पार्किंगमध्ये कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून सागर धनकर या २३ वर्षीय ज्युनिअर रेसलिंग चॅम्पियनला मारहाण केली. सागरसोबत त्याच्या आणखी दोन मित्रांना देखील मारहाण झाली. त्यानंतर सागरचा मृत्यू झाला अन् सुशीलचा पडता काळ सुरू झाला.
२३ मेपर्यंत सुशील पोलिसांपासून पळत होता. २३ मेला पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं. त्याक्षणी सुशील रुपात जणू काही भारतीय कुस्तीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिल्याचा भास अनेक कुस्तीप्रेमींना झाला.
मात्र, ही काही पहिली वेळ नव्हती. या अगोदरही सुशील कुमार अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकला होता. त्याचा सहकारी आणि भारताचा कुस्तीपटू नरसिंह यादवनं त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. २०१६ च्या रियो ऑलिम्पिकसाठी ७४ किलो वजनी गटात नरसिंह यादव आणि दोन ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हे दोघे दावेदार होते. पात्रता फेरीत सुशील कुमारनं भाग घेतला नाही. त्यामुळं नरसिंह यादवला ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी पाठवण्यात आलं. नरसिंहनं आपल्या कौशल्याच्या बळावर ऑलिम्पिकमध्ये स्थानंही मिळवलं.
नॅशनल रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया(डब्ल्यूएफआय)च्या नियमांनुसार ज्या वजनाच्या श्रेणीत खेळाडूला कोटा मिळतो त्याच खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करता येतं. दोन वेळेचा ऑलिम्पिक पदक विजेता असल्यामुळे आपल्याला संधी मिळावी, अशी सुशील कुमारची इच्छा होती. त्याने डब्ल्यूएफआयला पुन्हा पात्रता सामने घेण्याची विनंतीही केली होती मात्र, डब्ल्यूएफआयनं नकार दिला. त्यानंतर सुशील न्यायालयात गेला होता. न्यायालयानं त्याची याचिका फेटाळून लावली होती.
यानंतर नरसिंहनं सोनीपतमधील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआय) येथे सराव सुरू केला. ऑलिम्पिक स्पर्धेच्या दहा दिवस अगोदर नरसिंह राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीच्या (नाडा) डोप चाचणीमध्ये पॉझिटिव्ह असूनही नाडानं त्याला क्लीन चिट दिली. मात्र, जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीनं (वाडा) त्याला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यापासून रोखलं आणि त्याच्यावर चार वर्षे बंदी देखील घातली.
या प्रकरणात नरसिंह यादवनं देखील सुशील कुमारवर गंभीर आरोप केले. सुशीलच्या सांगण्यावरून आपल्याला डोपिंगमध्ये अडकवण्यात आलं आहे. सोनीपत येथे प्रशिक्षण घेत असताना सुशीलच्या सांगण्यावरून आपल्या जेवणात काहीतरी मिसळले गेले, असे आरोप नरसिंहने केले होते. या प्रकरणात मा. पंतप्रधानांच्या सांगण्यावरून एक चौकशी समिती करण्यात आली होती.
नरसिंहला डोपमध्ये अडकवल्याच्या कथीत प्रकरणानंतरही सुशील ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकला नाही. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (आयओए) नरसिंहच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूला कोटा देण्यास नकार दिला होता.
याशिवाय २०१७मध्ये कुस्तीपटू प्रवीण राणावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात सुशीलचं नाव आलं होतं. दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममध्ये २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या चाचणीत सुशीलचा सामना उदयोन्मुख कुस्तीपटू प्रवीण राणाशी होता. सुशीलच्या समर्थकांनी प्रवीण आणि त्याच्या भावाला मारहाण केली होती. सुशीलच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप प्रवीण व त्याच्या भावाने केला होता याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलसमवेत देशासाठी कांस्यपदक जिंकणार्या योगेश्वरसोबतही त्याचा वाद झाला आहे. योगेश्वर छात्रसाल स्टेडियममध्येच प्रशिक्षण घेत होता. सुशीलशी झालेल्या वादामुळे त्यानं लंडन ऑलिम्पिकनंतर छात्रसाल स्टेडिअम सोडलं. योगेश्वर व्यतिरिक्त सुशीलचे खास मित्र असलेले कुस्तीपटू जितेंद्र कुमार आणि प्रवीण यांनीही छात्रसाल स्टेडिअम सोडलं. जितेंद्र आणि प्रवीण दोघेही ७४ किलो वजनी गटात खेळतात. सुशील त्यांचा आदर्श होता, दोघेही अगदी पब्लिकली सुशीलच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतं. वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये मेडल मिळवलेला पहिलवान बजरंग पूनियानं देखील वाद-विवादांमुळे छात्रसाल स्टेडिअम सोडलं आहे. पूनियानं टोकियो ऑलिम्पिकसाठी कोटा देखील मिळवला आहे.
२०१९च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप चाचण्यांमध्ये सुशीलवर कुस्तीपटू जितेंद्रला जाणून-बुजून डोळ्यावर बुक्की मारल्याचा आरोप आहे. इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या चाचण्यांमध्ये जितेंद्रचा अंतिम सामना सुशीलविरुद्ध होता. कुस्तीच्या वेळी सुशीलने प्रथम जितेंद्रच्या बोटाला मुरड घातली आणि त्यानंतर डाव्या डोळ्यावर बुक्क्या मारल्या. मात्र, दुखापत होऊनही जितेंद्रनं या सामन्यात शेवटपर्यंत सुशीलशी झुंज दिली.
सुशीलचा फक्त खेळाडूंशीच नाही तर अनेक प्रशिक्षकांशी वाद झालेले आहेत. अनेक प्रशिक्षकांनी सुशीलच्या वागण्याला कंटाळून छात्रसाल स्टेडिअमही सोडले आहे. लंडन ऑलिम्पिकनंतर प्रशिक्षक रामफल यांनी छात्रसाल स्टेडियम सोडलं होतं. त्याच्या सहा महिन्यापूर्वी, सुशीलचे विशेष प्रशिक्षक विरेंद्र सिंग यांनी वादामुळे सुशीलपासून फारकत घेतली होती. विरेंद्र सिंग सध्या दिल्ली-हरियाणा सीमेला लागून असलेल्या खेड्यात आपली अकादमी चालवित आहेत.
इतकचं नाही तर सुशीलचं नाव उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड सुंदर भाटीशीही जोडण्यात आलं आहे. सुशीलनं दिल्ली महानगरपालिकेकडून दिल्ली आणि गाझियाबादच्या सीमेवर टोल वसूल करण्याचे कंत्राट घेतलं होतं. येथील टोल वसूलीची जबाबदारी त्यानं गुंड सुंदर भाटीला दिल्याचा आरोप सुशीलवर झाला होता.
नजफगडचा हा मुलगा भारतात कुस्तीचा चेहरा बनला होता. सुशीलला पाहून अनेक तरुण कुस्तीपटूंनी मोठी स्वप्नं पाहण्याची हिम्मत केली. सुशीलच्या रुपात त्यांच्याकडे माणूस होता जो त्यांना पुढचा मार्ग दाखवेल. छात्रसाल स्टेडिअम भारतीय कुस्तीची मक्का झालं होतं. मात्र, कुणाला माहित होतं, जो पहिलवान कधीकाळी देशाचा तिरंगा खांद्यावर घेऊन अभिमानानं मिरवत असे, त्यालाच एक दिवस आपला चेहरा लपवत फिरावं लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.