आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
प्रेम आणि प्रेमकथा हा जवळपास प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्राचीन काळापासून आपल्याकडे अशा अनेक प्रेमकथा घडून गेल्या आहेत, ज्यांचा आदर्श आजच्या पिढीला घेता येईल. इतिहासाच्या पटलावर अशा काही प्रेमकथा आहेत ज्या धर्म, जात, भाषा, वय, पैसा यापलीकडे जाऊन निखळ, निस्वार्थ प्रेम कसं असावं, हे आपल्याला शिकवतात.
आज आम्ही अशीच एक ‘प्रेमाची गोष्ट’ सांगणार आहे.
ही गोष्ट आहे एका मुस्लिम शहजादीची, जी फक्त मूर्ती पाहून एका हिंदू देवतेच्या प्रेमात पडली. थुलुक्का नचियार असं या राजकुमारीचं नाव आहे. अनेकांनी तिचं नावही ऐकललं नसेल. पण, दक्षिण भारतात थुलुक्का नचियारला आजही एखाद्या देवीप्रमाणं मानलं जातं.
ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी अनेक मुस्लिम आक्र*मकांनी भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली होती. अल्लाउद्दीन खिलजी हा त्यापैकीच एक होता. खिलजी म्हटलं की, सर्वांना राणी पद्मावतीसाठी वेडा असलेला खिलजी डोळ्यांसमोर येतो. खिलजीसारखीच त्याची मुलगी देखील एका देवतेच्या प्रेमात वेडी झाली होती. मात्र, वडीलांप्रमाणं वेडेपणा न करता तिनं आपल्या प्रेमाचा मान-सन्मान जपला आणि इतिहासात एक आदराचं स्थान मिळवलं. थुलुक्का नचियार ही सुलतान अल्लाउद्दीन खिलजीची मुलगी होती. ‘तुघलक राजकुमारी’ असा थुलुक्का नचियारचा अर्थ होतो.
१३१० ते १३११ या दरम्यान दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीनं सेनापती मलिक कफुरच्या नेतृत्त्वात दक्षिणेकडील राज्यांत आपलं सैन्य पाठवलं होतं. दक्षिणेतील होयसळ व पंड्या या सत्ता मुघल साम्राज्यात जोडण्यासाठी मलिक कफुर दक्षिणेत चाल करून गेला. १३११च्या मार्च व एप्रिल महिन्यांमध्ये मलिकनं राजधानी मदुराईसह शेकडो ठिकाणी आक्र*मणं करून लूटमार केली. मात्र, त्याला पंडू राजांना मुघलांच्या अधिपत्याखाली आणण्यात यश आलं नाही.
विविध ठिकाणी केलेल्या लूटीमध्ये त्यानं गडगंज संपत्ती हस्तगत केली. दिल्लीतील मुस्लिम सैन्यानं दक्षिण भारतातील ज्या मंदिरांची लूट केली त्या यादीमध्ये तामिळनाडूमधील श्रीरंगम येथील मंदिराचाही समावेश होता. मुघलांनी मंदिरातील संपत्तीसह भगवान रंगनाथाच्या मूर्ती देखील दिल्लीला नेल्या.
असं सांगितलं जातं की, एका स्थानिक महिलेनं मुघल सैन्याचा पाठलाग केला आणि देवाच्या मूर्ती कुठे लपवलेल्या आहेत याची माहिती परत येऊन पुजाऱ्यांना दिली. मूर्ती परत मिळावी यासाठी डझनभर पुजाऱ्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांची वेशभुषा धारण करून दिल्लीच्या दरबारात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला.
मलिक काफुर लूट करून दिल्लीला परत गेल्यानंतर लूटून नेलेल्या सर्व सोन्याच्या मूर्ती आणि दागिने वितळवण्यास सुरुवात केली होती. त्याचं वेळी मुघल राजकुमारी सुरथानीची नजर रंगनाथाच्या मूर्तीवर पडली आणि ती रंगनाथाच्या प्रेमात पडली.
मलिक काफुरला विनंती करून तिनं रंगनाथाची मूर्ती स्वत:कडं ठेवली. ती त्या मूर्तीला अगदी जिवंत व्यक्तीप्रमाणं सांभाळत होती. दररोज अंघोळ घालणं, मूर्तीचे कपडे बदलणं आणि त्याला नैवैद्य देणं या सर्व गोष्टी ती करत असे.
इतकंच काय ती झोपतानासुद्धा त्या मूर्तीला जवळ घेऊन झोपत असे. तिच्या सेवेनं भगवान रंगनाथ खूश झाले. दररोज रात्री ते विविध रुपांमध्ये सुरथानीला दर्शन देत असतं, असे काही संदर्भ सापडतात.
या दरम्यान श्रीरंगमवरून दिल्लीला पोहचलेल्या पुजाऱ्यांनी रंगारंग कार्यक्रम करून सुलतानाला खुश केलं. कलाकारांना पाहिजे त्या वस्तू देण्याचा आदेश सुलतानानं मलिक कफूरला दिला. कलाकारांनी रंगनाथाच्या मूर्तीची मागणी केली. मलिक कफूरनं मूर्ती देण्यासाठी होकार दिला मात्र, राजकुमारीला मूर्तीचा लागलेला लळा पाहता मूर्ती रात्री घेऊन जाण्यास सांगितलं. सांगितल्याप्रमाणं कलाकारांच्या वेषात आलेल्या पुजाऱ्यांनी रात्री मूर्ती घेऊन दक्षिणेकडं कूच केलं.
मात्र, जेव्हा राजकुमारीला ही गोष्ट कळली तिनं काहीही विचार न करता पुजाऱ्यांचा पाठलाग केला. सुलतानानं देखील आपलं सैन्य त्यांच्या पाठीमागे लावलं. मुघल सैन्याला पाहून पुजाऱ्यांनी वेगळं वेगळं होऊन श्रीरंगम् गाठण्याचं ठरवलं. या दरम्यान ज्या दोन व्यक्तींकडं श्रीरंगनाथाची मूर्ती होती त्या जंगलात रस्ता चुकल्या.
इकडे राजकुमारी काही पुजाऱ्यांचा पाठलाग करून थेट श्रीरंगम् येथे येऊन पोहचली. तिनं रंगनाथाच्या मूर्तीसाठी सगळा गाव पालथा घातला मात्र, तिला यश आलं नाही. शेवटी तिनं मंदिराच्या गाभाऱ्यातच आपला जीव सोडला.
या सर्व गोंधळानंतर मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने रंगनाथाची हुबेहुब दुसरी मूर्ती स्थापन करण्याची व्यवस्था केली. त्याचवेळी भगवान रंगनाथ देखील एका भट्टराच्या स्वप्नात गेले. आपण राजकुमारी सुरथनीला त्यांनी आपली पत्नी म्हणून स्वीकारलं असून तिची देखील इतर देवीप्रमाणं पूजा करावी, अशी इच्छा व्यक्त केली. भट्टरांनी हे स्वप्न इतरांना सांगितलं. पडलेलं स्वप्न हे देवाचा आदेश मानून त्यांनी सुरथनीसाठी एक विशेष गाभारा तयार केला.
मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीची पूजा होत नाही म्हणून त्या गाभाऱ्यात हिरे आणि सोन्यानं सजवलेलं राजकुमारीचं चित्र ठेवण्यात आलं. तेव्हापासून आजतागायत भगवान रंगनाथाच्या सोबतीनं या मुस्लिम राजकुमारीची पूजा केली जाते. प्रेमासाठी केलेल्या त्यागामुळं राजकुमारी सुरथिनी दक्षिण भारतीयांसाठी ‘थुलुक्का नचियार’ म्हणून पूज्यनीय झाली.
थुलक्का नचियारबाबत असंही म्हटलं जातं की, ती सुलतानाची नाही तर, मलिक कफूरची मुलगी होती. मात्र, याची सतत्या पडताळून पाहण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.
आजही वर्षातून एकदा, रंगनाथाचा आणि थुलुक्का नचियारचा कल्याण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तिच्या प्रेमाची साक्ष म्हणून रंगनाथाच्या नैवेद्यामध्ये मुघल पद्धतीनं शिजवलेली पोळी, लोणी आणि साखर ठेवली जाते. रंगनाथाअगोदर हा नैवेद्य राजकुमारीला ठेवला जातो त्यानंतरच तो देवाला दिला जातो. नचियार गाभारा खरी भक्ती आणि प्रेम काय असावं याचं जिवंत उदाहरण आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.