आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मनुष्याचे आणि वृक्षांचे नाते हे निसर्ग साखळीचे एक घटक म्हणून नाहीतर त्या पलीकडे एका भावनिकतेचे आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ अर्थात वृक्ष आणि हा आजूबाजूचा निसर्ग आमचा मित्र आहे.
निसर्गाशी असलेली बांधिलकी बिष्णोई समाजाच्या लढ्याच्या रूपाने अथवा उत्तराखंडातील पहाडी लोकांच्या चिपको आंदोलनाच्या रूपाने माणूस वेळोवेळी दाखवून देत असतो.
परंतु मागच्या काही दशकात विकासाच्या प्रगती बरोबर निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. प्रदूषणात झालेल्या वाढीमुळे सुद्धा पर्यावरण धोक्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत माणसाचे निसर्गाशी असलेले नाते वृंधिगत करणे फार गरजेचे बनले असून यासाठी पर्यावरण व माणसामध्ये सेतू बांधण्याचं काम करावं लागणार आहे.
राजस्थानमध्ये असाच एक सेतू आणि ऋणानुबंध निर्माण करण्याचा एक सुंदर असा प्रयत्न केला जात आहे.
राजस्थानमधील पिप्लांत्री या गावात एखाद्या घरात मुलीचा जन्म झाला तर गावाच्या परिसरात १११ झाडांची लागवड केली जाते.
नुसती लागवडच केली जात नाही तर त्या झाडांच्या संगोपनाची काळजी संपूर्ण समाज घेत असतो.
यासाठी गावकरी २१००० रुपयांची वर्गणी गोळा करतात आणि १०००० रुपये मुलीचे आईवडील देतात यातून मुलीच्या नावाने ३१००० रुपयांचे फिक्स डीपोझिटचे अकाऊन्ट तयार केले जाते. यासोबतच मुलीच्या माता पित्याकडून शपथ घेतली जाते की ते मुलीचं संपुर्ण शिक्षण करतील आणि जोपर्यंत ती सज्ञान होत नाही तोपर्यंत तिचं लग्न करणार नाही.
ही सुंदर संकल्पना आकारास येण्यामागे शाम सुंदर पालीवाल नामक या गावचेच एक रहिवासी आहेत. आपल्या प्राणप्रिय मुलगी किरणला ती अगदी लहान असतानाच गमावल्यानंरत, इतर कोणासोबत असा दुर्दैवी प्रकार पुन्हा घडू नये यासठी शाम सुंदर पालीवाल यांनी ही योजना गावकऱ्यासमोर मांडली. ती गावकऱ्यांनी स्वीकारली व आज त्या योजनेप्रमाणे गावात प्रत्येक मुलीच्या जन्माबरोबर गावाच्या आसपासच्या प्रदेशात १११ झाडांची लागवड केली जाते.
पालीवालांच्या मते गावात दरवर्षी ६० मुलींचा जन्म होतो. जे प्रमाण मुलांच्या जन्माच्या तुलनेत फार कमी होते. आता झाडे लावून मुलीचा जन्म एका आनंदोत्सवासारखा साजरा केला जातो यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होते आहे.
भारतात मुलींचा जन्मदर हा फारच कमी असून, मागील काही वर्षात स्त्री भ्रूणहत्येचे वाढलेले प्रमाण बघता, मुलीचा जन्म हे काही दुःखाचं कारण नसून आनंदाचं कारण आहे, हे समाजात रुजवण्यासाठी हे कार्य पालीवाल आणि ग्रामस्थ मिळून करत आहेत. ते स्त्रीजन्माप्रतीच्या उदासीनतेला आणि पर्यावरण रक्षा या दोन्ही महत्वपूर्ण विषयांची सांगड घालून एक उत्तम समाधान जगाला देऊ बघत आहेत.
आज भारत सरकार मुलीचा जन्मदर वाढावा याकरिता विविध योजना अंगीकारत आहे. लिंग निदान चाचण्यांवर भारत सरकारने बंदी घातली आहे. भारतात मुलीचा जन्म हा कटुंबावरचा भार समजला जातो, कारण लग्नानंतर मुलीच्या बापाला मोठी रक्कम हुंडा म्हणून द्यावी लागते. जरी या प्रथेवर कायदेशीर बंदी असली तरी ही प्रथा भारतीय जनमानसात रुजली आहे.
आज भारतात हुंडाबळींची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत मुलीचा जन्म हा एक प्रकारे बापाच्या जीवाला खासकरून कनिष्ठ मध्यमवर्गीय बापाच्या जीवाला एक ताप समजला जातो. यामुळे स्त्रीभ्रूण हत्या होतात.
पण या वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येवर परिणामकारक उपाय म्हणजे या गावात राबविण्यात आलेलं हे मॉडेल!
पर्यावरण रक्षण आणि बेटी बचाव अशा दोन्ही गोष्टीची तरतूद या माध्यमातून केली जात आहे. हे निश्चितच भूषणावह आहे. जगभरातल्या मीडियाने या गावातील मॉडेलची दखल घेतली असून, हे मॉडेल अजून देशभरात राबवलं पाहिजे असा सूर लावला जात आहे.
डिपॉझिटच्या पैशातून मुलीचं संगोपन देखील होतं आणि झाडं लावल्याने जैव विविधता वाढीस लागते. हा एक अत्यंत चांगला समतोल साधणारा मार्ग असून यामुळे अनेक जीवांचे रक्षणच होणार मानवता आणि निसर्गातला सेतू अजून मजबुतीने उभा राहणार आहे.
मुलीचा जन्म हा कुठल्याच प्रकारे शाप नसून एक वरदान आहे आणि त्याद्वारे केले जाणारे पर्यावरण जोपासणेचे कार्य हे एक मोठे पुण्यकर्म आहे, असा संदेश देणाऱ्या या योजनेची भारतालाच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीला गरज आहे. अशा योजनांना सरकारने प्रोत्साहन दिल्यास एक कल्याणकारी परिस्थिती निर्माण करणे सहज शक्य होणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.