आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
७०-८० च्या दशकात भारतीय चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेले नाव म्हणजे धर्मेंद्र. आजच्या काळातही धर्मेंद्र यांचे नाव हे बॉलिवूडचे आघाडीचे नायक म्हणून आग्रहाने घेतले जाते. त्यांचा अमिताभ व हेमा मालिनी सोबत आलेला शोले चित्रपट भारतीय प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतला होता.
चित्रपटसृष्टीचा एक मोठा चेहरा बनलेला धर्मेंद्र सर्वांनी पाहिला आहे, पण धर्मेंद्रचा नायक बनण्यापूर्वीचा प्रवास अत्यंत खडतर होता.
धर्मेंद्र मुळचे पंजाबचे, त्यांचे वडील एका शाळेत मुख्याध्यापक होते. आपल्या मुलाने खूप शिकावे आणि नाव कमवावे अशी त्यांची अपेक्षा होती. पण धर्मेंद्रचे मन अभ्यासात अधिक लागत नसे. त्यांना मनसोक्त खेळणे व चित्रपट पाहणे खूप आवडायचे.
आपला छंद पूर्ण करण्यासाठी ते आपल्या गावापासून अनेक मैलांवर दूर असणाऱ्या शहरात जाऊन नेहमी चित्रपट पाहत असत. असाच एकदा त्यांनी सुरैयाचा ‘दिल्लगी’ चित्रपट पहिला, त्यांना तो एवढा आवडला की त्यांनी तो एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चक्क सलग ४० दिवस रोज पाहिला.
या चित्रपटामुळे ते एवढे प्रभावित झाले की आता आपल्याला चित्रपटातच करियर करायचे हा जणू संकल्पच त्यांनी केला. मग काय? येणारे चित्रपट, त्यातील संवाद-गाणी गुणगुणत त्यातील सीन्सचे ते बारकाईने निरीक्षण करू लागले.
यातच फिल्म-फेयर नावाची संस्था चित्रपटांसाठी काही नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याची बातमी त्यांना समजली. ही संधी माझ्यासाठीच आहे असे मनाशी ठरवून, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तत्काळ अर्ज भरला.
धर्मेंद्रने अभिनयासाठी कधीही कुठले क्लासेस केले नाहीत, तरीही अनेक प्रतिभावंत व्यक्तीना मागे सोडत ते यात प्रभावीपणे अभिनय करून उत्तीर्ण झाले. आता चित्रपटात जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही असे त्यांना वाटू लागले होते. पण यश सहजासहजी मिळत नाही हे त्यांना तेव्हा माहिती नसावे.
चित्रपटात काम करून अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला खरा पण त्यांना थेट चित्रपटात प्रवेश मिळाला नाही, अनेक रात्री रस्त्यावर काढाव्या लागल्या. एवढंच काय तर अनेकदा त्यांनी चणे-फुटाणे खाऊन दिवस काढले, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
सुरुवातीचा काळ एवढा वाईट होता की अनेक चित्रपट निर्माते, अभिनेते यांच्या भेटीसाठी ते मैलोंमैल चालत प्रवास करायचे कारण त्यांच्याकडे बसला देण्यासाठी पैसे नसायचे. काम मिळत नव्हते, जेवणाची भ्रांत झाली होती.
एक दिवस असाच प्रवास करून ते रूमवर आले. ते थकले असल्याने बेशुद्ध झाले, त्यांचा मित्र त्यांना रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी धर्मेंद्रला तपासले व याला गोळ्यांची नव्हे तर जेवणाची गरज आहे असे सांगितले.
बरीच धावपळ केल्यानंतर अखेर धर्मेंद्रला पहिला चित्रपट मिळाला. अर्जुन हिंग्रानीच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला. आज धर्मेंद्र यांचे वय ८० पेक्षा जास्त आहे. आजही धर्मेंद्र अर्जुन हिंग्रनीना देव मानतात. ‘मी जो काही आहे तो केवळ अर्जुनजींनी दिलेल्या कामामुळे आहे’, असे ते वारंवार सांगतात.
धर्मेंद्र हे दिसायला रुबाबदार होते, त्यांच्या अभिनयाने अनेकांना भुरळ घातली. त्यांचा ‘फुल और पत्थर’ हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटात शर्ट लेस होऊन त्यांनी धुमाकूळ घातला होता, अर्थात या प्रकारामुळे ते अनेक टीकाकारांचचं लक्षही बनले होते. पण प्रगतीच्या मार्गात अडथळे येतंच असतात हे त्यांनी आता ओळखले होते.
त्यांचा हिटचा प्रवास सुरूच राहिला, त्यांना विविध चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, आघाडीचे दिग्दर्शक आता त्यांच्या होकाराची वाट पाहू लागले, अनेक अभिनेत्री धर्मेंद्रसह काम करण्यासाठी पैज लावू लागल्या.
काही चित्रपटात सोबत काम केल्यानंतर त्यांच्या व मीनाकुमारीच्या प्रकरणामुळे बराच वाद उफाळला होता. पण काही दिवसानंतर तो शांत झाला. धर्मेंद्र हा युथ आयकॉन होता, तरुण वर्गात त्याच्या विषयी आकर्षण प्रचंड वाढत होते.
कोणीतरी त्याकाळचे आणखी एक आघाडीचे अभिनेते दिलीप कुमार यांना धर्मेंद्र विषयी विचारले होते, त्यावेळी धर्मेंद्रच्या अभिनयाचे कौतुक करत मी पुढच्या वेळी देवाकडून धर्मेंद्रसारखा सुंदर चेहरा व त्याच्यासारखा चाहतावर्ग मागेन असा सांगितले होते.
आजही अभिनेते असलेले गोविंदा, ह्रितिक, सलमान, सोनू सूद,आणि सन्नी-बोबी ही त्यांची मुलं आम्ही धर्मेंद्रामुळे चित्रपटाकडे वळलो असे अभिमानाने सांगतात. धर्मेंद्र एक शेरदिल व्यक्तिमत्त्व आहेत ते अनेकांना आर्थिक व सामाजिक मदत करताना आपण पाहिलेले आहे.
शोले चित्रपटाचा एक किस्सा त्यांनी मुद्दामहून सांगितला होता, तो म्हणजे अभिनय करत असतांना ते जाणीवपूर्वक चुका करत होते, कारण त्यांना जास्तीत जास्त वेळ हेमा मालिनीसह घालवायचा होता, त्यांची ही केमिस्ट्री पुढे वाढतच गेली.
काही काळानंतर त्यांनी हेमा मालिनीशी विवाह केला. शिवाय या विवाहासाठी त्यांनी धर्मपरिवर्तन करत इस्लाम स्वीकारला असेही काहीजण सांगतात.
धर्मेंद्रने आपल्या चालत्या काळात अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करून कितीतरी हिट फिल्मस् दिल्या, यात बिमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी, यश चोपड़ा, बी.आर. चोपड़ा, रमेश सिप्पी, मनमोहन देसाई असे अनेक दिग्गज होते. टाईम्स नावाच्या एका वृत्तपत्राने त्यांना सर्वांत सुंदर पुरुषांच्या यादीत स्थान दिले होते.
धर्मेंद्र यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचले होते, त्यांच्या सोबत काम करणे हे भाग्य आहे असे नवोदित कलाकारांना वाटू लागले. धर्मेंद्र हे अतिप्रमाणात मद्य पितात म्हणून अनेकांनी त्यांच्या विषयी चुकीची मतं मांडली. पण ‘मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगतो’ असे सांगायला ते कधी विसरले नाहीत.
धर्मेंद्रने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक सदाबहार फिल्म्स दिल्या, त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना चित्रपटसृष्टीच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांचा शोलेमधील ‘बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना’ व ‘कुत्ते में तेरा खून पी जाऊंगा” हा संवाद प्रचंड प्रसिद्ध झाला होता. आजाही हा डायलॉग नेहमीच्या वापरात आहे.
त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात प्रवेश करून २००४ साली बिकानेरमधून निवडणूक लढवली व खासदार बनले. ते दोन वेळा खासदार होते.
त्यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या हेमा मालिनी आजही मथुरा मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. शिवाय २०१९ साली झालेल्या निवडणुकीत त्यांचे मोठे सुपुत्र प्रथितयश अभिनेता सन्नी देओल हे देखील गुरुदासपूर मतदारसंघातून खासदार बनले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून धर्मेंद्र चित्रपटसृष्टीचे एक महर्षी म्ह्णून गौरविले जात आहेत, त्यांनी आज उभं केलेलं वलय त्यांच्या दीर्घ संघर्षाची परिणीती आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.