आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताला चित्रकला, संगीत, नृत्य, शिल्प, लेखन अशा बहुविध कलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अनेक लोकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हा वारसा अधिकाधिक समृद्ध केला, भारतीय कलेला नवा आयाम दिला. चित्रकलेच्या क्षेत्रात राजा रवीवर्मांसारखे रत्न निर्माण करणाऱ्या या मातीत आणखीही काही चित्रकार होऊन गेले ज्यांच्यामुळे कलाक्षेत्रात भारताची एक नवी ओळख निर्माण झाली. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्ने तर एकापेक्षा एक रत्न घडवलेत.
रंगाची अमूर्त भाषा बोलणारा अशाच एका महान चित्रकाराची कथा आज आपण बघणार आहोत.
ज्याच्या हयातीत तर त्याच्या चित्रकलेची दाखल घेतली गेलीच पण त्याच्या पश्चातही त्याच्या चित्रांना कोट्यावधी डॉलर्सची किंमत मिळाली. अशा या कलाकाराचे नाव होते, वासुदेव संतू गायतोंडे.
वासुदेव गायतोंडे हे अमूर्त चित्रशैलीतील एक प्रख्यात नाव. त्यांच्या चित्राभोवतीचे गूढ वलय अजूनही काही केल्या कमी होत नाही. ज्यांच्या चित्रासाठी सर्वाधिक बोली लावली जाते असे ते एकमेव भारतीय चित्रकार आहेत. २०१५ साली मुंबईच्या क्रिस्टी संस्थेने गायतोंडे यांच्या एका ऑईल पेंटिंगचा लिलाव केला होता तेव्हा त्याला ३० कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली होती. भारतीय चित्रकाराच्या चित्राला इतकी मोठी किंमत मिळणं हा एक मोठा विक्रमच होता. गायतोंडे यांच्याच दुसऱ्या काही चित्रांनी त्यांचा हा विक्रम मोडून काढला आहे.
गायतोंडे यांचा जन्म १९२४ साली नागपूर येथे झाला. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांच्यातील चित्रकाराला खऱ्या अर्थाने आकार मिळाला. जे. जे.मधून बाहेर पडल्यावर ते काही काळ बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स या कलाकारांच्या गटाचे सदस्य होते. एम. एफ. हुसेन, एफ. एन. सुझा, एस. एच. रझा अशा दिग्गज आणि बंडखोर कलाकारांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली होती. या कलाकारांनीच भारतात मॉडर्न आर्टची पायाभरणी केली.
गायतोंडे यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अनोखी शैली. कॅनवासवर पारदर्शक रंगांचा एकामागून एक थर देत अमूर्तपणे व्यक्त होण्याची किमया त्यांनाच साधली. त्यांनी आपल्या शैलीत अनेक नवनवे प्रयोग केले, तेंव्हा कुठे त्यांना मुर्ततेकडून अमूर्ततेचा प्रवास शक्य झाला. काहीतरी संदेश देणे हा त्यांच्या चित्रांचा उद्देश कधीच नव्हता. त्यांची चित्रे म्हणजे शांत चित्ताने एकरूप होऊन स्वमन अनुभवण्याची संधी होती.
त्यांच्या चित्राकडे पाहताना ती चित्रे आपल्याकडे खेचून घेतात असे वाटते. कधी त्यांच्या चित्रातून आत्मशांतीचा साक्षात्कार होतो तर कधी त्यातून आतली सगळी उलथापालथही बाहेर पडते.
कधीकधी त्यांची चित्रे स्थिर डोहासारखी शांत वाटतात तर कधी कधी आतल्या वादळांना वाट करून देत.
कॅनव्हासवर पारदर्शी रंगांचा पातळ थर देत त्यातून साकारत जाणारी त्यांची चित्रे म्हणजे अद्भुत आनंदाचा अनुभव देणारी अत्युच्च कलाकृती होती.
त्यांच्या चित्रात रंग, विचार, चिंतन आणि आनंद यांचा संगम दिसत असे. त्यांनी हरेक प्रकारच्या माध्यमाचा वापर करून चित्रे बनवली पण, पॅलेट नाईफच्या सहाय्याने रंगांचे विविध रूप दाखवण्याची किमया साधणारे गायतोंडे हे एक सिद्धहस्त रंगकर्मी होते. पॅलेट नाईफच्या वापरामुळे त्यांच्या चित्राला त्यांची अशी खास शैली प्राप्त झाली आणि हीच त्यांची ओळख बनली.
१९७० च्या आसपास ते मुंबई सोडून दिल्लीत वास्तव्यास गेले. त्यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रकृती या दिल्लीच्या वास्तव्या दरम्यानच निर्माण झाल्या आहेत. चित्रे काढण्यासाठी ते ब्रश ऐवजी रोलरचा वापर करत.
चित्रात वापरलेल्या भौमितिक रचनांमुळे त्यांची चित्रे आणखीनच बोलकी होऊ लागली. त्यांच्यावर जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा अफाट प्रभाव होता. त्यांनी जगभर प्रवास केला. या प्रवासात त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचाही प्रभाव पडला. या सगळ्याच धर्मांतील तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्या चित्रातूनही जाणवतो.
गायतोंडे यांची चित्रे जितकी गूढ वाटतात त्यांचे प्रत्यक्ष आयुष्यही तितकेच गूढ होते. त्यांना नेहमी एकांतात बसून चिंतन करणे आवडत असे. लोकांमध्ये मिसळण्याचे प्रमाणही खूपच कमी होते. बोलतानाही अगदी मोजकंच बोलायचे. हळूहळू त्यांच्याभोवतीचे गूढ वलय आणखी दाट होत गेले. हाच एकटेपणा आणि गूढता त्यांच्या चित्रातूनही प्रतिबिंबित होत राहतो. त्यांनी कुणाला फारशा मुलाखतीही दिलेल्या नाहीत त्यामुळे हे सगळे त्यांनी कसे साध्य केले हे गूढ कुणालाच उकलणार नाही. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयीही फारशी माहिती मिळत नाही.
त्यांच्या चित्रांचे फोटो पाहून त्यांची चित्रे समजून घेता येत नाहीत. त्यासाठी ती प्रत्यक्षात पाहायला हवीत. कॅनव्हासवरील रंगांचे थर, रंगांचे मिश्रण, त्या चित्रांमधील गूढता पाहिल्यानंतरच त्या चित्रांचे मोल समजते.
निरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला तेव्हा त्याच्या संग्रहातील त्यांच्या एका अनाम तैलचित्राला ३० कोटी रुपये मिळाले होते. १९७४ साली काढलेल्या या चित्राला ४.५ कोटी डॉलर इतकी किंमत आली. इतक्या मोठ्या किमतीला ही चित्रे विकली जाणे हा भारतीय चित्रकलेतील एक नवा पायंडा आहे. १९५७ साली त्यांना यंग एशियन आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीनेही त्यांना पुरस्कार मिळाला होता.
१९७१ साली त्यांना पद्मश्री या सर्वोच्च भारतीय नागरी सन्मानाने पुरस्कृत केले आहे.
पण, त्यांच्या हयातीत तर त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली नाही. २००१ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर मात्र त्यांच्या चित्रांची मागणी वाढली. चित्रकाराने चित्र कुठल्या काळात काढले, त्यासाठी कुठल्या माध्यमाचा वापर केला, त्याच्या आधीच्या चित्रकारांना किती रक्कम मिळाली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्यांची किंमत ठरवली जाते. गायतोंडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन गुगेनहाइम म्युजियममध्येही लावण्यात आले आहे.
भारतीय चित्रकाराची चित्रे सर्वोच्च किंमतीला विकले जाण्याचा विक्रम आजतरी गायतोंडे यांच्या नावावरच आहे. वासुदेव गायतोंडे हे जिवंतपणीच एक दंतकथा बनून गेले होते. राजा रविवर्मानंतर बाहेरच्या जगात जर कुठल्या भारतीय चित्रकाराची चर्चा होत असेल तर ती वासुदेव गायतोंडे यांचीच!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










