आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दोन देशांदरम्यान जेव्हा स्पर्धा आणि कटुता निर्माण होते तेव्हा एकमेकांवर मात करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जातात. प्रतिस्पर्धी किंवा शत्रू राष्ट्राच्या अंतर्गत हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एक गुप्तचर संघटना स्थापन केली जाते. प्रत्येक देशाची अशी गुप्तचर संघटना असते जी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतर देशांच्या हालचालींवर नजर ठेवून असते.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतरही अशा अनेक गुप्तचर संघटना निर्माण झाल्या. पण, या गुप्तचर संघटनांच्या अतिरेकी कारवाया आणि छळवाद यामुळे या संघटनांनी आपल्याच देशातील जनतेचा रोष ओढवून घेतला. त्यामुळे या संस्थावरच नंतर बंदी आणण्यात आली.
आज आपण अशाच काही गुप्तचर संघटनांची माहिती घेणार आहोत ज्यांचा पहिल्या-दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान खूप दरारा होता पण नंतर त्यांचे विघटन करण्यात आले.
१) सावाक- इराण
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर या युद्धातून उभ्या राहिलेल्या महासत्तांनी नैसर्गिक तेलसाठ्यांचे महत्त्व ओळखले होते. असे नैसर्गिक तेलसाठे ज्या देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत अशा देशांकडे या महासत्तांनी आपला मोर्चा वळवला. अर्थातच अमेरिकाही दुसऱ्या महायुद्धानंतर एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जाऊ लागला. याच जोरावर अमेरिकेने अनेक देशाच्या अंतर्गत व्यवस्थेतही ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली.
तेल साठ्यांनी समृद्ध असलेल्या देशांच्या यादीत इराणचा क्रमांक बराच वरचा लागतो. त्यामुळे साहजिकच अमेरिकेची नजर इराणवर पडली. अमेरिकेच्या गुप्तचर संघटना तर किती वेगवान, चपळ आणि चलाख आहेत हे सांगायला नको. त्यांनी आपल्या गुप्तचर संस्थेने पुरवलेल्या माहितीच्या आधारे इराणमध्ये नवनवे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली.
अमेरिकेने इराणलाही आपल्यासारखीच एक गुप्तचर संघटना स्थापन करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांना शत्रूच्या कारवायांपासून आपला बचाव करणे शक्य होईल. अमेरिकेच्या या सल्ल्यानुसार इराणचा सर्वेसर्वा मोहम्मद रेझा शाह याने सावाक या संघटनेची स्थापना केली.
१९५७ साली स्थापन झालेली ही संघटना १९७९ पर्यंत कार्यरत होती. १९७९ मध्ये इराणमध्ये झालेल्या क्रांतीकाळात या संघटनेचे विघटन करण्यात आले. सावाकचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास इतकेच म्हणता येईल की, ‘ही इराणची एक अत्यंत दुष्ट आणि विकृत संघटना होती जिच्याबद्दल लोकांच्या मनात फक्त द्वेष आणि दहशतीची भावना होती.’
इराणमध्ये सोव्हिएत गुप्तहेर इराणची गुप्त माहिती काढून नेतात असा एक समज त्याकाळी होता. तेंव्हा सावाकचे पहिले काम होते, या सोव्हिएत गुप्तहेरांना पकडणे. पण, हळूहळू सावाक इतकी कठोर आणि निर्दयी होत गेली की फक्त संशयाचा आधारावर ते आपल्याच देशातील सरकारच्या विरोधकांना आणि निष्पाप नागरिकांना देखील पकडून कैद करू लागले. या निष्पाप लोकांना कैद करून त्यांच्यावर अतोनात अत्याचार करू लागले. सावाकच्या या कार्यपद्धतीमुळे इराणच्या निष्पाप नागरिकांना विनाकारण आपले जीव देखील गमवावे लागले. अशा अनेक कारणामुळे इराणमध्येच सावाक विरोधात रोष वाढू लागला.
सावाकने आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा गैरफायदा घेत अनेकांचा छळ केला, कित्येकांची हत्या घडवून आणली, इराणच्या जनतेच्या मनात या संघटनेबद्दल घृणा निर्माण झाली. त्यांनी सुरक्षेच्या नावाखाली केलेल्या अशा अघोरी कृत्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पुढे इराणचे पंतप्रधान शाहपोर बख्तियार यांनी या संघटनेचे विघटन केले.
२) एन. के. व्ही. डी.- सोव्हिएत संघ
रशियामध्ये १९१७ साली या संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीला या संघटनेला देशातच पोलिसिंग करण्याचे आणि देशातील तुरुंगांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती. १९३० साली ही संघटना रद्द करण्यात आली. काही वर्षांनी जेव्हा स्टालिनची सत्ता कायम झाली तेव्हा स्टालिनच्या चेका या गुप्तचर संघटनेसह एन. के. व्ही. डी.ला पूर्ण अधिकार दिले गेले.
या स्वातंत्र्याचा दोन्ही संघटनांनी फायदा घेत प्रशासनावर आपली पकड जमवली. देशातील गुलाम-कामगारांसह सीमेवरील सैनिकांच्या हालचालींवरही ही संस्था देखरेख करू लागली. अनेक नागरिकांना, कामगारांना, या संघटनेने मारून टाकले.
पोलंडसारख्या त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या देशांतही त्यांनी अशाच प्रकारे दमन सुरू केले. या संघटनेने १९४१ साली युक्रेनमधील हजारो कैद्यांना अत्यंत क्रूरपणे संपवले. १९४६ साली या संघटनेचे नाव बदलून एम.व्ही.डी. असे करण्यात आले. या संघटनेच्या नेतृत्वात तीन वेळा बदल करण्यात आला.
३) स्तासी- जर्मनी
दुसऱ्या महायुद्धानंतर १९५० साली इतर राष्ट्रांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली. जर्मनीच्या सोशलीस्ट युनिटी पार्टीकडे या संघटनेची सूत्रे एकवटलेली होती. सुरुवातीला तर ही संघटना इतर देशांचे गुप्तहेर पकडण्याचे काम ही संघटना करीत असे. पण, काही काळाने स्तासीचे अधिकारी जर्मन नागरिकांचे अपहरण करू लागले.
इतर देशाच्या गुप्तहेरांसोबतच ते आपल्याच देशाच्या नागरिकांवरही नजर ठेवू लागले. जर्मनीच्या एक तृतीयांश लोकसंख्येची सगळी माहिती त्यांच्याकडे होती. एवढेच नाही तर, जर्मनी सोडून गेलेल्या अधिकाऱ्यांचीही या संघटनेने हत्या केली.
या संघटनेचा हा मुर्खपणा इथेच थांबला नाही तर यांनी दशहतवादी संघटनांशी हातमिळवणी केली. या संघटनांच्या मदतीने त्यांनी पश्चिम जर्मनीत बॉम्बस्फोट घडवून आणले. या दहशतवाद्यांना पूर्व बर्लिनमध्ये सुरक्षित ठेवण्यास मदत केली.
१९८९ मध्ये जेव्हा बर्लिनची भिंत पाडण्यात आली. पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आले. लोकांच्या विरोधामुळे स्तासीवर बंदी घालण्यात आली. त्यांनी जर्मन नागरिकांबद्दल जी काही माहिती गोळा केली होती ती नागरिकांना परत करण्यात आली.
४) दिना– चिली
१९७४ साली या संघटनेची स्थापना करण्यात आली. दिनाला स्वतंत्र प्रशासनिक अधिकार देण्यात आले होते. १९७७ पर्यंत ही संघटना अस्तित्वात होती. त्यानंतर तिचे एनआयसीमध्ये रूपांतरण करण्यात आले. फक्त राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली ही संघटना हळूहळू एका हुकुमशाही गटात परावर्तीत झाली. यात सुरुवातीलाच वीस हजार अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली होती.
कोणत्याही नागरिकांवर नजर ठेवण्याचा दिनाला अधिकार होता. त्यामुळे दिनाबद्दल सगळीकडेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांना छळ करणे, स्त्रियांवर बलात्कार करणे असे अत्याचारांची यादी वाढतच होती. कैद्यांसाठी उभारण्यात आलेल्या छळ छावण्यांत त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले जात. कैद्यांचे हातपाय मोडले जात.
एका कैद्याला तर लोखंडी साखळीने असे मारले होते की वरून बघता तो जराही जखमी वाटत नव्हता पण त्याला आतून खूप जबर मार बसला होता त्याला त्यांनी तसाच मारण्यासाठी सोडून दिले. अक्षरश: तडफडून तडफडून त्या तरुण कैद्याने प्राण सोडले.
महिला कैद्यांचा तर आतोनात लैंगिक छळ केला जाई. त्यांच्या गुप्तांगात लोखंडी सळ्या घुसवणे, कुत्र्याशी संभोग करायला लावणे अशा कितीतरी विकृत आणि हिंसक कृत्यांनी दिनाच्या अधिकारांचे हात बरबटले होते.
प्रसार माध्यमांवरही दिनाची करडी नजर होती. रेडीओ, वृत्तपत्र अशा कोणत्याही माध्यमातून कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी ती तपासून घेणे अनिवार्य होते. अनेक वृत्तपत्रांवर आणि प्रसारमाध्यमांवर त्यांनी बंदी आणली.
हळूहळू दिना संघटनेबद्दल चिली नागरिकांचा रोष व्यक्त होऊ लागला. कारण अनेकांनी दिनाच्या या कारवाईत आपले आप्तस्वकीय हरवले होते. जनतेच्या दबावामुळे दिनाची रीतसर चौकशी करणारी समिती स्थापन करण्यात आली. एकेक करून दिनाच्या सगळ्या कारानाम्यांवरील पडदा उठला. शेवटी तिचे विघटन केल्यानंतरच जनतेचा रोष शांत झाला.
याशिवायही जगभरात आणखी काही अशा गुप्तचर संघटना होत्या ज्या देशाच्या सुरक्षेच्या नावाखाली आपल्याच नागरिकांचे जीवन चिरडून टाकू लागल्या. अशा अनेक संघटनांवर सरकारला बंदी आणणे भाग पडले. लाखो निष्पाप नागरिकांची अशी सामुहिक हत्या करण्याचा या संघटनांना आणि त्यांना स्थापित करणाऱ्या सरकारांना हा हक्क कुणी दिला असा प्रश्न निर्माण होतो.
अतिसुरक्षा किंवा असुरक्षिततेची भावना अशाप्रकारे दमनकारी व्यवस्थेला जन्म देत असेल तर सुरक्षा या शब्दाला काही अर्थच राहत नाही, हेच या संघटनांनी सिद्ध केले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.