आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वी आणि जीवसृष्टीवर किती घातक परिणाम होत आहेत त्याबद्दल गेली अनेक वर्षे सातत्याने चर्चा सुरु आहे. जीवसृष्टीतील कित्येक प्राणी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही तर कधीचेच नामशेष झाले आहेत. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आणि तोच वाघ आज भारतातून नाहीसा होण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. आज वाघांसाठी अभयारण्ये राखीव ठेवण्याची गरज पडली आहे. जीवसृष्टीतील प्रत्येक प्राणी महत्वाचा आहे. अन्नसाखळीत प्रत्येक प्राण्याला त्याचे स्थान आहे. ही अन्नसाखळीच विस्कळीत झाली तर पुन्हा त्याचे परिणाम संपूर्ण जीवसृष्टीलाच भोगावे लागणार.
आज देशात गायीच्या कत्तलीवरून केवढे रान माजवले जाते. गायींना संरक्षण देण्यासाठी कायदे केले जात आहेत. पण असाच दृष्टिकोन सर्व प्राण्यांच्या बाबतीत असायला हवा. कारण भारतातील कित्येक प्राणी आज अशाच पद्धतीने नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत.
भारतातील आणखी एका पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? पर्यावरण साफ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा हा पक्षी जर भारतातून हद्दपार झाला तर भारताच्या पर्यावरणात, अन्नसाखळीत आणि जीवसृष्टीचा समतोल साधण्यात नक्कीच बिघाड निर्माण होईल.
हा पक्षी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या पर्यावरणातील मृत प्राण्यांच्या शरीराची विल्हेवाट लावणारा गिधाड पक्षी आहे.
आज जी अवस्था भारतातील वाघांची आहे तीच अवस्था गिधाडांचीही आहे. प्रसार मध्यामांनाही अजून हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही. भारतातील गिधाडांची संख्या कशी रोडावली आहे, त्याचा जीवसृष्टी आणि अन्नसाखळीवर काय परिणाम होत आहे आणि त्यामागचे नेमके कारण काय हे समजावून घेण्यासाठीच हा लेखप्रपंच.
गिधाडांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे एक औषध म्हणजे ‘डिक्लोफिनॅक.’ हे औषध पेन किलर म्हणजे वेदनाशामक म्हणून उपयोगी ठरते. प्राण्यांनादेखील वेदनाशामक म्हणून हेच औषध दिले जाते. तरीही जेव्हा कुठलेही जनावर मरते तेव्हा अनेकदा त्याच्या मृत शरीराला असेच रस्त्यावर फेकून दिले जाते.
मेलेल्या जनावरांचे मांस हेच गिधाडांचे प्रमुख अन्न आहे. मृत जनावरांचे मांस खाल्ल्याने अशा मृत शरीराची नैसर्गिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. डिक्लोफिनॅक औषध इतर जनावरांसाठी जरी वरदान ठरत असले आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी होत असल्या तरी गिधाडांना मात्र याची किंमत चुकवावी लागते.
डिक्लोफिनॅक औषध घेऊनही मृत झालेल्या जनावराचे मांस जेव्हा ही गिधाडे खातात तेव्हा त्यांच्या मुत्रपिंडावर याचा वाईट परिणाम होतो. या डिक्लोफिनॅक औषधामुळे गिधाडांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक गिधाडे मूत्रपिंड निकामी झाल्याने दगावली जात आहेत.
भारतातील गिधाडांच्या जवळपास सगळ्याच जाती आज विनाशाच्या उंबरठ्यावर आहेत. यातही बंगाली गिधाड किंवा पांढऱ्या रंगाच्या गिधाडांची संख्या खूपच कमी झाली आहे. यांची जवळपास ९९.७% इतकी लोकसंख्या नाहीशी झाली आहे. लांब चोचीचे गिधाड किंवा भारतीय गिधाडांची संख्याही खूपच कमी झालेली आहे. हिमालयीन गिधाडे आणि भारतीय गिधाडे यांच्या संख्येत ९०-९८% इतकी घट आढळत आहे.
जीवसृष्टीतील हा असमतोल आपला परिणाम दाखवत आहे. गिधाडांच्या कमी झालेल्या संख्येमुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत अचानकच मोठी वाढ झाली आहे. आता सडलेले मृतदेह खाणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या भटक्या कुत्र्यांवरच आली आहे. भारतात जवळपास १८ अब्ज भटके कुत्रे असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या इतर देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. भटक्या कुत्र्यांच्या या वाढत्या संख्येला आटोक्यात आणणे सध्या तरी आवाक्या बाहेरचे काम बनले आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे आणखीनच समस्या वाढत आहेत. कुत्रा चावणे, त्यामुळे रेबीज होणे अशा घटनांतही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. भटक्या कुत्र्यांचा हा उपद्रव दिवसेंदिवस अधिकाधिक भेडसावत आहे.
आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक राहतात. या विविध धर्मीय लोकांच्या श्रद्धेतही विविधता आढळते. हिंदू धर्मियांमध्ये मृतदेहाला अग्नी देतात तर मुस्लीम दफन करतात. भारतातील अल्पसंख्य समजल्या जाणाऱ्या पारशी समूहात मात्र मृतदेह विहिरीत टांगले जातात आणि गिधाडे त्यांचे भक्षण करतात. पारशी लोकांचा असा समज आहे की जेव्हा गिधाडे मृतदेहाचे संपूर्ण भक्षण करतात तेव्हाच त्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होते.
पण, गिधाडांचीच संख्या कमी झाल्याने एकेका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहा-सहा महिने वाट पहावी लागत आहे. अशाने हा समुदाय अनिच्छेने त्यांची ही प्रथाच बंद करण्याच्या मनस्थितीत आहे.
गिधाडांची संख्या कमी होत असताना सगळ्यांनीच बघ्याची भूमिका घेतली. डॉ. लिंडसे ओक्स यांनी २००३ मध्येच डिक्लोफिनॅकमुळे गिधाडांच्या संख्येत घट होत असल्याचे दाखवून दिले होते. भारत सरकारने मात्र याकडे वेळीच लक्ष दिले नाही. या औषधाला पर्याय उपलब्ध असतानाही बाजारातून हे औषध मागे घेण्यास सरकारने तीन वर्षांचा अवधी घालवला. या तीन वर्षात गिधाडांच्या संख्येत किती तरी मोठी घट झाली असेल. डिक्लोफिनॅक औषधाला पर्याय म्हणून जे औषध बाजारात आणले आहे त्याचा गिधाडांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
औषधावर बंदी आणल्याने आता गिधाडांचा मृत्युदर कमी होईल यात शंका नाही. पण, त्यांची संख्या कशी वाढेल त्यांच्यासाठीही राखीव अभयारण्यासारखे काही उपाय योजता येतील का, यावर विचार होणे गरजेचे आहे. गिधाडांची रोडावलेली संख्या पुन्हा पूर्वपदावर येईपर्यंत त्यांच्यासाठी काय करता येईल यावर अभ्यास झाला पाहिजे आणि त्यातून हाती आलेल्या निष्कर्षांची अंमलबजावणीही झाली पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.