आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
लेखक- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई (9323117704)
‘इतिहास माणसाला शहाणा बनवतो’ असे एक अभिवचन आहे. गतइतिहासाचा यथायोग्य उपयोग केला तर मानवी समाजाच्या वाटचालीत तो चांगला मार्गदर्शक बनू शकतो.
तान्हाजी मालुसरे यांनी दाखविलेले अतुल धैर्य,अफाट साहस, शौर्य आणि पराक्रमी झुंजारवृत्ती याचे तपशील सापडत आहेत. ‘माझ्या मुलाच्या लग्नाचे राहू दे, पण मला प्रथम स्वराज्याचे काम करू दे’ ही त्यांची भावनाच किती श्रेष्ठ होती.
छत्रपती शिवप्रभूंनी शून्यातून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आपल्या अलौकिक, अद्भूत पराक्रमाने हिंदुस्थानातच नव्हे तर अखिल जगतात ते प्रसिद्ध पावले. शिवप्रभूंच्या रूपाने “मराठा राजा छत्रपती झाला.” छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन शाहीर तुलसीदास याने तान्हाजीचा पोवाडा लिहून (१६९०) त्याच्या अद्वितीय पराक्रमाचे गुणगान पहिल्यांदा मराठी जनांपुढे केले. या पोवाड्यात एकूण पंचावन्न चौक आहेत. इतका विस्तृत पोवाडा शिवकाळातील इतर कोणत्याही प्रसंगाचा नाही.
शाहिराची साधी सोपी, रांगडी परंतु तितकीच तडफदार आणि ओघवती भाषा गेली ३५० वर्षे सर्वांनाच मनापासून भावते आहे. त्यानंतर अनेक रथी-महारथींचे लक्ष त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झाले, वेगवेगळ्या बखरी, शकावली, आज्ञापत्र, निबंधावली, यात त्रोटक स्वरूपात नोंद झाली. मात्र १९०३ साली ह. ना. आपटे यांच्या कादंबरीने लोकप्रियतेचा इतिहास घडवला.
स्वराज्याचा मंत्र देणारे लोकमान्य टिळक सिंहगडावर स्फूर्ती घेण्यासाठी वास्तव्य करू लागले. अनेक कादंबऱ्या, चित्रपट निघाले. मात्र जावळीच्या खाली पोलादपूर तालुक्यातील दुर्गम डोंगर-दऱ्या खोऱ्यांत वसलेल्या आणि इतिहासात नोंद झालेल्या उमरठमधील समाध्या, यांचा शोध घेण्याचे महत्वाचे काम निःसंशय दिवंगत स्वातंत्र्य सेनानी अंबाजीराव मालुसरे यांनाच जाते.
पुढे तर १९३० पासून उमरठ येथे पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी होण्यास सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द कानी पडले की मराठी माणूस लगेचच नतमस्तक होतो, तर नरवीर तानाजी म्हटले की, हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या यो*द्ध्याचे स्मरण होते.
नरवीर तानाजी मालुसरेंचे चरित्र अदभुत, रोमांचकारी घटनांनी भरलेले असून त्यांनी त्यांच्या जिवीतकार्यात केलेल्या अलौकिक पराक्रमामुळे आजही हिंदुस्थानची जनताच नव्हे तर जागतिक स्तरावरचे इतिहासाचे अभ्यासक भारावून गेले आहेत. त्यांच्या चरित्रातील कथा, उपकथा, आख्याने, दंतकथा यांची आजपर्यंत अनेकांनी पारायणे केली. त्यावर कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, पोवाडे रचले गेले आणि गायलेही गेले. त्यायोगे आजही मराठी माणसांच्या मनामनाधे तो घर करून राहिल्याचे दिसून येते.
नरवीर तान्हाजीचे शिवाजी महाराजांच्या एकूणच स्वराज्य स्थापनेत फार मोठे योगदान राहिले आहे. अफझलखान वध, १६६१ च्या सुमारास दक्षिण कोकणावर संगमेश्वर स्वारी, आग्र्याहून सुटका ह्या फार मोठ्या संकटाच्या वेळी त्यांनी शिवाजी महाराजांची साथ केली होती, आधी कर्तव्य स्वराज्यासाठी, आपल्या महाराजांसाठी हेच त्यांच्या मनी ठसले होते.
शिवाजी महाराज हे खऱ्याखुऱ्या अर्थाने दुर्गाचे स्वामी होते. त्यांचे सारे वैभव दुर्गामध्येच होते. सिंहगडाला शिवपूर्वकाळात, शिवकाळात, पेशवेकाळात आणि इंग्रज अमदानीत देखील फार फार महत्त्व होते.
शके १५८८, श्रावण वद्य १२ म्हणजे दि. १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले आणि अविश्रांत घोडदौड करीत राजगडावर येऊन पोहोचले. सततच्या मोहिमांमुळे व मिर्झा राजा जयसिंहाच्या आक्रमणामुळे हिंदवी स्वराज्याची घडी विस्कटली होती. २३ किल्ले तहान्वये मोगलांच्या ताब्यात दिले होते. महाराजांना जो इतिहास घडवायचा होता त्याचा भूगोलच बिघडला होता.
ती घडी परत बसवण्यासाठी पुरंदरचा पराभव आणि आग्र्यातील अपमान धुऊन काढण्यासाठी महाराजांनी धाडसी मोहीम आखली. तहानुसार मुघलांना दिलेले तेवीस किल्ले व मुलुख परत एकदा जिंकून घेणे हे त्या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. या धाडसी मोहिमेची सुरुवात सिंहगड जिंकून करायची असा संकल्प आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलून दाखविला आणि या मोहिमेवर स्वतःच जायचे ठरवले. कारण सिंहगडाचे सामर्थ्य व महत्त्व मराठ्यांबरोबरच इतर राजसत्तांनाही माहिती होते.
मुघलांनी या अतिमहत्त्वाच्या गडावर उदेभान राठोड नावाचा शूर रजपूत सरदार तैनात केला होता, उदेभान जसा पराक्रमी होता तसा तो कडक शिस्तीचा मुलकी अधिकारी होता. उदेभानाचा उल्लेख सभासद बखर, जेधे शकावली, शिवापुरकर शकावली यांसारख्या विश्वसनीय साधनांमधून मिळतो. सिंहगडाला जेथे सरळसोट उभी अशी नैसर्गिक तटबंदी नव्हती तेथे भक्कम तटबंदी बांधून गडाला बळकटी दिली होती. गडावर तोफा, बंदुका, दारुगोळा असा मोठा साठा होता आणि गड झुंजवायला १५०० ह*त्यारबंद राजपूत सैनिक होते. गडाच्या घेऱ्यात असलेल्या चारी चौक्यांच्यावर घेरे सरनाईकाच्या शूर आणि इनामी पहारेकऱ्यांची गस्त असे. चुकूनही कोणी टेहळणीसाठी गस्त घालताना आढळला तर त्याला कैद करून किल्लेदाराकडे घेऊन जात. म्हणजे जशा गडाच्या तट बुरुजावरून गस्ती सुरू होत बंदोबस्त होता, तसे गडाच्या घेऱ्यातही रात्रंदिवस फिरते पहारे होते, त्यामुळे असा गड जिंकून घेण्यासाठी शौर्य, धैर्य, युक्ती आणि शक्ती या गुणांची आवश्यकता असलेला एखादा हुन्नरबाज व मातबर कसलेला योद्धा निवडणे महत्त्वाचे होते.
त्याचवेळी तानाजी आपला मुलगा रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन शेलारमामांना घेऊन किल्ल्यावर आला होता. राजांचा सिंहगड स्वारीचा मनसुबा तानाजीला कळला, आणि गडी हट्टाला पेटला.
मुलाचे लग्न बाजूला सारून ‘आधी लगीन कोंढण्याचं मग माझ्या रायबाचं…’ या हट्टापुढे राजे निरुपाय झाले, बस्स ठरलं तर… सिंहगडाची मोहीम सुभेदार तान्हाजीरावांनी फत्ते करायची.
सिंहगडाला वेढा घालून राजांना गड जिंकायचा नव्हता तर कमी सैन्यबळ, पैसा, कमी वेळ व मोहिमेची गुप्तता पाळून ही मोहीम यशस्वी करायची होती. त्याबरहुकूम तान्हाजीने ठरविले की, अवघ्या निवडक मावळ्यांना सोबत घेत एखाद्या रात्री गडावर अचानक छापा टाकायचा शत्रुसैन्याला कापून काढायचे. त्यानुसार तानाजी उमरठहून राजगडला आल्यानंतर सिंहगडाच्या घेऱ्यात ऐन मध्यरात्रीच्या चांदण्यात टेहळणी केली.
सुरुवातीला गुंजवण्यातून खामगावच्या खिंडीतून कल्याण गावातून टेहळणी केली, त्याप्रमाणे तिन्ही घेरे भक्कम दिसले. शेवटी डोंणगिरीच्या दरीत घेरेसरनाईकाच्या मोठया वाड्यात बिनधास्त घुसण्याचे तानाजीने ठरविले. घेरे सरनाईकाचे मेटकरी पहारेकऱ्यांना बाजूला सारीत एक धिप्पाड उंच माणूस त्या वाड्यात शिरला आणि भीतीची तमा न बाळगता थेट घेरे सरनाईकाच्या पुढ्यात जात राम राम करीत म्हणाला, “मी साखरेचा पाटील, कोंढणपूरच्या भवानी देवीच्या दर्शनाला आलो आहे, पहाटे दर्शनाला जाईन, रात्री इथंच मुक्काम करीन म्हणतो”. घेरे सरनाईकांना काय करावं ते सुचेना, पाहुणा इकडचं तिकडचं बोलू लागला. ती व्यक्ती कोणी साधीसुधी नव्हती, तर खुद्द सुभेदार तान्हाजी मालुसरेच होते!
शाहीर तुलसीदासच्या पोवाड्यात वर्णन आहे –
“तान्हाजीने घेरेसरनाईकला त्याच्या कलाकलाने समजावत, काही गोष्टी पटवून देत आपल्या विश्वासात घेतले. त्याला दिलासा दिला. शत्रूच्या ताब्यात असलेल्या गडाच्या घेऱ्यात घुसून कडेकोट बंदोबस्तासाठी असलेल्या त्याच्याच एका अधिकाऱ्याला दिलासा देऊन आपल्या बाजूला वळवणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण तान्हाजीने ते मोठ्या हुशारीने साधले.
दुसऱ्या दिवशी दोन मावळ्यांना राजगडाकडे तान्हाजीने सुर्याजीला निरोप पाठविला, पाचशे मावळ्यांना घेऊन नवमीच्या रात्री खामगावच्या खिंडीत ये. पाचशे मावळ्यांपैकी तीनशे मावळे घेऊन तान्हाजीने डोणागिरीचा कडा चढून सिंहगडात प्रवेश करायचा. त्यातल्या निवडक मावळ्यांनी कल्याण दरवाजाचे चौकी-पहारे मारून तो दरवाजा उघडायचा. दरम्यानच्या काळात सूर्याजीने राहिलेले दोनशे मावळे घेऊन कल्याण दरवाजापाशी दबा धरून बसायचे आणि दरवाजा उघडल्यावर गडात घुसायचे, आणि मावळी सैन्याने मुघल सैन्यावर अचानक छापा टाकून सिंहगड ताब्यात घ्यायचा.
शके १५९१ सौम्यनाम सवंत्सरातील माघ वद्य नवमी अर्थात ४ फेब्रुवारी १६७०, वार शुक्रवारी, नजरेतूनच एकमेकांचा निरोप घेत दोघे भाऊ वेगवेगळ्या वाटांकडे निघाले. मध्यरात्रीच्या किर्र अंधारात सिंहगडाचा घेरा शांत झोपला होता मात्र काळ्याकुट्ट अंधारात जीवाची पर्वा न करता मावळे विजयाच्या नांदीसाठी ताशीव कड्याला भिडले होते. हळूहळू मावळी सैन्य गडावर पोहोचले, इतक्यात मावळ्यांनी गडावर ह*ल्ला चढवल्याची मुघलांना चाहूल लागली.
मुघल सैन्य सावध झाले, तान्हाजीने पाहिले, त्याच्या हाताशी अवघे तीनशे मावळे तर समोरून दौडत येणारे मुघल सैन्य जवळपास दिड हजार, परंतु तान्हाजी किंवा त्याचे शूर मावळे घाबरले नाहीत. कमरेच्या तलवारी उपसल्या, ‘हर हर महादेव’ची रणगर्जना देत मावळे तुटून पडले. यु*द्धाची धामधूम सुरु असतानाच राजपूतांनी बळ एकवटून जोरदार ह*ल्ला चढविला, सिंहगडावरचे मावळे कल्याण दरवाजापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सूर्याजी सिंहगडाबाहेर लढाईपासून दूर राहिला, तान्हाजी जीवाची पर्वा न करता मोठ्या त्वेषाने लढत होता.
आपल्या मावळ्यांना चेतवून प्रोत्साहित करीत होता, इतक्यात तान्हाजीची उदेभानाशी गाठ पडली.
दोघेही जबरदस्त यो*द्धे रागास पेटले, दात ओठ खात अंगातले सर्व बळ पणाला लावून तलवारींचे घाव एकमेकांवर घालत होते, एकाला सिंहगड घ्यायचा होता तर दुसऱ्याला तो द्यायचा नव्हता.
दोघेही पराक्रमाची शर्थ करीत होते, ढाल आणि तलवारीचा खणखणाट आसमंतात निनादत होता, इतक्यात उदेभानाच्या एका जबरदस्त आघाताने तान्हाजीची ढाल खाडकन तुटली. आता बिनढालीच्या तान्हाजीवर तो तलवारीचे वार मोठ्या आवेशाने एकामागोमाग घालू लागला. दुसरी ढाल समयास न आल्याने मरणाला न घाबरणाऱ्या या मर्द गड्याने यत्किंचितही न डगमगता आपल्या दुसऱ्या हातावर घाव सोसत लढू लागला.
इतक्यात एकच आक्रोश झाला, तान्हाजीचा घाव उदेभानावर आणि उदेभानाचा घाव तान्हाजीवर कोसळला. एकाच क्षणी दोघेही तुकडे होऊन कोसळले, सुभेदार तान्हाजी मालुसरे पडले.
आपला सुभेदार ठार झाल्याचे पाहिल्यावर मावळ्यांचा धीर खचला हात तोंडाशी आलेला विजय हुकणार असे वाटत असतानाच सुर्याजीने कल्याण दरवाजातून दोनशे मावळ्यांसह येत पळणाऱ्या मावळ्यांना आडवे जात अस्सल मराठमोळ्या भाषेत निर्भत्सना केली, त्यांना पुन्हा चेतवले. आता मावळ्यांना अवसान चढले, ‘हर हर महादेव’ ची गर्जना आसमंतात पुन्हा निनादली, मुघल फौजेची जोरदार क*त्तल झाली. सुर्याजीने थोरला भाऊ पडल्यावरही हिंमत धरून नव्या जोमाने केलेल्या ह*ल्ल्यात बाराशे रजपूत आणि मुघलांना ठार मारले.
उरलेल्यांची पळता भुई थोडी झाली, काहींनी तटबंदीवरुन उड्या टाकल्या, शर्त करीत सिंहगड मावळ्यांनी जिंकला, भगवे निशाण चढले. पागेचे खण पेटवून राजगडावरून इशारतीची टक लावून वाट पाहणाऱ्या शिवाजी महाराजांना विजयाची बातमी कळली. दुसऱ्या दिवशी जासूद राजगडावर पोहोचला आणि बातमी देत महाराजांना म्हणाला, “तान्हाजी मालुसरा यांनी मोठे यु*द्ध केले, उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तान्हाजी मालूसराही पडला, तान्हाजी धारातीर्थी पडल्याच्या दुःखद घटनेने महाराज बहुत कष्टी जाहलें, एक गड घेतला ! फत्ते झाली ! परंतु एक गड गेला!”
शिवाजी महाराजांचे हे उदगार महाराष्ट्राच्या पानांपानात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले… इतिहासात अजरामर झाले, शूरमर्दाचा पोवाडा, शूर मर्दाने ऐकावा, शिवाजीचे राज्यात ऐसा उमराव होणे नाही..
छत्रपती शिवरायांच्या तालमीत तयार झालेला शिष्य कसा असावा हे तान्हाजीने दाखवून दिले तर पाठीवरून आलेला धाकटा भाऊ कसा असावा हे सुर्याजीने दाखवून दिले, रामायणात राम-लक्ष्मण, तर विजयनगरच्या इतिहासात हरिहरराय-बुक्कराय ही भावंडे अजरामर राहिली आणि मराठ्यांच्या इतिहासात तान्हाजी-सूर्याजी ही मालुसरे भावंडे चंद्रसूर्यप्रमाणे अढळ झाली.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.