आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
राष्ट्रधर्म, वचनपूर्ती आणि असामान्य शौर्य हे तीन गुण जर कोणाच्या चरित्राचा अविभाज्य भाग असतील तर ती व्यक्ती आहे, शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांचे शिष्य बंदा सिंह बहादुर!असं म्हणतात की बंदा सिंह बहादुर एक वैरागी होते. मधो दास असे त्यांचे मुळनाव.
मग, एक वैरागी मुघलांचा कर्दनकाळ कसा बनला?
मधो दास यांचा जन्म १६७० साली काश्मीरच्या राजौरी क्षेत्रात झाला. ते १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी एका मृगाला डोळ्यासमोर प्राण त्यागताना पाहिले होते. या घटनेमुळे ते इतके विचलित झाले की त्यांनी संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि जानकीदास वैरागी यांना गुरु मानले. जानकीदास यांच्यासोबत काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते रामदास वैरागी यांच्या संपर्कात आले. त्यांच्याकडून त्यांनी अध्यात्माचे शिक्षण घेतले. नांदेडच्या गोदावरी तटावर त्यांनी योगसाधना करण्यास सुरुवात केली.
एकीकडे मधो दास अध्यात्माच्या जवळ जात असताना दुसरीकडे उत्तरेत मुघलांचे जुलूम वाढत चालले होते. पण त्यांना याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. ते आपल्या योगसाधनेत लीन होते.
आपल्या दोन मुलांच्या वीरमरणामुळे शीख समुदायाच्या सुरक्षेसाठी चिंतीत असलेल्या गुरु गोविंद सिहांनी नांदेडला पलायन केले होते. इथे स्थानिक लोकांनी त्यांना मधो दास यांची माहिती दिली. गुरु गोविंद सिंह यांनी प्रभावित होऊन मधो दास यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मधो दास यांना भेटल्यावर गोविंद सिंह जी म्हणाले की ‘जर तुम्ही राजपूत लोकंच संन्यास घ्याल तर धर्माचे आणि सर्वसामान्य लोकांचे रक्षण कोण करेल ?’
गोविंद सिंहांच्या मार्गदर्शनामुळे बंदा सिंह बहादूर यांचे डोळे उघडले. त्यांना सर्वत्र मोगलाईने ग्रासलेल्या गरिबांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, दोन निरपराध मुलांच्या बलिदानाची आठवण त्यांना झोपू देत नव्हती. गुरु गोविंद सिंह यांच्या आदेशावरून बंदा सिंह बहाद्दूर यांनी शीखांच्या मदतीसाठी पंजाबच्या दिशेने पाऊले उचलली.
३ सप्टेंबर १७०८ रोजी गुरु गोविंद सिंहजी यांनी मधो दास यांचे अमृतपान करून बंदा सिंह बहादूर असे नामकरण केले.
बंदा सिंह बहादूर यांनी शीख सैन्य एकत्रित करून तमाम हिंदू शीख लोकांच्या रक्षणासाठी मुघलांविरुद्ध यु*द्ध पुकारले. समानाच्या यु*द्धात बंदा सिंह यांच्या नेतृत्वात शीख सैन्याने मुघलांच्या दहा लाख सैन्याचे शिर*काण केले. यानंतर शीख सैन्याची ताकद शतपटीने वाढली होती, पण बंदा सिंह विचलित होते. गोविंद सिंहांच्या मुलांचा ह*त्यारा असलेल्या वाजिद खानचे जिवंत असणे त्यांना खटकत होते.
प्रतिशोध घेण्यासाठी बंदा सिंहने अधिक प्रतीक्षा केली नाही. १७१० साली बंदा सिंह बहादूर यांनी सरहिंदवर चढाई करून तिथला किल्लेदार वाजिद खान याचा सं*हार केला.
वाजिद खानच्या मृत्यूनंतर सरहिंद पासून सतलजपर्यंत शीख साम्राज्याचा उदय झाला. पुढे हे यमुनेपर्यंत विस्तारले. बंदा सिंह यांनी मुखलीगढ नावाचे गाव वसवले आणि त्याला आपली राजधानी घोषित केले. याठिकाणी त्यांनी एका किल्ल्याची देखील निर्मिती केली. पुढे मुखलीगढचे लोहगढ हे नामकरण करण्यात आले.
बंदा सिंह यांनी शीख धर्माचे नवीन नाणे काढले. शीख धर्माचे ते पहिले नाणे होते. पंजाबात आपले राज्य स्थापन केल्यानंतर ते उत्तर प्रदेशात गेले. याठिकाणी सहारनपूर, मुज्जफरनगर, जलालाबाद येथील मुघलांच्या अन्यायाने ग्रस्त असलेल्या जनतेला मदत केली. त्यांनी या लोकांसाठी मुघलांशी यु*द्ध केले.
बंदा सिंह याने जमीनदारीच्या प्रथेला हटविण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत दिली. त्यांनी मुघलकालीन घुसखोरी आणि करवसुलीच्या प्रथेवर बंदी आणली. त्यांनी एक नवीन व्यवस्था उभारली. त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून इमानदार लोकांची त्या पदी नेमणूक केली. त्यांच्या शासन व्यवस्थेमुळे सामान्य जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
एका आख्यायिकेनुसार तर सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी मृत्युदंड दिला होता.
बंदा सिंह यांनी लोकांची मुघलांपासून रक्षा केली, सदौरच्या यु*द्धात त्यांनी शेख आणि सय्यदांचा पराभव केला, त्यांनी लाहोर आणि दिल्ली दरम्यानचा मार्ग खंडित केला. यामुळे मुघल बादशहा बहादुरशहा विचलित झाला होता. त्याने पंजाबवर आक्र*मण केले. संपूर्ण शाही सैन्य घेऊन तो बंदा सिंह यांना रोखायला गेला. त्याचे सर्व सरदार त्याच्यासोबत होते. त्यावेळी बंदा सिंह उत्तर प्रदेशात होते, त्यांच्या अनुपस्थितीत हा ह*ल्ला करण्यात आला.
मुनीम खानच्या नेतृत्वात मुघल सैन्याने सरहिंदपर्यंतच्या प्रदेशावर वर्चस्व मिळवले. बंदा सिंह बहादूर परतले. त्यांनी ६० हजार शीख सैन्य घेऊन मुघलांशी यु*द्ध केले, यात शीख विजयी झाले पण बंदा सिंह यांच्या किल्ल्याला वेढा पडला. पण बंदा सिंह या किल्ल्यातून यशस्वीपणे निसटले. १७१५ साली गुरुदासपूरच्या गुरुदास नांगल गावात ते लपले होते, तिथे मुघलांनी वेढा टाकला. मोठा संघर्ष झाला पण अखेरीस बंदा सिंह मुघलांच्या हाती लागले.
बंदा सिंह यांना साखळदंडाने बांधण्यात आले. त्यांच्यावर अमानवीय अ*त्याचार करण्यात आले. त्यांना इस्लाम स्वीकरण्याची जबरदस्ती करण्यात आली. त्यांच्या सात वर्षांच्या मुलाची ह*त्या करण्यात आली. त्यांच्या डोळ्यात गरम सळ्या घालण्यात आल्या. त्यांची त्वचा खेचण्यात आली. धर्मवीर छत्रपती शंभूराजांप्रमाणेच अत्यंत अमानवी पीडेला सहन करत त्यांनी अखेरीस आपले प्राण सोडले.
असहाय्य लोकांच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले व शेवटच्या श्वासापर्यंत धर्म जपणारे बंदा सिंह बहादूर निश्चितच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.