आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात बँकिंग क्षेत्र किती अत्यावश्यक आहे, हे आपण जाणतो. आज भारतात १२८ पेक्षा जास्त बॅंक्स कार्यरत आहेत, यापैकी ४३ विदेशी बँक्स आहेत. असे असले तरी भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एकच आहे. जर तुम्ही ग्रामीण अथवा निम शहरी भागात वास्तव्यास असाल तर तुमचे हमखास या बँकेत खाते असेल.
चला तर आता जाणून घेऊ भारतातील सर्वात मोठ्या बँकेबद्दल, स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल!
बिटिशकालीन भारतात एकवेळ अशी आली होती की ईस्ट इंडिया कंपनीचे दिवाळे निघाले होते. मराठा आणि म्हैसूर या दोन राज्यांशी झालेल्या यु*द्धात मोठ्या प्रमाणात वित्तहानी ईस्ट इंडिया कंपनीला सहन करावी लागली होती. आता इतर ठिकाणी यु*द्ध लढण्यासाठी या कंपनीला पैशांची आवश्यकता होती. ब्रिटिश भारतात त्यावेळी कोलकाता हे सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. कोलकता येथील व्यापारी भारतातून लंडनला माल निर्यात करायचे, त्यामुळे कोलकता बंदराला त्यावेळी मोठे आर्थिक महत्व प्राप्त झाले होते.
ईस्ट इंडिया कंपनीने युरोपातील व्यापारी आणि भारतातील काही धनाढ्य लोकांच्या सोयीसाठी २ जून १८०६ रोजी बँक ऑफ कोलकाताची स्थापना केली.
ब्रिटिश भारताची बंगाल सरकारसमवेत ही पहिली बँक होती. स्थापनेनंतर तीन वर्षांनी या बँकेचे ‘बँक ऑफ कलकत्ता’ असे नामकरण करण्यात आले. बँक ऑफ कलकत्ता ही भारतीय बँकिंग क्षेत्राची सुरुवात मानली जाते. बॉम्बे प्रांताच्या व्यापारी हालचालीत वाढ करण्यासाठी १५ एप्रिल १८४० साली बँक ऑफ बॉम्बेची स्थापना करण्यात आली. मद्रास प्रांतात १ जुलै १८४३ रोजी बँक ऑफ मद्रासची सुरुवात करण्यात आली.
तिन्ही बँकांचे संचलन रॉयल चार्टरद्वारा करण्यात येत होते. या तिन्ही बँकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात नोटा काढण्याचा अधिकार होता. १८६१ मध्ये नोट आणि करन्सी ॲक्ट आणण्यात आला व या बँकांचा हा अधिकार काढून घेण्यात आला. १८६२ मध्ये हे द्रव अधिकार (लिक्विडीटी राईट्स) तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारला सोपविण्यात आले.
बँक ऑफ कलकत्ताच्या अधिकारक्षेत्रात ब्रम्हदेश, संयुक्त प्रांत (युपी), मध्य प्रांत, पंजाब, दिल्ली, हैद्राबाद, बंगाल, ओडिशा, बिहार आणि खैबर पख्तुन्वा हे प्रांत येत होते. ब्रिटिशकालीन भारताची बहुसंख्य लोकसंख्या याच भागात होती. बँक ऑफ बॉम्बेचे अधिकारक्षेत्र बॉम्बे प्रांत, सिंध प्रांत, इंदौर आणि बिरारपर्यंत पसरले होते. या बँकेच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर युरोपियन संस्थांच्या निर्देशकांची नेमणूक केलेली असायची. बाकी सरकारद्वारा नेमण्यात आलेले लोक होते. या बँकांमधून १ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (याकाळात नवख्या आयसीएस – प्रशासकीय अधिकाऱ्याचा पगार वर्षाला ३ हजार, तर वरिष्ठ अधिकाऱ्याचा पगार वर्षाला ६० हजार असत)
या बँकांनी १८७६ साली आपापल्या प्रेसिडेन्सीमध्ये अनेक शाखांचे उद्घाटन केले. त्याकाळी बँक ऑफ कलकत्त्याच्या बंगाल प्रांतात १८ आणि बँक ऑफ बॉम्बेच्या मुंबई प्रांतात १५ शाखा होत्या. २७ जानेवारी १९२१ रोजी बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ कलकत्त्याच्या ७० शाखांचे विलीनीकरण करण्यात आले. या सर्वांची एकत्रित अशी “इंपिरियल बँक ऑफ इंडिया” स्थापन करण्यात आली.
इंपिरियल बँकेची एक शाखा लंडनमध्येसुद्धा होती, ज्यात बंगाल, बॉम्बे आणि मद्रास बँकेतील जुने खातेधारक आपले पैसे जमा करायचे. बँकेचे बहुसंख्य स्टॉक भारतीयांकडे होते पण बँकेचे प्रबंधक मात्र युरोपियन होते.
इंपिरियल बँकेचे जुने शेयर होल्डर्सची स्थिती यथातथाच होती. ब्रिटिश सरकारने त्यांना पहिल्या तीन वर्षात नफ्यातील हिस्सेदारी दिली नाही. इंपिरियल बँकेने व्यापारी आणि केंद्रीय बँक म्हणून कामकाज पार पाडले. १९३५ मध्ये “भारतीय रिजर्व बँके”ची स्थापना करण्यात आली आणि बँकांचे केंद्रीय व्यवहार त्यांना हस्तांतरित करण्यात आले. इंपिरियल बँक ही फक्त एक व्यापारी बँक म्हणून शिल्लक राहिली. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी इंपिरियल बँकेच्या १७२ शाखा, २०० उपशाखा होत्या, यामध्ये तब्बल २७५ कोटी १४ लाख रुपये रक्कम होती.
इंपिरियल बँकेव्यतिरिक्त इतर अनेक बॅंक्स भारतात आपला कार्यविस्तार करत होत्या, पण त्यांचे ग्राहक हे श्रीमंत लोकच होते. भारतातील बहुसंख्य लोक हे बँकिंगपासून वंचितच होते. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधून घेण्यात आले.
एस्टड दिनशॉ गोरेवाला यांच्या अध्यक्षतेखाली बनलेली ऑल इंडिया रुरल क्रेडिट सर्व्हे कमिटी, १९५१ ने ग्रामीण भागात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी लोन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यामुळे ग्रामीण बँकेच्या स्थापनेची निकड निर्माण झाली. यासाठी संसदेत भारतीय स्टेट बँक कायदा पारित करण्यात आला. १९५५ मध्ये इंपिरियल बँकेला स्टेट बँकेने अधिग्रहित केले.
सुरुवातीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ८ अधिनस्थ बँकांची स्थापना करण्यात आली. पण कालांतराने या सर्वच बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, भारतीय महिला बैंक या स्टेट बँकेच्या अधिनस्थ बँकांचे २०१७ मध्ये विलीनीकरण करण्यात आले.
आज भारतीय स्टेट बँकेकडे ५० लाख कोटींची संपत्ती आहे, देशभरात बँकेचे ६० हजाराहून अधिक एटीएम आणि २२ हजार पेक्षा जास्त शाखा आहेत. जगातील ५० सर्वात मोठ्या बँकांमध्ये स्टेट बँकेचा समावेश होतो.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २ लाख ३६ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. स्टेट बँकेच्या ग्राहकांची संख्या ही ५० कोटींहून अधिक आहे. भारताच्या स्थानिक बँकिंग बाजारात स्टेट बँकेची २३ टक्के हिस्सेदारी आहे. ३५ देशांमध्ये स्टेट बँकेचे २०७ कार्यालये आहेत. २०१७ मध्ये बँकेचा ५०० फॉर्च्युन ग्लोबल बँकांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. स्टेट बँकेच्या ग्राहकांची, खातेधारकांची संख्या अमेरिका, रशिया, जपान आणि जर्मनीच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी ग्रामीण बँक आहे. तिच्या स्थापनेमागचा उद्देशच कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एका छत्राखाली आणण्याचा होता. १९५० या काळात कृषी क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील एकूण योगदान ५० टक्के इतके होते, आज ते १५ टक्के इतकेच उरले आहे. भविष्यात हे अजून कमी होऊ शकते. असे असले तरी भारतीय स्टेट बँक अत्यंत योग्यप्रकारे आपले आर्थिक व्यवहार पार पाडते आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










