आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“ज्यावेळी माझ्या शेजारी राहणारी कुठली स्त्री रोज आपल्या नवऱ्याचा मार खाते, त्याचे बूट साफ करते, त्यावेळी माझ्या मनात तिच्याविषयी कुठलीच सहानुभूती निर्माण होत नाही, पण तीच स्त्री ज्यावेळी आपल्या नवऱ्याशी भांडून चित्रपट बघायला जाते आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याची अवस्था मी बघतो, त्यावेळी माझ्या मनात सहानुभूती निर्माण होते.”
वर लिहिलेल्या ओळी कुठल्या पितृसत्ताक मानसिकतेने ग्रस्त व्यक्तीच्या वाटत असल्या तरी त्या लिहिल्या आहेत थोर लेखक सादत हसन मंटो यांनी !
आज सादत हसन मंटो या नावाचा परिचय करून देण्याची गरज नाही, मंटोच्या लिखाणाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांचे व्यक्तित्व इतके रंजक होते. त्यावर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
नवाझुद्दीन सिद्दीकीने आपल्या दमदार अभिनयाने मंटोला आत्ता पडद्यावर जिवंत केले असले तरी त्याच्या पुस्तकांच्या रूपात तो सुरुवातीपासूनच आपल्यातच आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हिंदी आणि उर्दू भाषेत बरंच काही वाचलं आणि लिहिलं जात होतं. त्याच काळात पंजाबच्या एका समराल नामक खेडे गावात मूळ काश्मिरी असलेल्या मौलाना गुलाम हुसेन यांच्या घरी ११ नोव्हेंबर १९१२ रोजी एका लहान मुलाचा जन्म झाला. हाच मुलगा भविष्यात बदनाम लेखक मंटो म्हणून नावारूपाला आला.
सुरुवातीपासूनच त्यांचा व्यवहाराशी संबंध नव्हता. ३०च्या दशकानंतर त्यांचा लिखाणाकडे ओढा वाढत गेला. याच काळात त्यांची भेट प्रख्यात विद्वान अब्दुल बारी आलिग यांच्याशी झाली. आलिग यांनी मंटो यांना रशियन आणि फ्रेंच साहित्याचा अभ्यास करायला सांगितला. त्यानंतरच मंटो परदेशी साहित्य वाचू लागले. सुरुवातीच्या काळात त्याचं लिखाण कमी होतं, पण अनुवाद मोठ्या करायचे. त्यांनी फ्रेंच आणि रशियन साहित्याचा उर्दू भाषेत अनुवाद केला.
यानंतर ते लुधियानाच्या मसावत नावाच्या वृत्तपत्रात नोकरी करू लागले. त्यांनी पुढे लिटरेचर शिकण्यासाठी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात प्रवेश घेतला. १९३४ साली ते प्रगतिशील लेखक संघाच्या संपर्कात आले. याच काळात त्यांची भेट उर्दूचे प्रसिद्ध साहित्यिक सरदार अली जफर यांच्याशी झाली. यानंतर त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिण्यास सुरुवात केली. १९४० मध्ये त्यांना रेडिओसाठी लिहिण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी ३-४ वर्ष काम केले. इथे सुरु झालेले लिखाण आयुष्यभर असेच सुरु राहिले.
क्रिएटिव्हिटी अशी गोष्ट आहे जी मनुष्याला आत्मकेंद्री बनवते. आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा प्रभाव लेखकाच्या लिखाणावर पडतो, असं म्हणतात. पण मंटो यांच्या बाबतीत हे देखील लागू होत नाही. मंटो यांच्या लिखाणाचा आणि परिवाराचा संबंध नव्हता. ते एक उत्तम पती आणि पिता होते.
१९३६ साली त्यांचा साफियाशी विवाह झाला. यावेळी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली नव्हती. लग्नानंतर ते आपल्या पत्नीला घेऊन सोबतच फिरायला जात. साफिया यांनी देखील त्यांच्या पत्नीचे दायित्व व्यवस्थित पार पाडले.
मंटो आपले पहिल्यांदा लिखाण त्यांनाच ऐकवत असत. साफिया देखील मंटो यांना त्यांच्या लिखाणात सुधारणा सुचवत.
मुंबईत वास्तव्यास असताना मंटो यांना एक मुलगा झाला पण तो काही काळातच दगावला. यानंतर त्यांना तीन मुली झाल्या. साफिया यांनी प्रत्येक मंटो यांना त्यांच्या चांगल्या वाईट काळात साथ दिली. मंटो आपल्या बायको आणि मुलांची किंमत चांगल्या प्रकारे जाणून होते. त्यांनी कधीच त्यांना तक्रारीची संधी दिली नाही. एका ठिकाणी त्यांनी लिहिले आहे की मी भले आपत्तीजनक आणि विद्रोही साहित्य लेखन करत असलो तरी एक पती आणि पिता देखील आहे. मंटो यांना लेखन करताना कधीच एकटेपणाला सामोरे जावे लागले नाही.
मंटो यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “मी कथालेखन कसं करतो? मी एका सोफ्यावर बसतो, हातात कागद आणि लेखणी घेतो, बिस्मिल्ला म्हणून लिखाणास सुरुवात करतो. माझ्या तिन्ही मुली माझ्या अवतीभोवती पिंगा घालत असतात, त्यांच्या भांडणाचा निवाडा देखील मी करतो, कोणी भेटायला आलं तर त्यांचा पाहुणचार देखील करतो, इकडे आपलं लेखनही सुरु ठेवतो.”
१९४७ साली फाळणीनंतर इतर लेखकांप्रमाणे मंटो यांच्या मनावर देखील प्रभाव पडला. फाळणीनंतर ते आपला देश सोडून पाकिस्तानात गेले. अर्थात त्यांनी त्यावेळी भारताच्या जागी पाकिस्तानची निवड का केली? हे अजूनही रहस्यच आहे. फाळणीच्या वेळी हिंदू मुसलमान यांच्यातील दं*गली त्यांनी याची देही याची डोळा अनुभवल्या आणि याचा त्यांना फारच मानसिक धक्का बसला. फाळणीच्या काळातील दुःख त्यांनी आपल्या कथेत उतरवले.
त्यांनी त्यावेळी भविष्यवाणी केली होती की पाकिस्तान हा कट्टरपंथी मुस्लिमांचा देश होईल, त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली.
मंटो यांच्या कथा काळाच्या पुढच्या होत्या, धूसर भविष्याचा वेध त्या कथांमध्ये घेण्यात आला होता.
मंटो हे चांगले पती आणि पिता असले तरी त्यांना एक वाईट सवय होती, जी आयुष्यभर तशीच राहिली. ती सवय होती, दारू पिण्याची. ते एखाद्या बेवड्या माणसाइतके दारू प्यायचे. मंटो यांचे आपल्या वडिलांसोबत जमायचे नाही, ते त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोचे अपत्य होते. यामुळेच ते प्रेमापासून वंचित राहिले, हीच गोष्ट त्यांना दारूच्या जवळ घेऊन गेली. फाळणीनंतरच्या काळात त्यांची दारूची नशा वाढतच गेली. मुंबईहून पाकिस्तनाला जाताना त्यांनी मोठ्याप्रमाणात दारू प्यायला सुरुवात केली.
मंटो मुंबईत होते तोपर्यंत त्यांच्याकडे फिल्मचे प्रोजेक्ट असायचे पण मुंबई सोडल्यावर त्यांचा चित्रपटांशी असलेला संबंध संपला होता, फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली होती. पाकिस्तानात हाताला काम नसल्यामुळे ते दारूच्या आहारी गेली. ते इतके आहारी गेले की त्यांना स्वतःची शुद्ध उरली नव्हती.
एकदा तर दारूच्या अति सेवनामुळे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले होते. बऱ्याचदा वृत्तपत्राचे संपादक त्यांच्याकडून कथा लिहून घ्यायचे आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्या हातात दारूची बाटली द्यायचे. दारूमुळे मंटो यांची परिस्थिती खूप खालावली. त्यांना नशा मुक्ती केंद्रात पाठवले गेले, तिथे त्यांनी त्यांची सर्वात अजरामर कलाकृती टोबा टेक सिंहचे लेखन केले होते.
नशा मुक्ती केंद्र व पुनर्वसनाच्या प्रयत्नांचा फारसा उपयोग झाला नाही. मंटो यांना यकृताचा विकार जडला. त्यांची तब्येत फारच खालावत गेली. १८ जानेवारी १९५५ रोजी मंटो यांचे दारूच्या व्यसनामुळेच निधन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.