आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या संशयास्पद आत्महत्येनंतर या प्रकरणाने देशभरात वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणात ड्रग्ज आणि बॉलिवूड यांचे संबंध पुन्हा चर्चेत आले होते. ‘गांजा‘ची यावेळी सर्वाधिक चर्चा करण्यात आली होती.
गेल्या हजार वर्षांपासून भारतीय लोक भांग सेवन करतात. गांजाचा देखील यातच समावेश होतो. भारतात गांजा आणि हाशिश यांच्या वापरावर बंदी आहे पण भांग पिण्यावर कुठलीच बंदी नाही. तिन्ही एकाच वनस्पती प्रजातीपासून उत्पादित केले जातात, असं असलं तरी दोघांवर बंदी आहे तर एकाच्या वापराला व विक्रीला सूट देण्यात आली आहे.
होळीच्या आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकराचा प्रसाद म्हणून भारतात भांग प्राशन केली जाते. भांग विक्री करण्याची आणि खाण्या-पिण्याची कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. ठंडाईमध्ये टाकून भांग पिण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालु आहे.
परंतु याच भांगेच्या झाडापासून बनवण्यात येणाऱ्या इतर पदार्थांना जवळ बाळगले तर १० हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
गांजा आणि भांग दोन्ही एकाच झाडापासून उत्पन्न होतात. ओखली आणि मुसळीच्या या झाडांच्या पानांना कुटून त्यांचे जे चूर्ण बनवण्यात येते त्याला भांग म्हटले जाते. तर याच झाडाच्या मादा भागाला वाळवून त्यापासून गांजा बनवण्यात येतो. भांग खाण्यापिण्याचा गोष्टीत एकत्र करून प्राशन करण्यात येते, तर गांजा तंबाखूसारखा चिलममध्ये भरून ओढला जातो. चरस देखील याच झाडापासून तयार करण्यात येतो.
१९८५ साली भारताने नार्कोटिक्स आणि सायकोट्रोपिक सबस्टन्सच्या यादीत गांजाच्या रोपाचा अर्थात कॅनबिसच्या फुलांचा व फळांचा समावेश केला व त्याच्या वापराला गुन्हेगारी कायद्याअंतर्गत शिक्षेची तरतूद केली. परंतु याच झाडाच्या पानांना मात्र खुली सूट देण्यात आली, यातूनच भांग तयार करण्यात येते.
खरंतर १९६१ साली जेव्हा सर्वप्रथम गांजाला हार्ड ड्रग्जच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता तेव्हा भारताने त्याचा विरोध केला होता. परंतु भविष्यात अमेरिकेच्या दबावाला भारत बळी पडला आणि गांजाचा वापरावर निर्बंध घालण्यात आले.
भारताच्या काही राज्यात भांग पिणे देखील अवैध आहे. आसाममध्ये भांग जवळ बाळगणे कायद्याने गुन्हा आहे, तर महाराष्ट्रात त्याच्या उत्पादन, वापर आणि विक्रीवर देखील बंदी आहे. भांग विक्री फक्त विशेष लायसन्स असणाऱ्या लोकांपुरता मर्यादित करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये २००७ मध्ये भांग पिण्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली.
गांजावर कायदेशीर बंदी असली तरी आज बेकायदेशीरपणे गांजाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. भारतात ३.१ कोटी लोकांनी, म्हणजेच एकूण लोकसंख्येचा ३% लोकांनी २०१८ साली गांजाचे प्राशन केले होते. इस्त्रायलच्या सीडो या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे की २०१८ साली एकट्या दिल्लीत ३२.३८ मेट्रिक टन गांजाची विक्री करण्यात आली. गांजाच्या वैधतेवर अभ्यास करणाऱ्या एका अभ्यासगटाच्या रिपोर्टनुसार जर गांजा वैध करण्यात आला तर त्यातून भारत सरकारला ७२५ कोटी रुपये महसूल मिळणार आहे.
भांग हे एक स्वदेशी वनस्पती आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भांग उत्पादित करण्यात येते. भारतात धार्मिक आणि आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत या झाडाचे विशेष महत्व आहे. आयुर्वेदात या वनस्पतीच्या प्रत्येक भागाचे महत्व आहे. या झाडाचे व्यापारीदृष्ट्या देखील महत्व आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीत या झाडाचा वापर करण्यात येतो. परंतु जेव्हापासून कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे, त्यावेळेपासून याच्या उत्पादनाला कोणी धजावत नाही.
भांग कायदेशीर असताना त्याच वनस्पतिच्या दुसऱ्या भागावर बंदी घालणे योग्य नसल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. मेनका गांधी, तथागत सतपती आणि शशी थरूर यांनी वीड, चरस आणि हाशिश या पदार्थांच्या वापरावरील बंदी उठवण्याची मागणी केली आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील तशी मागणी केली आहे.
भारताने त्यावेळी अमेरिकेच्या दबावात बंदी घातली होती पण आता परिस्थिती पालटली आहे. गांजाला आधी भारतात कायदेशीर बंदी नव्हती. अमेरिकेत मात्र त्यावर बंदी घालण्यात आली होती. अमेरिकेसोबत काही महत्वपूर्ण करार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने अमेरिकेच्या दबावात येऊन भारतात देखील बंदी घातली होती. भारतात गांजाचा त्याच्या प्राचीन संस्कृतीशी असलेला संबंध लक्षात घेऊन त्याला पुन्हा कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी मोठी मोहीम छेडली गेली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.