आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी ‘बाली’ या बेटावर असलेल्या एका हिंदू इन्स्टिट्यूटचे हिंदू विद्यापीठात रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा केला. भारतीय मीडियाने त्यावेळी बातमी देताना हे विद्यापीठ रामायणातील लोकप्रिय पात्र आणि प्रभू श्रीरामाचे सखा सुग्रीव यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात येणार आहे, असे म्हटले होते. परंतु हे खोटे आहे.
इंडोनेशियामध्ये तयार होणाऱ्या हिंदू विद्यापीठाचे नामकरण आई गुस्ति बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी करण्यात येणार आहे. बाली येथील स्टेट हिंदू इन्स्टिट्यूटला विकसित करून या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. १९९३ साली हिंदू इन्स्टिट्यूटची स्थापना हिंदू धर्मीय शिक्षकांनी केली होती. आधी ही एक अकादमी होती आणि नंतर या अकादमीचे हिंदू स्टेट कॉलेजमध्ये रूपांतर करण्यात आले होते. २००४ साली याला इन्स्टिट्यूटचे रूप देण्यात आले.
रामायणातील सुग्रीवाचे नाव या विद्यापीठाला देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येतो तो चुकीचा असून, आई गुस्ति बागस सुग्रीव यांच्या नावावर या विद्यापीठाचे नामकरण करण्यात येणार आहे. आई गुस्ति बागस सुग्रीव हे इंडोनेशियातील एक मोठे धार्मिक नेते होते.
मुस्लिम बहुल असलेल्या इंडोनेशियात हिंदू विद्यापीठाची निर्मिती का केली जात आहे, हे आपण समजून घेऊया.
हिंदू विद्यापीठात ‘ॲडमिनिस्टर हिंदू हायर एज्युकेशन प्रोग्राम’च्या बरोबरीने त्याच्याशी संबंधित उच्च शिक्षणाचे अनेक विषय शिकवले जाणार आहेत. हिंदू इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात रवानगी करण्यात येणार असून या इन्स्टिट्यूटची सर्व मालमत्ता विद्यापीठाला सुपूर्द करण्यात येणार आहे.
इंडोनेशियामध्ये हिंदू विद्यापीठ तयार होत आहे, ही एक ऐतिहासिक घटना आहे. २३ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात ४० लाख हिंदूंचे वास्तव्य आहे. एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के देखील हिंदू इंडोनेशियात नाहीत. असं असलं तरी देखील इंडोनेशियात एक हिंदू विद्यापीठ आकारास येत आहे, ही अल्पसंख्याक समुदायाच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी फार महत्त्वपूर्ण बाब आहे. इंडोनेशियातील हिंदू संस्थांच्या विकास व संरक्षणासाठी तिथले राष्ट्रपती सतत प्रयत्नशील असतात.
हिंदू विद्यापीठाच्या निर्मितीचे कार्य हाती घेऊन इंडोनेशियाने आपल्या ऐतिहासिक वारश्याच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इंडोनेशिया हिंदू धर्म आणि तिथल्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी सदैव पुढाकार घेत आला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी हजारो वर्षं जुन्या हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
सेंट्रल जावा येथील स्लॅमन आणि क्लाटेनच्या मध्यभागी स्थित असलेल्या प्रंबनन मंदिरात ११०० वर्षांनी महाभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. हे ९ व्या शतकात बांधण्यात आलेले मंदिर असून जगातील सर्वांत मोठ्या शिव मंदिरांपैकी एक आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोकोवी हे स्वतः मोठे कृष्णभक्त आहेत. ते भगवान कृष्णाला सर्वशक्तिमान मानतात.
इंडोनेशियाच्या चलनाचे नाव रुपया आहे. इंडोनेशियात २० हजार रुपयांची एक नोट आहे. या नोटेवर भगवान गणेशाचे चित्र आहे. हे जगातील एकमेव चलन आहे ज्यावर गणपतीचा फोटो आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील मुख्य चौकात अर्जुन विजयाची प्रतिमा लावण्यात आली आहे.
याशिवाय काही वर्षांपूर्वीच इंडोनेशियाने गरुडावर विराजमान असलेल्या भगवान विष्णूच्या १२० मीटर उंचीच्या प्रतिमेचे अनावरण केले आहे. ही जगातील सर्वांत मोठी विष्णूमूर्ती आहे. हिंदू देवी देवतांच्या प्रतिकांबरोबर संस्कृत भाषेला देखील इंडोनेशियात फार महत्व आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्या देशातील हिंदू संस्कृतीची पाळंमुळं नष्ट करत असताना दुसरीकडे इंडोनेशिया आपल्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे जतन करत आहे. आजही इंडोनेशियामध्ये कट्टर इस्लामी लोकांची संख्या फार नाही.
२००० वर्षांपूर्वी चोल राजांनी हिंदू धर्माचा इंडोनेशिया आणि दक्षिण पूर्व आशियात हिंदू धर्माचा प्रसार केला. त्यांचे काही सैनिक, धर्मगुरू आणि सरदार या भागात स्थायिक झाल्याने हिंदू धर्म या भागात रुजला होता. श्रीविजय आणि मजापही या दोन हिंदू साम्राज्यांनी एकेकाळी इंडोनेशियावर राज्य केलं आहे. सहाव्या शतकात इंडोनेशियात बुद्ध धर्माचे आगमन झाले. १४व्या शतकात अरबी व्यापाऱ्यांनी या देशात इस्लाम रुजवला. या देशात इस्लामचा प्रसार वेगाने झाला.
इस्लाम जरी आज इथला प्रमुख धर्म असला तरी हिंदू आणि बौद्ध संस्कृतीची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.