आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय सैन्याचा इतिहास हा आपल्या सैनिकांच्या शौर्य कथांनी भरलेला आहे. हुतात्मा कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद यांच्यापासून हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यापर्यंत, भारतीय सैन्यदलाच्या शौर्यासमोर शत्रूची त्रेधातिरपीट उडाली आहे. १९७१ च्या यु*द्धात एका सैनिकाने असाच पराक्रम गाजवला होता. त्या सैनिकाच्या शौर्याचे शत्रू पाकिस्तानने देखील कौतुक केले होते.
त्या वीर जवानाचे नाव होते अरुण खेत्रपाल.
अरुण खेत्रपाल हे १७-पुना हॉर्स बटालियनचे जवान होते. शेवटच्या श्वासापर्यंत पाकिस्तानी सैन्याशी झगडत, त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी देशासाठी प्राण त्यागले होते. त्यांचे असामान्य शौर्य बघून शत्रूनेही त्यांना सलाम ठोकला होता.
अरुण खेत्रपाल यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५० रोजी पुण्यात झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते एनडीएमध्ये दाखल झाले. ३ वर्ष ट्रेनिंग घेतल्यावर १३ जून १९७१ रोजी १७ पुना हॉर्स बटालियनमध्ये त्यांचे कमिशन झाले.
जॉईन करून ६ महिन्यांचा कालावधी उलटला नव्हता इतक्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान यु*द्धाला सुरुवात झाली.
७१च्या यु*द्धात फामागुस्ता नावाच्या टँकवर बसून अरुण खेत्रपाल यांनी पाकिस्तानी सैन्यावर ह*ल्ला केला. आपल्या टँकने त्यांनी पाकिस्तानच्या ४ टँक्स नेस्तनाबूत केले. त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यानंतर ‘अरुण वापस लौटो’ अशी सुचना केली. पण अरुण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सुचनेकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी अधिकाऱ्याला कळवले की त्यांच्या टँकची गन अजूनही शाबूत आहे आणि शत्रू टप्प्यात आहे. अरुण परतले नाहीत त्यांनी आ*क्रमकपणे ह*ल्ला चालूच ठेवला.
शत्रूच्या बाजूने एक गोळा आला आणि त्याने अरुणच्या टँकच्या वरच्या भागाचा वेध घेतला. या गोळ्याने अरुण यांना टक्कर मारली, ज्यामुळे ते प्रचंड घायाळ झाले.
अरुणने आपल्या गनरला सांगितले की ते आता बाहेर येण्यास असमर्थ आहे, असं असलं तरी गनरने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याला देखील अपयश आले. अखेरीस १६ डिसेंबर १९७१ रोजी १० वाजून १५ मिनिटांनी, अरुणने शेवटचा श्वास घेतला.
अरुण खेत्रपालने २१ व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले होते. जम्मू-काश्मीरच्या संभा भागातील बंसतर नदीला पार करताना ते शत्रूच्या नजरेत आले व घात झाला. अरुणच्या बलिदानासाठी सरकारने त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित केले.
अरुण खेत्रपाल यांच्या घराची लष्करी सेवेची मोठी परंपरा होती. त्यांचे पणजोबा ब्रिटिशांच्या विरोधात शीखांच्या सैन्यदलातून लढले होते. १८४८ साली चुलियावालाच्या यु*द्धात त्यांनी पराक्रम गाजवला होता. त्यांचे आजोबा पहिल्या महायु*द्धात ब्रिटिश सैन्याच्या बाजूने लढले होते. त्यांचे वडील सेनेच्या इंजिनिअर कॉर्प्समध्ये कार्यरत होते व ब्रिगेडियर पदावरून ते रिटायर झाले होते. अरुण त्यांच्या घरातील चौथ्या पिढीतील लष्करात सेवा बजावणारे सैनिक होते.
वयाच्या २१व्या वर्षी बलिदान देणारे परमवीर अरुण खेत्रपाल आजही राष्ट्रासाठी प्राण देण्याची तयारी असलेल्या असंख्य तरुणांचे आदर्श आहेत. अरुण यांच्यासारख्या बलिदान देणाऱ्या असंख्य भारतीय लष्करातील जवानांमुळे आज आपल्या घरी सुरक्षित राहू शकतोय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.