आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
अजमेरचा राजा तिसरा पृथ्वीराज चौहान आणि घोरी शासक मोहम्मद घोरी यांच्यात तराई येथे यु*द्ध झाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीला याआधी तब्बल सोळा वेळा धूळ चारून त्याने याचना केल्याने सोडून दिले. असे असतानाही सतराव्या लढाईत पृथ्वीराज चव्हाण यांना प्राणास मुकावे लागले.
गजनीचा मोहम्मद याने गझनवी साम्राज्य स्थापन केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य तुर्कांनी जिंकून घेतले. घोरीने तुर्कांचा पराभव करून घोरी साम्राज्याचा पाया घातला, नवीन साम्राज्याची व्यवस्था लावून आणि स्वतःची गादी सुरक्षित करून घोरीने आपला मोर्चा भारताकडे वळवला.
११७५ साली मोहम्मद घोरीने मुलतान ताब्यात घेतले व एकामागून एक करत बघता बघता संपूर्ण सिंध प्रांतावर आपले वर्चस्व स्थापन केले. ११७८ साली गुजरातचा राजा भीमदेव सोलंकी व घोरी यांच्यात गुजरातमधील ‘कायदारा’ येथे लढाई झाली. त्या लढाईत पराभूत झालेला घोरी पुन्हा मुलतान येथे निघून गेला. पुढे घोरी पंजाबवर चाल करून गेला. तेथे खुस्त्रो मलिकला पराभूत करून घोरीने मलिक प्रांत आपल्या साम्राज्यात सामील केले.
११९१ साली घोरी खैबरखिंडीच्या मार्गाने भटिंड्यापर्यंत आला. त्याने तेथील किल्लेदारास कैद केले आणि पृथ्वीराज चौहानच्या राज्याची वायव्य सीमा गाठली.
घोरीच्या आक्र*मणाविरोधात उत्तर भारतातील राजे पृथ्वीराज चौहान यांच्या नेतृत्वाखाली संघटित झाले या सैन्याने सेनापती गोविंदच्या सूचनेनुसार आपल्या शत्रूस तराई येथे गाठले. गोविंद व घोरी यांच्यात अटीतटीची लढाईत झाली, ज्यात घोरी जखमी झाला आणि पृथ्वीराज चौहानचा विजय झाला. घोरीने ताब्यात घेतलेला भटिंडाचा किल्ला त्यांनी परत मिळवला.
पराभूत घोरीच्या सैन्याला पकडल्यानंतर त्याचा कोणत्याही प्रकारे छळ केला नाही ना त्याच्या साम्राज्यावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घोरीला कैद तर केले गेले परंतु त्याने विनंती केल्यावर त्याला कैदेतून मुक्त करण्यात आले.
यातून धडा घेईल तो घोरी कसला! ११९२ साली त्याने पुन्हा ह*ल्ला चढवला. पुन्हा एकदा घोरी व पृथ्वीराजचे सैन्य समोरासमोर आले. यावेळी पृथ्वीराजचे सैन्यबळ आणखी वाढले होते. गेल्या वेळी सपशेल पराभूत ठरलेल्या घोरीने सावध पवित्रा घेतला होता. त्याने आपल्या प्रचंड सैन्याला पाच तुकड्यांमधे विभागले. सुरुवातीला राजपूत सैन्याच्या मुख्य बळकट फळीवर चार तुकड्या पाठवल्या, राजपूत सैन्याची पीछेहाट होतेय हे बघून त्याने राखीव बारा हजाराची नवउमेद तुकडी पाठवली.
पृथ्वीराज चौहान पराभूत झाले. यानंतरच्या घडामोडींसाठी इतिहासात दोन गोष्टी सांगितल्या जातात. पहिली म्हणजे पराभवानंतर घोरीने पृथ्वीराज चौहानाला कैद केले व नंतर त्यास ठार मारण्यात आले. दुसरी गोष्ट राजस्थानच्या इतिहासात विशेष प्रसिद्ध आहे. ती गोष्ट पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजदरबारी असणारा राजकवी ‘चांद बरदाई’ याच्या काव्यरचनेवर आधारलेली आहे.
त्या कथेनुसार मोहम्मद घोरीने रात्रीच्यावेळी पृथ्वीराज चौहानावर कपटाने हल्ला केला. पृथ्वीराजाचे सैन्य पराभूत झाले व राजाला कैद करून तो आपल्या साम्राज्यात घेऊन गेला. पृथ्वीराजला दरबारात हजर करण्यात आले; घोरीने पृथ्वीराज यांना नजर खाली करण्याची आज्ञा केली.
यावर “राजपुतांच्या मृत्यूनंतरच त्यांची नजर खाली होते”, असे उत्तर पृथ्वीराजने घोरीला दिले.
आपल्याच दरबारी झालेल्या अपमानाने संतप्त झालेल्या घोरीने पृथ्वीराजाच्या डोळ्यात गरम सळ्या भोकसून त्यांना कायमचे आंधळे केले.
चांद बरदाईने वेशांतर करून घोरीच्या दरबारात प्रवेश केला. मोठ्या चतुराईने त्याने घोरीचे कान भरले त्याने घोरीला सांगितले की पृथ्वीराज हा अतिशय कुशल धनुर्धर असून तो केवळ आवाजाच्या दिशेने लक्ष्यभेद करू शकतो घोरीला यावर विश्वास बसला नाही आणि चांद बरदाईच्या अपेक्षेप्रमाणेच त्याने पृथ्वीराजांची ही कला स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवण्याची फर्माइश केली.
पृथ्वीराजाच्या हातात धनुष्य आणि बाण दिले. या संधीचा फायदा घेत चांद बरदाईने घोरी उभा होता त्या जागेवरून पृथ्वीराजला कवितेच्या माध्यामातून इशारा केला. त्या ओळी होत्या, “चार बनस २४ गज अंगुल अष्ट परमाण, का उपर सुलतान हे चुकीजे मत चौहान” इशारा लक्षात येताच पृथ्वीराजाने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि त्या बाणाने घोरीच्या गळ्याचा वेध घेतला.
तराईच्या या दुसऱ्या लढाईने राजपुतांचा भयानक वि*ध्वंस केला, राजपूत अस्मितेचा चुराडा झाला. यातून सावरणे राजपुतांसाठी फार अवघड होते. घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने पृथ्वीराजचे अजमेर ताब्यात घेतले उत्तर आणि मध्य भारतावर घोरीच्या पताका फडकू लागल्या.
पृथ्वीराज चौहानच्या मुलाने आपले साम्राज्य रणथंबोर येथे स्थापन केले. पुढे ११९४ साली कुतुबुद्दीन ऐबक याने गडवाल राजा जयचंद्राचा चांदवर येथे पराभव केला आणि अशाप्रकारे तराई आणि चांदवर लढायांमुळे भारतात तुर्किश राजवटींनी पाय रोवायला सुरुवात केली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.