आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
दिल्लीच्या सिंहासनावर बऱ्याच राजांनी राजेपद भूषवलं. पण चौदाव्या शतकात मोहम्मद बिन तुघलक याने आपल्या कारकीर्दीची वेगळी छाप सोडली. तो एका वेगळ्याच करण्यासाठी कायमच लक्षात राहिला. बरेच राजे हे त्यांच्या साम्राज्यवादी वृत्तीसाठी ओळखले जात. पण मोहम्मद बिन तुघलक मात्र त्याने काढलेल्या विचित्र फर्मानासाठी ओळखला गेला. अगदी आजसुद्धा जर कोणी काही विचित्र निर्णय घेतला तर त्याला ‘तुघलकी फर्मान’ असेच म्हटले जाते.
मोहम्मद बिन तुघलकचा जन्म इसवी सन तेराशेच्या आसपास तुघलक घराण्यात झाला होता. घैसुद्दीन तुघलक हा तुघलक घराण्याचा संस्थापक होता. मोहम्मद तुघलक याचे त्याचे बालपण राजेशाही थाटात गेले. त्याला राजदरबारी उत्तम शिक्षण मिळाले. त्याला तर्कशास्त्र, यु*द्धशास्त्र ,अर्थशास्त्र तसेच अनेक कलांमध्ये रस होता. त्याने मिळवलेल्या विशेष कौशल्यामुळे त्याने आपल्या प्रजाजनांची मने जिंकली.
लवकरच मोहम्मद बिन तुघलक राज्यकारभारात सक्रिय झाला.
त्याच्या वडिलांनी त्याला दख्खनमध्ये वारंगळच्या मोहिमेवर पाठवले. तो काळ साधारणत: १३२३-२४च्या दरम्यानचा असावा.
वारंगळमध्ये हिंदूंनी तुघलक घराण्याविरुद्ध जोरदार मोर्चेबांधणी केली होती. तुघलक साम्राज्यासाठी हा एक मोठा धोका होता. त्यामुळे वारंगळमधला हिंदूंचा विरोध मोडून काढण्याची मोठी जबाबदारी मोहंमद तुघलकवर होती. एक प्रकारे आपण, तुघलक साम्राज्य सांभाळण्यास सक्षम आहोत की नाही, हे दाखवून देण्याची संधीच मोहम्मद तुघलकला मिळाली होती. त्याने या मिळालेल्या संधीचा वापर आपल्या फायद्यासाठी केला. त्याने हिंदूंवर आक्र*मण करून हिंदूंचा विरोध दडपून टाकला. त्याच्या पराक्रमाच्या जोरावर आपल्या पित्याच्या नंतर इसवी सन १३२५ साली तो दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाला.
मोहम्मद तुघलक हा एक बुद्धिमान शासक होता. सत्ता हातात मिळाल्यानंतर त्याने राज्यात बदल करायला सुरुवात केली. खरे तर त्याला संपूर्ण भारतात साम्राज्यविस्तार करण्यासाठी तो महत्त्वाकांक्षी होता. पण असे असले तरी त्याच्या कर्तृत्वाला डाग लावणाऱ्या काही गोष्टी घडल्या. त्याने अतिशय चुकीचे आणि अव्यवहार्य निर्णय घेतले. आणि इतिहासकारांना टीकेला जागा करुन दिली. त्याच्या त्या निर्णयामुळे ‘तुघलकी कारभार’ असे विशेषणच भारतीय भाषांमध्ये रुढ झाले.
साम्राज्यविस्ताराच्या लालसेपोटी मोहम्मद बिन तुघलक याने आपली राजधानी १३२९ साली दिल्लीहून देवगिरीला नेली आणि देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद असे ठेवले.
भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी राजधानी स्थापन करणे आणि संपूर्ण भारतावर कब्जा मिळवणे हा त्याचा हेतू होता. विचित्र बाब म्हणजे तो फक्त राजधानी बदलून शांत बसला नाही तर चक्क त्याने दिल्लीतील प्रजेलासुद्धा दौलताबाद या नव्या राजधानीच्या ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी फर्मान काढले. त्याच्या सर्व निर्णयांपैकी हा निर्णय सगळ्यात जास्त चुकीचा ठरला.
राजाच्या आदेशानुसार दिल्लीतून लोकांनी देवगिरीकडे प्रवास सुरु तर केला, पण त्यातले काही लोक कधीही देवगिरीला पोहोचू शकले नाहीत. काहीजण रस्त्यातच मरण पावले आणि जे लोक देवगिरीत आले त्यातलेसुद्धा बरेच जण दूषित पाण्यामुळे आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सर्व प्रजाजन तुघलकच्या या अव्यवहारी निर्णयावर खूप नाराज झाले. शेवटी मुहम्मद बिन तुघलक याला आपल्या चुकीची जाणीव झाली. आणि त्याने आपली राजधानी पुन्हा दिल्लीला हलवली.
मोहम्मद बिन तुघलक याच्या आणखीन एका चुकीच्या निर्णयामुळे तर त्याच्या तिजोरीत खडखडाट झाला होता. तेव्हा तुघलकाच्या राज्यात चांदी व सोन्याची नाणी चलन म्हणून वापरली जात होती. त्याने अचानक एक दिवस नवीन फर्मान काढले आणि चलनात असलेली सर्व नाणी बाद ठरवली. त्यांच्या जागेवर त्याने नवीन तांबे आणि कांस्य धातूची नाणी चलनात आणली. नव्या नाण्यांवर नव्या मुद्रा कोरलेल्या होत्या. तांबे हा धातू त्या वेळी अगदी सहज उपलब्ध होत होते. त्यामुळे शेवटी ज्याची भीती होती तेच झालं.
लोकांनी स्वतः तांब्याची अगदी जशीच्या तशीच नाणी बनवायला सुरुवात केली. लोकांनी आपल्या घरातच टंकसाळे उभारले. बाजारात नाण्यांची आवक प्रचंड वाढली. अर्थातच त्यामुळे वस्तू महाग झाल्या.
रोजच्या जीवनावश्यक वस्तू घेणेसुद्धा लोकांना न परवडण्यासारखे झाले. या वाढलेल्या महागाईवर मोहम्मद बिन तुघलकाने जो उपाय केला, तो या समस्येपेक्षाही जालीम ठरला! बाजारातील चलनाचे आवक कमी करण्यासाठी त्याने लोकांकडे चलनसाठा परत कसा घेता येईल यासाठी उपाय केले. त्यासाठी त्याने दोआब प्रदेशातील शेतकऱ्यांवर जास्तीचा कर लावला. करवाढ केल्यामुळे लोक त्याच्यावर आणखी नाराज झाले. आणि त्याचा हाही निर्णय सपशेल चुकीचा ठरला.
एवढे सगळे होऊनसुद्धा त्याची राज्यविस्ताराची महत्त्वाकांक्षा बुजली नव्हती. त्याने इतर राज्यांवर ताबा मिळवण्यासाठी आपले सैन्यबळ वाढवायला सुरुवात केली. त्यासाठी तो राज्यातून मोठ्या संख्येने सैनिक भरती करू लागला. त्याने भरती केलेल्या सैनिकांपैकी बरेच जण असे होते की त्यांची मैदानात उभे राहण्याचीसुद्धा योग्यता नव्हती. एवढ्या सैन्याला त्याने एक वर्षभर कोणत्याही कामाशिवाय पोसले. त्यामुळे त्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडला. शेवटी त्याने त्यातले बरेचशे सैन्य बरखास्त केले.
उरलेसुरले सैन्य घेऊन तो हिमाचल प्रदेशातील एका राज्यावर चाल करून गेला. त्या भागातील कुलू कांगडा येथे त्याची शत्रूशी लढाई झाली. या लढाईत त्याच्या सेनापतीने एक घोडचूक केली. तो शत्रूचा अंदाज न घेता शत्रुसैन्याच्या मध्यवर्ती भागात जाऊन पोहोचला, आणि चहूबाजूंनी घेरला गेला. त्यामुळे त्याचे आपल्या सैन्यावरील नियंत्रण सुटले आणि मोहम्मद तुघलकाचे सैन्य सैरभैर झाले. या लढाईत त्याचा शत्रू सैन्याकडून दारुण पराभव झाला.
असं म्हणतात की त्याच्या सैन्यातील दहा हजार सैनिकांपैकी फक्त १० सैनिक दिल्लीत परतले होते.
असा मोहम्मद तुघलक एक पराक्रमी आणि महत्त्वाकांक्षी राजा असला तरी त्याच्या काही अव्यवहार्य निर्णयांनी त्याची कारकीर्द कायमची डागाळली गेली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.