आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
महाराष्ट्र हे नाव कसे उत्पन्न झाले किंवा या नावाची उत्पत्ती कशी झाली याचा शोध घ्यायचा प्रयत्न आजपर्यंत खूप जणांनी केला आहे. या नावामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात लपलेले असंख्य धागे आपल्याला सापडू शकणार आहेत.
प्रत्येक देशाच्या नावातील रहस्य समजून घेणे फार महत्वाचे आहे. जगातील प्रत्येक राष्ट्राच्या कितीतरी ऐतिहासिक कोड्यांचा उलगडा हा राष्ट्राच्या नामाभिधानावरुन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण आजही महाराष्ट्र हे नाव कसे पडले याबाबत बरीच गुंतागुंत आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्र हा शब्द प्राचीन आहे किंवा नाही यावरूनही अनेक मतभेद आपल्याला बघावयास मिळतात.
आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी समजूत आहे कि महाराष्ट्र हा शब्द पूर्वीपासून असून महाराष्ट्रात राहणारे ते मरहट्ट!
महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावले असता महाराष्ट्राला तीन हजार वर्षांची परंपरा असलेली आपल्याला दिसते. ही परंपरा सुरु होते ती अगस्त्य ऋषींपासून वेद किंवा जुने पुरावे शोधून काढले तर दंडकारण्य हा उल्लेख आपल्याला महाराष्ट्राबद्दल सापडतो. शकांच्या आक्र*मणापूर्वी तिसऱ्या शतकात साधारणपणे आर्यांचे या प्रदेशात येणे-जाणे देखील चालू झालेले उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून आपणास पहावयास मिळते.
शकांच्या पूर्वी इथे काही छोटे छोटे गोत्रे राहत होती ती गोत्रे ‘रट्ट’ म्हणजेच ‘मरहट्ट’ आहेत. हे लोक आजूबाजूच्या प्रदेशावर आपळी राज्य गाजवू लागली आणि या सर्व छोट्या राज्यांचे मिळून महाराष्ट्र बनले.
या ‘रहट्ट’ या शब्दावरून महाराष्ट्र हे नाव तयार झाले परंतु या समजुतीला काहीच आधार नाही असे आपल्याला दिसते. आजच्या आपल्या बोलण्यात आणि लिखाणात बऱ्याचदा ‘मराठा’ (देश) आणि मराठी (भाषा) असे शब्द वापरले जातात परंतु प्राचीन साहित्यामध्ये डोकावले असता शक्यतो ज्ञानेश्वरी किंवा कोणताही महानुभाव साहित्यामध्ये हा उल्लेख हा ‘मऱ्हाट किंवा मरहट्ट’ या नावाने आपल्याला बघावयास मिळतो. मऱ्हाट किंवा मरहट्ट हि नावे प्राचीन असून शुद्ध आहेत परंतु महाराष्ट्र हे नामाभिधान यापेक्षाही प्राचीन साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते.
‘मरहट्ट’ हा शब्द प्राचीन ‘महाराष्ट्र’ या शब्दापासून तयार झाला असावा असे आज गृहीत धरले जाते. ‘मरहट्ट’ हा शब्द इसवी सनाच्या नवव्या शतकात अपभ्रंश ‘काव्यत्रयी’ यामध्ये आलेला आपल्याला पहावयास मिळतो.
इसवी सनाच्या आठव्या शतकात ‘कोहुअल’ कवी होऊन गेला, त्याने जे काव्य लिहिले ते काव्य त्याने ‘मरहट्टी’ देशात लिहिले असे सांगतो. ‘महाराष्ट्र’ हा शब्द वरुचीच्या प्राकृत व्याकरणामध्ये आपल्याला आढळून येतो. हा ‘वरुची’ ख्रिस्तपूर्व काळामध्ये होऊन गेला तसेच बौद्ध धर्माचा जो ‘महावंस’ नावाचा ग्रंथ आहे त्यामध्येही ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा उल्लेख येतो.
‘महावंस’ हा ग्रंथ साधारणपणे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या मध्यात झाला असे मानले जाते. इसवी सनाच्या सहाव्या शतकातील वराह मिहीर याने लिहिलेल्या ‘बृहत् संहिता’ या ग्रंथात महाराष्ट्र हे नाव आपल्याला आढळते. इसवी सनाच्या सातव्या शतकामध्ये बदामी चालुक्य राजा दुसरा पुलकेशी दुसरा याच्या दिग्विजयाचे वर्णन करणाऱ्या ऐहोळे शिलालेखात ‘महाराष्ट्राचे’ नाव कोरलेले आहे. नाणेघाटात सातवाहनांचा जो शिलालेख उपलब्ध आहे त्यामध्ये सातवाहनांचा उल्लेख हा ‘महारठिनो गणकइरो’ म्हणजे (महारठ गणाचा सदस्य) असा केलेला आपल्याला दिसतो. हा उल्लेख इ.स.पूर्व पहिल्या शतकात केलेला आपल्याला आढळतो.
‘वरुचीच्या’ काळापासून आपल्या देशाचे नाव हे ‘महाराष्ट्र’ आहे त्यापूर्वी कित्येक शतके हे नाव अस्तित्वात असावे हे आपल्याला ‘महाराष्ट्र’ या प्रचलित नावाच्या सर्वदूर पसरलेल्या किर्तीवरून समजते. परंतु अशोकाच्या कोणत्याही शिलालेखात ‘महाराष्ट्र’ हे नाव आपल्याला दिसत नाही अगदी त्याने ‘नालासोपारा’ येथे जो स्तूप उभारला त्या स्तूपाच्या इथे जो प्रस्तरलेख मिळाला आहे तेथे देखील ‘महाराष्ट्र’ हे नाव आढळत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र’ नावाने ओळखला जाणारा आजचा प्रदेश कोठे अस्तित्वात होता हे त्या काळामधील ऐतिहासिक लेखांवरून समजत नाही.
ह्युआन श्वांगसारख्या चिनी प्रवाश्यांनी केलेले वर्णन ‘महाराष्ट्र’ नावाच्या उत्पत्तीसाठी महत्वपूर्ण ठरते.
आजच्या मराठ्यांच्या पूर्वजांचा उल्लेख पाहायला गेले तर प्राकृत ग्रंथातून हा उल्लेख ‘मरहट्टे’ असा येतो तसेच संस्कृत ग्रंथामधून यांनाच ‘महाराष्ट्रिक’ असे संबोधलेले आपल्याला आढळून येते. इ.स. १० व्या शतकातील राजशेखर कवी सांगतो की महाराष्ट्रीय कुलवधूशी लग्न केले आहे. ती महाराष्ट्रीय कुलवधू ही चाहुआन म्हणजेच आजचे चव्हाण कुळातील होती असे तो लिहितो. मराठ्यांना कानडी आणि तामिळ लोक ‘आरीयेरू’ या नावाने ओळखतात. आरीयेरूचा संबंध पार दुसऱ्या शतकापर्यंत जातो.
ह्युआन श्वांग जेव्हा भारतात आला होता तेव्हा त्याने महाराष्ट्राचा उल्लेख ‘महोलचे’ असा केला आहे तसेच ह्युआन श्वांग याने महाराष्ट्राचे वर्णन करताना असे लिहिले आहे की महाराष्ट्राची जमीन अत्यंत सुपीक आहे तसेच महाराष्ट्रातील लोक हे साधे सरळ, परंतु तापट आहेत यांच्याशी कोणी लढाई देखील केली तर ही लोक त्यांचा पाठलाग करून शत्रूस मारतात तसेच या प्रदेशाचे दुसरे नाव हे ‘दंडकारण्य असे देखील आहे’. अशा प्रकारे महाराष्ट्र हे नाव पडलेले आपल्याला दिसते.
सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वेबसाईटवर पूर्वप्रकाशित.
महत्वाचे:-
१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या पाऊलखुणा ठेवाव्यात.
४) धबधब्यामध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.