आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एकीकडे जग भौतिक सुखाच्या मागे धावत असतांना असे अनेक अवलिया लोक असतात जे प्रवाहाच्या उलट वाहतात. आपल्या पायाशी असलेल्या सुखाचा गालिचा सोडून ते काटेरी वाट निवडतात.
इतिहास अशा असंख्य लोकांच्या चरित्राने व्यापलेला आहे. आजही असे असंख्य लोक आहेत, जे आपल्या जवळचं ते सर्व सोडून एका उदात्त ध्येयाला बाळगून कार्य करत आहेत. अशाच लोकांपैकी एक आहेत अलोक सागर.
एखादा आयआयटीचा प्रोफेसर, आपली भरभक्कम कमाईची नोकरी सोडून एखाद्या आदिवासी पाड्यावर जाऊन तिथल्या लोकांमध्ये राहतो, तिथल्या मुलांना शिकवतो, त्या लोकांचं राहणीमान सुधारावं यासाठी प्रयत्न करतो. लोकांना त्यांची मूळ ओळख कळू देत नाही. एकदिवस पोलीस स्टेशनला जातो आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला त्याचा डिग्री व शिक्षणाची तपशिलवार माहिती देतो आणि सर्वांना आश्चर्य चकित करून सोडतो.
ही कथा एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभणारी वाटत असली तरी ही कथा आहे आलोक सागर या एका ध्येयवादी माणसाची.
अलोक सागर हे मूळचे दिल्लीच्या प्रतापगंज येथील आहेत. अलोक सागर यांचे वडील एक आयआरएस अधिकारी होते. अलोक यांची आई दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये फिजिक्सची प्राध्यापक आहे. तर भाऊ आयआयटी दिल्लीत प्राध्यापक आहेत.
अलोक सागर यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण दिल्ली येथे झालं. त्यांनी आयआयटी दिल्लीत ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं. अमेरिकेतल्या ह्युस्टन विद्यापिठात त्यांनी पीएचडी केली.
पुढे त्यांनी आयआयटी दिल्लीत अध्यापन करण्यास सुरुवात केली. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे अलोक सागर यांच्या आयआयटीतील विद्यार्थ्यांपैकी एक होते.
आयआयटीतील सुखवस्तू जीवन मात्र त्यांना रुचत नव्हतं, त्यांना काहीतरी वेगळं करायची इच्छा निर्माण झाली. मग १९८२ साली त्यांनी आयआयटी मधील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.
तिथून त्यांनी मध्यप्रदेशातील रस्ते आणि वीजेची वानवा असलेल्या दुर्गम भागातील कोचामु या गावी आपला मुक्काम हलवला. गेल्या २४ वर्षांपासून ते तिथेच राहत आहेत. इतका दीर्घकाळ निवास करून सुद्धा त्यांनी आसपासच्या आदिवासींना आपण कोण आहोत ते कळू दिलं नाही आणि सांगण्याचा प्रयत्न देखील केला नाही.
अत्यंत साधारण आयुष्य ते जगत होते, इतकं की एखाद्या आदिवासी व्यक्तीत आणि त्यांच्यात फरक केला जाऊ शकत नव्हता. ते संपूर्णपणे त्या समाजात मिसळून गेले आहेत. त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं, त्यांनी आदिवासी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी आदिवासी मुलांना प्राथमिक शिक्षण देऊ केलं.
ते रोज सायकल वर ६० किलोमीटरचा प्रवास करून आसपासच्या गावात बिया विकायला जातात. त्यांनी तेथील स्थानिक भाषा व शब्दोच्चार शिकवले. गेली २४ वर्ष त्यांनी त्यांची ही दिनचर्या जोपासून ठेवली होती.
पण जेव्हा बेतुल जिल्ह्यात निवडणुका लागल्या तेव्हा त्यांना त्यांची ओळख जगाला सांगावी लागली. निवडणुकीच्या काळात काही स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांचं कार्य संशयास्पद वाटलं. मग त्यांनी या संदर्भात पोलीस स्थानकाला कळवले.
त्यांना गाव सोडून जाण्यासाठी सांगण्यात आले. पण ते न डगमगता पोलिस स्थानकात गेले आणि त्यांनी आपला सगळा इतिहास पोलिसांसमोर उघड केला.
जेव्हा अलोक सागर यांनी आपल्या डिग्र्या पोलिसांना दाखवल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला. इतकी वर्षे राहून गावातल्या कोणालाच हे माहिती नव्हतं म्हणून लोक देखील अचंबित झाले. एवढी वर्षं त्यांनी आपल्या व्यवहारातून कधीच लोकांना आपल्या शैक्षणिक पातळीची आणि आपल्या पार्श्वभूमीची जाणीव देखील होऊ दिली नाही.
अलोक सागर सांगतात की आयआयटीच्या नोकरीपेक्षा त्यांना आदिवासी लोकांचा जमिनीशी व निसर्गाशी असलेला ऋणानुबंध जास्त भावला.
आदिवासी लोकांत अगदी त्यांच्यासारखा भौतिक सुखांचा त्याग करून जीवन व्यतित केल्यावर त्यांना सत्वाची जाणीव झाली असल्याचे ते सांगतात.
अलोक सागर एका संस्थेच्या दीर्घ काळ संपर्कात असून आदिवासी जणांच्या उत्थानासाठी ते त्या संस्थेचे प्रकल्प राबवत असतात. आदिवासी मुलांचे भविष्य कसे सुधारेल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अलोक सागर यांच्या कार्य समर्पण भावाचे अगदी मध्य प्रदेश इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
आज ही अलोक सागर मध्यप्रदेशातील त्या खेडेगावात शांतपणे आपलं आयुष्य जगत आहेत. त्यांना त्यांचं नंदनवन गवसलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.