आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आपल्या तलवारीने मुघलांना पाणी पाजणारे राजा छत्रसाल यांना बुंदेलखंडाचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे. छत्रसालाने बुंदेलखंडाला एक शक्तिशाली राज्य बनवले होते. परंतु, त्यांच्या साम्राज्यावर जेंव्हा मुहम्मद खान बंगशने ह*ल्ला केला तेव्हा मात्र हे हतबल झाले. आपले राज्य वाचवण्यासाठी त्यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांकडे मदत मागितली.
मुहम्मद खानने बुंदेलखंडावर ह*ल्ला केला तेव्हा राजा छत्रसाल ७९ वर्षांचे होते. शत्रूच्या सामर्थ्याने नव्हे तर त्यांच्या वृद्धावस्थेने त्यांना हतबल केले होते. जेव्हा छत्रसाल बुंदेला तरुण होते, तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली होती, छत्रसालांना शिवरायांकडे नोकरी मिळवून आपला हरवलेला मान पुन्हा मिळवायचा होता. पण शिवाजी महाराजांनी त्यांना एक तलवार भेट दिली आणि बुंदेलखंड स्वतंत्र करा असा उपदेश केला, त्यावेळी जेव्हा मदतीची गरज पडेल तेव्हा आम्ही येऊ असे वचनही राजांनी छत्रसालाला दिले होते. बंगशच्या रूपाने हे संकट बुंदेलखंडावर आले होते, पण यावेळी छत्रपती शाहू राजे होते, तेव्हा शाहू महाराजांना छत्रसालांनी मदतीची मागणी केली व आपल्या आजोबांनी तसा शब्द दिल्याची देखील आठवण करून दिली. त्यामुळे शाहू महाराजांनी थोरल्या बाजीरावांना ही कामगिरी सोपवली.
पेशव्यांच्या मदतीची आस लावून बसलेल्या याच महाराजांनी ऐन यौवनाच्या उंबरठ्यावर असताना मात्र अवघ्या २५ सैनिक आणि ५ घोडेस्वारांसह त्यांनी मुघली फौजांवर चालून जाण्याचे असामान्य धाडस दाखवले होते.
त्यांनी बुंदेल साम्राज्याची स्थापना करून हे राज्य भरभराटीस आणले होते. मुघलांशी पंगा घेणे म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती. जे दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले तेच उत्तरेत महाराजा छत्रसाल यांनी करून दाखवले.
छत्रसाल हे ओरछा राज्याचे राजा रुद्र प्रताप सिंह यांचे वंशज. त्यांचे वडील चंपतराय हे महोब्याचे जहागीरदार होते. छत्रसाल यांचा जन्म ४ मे १६४९ रोजी झाला. १२ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले.
ज्या मुघलांना चंपतरायांनी सुरुवातीला साम्राज्य विस्तार करण्यास मदत केली तेच मुघल त्यांच्यावर उलटले होते. मुघलांशी मैत्री करून चंपतराय यांना अमाप पश्चाताप होत होता. हेच मुघल आणि विशेषतः औरंगजेब चंपतरायांच्या मृत्यूसही कारणीभूत ठरले.
यावेळी छत्रसाल आपल्या मामाकडे राहून यु*द्धनीती शिकत होते. पण, मुघलांशी आपल्या पित्याच्या ह*त्येचा सूड उगवण्याची शपथ तर त्यांनी तेव्हाच घेतली होती. परंतु मुघलांविरोधात बंड पुकारण्याइतकी मजबूत आर्थिक स्थिती, खंबीर आधार, अचूक मार्गदर्शन आणि मजबूत मनुष्यबळ यांची कमतरता होती.
छत्रसाल आणि त्यांचे भाऊ राजा जयसिंहकडे गेले व त्याच्या सैन्यात भारती झाले. राजा जयसिंह आणि चंपतराय यांची घनिष्ठ मैत्री होती. राजा जयसिंह मुघलांचे मांडलिक होते. छत्रसाल यांनी या सैन्यासोबत मुघलांसाठी अनेकदा लढले असे म्हटले जाते. मात्र, नंतर ते या सैन्यातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची स्वतंत्र सेना निर्माण करण्याचा निश्चय केला.
तिकडे दक्षिणेत शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढण्याचे धाडस दाखवलेच होते. बस्स, छत्रसाल यांनी आपल्या डोळ्यांसमोर फक्त शिवाजी महाराजांचीच मूर्ती आणली आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेतली.
शिवाजी महाराजांच्या कार्याने भारावलेले छत्रसाल त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रसालला मुघलांशी लढा तीव्र करण्याचा संदेश दिला. जे काम आम्ही दक्षिणेत करतो तेच काम उत्तरेतही कुणीतरी करण्याची गरज आहेच असाही संदेश शिवाजी महाराजांनी त्यांना दिला.
शिवाजी महाराजांकडून स्वराज्य स्थापनेची महाराजा छत्रसाल यांची तलवार बुंदेलखंडाच्या चहुबाजूला तळपू लागली.
शिवाजी महाराजांच्या भेटीनंतर छत्रसाल यांनी बुंदेलखंडातील छोट्या जहागिरदारांना एकत्रित करण्यास सुरुवात केली. हे जहागीरदार आत्तापर्यंत मुघालांसाठीच काम करत होते. परंतु अनेक जहागिरदारांनी त्यांना साथ देण्यास नकार दिला. मग त्यांनी महोबापासूनच मुघलांविरोधात यु*द्ध पुकारण्याचा निर्णय घेतला.
शिवाजी महाराजांनी जशी सुरुवातीला अठरापगड जातीतील मावळ्यांचे सैन्य उभे केले होते अगदी तोच कित्ता छत्रसाल यांनीही गिरवला. त्यांचे लहानपणीचे मित्र ज्यात कुणी तेली होते, कुणी मुस्लीम तर कुणी मणिहार. याच सवंगड्यांच्या साथीने त्यांनी मुघलांशी यु*द्धाचे रणशिंग फुंकले.
छत्रसाल राजाच्या या छोट्याश्या सैन्याने औरंगजेबाच्या नंगीवर पाय देताच औरंगजेबाने आपल्या ३० हजार सैन्याची तुकडी छत्रसाल राजाच्या मागे लावली. पण, छत्रसाल यांनी आपल्या यु*द्धकौशल्याने मुघलांना सळो की पळो करून सोडले.
मुघल घेराबंदी करण्यात माहीर आहेत याचा अनुभव तर त्यांना होताच. मुघलांनी आपल्या पित्याला कशाप्रकारे छळकपट करून मारले हे ते विसरले नव्हते. त्यामुळे मुघलांना झुलवत ठेवणे छत्रसाल यांच्यासाठी कठीण नव्हते.
उत्तरोत्तर औरंगजेबाच्या त्रासाला कंटाळलेले अनेक हिंदू राजे, जहागीरदार, छात्रासालांच्या पाठीशी उभे राहिले. यामुळे छत्रसाल यांची ताकद वाढत गेली. औरंगजेबाविरोधात त्यांनी इटावा, खिमलासा, गढाकोटा, धामौनी, रामगढ, किंजीया, माडियादो, रहली, रणगिरी, अशा अनेक ठिकाणी यु*द्ध केले आणि या प्रत्येक यु*द्धात त्यांचा विजय झाला.
यु*द्धात बंदी बनवलेल्या मुघल सरदारांकडून दंड वसूल केले आणि त्यांना मुक्त केले. बुंदेलखंडातून मुघलांचे एकछत्री शासन महाराजा छत्रसाल यांनी संपवून टाकले.
वसीयाच्या यु*द्धानंतर मुघलांनीही छत्रसाल यांना ‘महाराजा’ म्हणजेच स्वतंत्र राजाची मान्यता दिली. छत्रसाल बुंदेला हे त्याकाळातील एक महान शूरवीर आणि कुशल संघटक होते.
१७२९ मध्ये बंगशने त्यांच्या राज्यावर आक्र*मण केले तेव्हा मात्र त्यांना मराठ्यांच्या मदतीची आवश्यकता जाणवू लागली. बाजीराव पेशवे आपल्या सैन्यासह बुंदेल खंडात पोहोचले. महाराजा छत्रसाल आणि बाजीराव पेशवे यांनी बंगशचा पराभव केला.
महाराजा छत्रसाल हे पेशव्यांना आपल्या मुलाप्रमाणे मानत. मस्तानी, साहित्यातून आणि चित्रपटातून जिचे चित्रण एक नर्तकी असे करण्यात आले ती या शूरप्रतापी, धुरंधर राजाची कन्या होती.
छत्रसाल यांनी आपल्या मृत्युपुर्वीच २० डिसेंबर १७३१ साली महोबा, त्यांच्या राज्यातील एक तृतीयांश भाग, हिऱ्याच्या काही खाणी आणि आपली मुलगी मस्तानी बाजीरावांना सोपवली.
महाराजा छत्रसाल लढवय्ये यो*द्धा होते, तसेच ते साहित्य आणि कलेचेही भक्त होते. अनेक कलाकारांना त्यांनी आपल्या पदरी राजाश्रय दिला होता. कवी भूषण हे त्यांच्या दरबारातील प्रसिद्ध कवी.
कवी भूषण यांनी महाराजा छत्रसाल यांच्यावर ‘छत्रसाल दशक’ नावाचा काव्यग्रंथ लिहिला आहे. ८२ वर्षाच्या आयुष्यात ५२ लढाया जिंकणाऱ्या या राजाचे वर्णन कवी भूषण म्हणतात,
“छत्तातोरे राज में धक-धक धरती होए,
जित-जित घोड़ा मुख करे तित-तित फत्ते होए”
महाराजा छत्रसाल म्हणजे बुंदेलखंडाची ज्वलंत अस्मिता आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.