आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताचा आत्मा खेड्यात आहे असं म्हणतात. ग्रामीण विकास या विषयावर मोठमोठ्या चर्चा होत असतात. लाखो करोडो रुपयांचे पॅकेज, कित्येक योजना दरवर्षी ग्रामीण विकासासाठी जाहीर केल्या जातात. पण आजही भारतातील जास्तीत जास्त गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
वरच्या पातळीवर एवढं भरघोस काम होऊनही ते तळापर्यंत का पोचत नाही? गावे अविकसित का राहतात? याचं कारण आहे स्थानिक राजकारण्यांच्या, पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव!
पण पुणे जिल्ह्यात एक गाव असं आहे ज्याने अभूतपूर्व विकास करून घेत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इतर गावांसाठीही या गावाची विकासनीती आदर्शवत आहे. या गावाचं नाव सोरतापवाडी!
पुणे-सोलापूर हायवेवर हडपसरपासून पुढे काही किमी गेल्यानंतर हे गाव लागतं. सातत्याने राबवलेलं स्वच्छता अभियान आणि झाडांनी केलेली सजावट यामुळे गावाचं रुपडं उठून दिसतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली तेव्हापासून आजपर्यंत न चुकता प्रत्येक रविवारी या गावात सक्रिय स्वच्छता अभियान राबवले जाते.
गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची ही इच्छाशक्ती प्रत्येक गावकऱ्यात होतीच, पण तिला योग्य दिशा देण्याचं काम केलं या गावच्या सरपंचांनी. सुदर्शन जयकुमार चौधरी यांनी.
गेले काही महिने आपण कोरोनाच्या महामारीशी प्राणपणाने झुंज देत आहोत. अनेक प्रतिबंधक उपाय सरकारी आणि स्थानिक पातळीवर राबवले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या बाबतीतही या गावाने आदर्श घालून दिला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजवर या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही! लक्षणे दिसल्यावरच त्वरित विलगीकरण, सोशल डिस्ट्नसिंग, सॅनिटायझेशन इत्यादी उपाय करून या गावाने कोरोनाला पूर्णपणे दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.
सॅनिटायझेशन टनेल या यापैकीच एक उपक्रम. गावात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीला या टनेलमधून जावे लागते, त्यामुळे एखाद्या व्यक्तिमार्फत बाहेरून विषाणूचे वहन होत असल्यास ते रोखले गेले. असे अनेक प्रतिबंधात्मक उपाय राबवून या गावाने कोरोना प्रादुर्भाव रोखला आहे.
या गावात नुकतीच झालेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे नवीन ग्रामपंचायत इमारत.
एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या ऑफिसप्रमाणे या नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. संगणकीकृत प्रणाली आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असलेली ही इमारत गावकऱ्यांना सर्व सुविधा देण्यासाठी तत्पर असेल.
दोन दिवसांपूर्वी खासदार गिरीश बापट आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. ही अत्याधुनिक इमारत बांधताना पर्यावरणाचा काळजीपूर्वक विचार करण्यात आला आहे.
सोलर पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग अशा पर्यावरणपूरक गोष्टींचा समावेश यात करण्यात आला आहे. परिसरात शोभेची झाडे लावल्याने इमारत आणखी उठून दिसते. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
या कार्यालयासाठी १४वा वित्त आयोग, जिल्हा, ग्रामनिधी, जिल्हा परिषद निधी व ग्रामपंचायत निधी यांतून अंदाजे १ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
येत्या काळात गावकऱ्यांना तत्पर सुविधा देण्यासाठी हे ग्रामपंचायत कार्यालय सज्ज असणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.