आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सानन्दमानन्दवने वसन्तमानन्दकन्दं हतपापवृन्दम्।
वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये ॥
भारतातील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पवित्र मानली जाणरी नदी म्हणजे गंगा. याच गंगातीरी वसली आहे भारतीय संस्कृती, कला, साहित्याचं घर म्हणजेच वाराणसी.
वाराणसी बनारस किंवा काशी या नावानेही ओळखलं जातं. जगातील सर्वात पुरातन शहरांपैकी हे एक शहर आहे. अनेक हिंदू पौराणिक कथांमध्ये वाराणसीचा उल्लेख आढळून येतो. इथल्या गंगेच्या प्रवाहात डुबकी लावल्याने सगळे पाप धुवून निघतात अशी मान्यता आहे. हिंदूंसाठी काशी हे फार महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. रोज संध्याकाळी होणाऱ्या गंगाआरतीसाठी दुरून लोक येतात.
काशी खरी प्रसिद्ध आहे ती श्री विश्वनाथाच्या मंदिरामुळे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र असं मंदिर.
गंगाकिनारी वसलेल्या काशीमध्ये १००हून अधिक घाट आहेत. पूर्वाभिमुख असलेल्या या घाटांवर सूर्योदय बघणं ही एक पर्वणीच असते. प्रत्येक घाटाचा आपला एक इतिहास आहे.
यांपैकी पाच घाटांना विशेष मान्यता आहे. ते म्हणजे असी घाट, दशाश्वमेध घाट, आदिकेशव घाट, पंचगंगा घाट आणि मणिकर्णिका घाट.
मणिकर्णिका घाटाच्या जवळच आहे सिंदिया घाट. या घाटावर वसलंय एक आगळंवेगळं, अतिशय आकर्षक असं रत्नेश्वर मंदिर! या मंदिराला “Leaning Temple of Kashi” असंही म्हणतात.
याला असं नाव पडण्याचं कारण म्हणजे हे मंदिर शेकडो वर्षांपासून एका बाजूला झुकलेलं आहे. 9 डिग्री एवढं हे मंदिर झुकलं आहे तर या मंदिराची उंची ४० फुट इतकी आहे.
मणिकर्णिका घाटावरील इतर मंदिरांप्रमाणे हे मंदिरही प्राचीन आहे. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे घाटावरील इतर मंदिर वरच्या बाजूला आहेत पण हे एकच मंदिर आहे जिथे जायला घाट उतरावा लागतो. याच कारणामुळे इथे केवळ 2-4 महिनेच पूजा होते बाकी वर्षभर हे मंदिर पाण्याखालीच असतं.
या मंदिराबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत.
अहिल्यादेवी होळकरांच्या काळात त्यांनी काशीला अनेक जीर्णोद्धाराचे तसेच नवीन मंदिर निर्मितीचे काम केले. त्यांची एक दासी होती. रत्नाबाई नावाची. या दासीने एकदा देवींना मणिकर्णिका घाटासमोर शिवमंदिर बांधण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार अहिल्यादेवींनी या मंदिराची निर्मिती केली.
पण त्यानंतर काही दिवसांतच मंदिर एका बाजूला झुकलं. मंदिरालाच स्वतःचा भार सहन झाला नाही म्हणून ते झुकलं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण, बऱ्याच लोकांची अशी मान्यता आहे की या मंदिराला रत्नाबाईच्या नावावरून नाव देण्यात आलं म्हणून अहिल्यादेवी चिडल्या आणि त्यांनी या मंदिरात पूजा होऊ शकणार नाही असा शाप दिला. ज्यामुळे हे मंदिर जास्तकरून पाण्याखालीच असतं. पुढे या घाटाचे पुन्हा बांधकाम करण्यात आलं पण तरीही मंदिर काही सरळ झालं नाही.
याशिवायही अजून एक दंतकथा प्रचलित आहे. ती अशी की साधारण १५व्या-१६व्या शतकात मानसिंह नावाचा एक युवक होता. त्याच्या आईने त्याचं लहानपणापासून जे पालनपोषण केलं, वाढवलं त्याबद्दल तो आईचा ऋणी होता.
या ऋणांतून उतराई होण्यासाठी त्याने या मंदिराची निर्मिती केली. त्याच्या आईला हे कळल्यावर तिने चिडून शाप दिला ज्यामुळे हे मंदिर जमिनीमध्ये घुसलं. मातृप्रेमाचं ऋण कधीही फेडलं जाऊ शकत नाही.
या मंदिराला म्हणूनच मातृऋण म्हणूनही ओळखलं जातं.
दगडी बांधकाम असलेलं हे इतकं पुरातन मंदिर झुकलेलं असूनही एवढे वर्ष टिकलं कसं हे एक रहस्यच आहे. हे मंदिर जगातील आश्चर्यांपैकी एक “Leaning Tower of Pisa”पेक्षाही जास्ती झुकलेलं आहे.
भारतात अशा अनेक वास्तू आणि शिल्पकलांचे नमुने आहेत जे जगातील प्रसिद्ध वास्तुंपेक्षाही वरचढ आहेत. पण आपल्याला याबद्दल माहितीच नाही त्यामुळे अभिमान वाटणं तर फारच दूर राहिलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.