आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील लडाख हा प्रांत नेहमीच संघर्षाचे कारण आहे. १९४८-४९ च्या दरम्यान पाकिस्तानी घुसखोरांनी लडाख हडपण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाकिस्तानी घुसखोरांना पळवुन लावण्यात भारतीय सेनेचा मोठा हात असला तरी यामागे एक अदृश्य असा खारीचा वाटा होता तो अभियंता असलेले सोनम नोरबू यांचा.
कामगार ‘न्याचू’ घराण्यात नोरबू यांचा जन्म २७ मे १९०९ या दिवशी झाला. पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आणि अभियांत्रिकीच्या पदवीसाठी ते शेफील्ड विद्यापीठात गेले.
एका ज्येष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना तहसीलदार पदाची संधीसुद्धा दिली होती. परंतु अभियांत्रिकीच्या प्रेमापोटी त्यांनी ती नोकरी नाकारली. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या शिफारसीवरुनच त्यांना शेफील्ड विद्यापीठात एक जागा मिळवून देण्यात आली होती. एका जवळच्या नातेवाईकाने केलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर नोरबूनी आपले इंग्लंडमधील शिक्षण घेतले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोरबू यांनी विकास आयुक्त म्हणून जम्मू-काश्मीरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम केले. पुढे जाऊन ते सीमा रस्ते बांधकाम संस्थेत अभियंता म्हणून नियुक्त झाले. या विभागात त्यावेळी अभियंत्यांची कमतरता होती.
याच वेळी तेव्हाच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये येणाऱ्या लेह-लडाख प्रांतात काश्मीर पोलिस दल आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या चकमकी सुरु होत्या. जम्मू आणि काश्मीर नुकतेच भारतात समाविष्ट झाले होते.
त्याच वेळी २६ ऑक्टोबर १९४७ या दिवशी डोग्रा भागातील स्कार्दू नावाचे शहर पाकिस्तानी घुसखोरांच्या ताब्यात गेले होते. आता या घुसखोरांचे पुढचे लक्ष होते लडाखच्या प्रदेशावर. त्यांना यात विघ्न होते ते फक्त जम्मू आणि काश्मीर राज्य पोलीस दलाचे. या दलाचे सूत्र लेफ्टनंट कर्नल शेरजंग थापा यांच्या हाती होते.
दलात असलेल्या ३३ जणांना घेऊन घुसखोरांशी लढणे म्हणजे मोठे दिव्य होते. डोग्रा रेजिमेंटची दुसरी बटालियन अतिशय अवघड अशा वातावरणाचा सामना करत श्रीनगरवरुन काश्मीर पोलीस दलास येऊन सामील झाली. या बटालियनबरोबरच होते अभियंता सोनम नोरबू .
झोजिला पास ओलांडून १६ फेब्रुवारी, १९४८ रोजी नोरबू यांच्याकडे लेहमध्ये एक हवाई पट्टी बांधण्याचे काम सोपवण्यात आले. खराब वातावरणामुळे भारतीय सेनेला त्याठिकाणी तातडीने मदत पोहचवता येईल असा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे हवाई मार्गाने.
लेहला जाणारे बाकीचे मार्ग बर्फाच्छादित झाले होते. बाकीचे रस्ते लांब आणि फक्त पायी चालून ओलांडता येत होते. अशावेळी मोजकी तांत्रिक मदत आणि महाराजा हरी सिंग प्रशासनाच्या केवळ १३,००० रुपयांच्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने त्यांनी हवाई पट्टीचे काम लगेच सुरु केले.
नोरबू यांच्या कार्यतत्परतेचा परिणाम म्हणून लेहमध्ये रस्त्याच्या आधी हवाई पट्टी बनवून तयार झाली. लडाखच्या विकासासाठी नाही तर देशाच्या सुरक्षिततेसाठी ही हवाई पट्टी बनवण्यात आली. बुलडोजर, जेसीबी किंवा ट्रैक्टर या साधनांचा वापर न करता ही हवाई पट्टी बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.
लेहमध्ये जिथे ही हवाई पट्टी बांधण्यात येत होती तिथे मोठ मोठे दगड आणि खडक होते. फक्त ३ आठवड्यात या दगडांना तिथून कोणत्याही यंत्राचा वापर न करता हटवणे हे एक आश्चर्यकारक असे काम होते असे तज्ञ म्हणतात.
६ एप्रिल, १९४८ ला हवाई पट्टी वापरण्यासाठी तयार झाली आहे अशी घोषणा करण्यात आली. त्या दिवशी लेफ्टनंट प्रिथी चंद यांनी अधिक सैन्य आणि शस्त्रांची मागणी सेनेकडे गेली. नोरबूंनी १३,००० मधील १०, ८९१ रुपये वापरून बाकीचे २१०९ रुपये राज्याच्या तिजोरीत जमा केले.
नोरबूंनी बनवलेल्या या हवाई पट्टीच्या जोरावरच भारतीय सेनेने २४ मे, १९४८ रोजी या हवाई पट्टीवर प्रसिद्ध हवाई वाहतूक विमान ‘डकोटा’ उतरवले. लडाखच्या इतिहासातील हा एक मोठा क्षण होता. लडाखमधील बऱ्याचशा जनतेने याआधी दुचाकीसुद्धा बघितली नव्हती. याच विमानात हवाई कमांडर मेहर सिंग, त्यांच्या बरोबर फ्लाइट लेफ्टनंट एस. डी. सिंग आणि जनरल थिमैय्या हे होते.
२४ मे रोजी आलेल्या हवाई विमानात आलेल्या जेष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली आणि ते गेले. नंतर मात्र हवामानात आलेल्या खराबीमुळे ही विमाने लेहमध्ये उतरणे अशक्य झाले होते. शेवटी १ जून रोजी ६ डकोटा हवाई विमाने गुरखा रायफल्स आणि शस्त्रगोळा घेऊन हजर झाली आणि पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी सेनेच्या अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कारांनी नावाजण्यात आले. नोरबू यांना मात्र कोणताही पुरस्कार देण्यात आला नाही.
पुढे नोरबू यांनी झोजिला पासमधून जाणाऱ्या श्रीनगर-लेह या रस्त्याच्या सर्वेक्षण आणि बांधकामात मोठा हातभार लावला. त्यांच्या या अमुल्य अशा देशसेवेसाठी त्यांचा १९६१ साली सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला.
६०च्या दशकाच्या शेवटच्या काळात लडाखच्या मुलभुत यंत्रणेच्या जडणघडणीत १९वे बकुळा रिनपोचे यांच्याबरोबरच नोरबू यांचासुद्धा मोठा वाटा होता.
१९७० साली भारत सरकारने ‘उलानबातर’, मंगोलिया इथे आपला दूतावास स्थापन केला. त्याच्या पुढच्याच वर्षी सोनम नोरबू यांना तिथे पहिले रहिवासी भारतीय दुत म्हणून नियुक्त करण्यात आले.
प्रशासकीय सेवेत कार्य करून आल्यानंतर त्यांनी राजकारणात आपला सक्रिय सहभाग नोंदवला. १९७५ साली शेख अब्दुल्ला सरकारच्या वेळी ते कार्य आणि ऊर्जामंत्री होते.
त्यांचा मुलगा पिन्टू नोरबू म्हणतात, “माझे वडील एक प्रामाणिक, सरळ, स्वाभिमानी व्यक्ती होते. दिसायला साधारण परंतु उच्च विचारसरणी असलेले. कामाप्रती असलेले प्रेम आणि कार्यतत्परता यामुळेच त्यांना शेख अब्दुल्ला यांनी राज्याच्या ७०% बजेट नियंत्रण करणारया खात्याचे मंत्रिपद दिले होते. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आणि ओळखी असतानाही त्यांनी कधीही त्या गोष्टीचा गैरवापर केला नाही.”
प्रसिद्ध वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक सोनम नोरबू यांच्याबद्दल सांगतात की, “ते अत्यंत सामान्य कुटूंबातुन आले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. बाकी राजकारणी व्यक्तींसारखे ते अतिशय सरळ आणि प्रेमळ स्वभावाचे होते.”
त्यांच्या कालावधीत त्यांनी फक्त लडाखच नाही तर जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या बऱ्याच मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी केली. १९७७मध्ये लेहमधील पहिल्या हवाई उडडाणाचे उद्घाटनसुद्धा त्यांनीच केले. या हवाई सेवेमुळे आज लडाखच्या प्रगतीचा वेग वाढला आहे.
१९८०मध्ये सोनम नोरबू यांचा मृत्यू झाला. त्यावेळी शेख अब्दुल्ला यांनी आपला उजवा हात गेला असे वक्तव्य केल्याचे पिन्टू नोरबू सांगतात. त्यांच्या स्मृतीत लेहमध्ये आज एक दवाखाना आहे. ‘द सोनम नोरबू मेमोरियल हॉस्पिटल’ आजही लडाखमधील सर्वोत्कृष्ट सरकारी दवाखाना म्हणून प्रसिद्ध आहे.
सोनम नोरबू एक प्रामाणिक, राष्ट्रप्रेमाने झपाटलेले व्यक्तिमत्व होते. लडाख आणि त्याद्वारे भारताचा विकास एवढे एकच ध्येय समोर ठेऊन त्यांनी आपले जीवन देशासाठी अर्पित केले. मोठमोठ्या हुद्द्यांवर असुनही आपल्या ताकदीचा गैरवापर न करणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आज देशाला आहे. सोनम नोरबू हे त्यांच्यासाठी एक आदर्श आहेत!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.