आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिराच्या खटल्याचा निकाल दिला. तिरुवनंतपुरमस्थित पद्मनाभस्वामी मंदिरावर असलेल्या मालकी हक्कांवर केरळ सरकार आणि त्रावणकोरचे राजघराणे यांच्यात हा खटला सुरु होता.
यात सर्वोच्च न्यायालयाने त्रावणकोरच्या राजघराण्याचा त्या मंदिरावर असलेला हक्क स्वीकार केला आहे.
पद्मनाभस्वामी मंदिर हे देशभरात त्याच्या अमाप संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त संपत्ती या मंदिराच्या ताब्यात आहे. दशकभरापूर्वी या मंदिराच्या गर्भगृहात प्राप्त झालेल्या खजिन्यामुळे या मंदिराच्या संपत्तीत एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे.
इतिहासकारांच्या मते हे मंदिर ८व्या शतकातील असून या मंदिराचे पुनर्निर्माण त्रावणकोरचे महाराज मार्तंड वर्मा यांच्याद्वारे १८व्या शतकात पूर्ण करण्यात आले. या मंदिराचे स्थापत्य विशिष्ट चेरा प्रकारचे असून या मंदिरात भगवान विष्णूची शेषनागावर आरुढ निद्राधीन मूर्ती विराजमान आहे.
हे मंदिर भारतातील वैष्णव समुदायाच्या १०८ पिठांशी सलग्न आहे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर देखील या मंदिरावर १९९१ सालापर्यंत त्रावणकोरच्या राजघराण्याकडून कारभार चालवला जात होता. त्याच वर्षी राजघराण्याचे प्रमुख असलेल्या चिथिरा थिरूनल बलराम वर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर देखील केरळच्या राजघराण्याकडूनच या मंदिराचे २०११ सालापर्यंत व्यवस्थापन केले जात होते. बलराम वर्मा यांचे लहान बंधू उत्तरधाम थिरूनल मार्तंड वर्मा यांच्याकडूनच मंदिराचे व्यवस्थापन केले जात होते.
२०११ साली केरळ उच्च न्यायालयाने त्रावणकोर राजघराण्याचा मंदिरावरील शिबेत हक्क अमान्य केला होता. शिबेत म्हणजे ते लोक ज्यांच्याकडे मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा त्रावणकोर राजघराण्याला त्याचा हक्क प्रदान केला आहे.
पद्मनाभस्वामी मंदिराचे महात्म्य काय आहे आणि हा वाद कसा उभा राहिला हे आपण जाणून घेऊया!
पद्मनाभस्वामी मंदिरातील देवता ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्र रूप असून एका लोककथेनुसार विव्हला मंगलाथु स्वामियार हा संन्यासी भक्त संपूर्ण जगभर भगवान पद्मनाभाच्या दर्शनासाठी फिरत होता. एके दिवशी त्याला स्वप्न पडले की, भगवान विष्णूनी तिरुवनंतपुरम येथे १८ फुटांचे रूप धारण केले असून ते शयनावस्थेत विराजमान आहेत. त्यानंतर त्याने या ठिकाणी मंदिराची निर्मिती केली.
पद्मनाभस्वामी मंदिरातील मूर्त्ती ही कदशर्करेच्या मिश्रणातून निर्माण करण्यात आली असून यात अनेक वनस्पती, वाळू आणि राळ यांच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला आहे. आधी हे मंदिर लाकडापासून तयार करण्यात आले होते. पण कालांतराने या मंदिराचे ग्रॅनाईटच्या मदतीने बांधकाम करण्यात आले. या मंदिरात ३६५ खांब आहेत, जे वर्षातील प्रत्येक दिवसाचे प्रतिनिधित्व करतात.
मुख्य मूर्तीची निर्मिती ही १२,५०० शाळीग्राम शिळांपासून करण्यात आली आहे. या सर्व शिळा नेपाळमध्ये वाहणाऱ्या गंडकी नदीच्या पात्रातून आणण्यात आल्या होत्या, शाळीग्राम शिळेचे विष्णू पुराणात महात्म्य नमूद करण्यात आले असून या दगडात स्वयं श्री नारायणाचा वास आहे अशी मान्यता आहे. म्हणूनच त्याची सदैव पूजा अर्चना केली जात असते.
मंदिरातील खजिना
पद्मनाभस्वामी मंदिराच्या गर्भगृहात सहा गुप्त तिजोऱ्या आहेत. या तिजोऱ्यांना उघडण्यावरूनच केरळ सरकार आणि त्रावणकोरचे राजघराणे यांच्यात वाद चालू होता.
२०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने गोपाळ सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांच्या समितीचे गठन करून या मंदिरातील दोन कोठार, जे गेल्या १३० वर्षांपासून बंद होते, उघडण्याचे आदेश दिले.
जेव्हा हे कोठार उघडण्यात आले त्यावेळी यामध्ये तब्बल १ लाख कोटी किंमतीचे मौल्यवान ऐवज हाती पडले. कोठार उघडण्याच्या वेळी घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा मिनिट टू मिनिट रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सुपूर्द करण्यात आला.
या मंदिरात ८०० किलोच्या आसपास वजनाच्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या थैल्या होत्या. समितीला अनेक सोन्याचा नाण्याची मडकी आणि त्यासोबतच एक सोन्याची खुर्ची देखील सापडली, जिचा वापर धार्मिक कार्यासाठी केला जात असावा.
या कोठारात त्यांना ४ बाय ३ एक भगवान विष्णूची स्वर्ण मूर्ती आणि २८ फूट उंचीचे हिरे रत्ने माणिकांनी जडलेले २८ फुटांचे देवतेचे सिंहासन देखील मिळाले. या ठिकाणी मिळालेली बहुतांश स्वर्ण नाणी ही मध्ययुगीन, रोमन, नेपोलनीज आणि ब्रिटिश काळातील होती. या ठिकाणी देवतेचे ३० किलो वजनाचे वस्त्रालंकार देखील सापडले.
असंख्य स्वर्ण वस्तू, हिरे, माणिक, मोती, धातू या मंदिराच्या गर्भगृहातील कोठारात सुब्रमण्यम समितीला आढळून आले होते.
त्रावणकोरचे राजघराणे
१९९१ साली त्रावणकोरच्या शेवटच्या महाराजांचे निधन झाले, त्यानंतर त्यांचे लहान बंधू थिरुनाल मार्तंड वर्मा हे सध्या राजघराण्याचे वारस आहेत. त्यांच्या कुळाचा १८७० सालापर्यंतचा इतिहास उपलब्ध आहे. या राजघराण्याची स्थापना अय्यन अडिगल थिरूवादीर यांनी केली होती.
वंशजांच्या मते या पद्मनाभस्वामी मंदिराचे आणि त्यांचे गेल्या शंभराहून अधिक वर्षांपासूनचे संबंध आहे. पद्मनाभस्वामी हे त्यांचे आराध्य आहेत असे ते मानतात. त्रावणकोर राजघराण्याच्या वंशजांपैकी कोणीही कधीही मंदिरात जाताना कुठल्याही प्रकारचे भारी वस्त्र व वाहन प्रदान न करता अगदी साध्या कपड्यात प्रवेश करतात.
त्यांना मंदिरातील एकही गोष्टी स्वतःच्या ताब्यात घेण्याचा अधिकार नाहीये. मंदिरातील संपत्तीवर भगवान पद्मनाभाचा हक्क असून, त्यावर दावा करायला देखील राजघराण्याला परवानगी नाही. फक्त मंदिर व्यवस्थापनाचे दायित्व त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे.
१९५० सालापासून राजघराण्याने त्यांचा मुकुट स्वामी पद्मनाभाच्या चरणी अर्पण केला असून त्यांना त्रावणकोर साम्राज्याचे स्वामी बनवून स्वतः फक्त राज्यकारभार चालवला आहे.
गेल्या ९ वर्षांपासून चालू असलेल्या या वादाचा निकाल सरतेशेवटी राजघराण्याच्या बाजूने लागला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत केले जात आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.