आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतात कितीतरी श्रीमंत संस्थानिक होऊन गेले. या सगळ्या संस्थानिकांकडे बेहिशेबी संपत्ती होती. त्यांच्या खजिन्यात दुर्मिळातील दुर्मिळ वस्तूंचा समावेश होता. त्यांच्याकडे नोकरांचा खूप मोठा ताफा होता. या संस्थानिकांचे छंद देखील अगदी त्यांच्या समृद्धीला साजेसे आणि तितकेच चमत्कारिक होते. यातील अनेक संस्थानिकांच्या चमत्कारिक छंदांची आजही चर्चा होते.
ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतातील ही राजघराणी आणि संस्थानिक आपापल्या जहागिरी आणि संस्थाने सांभाळत होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही मोठमोठी संस्थाने भारतात विलीन करून एकसंध भारताची निर्मिती करण्यात आली. परंतु, त्यांच्या संपत्तीच्या बाबातीतीले हेवेदावे मात्र आजही सुरु आहेत.
अशाच संस्थानिकांपैकी एक होते रामपूरचे संस्थान. यांच्या संपत्तीचा वाद कोर्टापर्यंत पोहोचला.
उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने या संपत्तीच्या वाटणीबाबत आपला निर्णय देताना म्हटले, ज्याच्याकडे गादी सोपवण्यात आली फक्त त्याचाच संपत्तीवर अधिकार असेल असे होणार नाही.
उलट, नवाबाच्या सगळ्याच वंशाजांमध्ये या संपत्तीची समान वाटणी झाली पाहिजे. रामपूरच्या संस्थानच्या संपत्तीचा हा वाद कित्येक वर्षे रखडला होता. संपत्तीवरून या नवाबाच्या वंशाजांत गेली कित्येक वर्षे भांडणे सुरु होती. अर्थात, ही संपत्तीही काही अगदीच टीचभर आहे, अशातला भाग नाही. त्यामुळे कोणीच या संपत्तीवरील दावा सोडण्यास तयार नव्हते. सर्वोच्च न्यायालायाच्या निर्णयामुळे आत्ता कुठे या वादावर पडदा पडला.
भारतातील राजघराणी, रियासतकार यांच्याकडे अगणित संपत्ती होती. त्यांचा मानमरातब, श्रीमंती, त्यांचे उंची शौक याबद्दल ऐकले तरी आपले डोळे विस्फारले जातात. त्यांचा थाट, त्यांचा लवाजमा, त्यांचे राहणीमान याविषयीच्या कथा ऐकून आपण आजही अचंबित होतो.
अशाच काही नवाबाचे उंची आणि चमत्कारिक शौक यावर आपण या लेखातून एक दृष्टीक्षेप टाकणार आहोत.
महमुदाबाद सास्थानिकांचे शाही घराणे
उत्तरप्रदेशच्या सीतापूरजवळ कधीकाळी महमुदाबाद घराण्याची सत्ता होती. या शाही कुटुंबाकडे अगणित संपत्तीचा खजिना होता. हे संस्थान एकेकाळी अयोध्येच्या नवाबांच्या अखत्यारीत होते. या संस्थानिकांच्या वंशजांना आपल्याच संपत्तीसाठी सरकारशी लढावे लागले. या संस्थानाचे वारसदार मुहम्मद खान गेली अनेक वर्षे या संपत्तीसाठी संघर्ष करत आहेत. कारण त्यांची संपत्ती सरकारने शत्रूची संपत्ती म्हणून हस्तगत केली होती.
यामागे कारणही तसेच आहे.
मुहम्मद खान यांच्या वडिलांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. ते पाकिस्तानमध्ये निघून गेले पण, त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय इथे भारतातच राहिले. महामुदाबाद संस्थानिकांच्या संपत्तीचा आकडा ऐकला तरी आपले डोळे गरगरतील.
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळून यांची तीन हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्यासाठी हे न्यायालयीन लढा देत आहेत. मुहम्मद खान यांचे वडील अमीर अहमद १९५७ साली भारत सोडून पाकिस्तानला निघून गेले. भारत सरकारने १९६८ साली एक कायदा संमत केला. या कायद्यानुसार शत्रू राष्ट्रात जाणाऱ्यांची संपत्ती जप्त करून सरकारी तिजोरीत जमा केली जात असे. मुहम्मद खान यांची संपत्ती देखील याच कायद्याच्या अनुषंगाने जप्त करण्यात आली. भारत सरकारकडून ही संपत्ती परत मिळवण्यासाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला आहे.
हैद्राबादचे निजाम
बेहिशेबी संपत्ती असणाऱ्या नवाबांच्या यादीतील आणखी एक नाव म्हणजे, हैद्राबादचे निजाम. त्यांचे संस्थान भारतात विलीन झाले असले आणि संस्थाने खालसा केली असली तरी, या संस्थानांच्या वारसदारांकडे आजही भरपूर संपत्ती आहे.
हैद्राबादचे निजाम मीर साहेब यांची दाखल फोर्ब्ज मासिकाने देखील घेतली होती. फोर्ब्जच्या २००८ सालच्या जगातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत या निजामांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.
फोर्ब्जच्या दाव्यानुसार जगात ते पाचव्या क्रमांकांचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे १३० अब्ज रुपयांची संपत्ती होती. यावर्षी बिल गेट्स यांचे नाव २०व्या स्थानावर होते.
हैद्राबादचे निजाम मीर ओस्मान आली खान यांच्या आणखी एका छंदाचीही आवर्जुन चर्चा केली जाते.
त्यांच्याकडे १८५ कॅरेट वजनाचा एक हिरा होता. ज्याची किंमत जवळपास १४ अब्जाच्या घरात असेल. या हिऱ्याचा वापर ते पेपरवेट म्हणून करत असत.
यावरून त्यांच्या संपत्तीचा आपण अंदाज लावू शकतो. इतकेच नाही तर त्यांच्याकडे नोकरचाकरांचाही खूप मोठा लवाजमा होता. लवाजमा नव्हे याला एक छोटी फौज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतके नोकर-चाकर पदरी असणारे ते जगातील एकमेव व्यक्ती असतील.
१९६७ साली त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे १४ हजार पेक्षा जास्त नोकर होते. त्यांच्या महालाच्या संरक्षणासाठीच तीन हजार शिपाई होते. या नवाबांना फक्त पाणी देण्यासाठी २८ नोकर होते. या नवाबांचे शौक असे होते की, यांनी फक्त पान बनवण्यासाठी आणि सुपारी फोडण्यासाठी कितीतरी नोकर ठेवले होते.
जुनागढचे शेवटचे नवाब
जुनागढच्या नवाबांचे शौक तर काही औरच होते. या नवाबांचे प्राणी प्रेम विलक्षण होते. मुहम्मद महाबत खानजी हे जुनागढचे शेवटचे नवाब होते. फाळणीनंतर हे नवाब पाकिस्तानात गेले पण, त्यांची सारी संपत्ती त्यांनी इथेच सोडली.
या नवाबाचे जनावरांवर खूप प्रेम होते. त्यांच्याकडे अनेक प्रकारचे प्राणी पाळलेले होते. हे प्राणी त्यांनी विविध ठिकाणाहून आणले होते. त्यांच्याकडे विविध जातींचे ३०० कुत्रे होते. कुत्र्यांचा तर ते खूप लाड करत.
या कुत्र्यांचा ते वाढदिवस करत, यासाठी सर्वांना शाही मेजवानी दिली जात असे. त्यांच्याकडील प्राण्यांचे ते लग्न पण लावत असत. या लग्नसोहळ्यांचेही भव्य आयोजन केली जाई.
नवाबांचा हा शौक अनेकांना बुचकळ्यात टाकत असे. अनेक वन्य प्राण्यांनाही त्यांनी संरक्षण दिले होते.
फैजाबाद किंवा अवध संस्थानचे मुहम्मद याहीया मिर्जा असफ उद्दौला
मुहम्मद याहीया मिर्जा असफ उद्दौला यांना १७३८ साली ब्रिटीशांनी अवध संस्थानचे नवाब बनवले. अवधच्या या नवाबांनी लखनौमध्ये एक मोठा इमामवाडा बांधला आहे. याला भूलभुलैया म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या संस्थानात त्याकाळी सलग पाच वर्षे दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने लोकांची अवस्था अगदी दयनीय बनली होती.
मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार झाले होते. त्यांच्यावर उपाशी मरण्याची वेळ आली होती. या दुष्काळातून लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी हा इमामबाडा बांधण्याचा निर्णय घेतला.
या इमामबाड्याच्या बांधकामासाठी त्यांनी २० हजार लोकांना रोजगार दिला होता. हाताला काम नसल्याने कुणावरही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. म्हणून जोपर्यंत दुष्काळ संपत नाही तोपर्यंत या इमामबाड्याचे काम बंद करणार नाही असे आपल्या जनतेला त्यांनी आश्वासन दिले होते.
लखनौमधील हा इमामबाडा आज जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत गणला जातो. जनतेच्या काळजीपोटी या नवाबाने आपला खजिनाही रिता करण्यास मागे पुढे पहिले नाही.
भारतातील श्रीमंत आणि शाही घराण्यातील नवाबांच्या अशा चमत्कारिक आणि औदार्याने भरलेल्या अनेक कथा आपल्याला आजही ऐकायला मिळतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.