आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
राहुल गांधींच्या बाबतीत एक गंमत आहे. ते खरं बोलतात. प्रश्न इतकाच आहे की ते नको तिथे खरं बोलतात! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतील पराजयासोबतच केरळमधील वायनाड येथील विजयामुळे राहुल गांधींची खासदारकी शाबूत राहिली होती. केरळमधील तिरुवनंथपूरम येथील प्रचारसभेत त्यांनी केरळवासीयांचं कौतुक केलं. ते म्हणाले:
“पहिली १५ वर्षे आपण उत्तरेकडील खासदार होतो. आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. केरळला येणं आपल्यासाठी खूप नवीन होतं. कारण इथल्या नागरिकांना फक्त विषयांतच रस नाही तर त्यांना मुद्द्यांच्या तपशिलात जाण्याची रुचिही आहे”.
आता केरळमधील साक्षरतेचा दर आणि मानवी निर्देशांक दर उंचावत ठेवण्याची त्यांची धडपड लक्षात घेता तेथील लोक राहुल म्हणतात तशी जागरूक असणार हे नक्की. पण राहुल गांधी ज्यावेळेस उत्तर भारताविषयी सुरुवात करत हे बोलतात तेव्हा सगळ्यांचं आणि विशेषकरून त्यांच्या माध्यमप्रेमी भाजपायी विरोधकांचं लक्ष ते केरळचं कौतुक करण्याऐवजी उत्तरेला कसे हिणवतात याकडे आपोआप वेधले न गेल्यासच नवल!
ही मुळात भाषेची किमया! उदा. ते जेव्हा असं म्हणतात: “केरळमधील नागरिकांना फक्त विषयांतच रस नाही तर त्यांना मुद्द्यांच्या तपशिलात जाण्याची रुचिही आहे” आणि जेव्हा याची सुरुवात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या वेगळेपणावरून झालेली असते, तेव्हा ते नकळतपणे ‘ उत्तर भारतात हे कसं होत नाही’ हे सुचवून जातात.
विरोधकांच्या हातात त्यामुळे आयतंच कोलीत मिळतं. आणि मग त्यांच्या मुख्य राजकीय प्रतिस्पर्ध्यांची त्यांच्यावर आगपाखड सुरु होते. स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेविषयी कितीही वाद असले तरी त्या फर्ड्या वक्त्या, चतुर राजकारणी आणि कष्टाळू व्यक्ती आहेत. २०१९ ची अमेठीतील ‘जायंट किलर’ ही उपाधी त्यांनी मेहनतीने मिळवली आहे. अशी आयती चालून आलेली संधी त्या कशी सोडतील? भाजपने इराणींच्या जोडीला राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, परराष्ट्रमंत्री जयशंकर, उग्रमुखी आणि आकांडतांडवी हिंदुत्वाचे नायक मुख्यमंत्री योगी यांची फौज राहुल गांधींविरोधात उभी केली.
यात कळीचा मुद्दा नेहमी मागे राहतो. GST आणि त्यासारख्या अनेक भाजपच्या धोरणांनी दक्षिण भारताच्या हितांकडे नेहमी दुर्लक्ष केले. उत्तर भारतकेंद्री गाय, हिंदी आणि हिंदुत्व यांवर आधारलेल्या भाजपच्या राष्ट्रवादाला कर्नाटक वगळता दक्षिण भारताने नेहमी नाकारले आहे. असे असतानाही पंतप्रधान मोदींच्या तोंडून दक्षिण भारताविषयी अनवधानानेही कुठलेही चुकीचे किंवा उपहासात्मक उद्गार निघत नाहीत. भाजप चुका करून त्याविषयी बोलत नाही आणि राहुल बोलण्यातूनच आपल्या चुकांना जन्म देतात.
अनेक वर्षे काँग्रेसची उत्तर भारतात सत्ता होती. असे असतानाही राहुल गांधींच्या विधानाची परिणती, भाजप त्यांच्या विधानाची संभावना अमेठीतील पराभवाचे ‘शल्य’ आणि त्यामुळे गांधींचा उत्तर भारतद्वेष अशी करण्यात होते.
नेतृत्वाचे काही ठळक नियम असतात. कुठे काय बोलायचं ते कळायला हवं. कुठे काय नाही बोलायचं ते त्याहूनही आधी माहिती हवं. आपल्या विधानाचा काय ‘अर्थ’ निघेल आणि काय ‘अनर्थ’ होऊ शकेल हेही माहिती हवं. आपण एखाद्याचं कौतुक करताना त्यात तुलना आली की ‘लेकी बोले, सूने लागे’ झालंच म्हणून समजा.
दिल्लीचा रस्ता हा याच उत्तर भारतातून जात असल्याने ‘सूनेला’ म्हणजे या उत्तर भारतीय अस्मितेला अनावधानानेही दुखावून चालणार नाही हे राहुल गांधींनी ओळखायला हवे. नेहरूंसारख्या विद्वान आणि जाणत्या, इंदिरांसारख्या प्रखर पण मितभाषी आणि राजीव गांधींसारख्या शालीन आणि मितभाषी पंतप्रधानांच्या रांगेत बसण्याची मनीषा उरी बाळगणाऱ्या राहुल गांधींनी यातून बोध घेण्याची गरज आहे.
मोदींसारखा फर्डा वक्ता होण्याची गरज नाही. पी. चिदंबरम यांच्यासारख्या स्वपक्षातील नेत्याकडून मुद्देसूद आणि संयमित वक्तृत्वाचे धडे उत्तर-दक्षिण एकत्र हाताळण्यासाठी राहुल यांना फायद्याचे ठरतील. वक्तृत्व हा नेतृत्वासाठीचा एक गुण आहे पण मुद्देसुदता आणि आपल्या विधानांचे लावले जाणारे ‘अर्थ’ आणि ‘अनर्थ’ यांची जाण हे नेतृत्वाच्या मुळाशी आहे.
सगळं माहित असूनही, करून-सवरूनही केवळ आपला संदेश योग्यरित्या पोहोचवता येत नसल्याने राहुल गांधी नको त्या वादात अडकून पडत आहेत. नको तिथे खरं किंवा मनमोकळं बोलण्याच्या या अनावश्यक भोळेपणामुळे ‘ खरं बोले आणि सूने लागे’ अशी स्थिती निर्माण होत आहे. सगळा पक्षच थट्टेचा विषय होत चालला आहे.
G -२३ मार्फत आवाज उठवणाऱ्या नेत्यांमधील कपिल सिब्बलांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींचे कान टोचले आहेत. पण आपल्याविरोधात बोलणारे सगळे आवाज शत्रूंचे आहेत असं समजण्याची भाजपप्रमाणे काँग्रेसमधील परंपराही मोठी आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षासाठी आणि शक्तिहीन विरोधी पक्ष असलेल्या देशासाठीही कोणत्याही स्थितीत ही परिस्थिती फायद्याची नाही. पण नेहमीप्रमाणेच ‘ गळ्यात घंटा बांधणार कोण?’ हा प्रश्न उरतोच!
Rohit Ramchandra Joshi.
Research Scholar, CUK, Karnataka.
9923409591
[email protected]
या माध्यमावर व्यक्त केलेली मतं लेखकांची वैयक्तिक आहेत, संपादक मंडळ कदाचित त्यांच्याशी सहमत असेलही.