लेखक – प्रकाश रणसिंग
कोरोना या एका महामारीमुळे देश बंद होतो. शहरं रिकामी करावी लागतात. भांडवली विकासाची साखळी गळून पडते. शिल्लक राहते ते फक्त भांडवली साख़ळीचा बाह्य भाग की जो वरकड उत्पनाचा कधी भाग झालेलाच नसतो, त्याचं पोट फक्त साखळीला चिकटलेलं असतं. मग साखळी झपकन घसरते. कड्या शाबूत राहतात आणि आपापल्या ठिकाणी येतात. शहर गॅलरीत जमा होतं आणि रिकामी पोटं रस्त्यावर येतात.
कोरोनामुळे मजूर आणि माणूस हा फरक अधिक स्पष्ट झाला. भाडवली व्यवस्थेला माणूस लागत नाही मजूर लागतो.
मजुरांनी शहरं सोडून आपआपल्या गावांचा रस्ता धरला. उपाशी पोटी मजुरांनी आपआपल्या पद्धतीने गावं जवळ केली. काही काही मजुरांनी पाचशे सातशे किलोमीटरचं अंतर पायी कापलं. एका मजुराचा गावात पोहचायच्या आधी अती थकव्याने आणि भुकेने मृत्यू झाला.
आपल्या कुटंबासोबत पायी चालताना अपघातात मजूर बळी गेले. कोरोनाच्या आधी आमचा भुकेने बळी जाणार अशा प्रतिक्रिया मजुरांनी दिल्या. आपलं गाव जवळ करण्यासाठी मिळेल त्या वाहनाने मजुरांनी प्रवास केला. तमिळनाडूला मुबंईतील तीनशे मजूर एकाच कंटेनरमधून प्रवास करत होते तर सुरतला दूधाच्या टँकरमधून प्रवास करत होते.

मजुरांचे गावाकडे दयनीय अवस्थेत होणारे स्थलांतर लक्षात घेऊन सरकारला खरं तर फार उशीरा जाग आली आणि काही तुटपुंज्या गाड्यांची सोय केली गेली.
ऊसतोड कामगारांचे तर खूप हाल झाले. अचानक लॉकडाऊन झाल्याने परत आपआपल्या घरी जाणं कठीण झालं. मुकादम कामगारांना सोडून निघून गेले. कारखान्यांनी जबाबदारी झटकली. शेवटी ते आहे तिथेच राहीले. आणि मदतीची वाट बघत राहावं लागलं.
काही साखर कारखाने लॉकडाऊन झालं असताना सुद्धा चालूच होते. साखर काढणारी माणसं तेवढी पिळून निघाली. अजुनही तीच अवस्था आहे. शहर जे घडवतात त्यांनाच शहरात जागा नव्हती राहीली.

खरं तर फक्तं शारिरीक श्रमाची विक्री बंद झाली होती. बाकीच्या गॅलरीमधल्या लोकांसाठी वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. गॅलरीमध्ये सगळं व्यवस्थित चालू राहिलं. गॅलरीमधल्या लोकांच्या मनोरंजनासाठी रामायण, शक्त्तीमान सारखे अद्भुत शक्तीवाले कार्यक्रम सरकारने सुरु केले.
प्रधानसेवक गॅलरीतल्या लोकांना मनोधैर्य टिकण्यासाठी वेगवेग़ळे प्रयोग सुचवत होते. थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, नंतर दिवे पेटवा असं. सगळं गॅलरीतल्या लोकांचं लॉकडाऊन सुरु झालं होतं.
कोरोनापासुन वाचण्यासाठी लॉकडाऊन केला खरं, पण निम्यापेक्षा जास्त लोकाना माहीतच नव्हतं की काय चाललंय आणि काय नाही. प्रत्येकजण आहे तिथे अडकुन पडला होता. जे मजूर, कामगार गावाला गेले तिथंही पोटाचा प्रश्न होताच. यात सगळ्यात जास्त परवड आदिवासी आणि भटक्या विमुक्तांची झाली. महानगराशेजारी असणाऱ्या आदिवासी जमातींवर उपासमारीची वेळ आली.
महानगरामध्ये तरुण मुलं काहीना काही कामांसाठी जात होती तर ती कामं पुर्णपणे बंद झाली. उदा. ठाणे, मुंबई महानगराच्या परीसरात असनाऱ्या कातकरी, वारली जमातीवर लॉकडाउनचा विशेष परिणाम झाला. कातकरी महिला रानातल्या भाज्या घेऊन महानगरांच्या भाजी बाजारात येत, तर त्याही बंद झाल्या.
एक तर शहराने नैसर्गिक साधनसंपत्ती गिळंकृत केलेली आहे. आदिवासींच्या हातात काहीच उरलेलं नाही आशा परिस्थितीत हे आदिवासी पाडे भुकबळीच्या दिशेने सरकत आहेत. कातकरी जमातीचे लोक जास्तीत जास्त वीटभट्टीवर सहासहा महीने जातात. तिथंच कामाच्या ठिकाणी भट्टीवर राहतात. लॉकडाऊनचा कोणताही मागमूस त्याना लागला नाही आणि ते तिथेच अडकून राहिले.
काम नाही तर खायचं काय असा प्रश्न समोर उभा राहीला. ह्या सगळ्या माणसांच्या कष्टांनी पुणे, मुंबईसारख्या महानगरांच्या गॅलरी उभ्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर परिसरात महादेव कोळी आणि काही कातकरी जमाती भिमाशंकर या पर्यटन स्थळावर अवलंबुन आहेत.
परिसरात असणाऱ्या औषधी वनस्पती विकणे, छोट्या छोट्या खेळण्या विकणे आदी वर त्याचं पोट भरणं चालू असतं. ह्या लॉकडाऊनच्या स्थितीत त्याही जमातीवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त कातकरी जमातीचीच ही परिस्थिती नाही तर भिल्लं जमातीचीपण अशीच स्थिती आहे.
सरकारनं रेशनींगचं धान्य वाटप करायचं ठरवलंय पण काही आदिवासी आणि भटक्या जमातीतील बऱ्याच लोकांकडे रेशनकार्ड नाही की रहिवासीचा कोणता कागदावरील पुरावा नाही. बऱ्याच लोकांचे तर रेशनपुरवठ्याची दुकानं आणि आदिवासी पाडे याचं अंतर खूप आहे.

सरकारने अशा वेळेस आदिवासींच्या पाड्यावर धान्य आणि गरजेच्या अत्यावश्यक वस्तू पोहचवणं आवश्यक आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डहाणु विधानसभा मतदार संघाचे आमदार विनोद निकोले हे स्वतः आदिवासी पाड्यावर जाऊन अन्नधान्य पोहचवत आहेत.
सरकारने जनधनमधून प्रत्येकाच्या खात्या मधे ५०० / १००० मदत करण्याचं ठरवलं पण अशा लॉकडाउनच्या काळामधे आदिवासी पाड्यावरचे लोकं पन्नास ते साठ किलोमीटरवर असणाऱ्या बँकाच्या शाखेत कसे पोहचतील.
अशा प्रकारे सरकारी उपाय योजना आणि स्थानिक परिस्थिती यात खूप तफावत आहे. आदिवासींसाठी त्या त्या भागात स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. त्या मदत कक्षामार्फत आदिवासीच्या भाषेत कोरोनाविषयी जनजागृती सुद्धा आवश्यक आहे.
भटक्या जमातींचा जर विचार केला तर या जमाती आता हवालदिल परिस्थितीत आहेत. भटकंतीत मिळेल ते काम, मिळेल तिथे चार-आठ दिवस मुक्काम करणाऱ्या फासेपारधी, जोशी, कुडमुडे जोशी, वैदु, नंदीवाले, धनगर, लोहार, घिसाडी, गोसावी, बेलदार, गारुडी,आदी सारख्या जमाती पूर्वीपासून मूलभूत सोयी सुविधापासून वंचित आहेतच त्यात कोरोना सारख्या महामारीनं जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेशनचं धान्य रेशन कार्ड असल्यावरच मिळते ते रेशन कार्ड सुद्धा भटक्याजमातीकडे नाहीत. घर नाही कोणत्या घरात बसायचं? भटक्या जमातींचा हा प्रश्न आजच उपस्थित झाला नसून हा प्रश्न कायम स्वरूपाचा आहे. जर या प्रश्नाच्या बाजूने शासन स्तरावर यापूर्वी काम झालं असतं तर आता या माणसांवर उपासमारीची वेळ आली नसती.
एखाद्या लहान मुलाला भूक लागली म्हणून उंदीर मारायचं औषध खावं लागलं नसतं. समाजसेवी संस्था पुढं येऊन अत्यावश्यक सेवांचा चार आठ दिवस पुरवठा करतील आणि नंतर लॉकडाऊन असच काही दिवस राहिलं तर परिस्थिती गंभीर होईल.
शासनाने काही दिवस का होईना फिरती मोफत भोजनालये सुरु केली पाहिजे जेणेकरून वंचित घटकातील कोणताही व्यक्ती उपाशी राहता कामा नये. शासनाचा शिवभोजन थाळीचा उपक्रम आहे पण तिथपर्यंत जाण्यासाठी बाहेर पडावं लागेलच ना?
शासनसंस्थेला आता एकाच वेळी अनेक पातळीवर काम करावे लागणार आहे. एकतर कोरोनापासून लोकांचं सरंक्षण करणं आणि दुसरं म्हणजे भूकबळी जाऊ न देणं.
विशेषतः वंचित समाज घटकांवर भर द्यावा लागणार आहे. भुकेचा प्रश्न तर सोडवावाच लागणार आहे पण त्याच वेळी सामाजिक सौहार्द सुद्धा जपावं लागणार आहे. नाहीतर आधीच वंचित आणि अल्पसंख्य असणाऱ्या समाजाचे तिहेरी बळी जातील.
या सर्व समस्यांवर काम करण्यासाठी स्थानिक पातळीवर जागृती समित्यांचं गठन करायला पाहिजे. या समित्याद्वारे आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागतील. आरोग्य व्यवस्थेत तर सुधारणा आवश्यक आहेतच पण भारतीय सामाजिक रचनेचा विचार करता आपण जेव्हा कोरोना नंतरच्या जीवनाचा विचार करु त्यावेळी समाजिक परिणामांचा विचार अवश्य करावा लागणार आहे.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









